Kaayguru.Marathi

रविवार, ऑक्टोबर ३१, २०२१

प्रियदर्शिनी इंदिराजी

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान 
स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची आज पुण्यतिथी:
 शब्दसुमनांनी श्रद्धांजली 🌹🙏
✍️ इंदिराजी गांधी

कमला   जवाहरांची  इंदू
अटलजींच्या  दुर्गेचा मान
मोरारजींची   गुंगी गुडिया 
गौरवग्रंथी स्तुतीसुमनांचे पान 
करितो कोटी कोटी प्रणाम. १

बालपणी निर्मिली वानरसेना 
मुक्त  कराया  भारत   देशा 
केली जुलमी इंग्रजाची दैना
भोगीयलास तूम्ही कारावासा
करितो कोटी कोटी प्रणाम. २

बलाढ्य भारत सिद्ध कराया
तुझसी आवडे  विज्ञानक्रांती 
जगी  निःशस्त्रीकरण प्रणेता 
ध्यास  मनी   तव  विश्वशांती 
करितो  कोटी  कोटी  प्रणाम. ३

कणखर   नेता  विश्ववंदिता 
आद्य  हो महिला पंतप्रधान 
आत्मबळे एक्कात्तरचे समरी 
पाकचे  गळविले  देह -भान 
करितो  कोटी कोटी प्रणाम. ४

कथनी  अन् करणी यात 
कधी ना  केला तूम्ही भेद 
कर्तृत्व तुमचे महान एवढे
कोणी   ना  करीला   छेद
करितो कोटी कोटी प्रणाम. ५

श्वासात जनविकास ध्यास 
तुमचे जाणे एक विरमरण
भारतरत्न !  इंदिराजी.. .
हे तर... मातृभूमिस समर्पण 
तुम्हा कोटी कोटी वंदन ! ६

तुम्ही तर मुत्सद्दी आदि अंती 
जगी जन्म नसे कोणी दूजा
तुमच्या दृढसंकल्पा पुढती
उंच हिमगिरी वाटे हो खूजा
करितो कोटी कोटी प्रणाम! ७

© शब्दसौदर्य :-
प्रा.श्री.पुरूषोत्तम पटेल

त्रिवेणी लेखन प्रकार : नियम

काव्यलेखन प्रकार : त्रिवेणी 
नियम:-
१) त्रिवेणी ही रचना लिहायला अगदी साधीसुधी अशीच! त्रिवेणी म्हणजे तीन.तीन ओळीत लिहावयाची ही रचना,म्हणून हि " त्रिवेणी रचना " म्हणून ओळखली जाते.
२) त्रिवेणी ही रचना करतांना प्रत्येक ओळीत अक्षरांचे बंधन नाही.मात्र पहिल्या ओळीत जितकी शब्दसंख्या असेल तितकीच शब्दसंख्या तिस-या ओळीतही असावी.म्हणजेच पहिल्या आणि तिस-या ओळीत शब्दसंख्या सारखीच असावी.
३) पहिल्या दोन ओळीत एक विचार मांडलेला दिसतो.तर,तिसरी ओळ कधी पहिल्या दोन ओळींच्या अर्थामध्ये भर घालते.तर कधी ही तिसरी ओळ वेगळाच अर्थ- किंवा दृष्टिकोन देऊन जाते.
४) दुसरी ओळ लयबद्ध आणि अर्थपूर्ण होईल.इतकेच शब्द असावेत.म्हणजेच,या ओळीत पहिल्या आणि तिस-या ओळीत असतात इतके शब्द असणे बंधनकारक नाही.
५) पहिल्या आणि दुसऱ्या ओळीत शेवटच्या शब्दांत " यमक " साधला जावा.ह्यामुळे त्रिवेणी वाचतांना लयबद्धता येऊन नादमयता येते.

चला तर...✒️ लिहू या त्रिवेणी काव्य !

माझी प्रिया [ त्रिवेणी ]

तूच माझा श्वास तुझ्याविना गोड लागेना घास = 
[७ शब्द संख्या]
तुझ्याविना क्षणाक्षणाला होतात भास! 
प्रिये आयुष्यभर तुला सुखी पाहीन देवाला विनवतो ! = [७ शब्द संख्या.]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शनिवार, ऑक्टोबर ३०, २०२१

गाव माझा

गाव माझा 💎

प्रिये,  गाव   माझा    टुमदार  
येऊन  तर  पहा   तू   एकदा 
इथले  नदी  वृक्ष   पाखरं 🐦 
होतील  ग्   तुझ्यावर  फिदा 

तापी - वाकी गोमाई सरिता 
गाव  परिसराच्या भाग्यदाता
सुजलाम्   सुफलाम्  करीती
बळीराजाला या तिन्ही माता 

इथली  काळी कसदार माती
गोड   गोड  जपते  ग्   नाती 
केळी पपई गोड ऊसाचे मळे 
अन्  कापूस  भासे श्वेतमोती

रानातल्या   येता जाता वाटा
चढणी-उतरणी अन् नागमोडी 
त्यावर चालतांना   भासशील   
तू  तर  मनमोहक  गुलछडी ! 

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " 

शुक्रवार, ऑक्टोबर २९, २०२१

बुद्धीकौशल्य

बुद्धीर्यस्य बलं तस्य निर्बुद्धेस्तु कुतो बलम् |
वने  सिंहो मदोन्मतः  शशकेन  निपातितः |
       आचार्य  चाणक्य म्हणतात की, ज्या व्यक्तीजवळ  बुद्धी असते, शक्तीसुद्धा तिच्याजवळ असते. बुद्धीहीनाचे बल असुनही
ते बल  व्यर्थ आहे. कारण  बुद्धीच्या जोरावरच   व्यक्ती बळाचा उपयोग करु शकते. अन्यथा नाही. बुद्धीच्या बळावरच  एक ससा जंगलातील गर्विष्ठ सिंहाचा मृत्यूला कसा कारणीभूत झाला. यासाठी हा दृष्टांत,
         जंगलातील  सर्व  लहान-मोठ्या प्राण्यांनी वनराज सिंहाच्या जाचापासुन मुक्ती मिळविण्यासाठी सिंहाबरोबर एक करार केला.करारानुसार जंगलातील एकेक प्राण्यांने दररोज वनराजाकडे त्याचे भोजन बनुन जावे. ठरल्याप्रमाणे दररोज  एक प्राणी न चुकता वनराजाकडे भोजन बनुन जाऊ लागला. एक दिवस एका सशाची पाळी आली. सश्याने खुप विचार केला..... आणि  विचारांती मुद्दामच वनराजाकडे खूप उशिरा पोहोचला.
         सश्याला  पाहताच  भुकेला वनराजाने  संतापाने   प्रचंड मोठी    गर्जना केली. आणि  उशिरा  येण्याचे कारण विचारले. ससा म्हणाला, महाराज  क्षमा असावी.मी तुमच्या कडे येत असताना  रस्त्यावर मला एक सिंह भेटला, त्याने मला खायची इच्छा व्यक्त केली. तेव्हा आधी तुम्हाला सूचना  देऊन परत येतो अशी शपथ घेऊन आलो  महाराज!   सश्याचे बोल ऐकून  वनराजा  म्हणाले, कुठे आहे  तो दुसरा सिंह ?  ससा  म्हणाला,  वनराजा !  तो दुसरा सिंह  याच  विहिरीत  लपून आहे. चला महाराज . असे   बोलून  सश्याने  वनराजाला      विहिरीतील      पाण्यात        वनराजाचेच प्रतिबिंब  दाखवले.
         विहिरीतील    दुसरा   सिंह    पाहताच वनराजाने   क्षणाचाही  विलंब  न   करता विहिरीत उडी मारली. मुर्ख  वनराजाने शञुला ठार मारण्यासाठी विहिरीत उडी मारली आणि  तेथेच वनराजाचा अंत झाला.
         तात्पर्य , केवळ  एक बुद्धिमान व्यक्तीच आपल्या शक्तीचा  योग्य उपयोग करू शकतो. बुद्धिहिनाची  शक्ती  त्याला  कधीही  उपयोगी  पडत  नाही. एका  चिटुकला  पण  अत्यंत बुद्धीमान सश्याने  स्वतःपेक्षा  अधिक  शक्तीशाली  असणाऱ्या  सिंहाला मारले.

© प्रा.पुरूषोत्तम पटेल, (सातुर्खेकर)     मुं.पो.म्हसावद
   patelpm31@gmail.com

गुरुवार, ऑक्टोबर २८, २०२१

तोरणमाळ

(महाराष्ट्र राज्याचे द्वितीय क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण :- तोरणमाळ, ता.धडगाव येथील पर्यटनस्थळाचे 
काव्यमय वर्णन. )

     *  माझे तोरणमाळ  *

माझ्या सातपुडाच्या गळा शोभे
सप्तशिखरांची     माळा
तयात गिरी  तोरणमाळ 
भासे स्वर्गसुखाचा मळा              १

माझ्या  तोरणमाळची   माती
देते इतिहासाची  साक्ष 
नांदला पांडवांचा वाली
राजा इथे नाव तयाचे युवनाश्व                    २

माझ्या तोरणमाळची वाट
वळणावळणाची  बिकट
जाता येता खुणावतो 
सुंदर सात पायरीचा घाट      ३

माझ्या  तोरणमाळची भूमी
अहो किती पावन पावन
माय मांडीवर विसावले
पार्श्वनाथ आणि नागार्जून     ४

माझ्या  तोरणमाळची कथा
गातो व्यास न् कालिदास 
धन्य धन्य  या भूमिसी
सहस्रदा नमवितो मी शिष    ५

माझ्या  तोरणमाळवर फिदा
आषाढ - श्रावण  घननीळा
संगे घेऊनिया येतो
फूल फूलपाखरांचा मेळा       ६

माझ्या  तोरणमाळसी लाभले
निसर्गराजाचे वरदान
साग पळस बांबूच्या  वनी
खग गाती मंजूळ गाणं         

माझ्या  तोरणमाळच्या रक्षणा
दोन पुण्यकन्या  खास
गिरीशिखरी एक तोरणाई
दूजी सिताखाई निवास        ८

माझ्या तोरणमाळच्या कुक्षी
यशवंत  गोड जळतळे
शरदाच्या रात्री  खूले
इंद्रलोकीचे सौंदर्य  आगळे    ९

माझ्या  तोरणमाळच्या  अधरी
पद्माचे मोहक दल उले
ईको-पाॅईडशी बोलता

निनाद  तिनदा उसळे         १०

माझ्या तोरणमाळ येऊनी
पहा    खडकी    पाॅईंट
घे रे ...! डोळा साठवून 
भूदेवीच्या स्वर्गीय  थाट       ११

माझ्या  तोरणमाळच्या  भूवरी
उभा ईश् गोरक्षनाथ 
महाशिवरात्रीच्या  रात्री 
त्यांसी भेटे कैलासनाथ         १२

तोरणमाळची  होळी पहा खरोखरी
ढोल  दणाणतो मनोहारी 
शिबलीनृत्य गेरनृत्यात बेधुंद 
बिरि-बासरी संगे नर नारी      १३

माझ्या  तोरणमाळच्या  उदरी
वनौषधी    कितीऽऽतरी
अमृतकुंभ  धरूनिया हाती
येथे उभा भासे हो धन्वंतरी     १४

माझ्या  तोरणमाळच्या  भूवरी
गमते घरं  कौलारू 
गर्द हिरव्या  रानात जणू
हिंडतो सम्राटाचा  वारू          १५

माझ्या  तोरणमाळच्या  वनराई 
गातो  नि रमतो वनपिंगळा
लाविला या एका खगाने
अख्खा  जगताला लळा         १६

माझ्या  तोरणमाळच्या  आभाळी
सूर्यदेव रोज येतो हो... मस्त 
डोळियासी नवनवे  दिसे
सूर्योदय अन् सूर्यास्त            १७

ये रे दोस्ता ... एकदा तू !
पहा कीऽ माझे तोरणमाळ
तू ह्रदयी घे रे साठवून
प्रेम जिव्हाळा  सकळ           १८

कवी :-
प्रा.पुरूषोत्तम पटेल, मु.पो.म्हसावद


ता.शहादा,जि.नंदुरबार, 425432
भ्रमणध्वनी - 8421498724 

Blog-mhasawad. blogspot. In

patelpm31@gmail.com


बुधवार, ऑक्टोबर २७, २०२१

स्वप्नसुंदरी

प्रिये,तू स्वप्नसुंदरी होऊन
चंदेरी पंख लावून
सोनेरी कुंतल उडवित
पहाटस्वप्नी यावे
मलमली मिठीत घ्यावे !

तू तर माझी कमळकळी
पानावर निजलेली 
तू नभीची चांदणी
पाण्यातील रांगोळी
सोबत राहू गाऊ आपण
प्रेम तराणे नवे
प्रिये, तू स्वप्नसुंदरी होऊन
पहाटस्वप्नी यावे
मलमली मिठीत घ्यावे !

तू तर माझी सोनसाखळी
उर्वशी जशी हृदय जाळी
हास्यवदनी गाली खळी
नयन मोहक दंत कुंदकळी
न्हाऊ दे मन माझे
धुंद तुझ्या सवे
प्रिये,तू स्वप्नसुंदरी होऊन
पहाटस्वप्नी यावे
मलमली मिठीत घ्यावे !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल 
         " पुष्प "

मंगळवार, ऑक्टोबर २६, २०२१

काय हो देवा?

काय हो देवा तुम्ही असे का वागता ?
भक्तांच्या ईच्छा  पुर्ण करण्यासाठी
पाच दहा रुपयाचे गोड चणे-फुटाणे मागता ?
माहिती नाही मला तुमच्या भेटीचा रस्ता
पण... तुम्हाला भेटाया म्हणे..
खुपच खाव्या लागतात खस्ता?
हे खरे की खोटे नक्की सांगाल का?
भक्तांपेक्षा म्हणे तुम्ही भोप्यांचेच वेडे
भक्त देतातआणि तुमच्या वतीने
तेच खातात पेढे...
त्यांचा उदरभरणासाठी तुम्हाला केलंय
युगे अठ्ठावीस विटेवरी उभे...
तरीही तुम्ही हात ठेवून कटेवरी
नि:शब्द निश्चल अविरत उभेच..
तुमचे हे वागणं पाहवलं नाही
म्हणून रागावून दूरच उभी रखुमाई
देवा... सांगा ना तुम्हाला प्रिय कोण?
उन्हा पावसात हजारो कोस अंतर चालून
तीन तीन-चार चार दिवस तुमच्या
निमिषमात्र भेटीला आसुसलेला भोळा भक्त...
की मागील दाराने क्षणात येऊन
भेटणारा दांभिक भक्त...?
उत्तर... आषाढी एकादशीला
की कार्तिक वारीला..?
वाट पाहतोय वेड्या आशेने..
©प्रा. पुरुषोत्तम पटेल
           म्हसावद.

सोमवार, ऑक्टोबर २५, २०२१

बा...विठ्ठला !

विठ्ठला   केशवा  विठूराया  पंढरीनाथा
रुप   तुझे  पाहतो  चरणी  ठेवून  माथा

मूर्ती  तुझी  सावळी   गोलटोपी   शिरी
प्रसन्न  वदन   बरवे  दुःख   हरे  श्रीहरी

देवा  कानी  शोभती  लंब  मकरकुंडले 
मन  माझे  स्थिर  करी  दोन  कर्णफुले

कपाळी  तृतीय  नेत्र  वरी  चंदन टिळा 
कंठी  कौस्तुभमणी गळा तुळशीमाळा

वाम वक्षी  खळगी नाम श्रीवत्सलांछन
उजवे वक्षी वर्तुळखंड नाम श्रीनिकेतन

दोन  बाहूवरी  बांधियेले  दोन बाजुबंद
वरदायी  दोन  मनगटी  शोभे  मणीबंध

देवा, देखीले मी डोळा तुझे करकटेवरी
उभा दिसे  मज अठ्ठावीस युगे  वीटेवरी

तुझा  वाम हस्ती भासे  पांचजन्य शंख
उजव्या  हाती  धरीले तू  मोहक पंकज

रुप   तुझे  केशवा पाहिन  जन्मोजन्मी
नको  देऊ अंतर  तुझा भक्तांसी दे हमी

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

रविवार, ऑक्टोबर २४, २०२१

साखरझोप

पहाटेच्या साखरझोपेत....
एक गोड स्वप्न मी पाहिले
प्रिये!अमृतात न्हाली तू!
माझे भाग्य फळा आले

आज स्वप्नसुंदरीचे भाळी मी
कुंकू माझ्या नावाचे लाविले!
प्रिये! मधाळलेल्या देहाने
तू  समर्पित  मजला केले !


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

श्री सुखकर्ता


देवा तू गणराया
तूच बुद्धी दाता
संकट हराया
धाव रे मोरया 🙏

तूच प्रथमेश्वर 
तूच गणाधिश्वर
तूच सुखकर्ता 
धाव दु:ख हराया🙏

मुषक वाहना
पार्वती नंदना
तूच विघ्ननाशना
धाव रे मोरया🙏

तू शूर्पकर्णा
तू लंबोदरा
तू शंभोसुता
धाव रे मोरया🙏

अष्टविनायका तू
रिद्धी सिद्धी वरा
चिंतामणी तू रे
धाव चिंता हराया🙏

© प्रा.पुरुषोत्तम पटेल 
           " पुष्प "
           म्हसावद
   भ्रमणध्वनी-९४२१५३०४१२

शनिवार, ऑक्टोबर २३, २०२१

तुज नमो!

श्री गजाननाय भिमोदराय
उमासुताय   तुज नमो
भालचंद्राय तू गणनायकाय तू
शिवपुत्राय तुज नमो
सिद्धवेदाय तू गणाध्यक्षाय तू
शुर्पकर्णाय  तुज नमो
कांतीदाय तू दिर्घतुण्डाय तू
अव्यग्राय  तुज नमो
करुणामय तू शरण्याय तू
महाग्रिवाय तुज नमो
रत्नसिंहासनाय तू नित्याय तू
मुषकाधिपवाहनाय तुज नमो
अमेयाय तू विकटाय तू
भक्तकल्याणाय तुज नमो
सिंदुरवदनाय तू शांताय तू
एकदंताय तुज नमो
सिद्धिविनायक तू योगीशाय तू
कमलाक्षाय तुज नमो
शरण्याय तू  पूर्णाय तू
वेदस्तुताय  तुज  नमो
सुमुखाय तू गणेशाय तू
अनंताय   तुज   नमो
तुज नमो! तुज नमो ! तुज नमो!

© प्रा. पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, ऑक्टोबर २२, २०२१

अंगाई गीत

अंगाई ✍️
हातांचा करुनी पाळणा
ओढिते ममतेची दोरी
निज निज माझ्या बाळा
गाते तुला मी अंगाई ।।धृ।।

परतुनी आल्या गोठ्यात गाऊ
खोप्यात निजले चिऊ अन् काऊ
सवे खेळाया नाही कोणी
निज निज माझ्या बाळा 
गाते तुला मी अंगाई ।।१।।

नारायण गेला नारायणी
झाले शुभं करोती म्हणोनी
अंगणी झगमगे काजव्यांचा वाती 
निज निज माझ्या बाळा
गाते तुला मी अंगाई ।।२।।

गगनी चांदोबा उगवला 
चांदणं रांगोळी स्वागताला
निद्राराणी आली स्वये तुला जोजवाया
निज निज माझ्या बाळा
गाते मी तुला अंगाई ।।३।।

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, ऑक्टोबर २१, २०२१

माझी शाळा (कविता)


म्हसावद, ता.शहादा येथील कुबेर हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय या विद्यामंदिर विषयी कविता

माझी   शाळा 

माझी शाळा लळा लाविते बाळा
उपदेशाचा गोड गळा संजीवनी मज शाळा 


ज्ञान सेवा तू साफल्यम् ब्रिद असे हिचे थोर
ज्ञानियांचे जणू माहेर गाव म्हसावद शाळा कुबेर


थोर येथे गुरु परंपरा प्रितीची सदा वाहे धारा
जातीभेदासी नसे थारा समता पेरीतसे वारा


दूर करिते अज्ञान सकलां करीते सज्ञान
सांदिपनी जणू वरदान भासे सद्गुणांची खाण


चहू दिशी वृक्ष सावली दिनांसी शोभे माऊली
या रजकणांची धुळी शिष्य लाविती भाळी

            
कर्तृत्वाला देई मान अभ्यासाला मोठ्ठे स्थान
कुणी न् मोठा कुणी न सान शिकवी हा मंत्र महान


अशी ही धन्य धन्य माझी कुबेर शाळा
दोन्ही कर जोडून माझे कोटी प्रणाम

शब्दसौदर्य :प्रा.पुरूषोत्तम पटेल
उपमुख्याध्यापक,
कुबेर हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद, ता.शहादा


बुधवार, ऑक्टोबर २०, २०२१

आई-बाप

आई बाप हे दैवत माझे मज लाभले जन्मभरी तयांच्या चरणतळी भासे मज काशी अन् पंढरी ! मुखावरी विलसे त्यांच्या कोटी कोटी सूर्य भास का मांडू गा-हाणे देवा! भास तुझे ह्या हृदयांतरी! प्रभो,गाईन मी आवडीने तुझीच रे नामावली अशीच राहो कृपा अनंता जन्मोजन्मी तुझी मजवरी © प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

हे प्रभो !

हे प्रभो,
जेथे जातो तेथे तू असावा माझा सांगाती
निति ऐसी दे मज अकर्म दिसे भीती
दे गती दे  मज शुद्धमती  !
पाप न यावे मनी,हीच माझी प्रार्थना !

वृक्ष-वल्ली दिसो डोळा
खग उडू दे दशदिशी  !
आनंदात न्हाऊ दे सकल सृष्टि !
दानवता जळू दे,मानवता फूलू दे !
बंधुभाव उपजो मनी,हीच माझी प्रार्थना !

दु:ख दैन्य जळो भले
उमलू दे हर्ष मोद पुष्पदले
उच्च नीच नसे भाव
माऊलीचे पसायदान,मुखी गाऊ दे !
गीताज्ञान कळू दे सकला,हीच माझी प्रार्थना !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, ऑक्टोबर १९, २०२१

कोऽऽजागर्ती


कोऽऽजागर्ती कोऽऽजागर्ती
बोलत येईल लक्ष्मी भेटीला
सुख समृद्धी अन् आरोग्य
देईल हो आपुल्या भक्ताला

बंधुराज चंद्र आज उधळी
अमृत किरणांची गोळी
गौदुग्धी आपुले रुप दावूनी
मानवा देई संजीवक हाळी

समस्त वाचकांना " कोजागिरी " 
पौर्णिमेच्याा अमृतमय मन:पूर्वक
हार्दिक शुभेच्छा!🌹🙏🙏🙏

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

स्वच्छ भारत,समृद्ध भारत

स्वच्छ भारत 
चला रं... उठा रं... 
स्वच्छतेची शपथ घेऊ र्
मिळून सारे भारतीय आपण
भूमाता सुंदर करु र्

नरेंद्र मोदी साहेब र्
स्वतः हाती घेती झाडू र्
पाहून त्यांचे कार्य आपण
यशस्वी करु अभियान र्

कचरा राहता घरात र्
वाढते रोगराई र्
उचलून फेका कचरा बाहेर
जपा आपुले आरोग्य र्

गाव असो वा शाळा र्
टाकू नका तिथं कचरा र्
स्वच्छ राखू परिसर आपुला
पर्यावरण जपू या र्

ऐंका बापुची वाणी र्
तुम्ही सारे सुजाण र्
जिथे राही स्वच्छता 
देव तिथेचि वसतो र्

® प्रा.पुरूषोत्तम पटेल , म्हसावद

सोमवार, ऑक्टोबर १८, २०२१

बायको नावाचं पुस्तक

बायको नावाचे पुस्तक (कविता )

मित्रहो,बायको...अत्यंत संवेदनशील विषय. " बायको " ही प्रत्येक नव-याची अंतर्मनाची प्रेमळ हाक आणि मदतीची साद असते.तिच्याविषयी प्रेमाच्या गोष्टी जशा हृदयात साठवतो न् आपण ; तशाच  कडू गोष्टीही आपल्याच हृदयात जतन कराव्यात.कोणाशीही हा " ओटीपी " कधीही शेअर करु नका.[हीच जाणीव बायकोने ही ठेवावी  !]


बायको नावाचं पुस्तक 
आजन्म जपावे मनात
संसारातील छोटी मोठी गोष्ट
निरंतर जपावी हृदयात

बायको नावाच्या पुस्तकांची
पाने फाडू नये चारचौघात
कडू असो वा गोड आठवण
निरंतर जपावी आपण हृदयात

असावी प्रेमळ अतिसुंदर
छबी नवरोबाच्या मनात
दोघांत दिसू नये कधी अंतर
दिसावी एकमेकांच्या हृदयात

दोघांची जोडी जणू शोभावी
लक्ष्मी-नारायण जनात
कणभरही संशयाला नसावी 
जागा नवरोबाच्या हृदयात

बायको स्रित्वाचे एक दैवी रुप
ती तर नवदुर्गा सप्तखंडात
प्रसन्न वागा प्रतिदिन तिच्याशी 
क्लेश ठेवू नये हृदयात

बायको म्हणजे संसाराची 
फुलणारी पुष्पलता सुगंधित
जपावा तिच्या शब्द नवरोबाने
गीता वेद समजून हृदयात !


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

रविवार, ऑक्टोबर १७, २०२१

रुप-स्वरुप

रुप-स्वरुप (कविता)

शोना, क्षणभर पाहता तुला
तू माझा हृदयात केले घर
आता तर शक्यच नाही ग्
तुझ्याविना दूर राहणं क्षणभर

राणी सांगतो मी तुला ऐक !
क्षणात मनात ठसते ते रुप
विचारांना समजून घेऊन 
डोळ्यात साठते ते स्वरूप

प्रिये, तुझ्यासोबत ग् संचार
जीवनात भासे वसंतबहर
तुझ्या एक एक शब्द जणू 
श्वासात भरे संजिवक लहर

सखी,तू तर झाली ग् माझा
संसाराचा कणखर आधार
शब्दच सापडत नाही मला
कसे मानू मी तुझे आभार!

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

 

सुगरण

    सुगरण (कविता)
कधी शिकशील माणसा
सुगरणीची  तू  रे  कला
झाडावर  बांधीला  सुंदर
पिलांना  झुलता  बंगला

तिला  नाही   दोन  हात
ना  कोणी  रे  सोबतीला 
बघ   ईवलुश्या   चोचीने
खोपा   अविट   विणला

तिला   माहित  ना  माप
इंच   मिटर   अन्    फूट
बांधते  नाजूक  फांदीला
खोपा किती सुंदर अतूट

तीन   इंचाचा   हा  पक्षी
काडी  गुंफितो   दिसभर
पिला  आयुष्य   द्यावया
जीव   टांगतो  शेंड्यावर

मुठभरीचा  हा  रे  जीव
माया  ममतेला  चांगला
पिला  वाटते  ना  भिती
निजे बिनघोर खोप्याला

© प्रा.पुरुषोत्तम पटेल 
          " पुष्प "

शनिवार, ऑक्टोबर १६, २०२१

जागतिक अन्न दिवस

             आज दि.१६ ऑक्टोबर : जागतिक अन्न दिवस
         आज १६ ऑक्टोबर... ' जागतिक अन्न दिवस '

संयुक्त राष्ट्रसंघाने १६ ऑक्टोबर १९४५ पासून हा दिवस
 ' जागतिक अन्न दिवस ' म्हणून निवड केली.
याच दशकात जगातील बहुसंख्य देश हे वसाहतवादाच्या जोखडातून मुक्त /स्वतंत्र होऊ लागले होते.या देशांना विकासमार्गाची वाट चालतांना मुख्य अडचण होती " अन्न उपलब्धतेची ! " आणि हाच विधायक दृष्टिकोन ठेवून हा दिवस पालन करण्यास सुरुवात झाली.
  जगात २०२० पर्यंत कोणतीही व्यक्ती भुकेली राहणार नाही.यासाठी युएनए कडून #ZEROHUNGER
 ही एक मोहिम आखण्यात आली आहे.आजच्या दिनाच्या निमित्ताने आपणही त्यात योगदान देण्याचा संकल्प करु या !
💎 जागतिक अन्न दिवसाचे मुख्य उद्देश :-
१) जगभरातील भूक निर्मूलन कार्यासाठी जनप्रबोधन करणे.
२) उपासमारीने पिडीत लोकांसाठी अन्नसुरक्षा आणि पौष्टिक आहाराची आवश्यकता सुनिश्चित करण्यासाठी जागतिक स्तरावर जनप्रबोधन करणे.
३) " अन्न हा प्रत्येक मानवाचा मुलभूत अधिकार आहे " या बाबींवर लक्ष केंद्रित करणे.व प्रत्येकास अन्न पुरविणे.
 
💎 भूक संदर्भात विचार करता काही भयंकर मुद्दे समोर येतात.

१) सध्या जगभरात ६ कोटींहून अधिक लोक उपासमारीचे शिकार बनले आहेत.
२) दरवर्षी ४.५० लाख लोक भूक भागाााावी म्हणून दुषित अन्न सेवन करतात.त्यातच त्यांचे मृत्यू होतात.

 या दृष्टीने विचार करता २०२० ह्या वर्षी 
" वाढवा,पोषण करा,टिकाव धरता,एकत्र या![Grow,Nourish,Sustain, Together]" ही मध्यवर्ती कल्पना (थिम ) निश्चित केली होती.

💎 यंदा २०२१ ची थिम - 

" उद्या निरोगी,उद्या सुरक्षित अन्न ! "

 यानुसार विचार करता आपल्या देशात दर मिनिटाला कुपोषणामुळं दोन बळी जातात. घरात इन मीन तीन माणसं असतानाही नको तितकं स्वयंपाक करुन शिल्लक अन्न फेकून दिलं जातं. आपण हॉटेल मध्ये जेवायला जातो.तेव्हा पाहतो की,डिश मधले जितके खाल्ले जाते.त्याच्या पस्तीस ते चाळीस टक्के अन्न उष्टे म्हणून शिल्लक राहते.हे वास्तव कोणी नाकारू शकत नाही.तसेच हॉटेलमधून पार्सल आणलं की घरातील पोळीभाजीकडं कोणी पाहतही नाही... अन्नाची ही अशी ‘ किंमत ’ केली जात आहे. उत्पादित अन्नधान्य व फळांपैकी सुमारे ४० टक्के सडून / खाली सांडून वाया जातंय. त्यामुळं अन्नाची नासाडी रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. 

💎 लग्न समारंभातील ​अक्षतांचा वापर

हिंदू वैदिक विवाह पद्धतीनुसार लग्नात ‘ वधू-वरांच्या डोक्यावर अक्षता टाकण्याची परंपरा आहे.एका अभ्यास पाहणीनूसार एका लग्नामध्ये सरासरी पाच किलो तांदूळ अक्षतासाठी वापरला जातो. त्यातील फक्त अर्धा किलो तांदूळ वधू-वरांच्या डोक्यावर पडतो. एकूण टाकलेल्या अक्षतांपैकी फक्त दहा टक्केच अक्षता वधू-वरांच्या डोक्यावर पडतात.उर्वरित अक्षता आपल्या एकमेकांच्याच डोक्यावर पडतात,काहीवेळा डोळ्यात जातात.व ईजाही होते. अक्षता म्हणून टाकलेला व फेकलेला उर्वरित तांदूळ पायदळी तुडवला जातो. राज्यात सरासरी दीड लाख विवाह समारंभ होतात.त्यातून सुमारे सहा लाख किलो तांदळाची नासाडीच होते.हा तांदुळ वाचविण्यासाठी लग्नवेदीच्या ठिकाणी दोन मुली उभ्या केल्या व त्यांनी सर्वांच्या वतीने अक्षता टाकल्या तर केवळ शंभर दोनशे ग्रॅम अक्षता वापरून उर्वरीत तांदुळ वाचवता येईल.व त्या तांदुळामुळे दोनशे ते तिनशे लोकांची भूक भागविली जाईल.हाच विचार करून व परिस्थिती लक्षात घेऊन काही संस्था अक्षतांचे तांदूळ गोळा करून गरजू व्यक्तींना दान करतात.

💎 ​लग्नसोहळ्यातील अन्नाची नासाडी

सध्या परिस्थितीत लग्नसोहळ्यातील जेवणावळीचं स्वरुप बदलत आहे. आता पंगतीची पारंपरिक पद्धत कमी झाली असून त्याची जागा बुफे जेवणानं घेतली आहे. ही पद्धतही काही वाईट नाही. मात्र रांग लावून ताट वाढून घेण्याचा त्रास वाचविण्यासाठी अनेक जण ताटात गरजेपेक्षा जास्त वाढून घेतात. लहान मुलांच्या ताटातही सर्व पदार्थ वाढून घेतले जातात.पूर्ण न खाता ताटातुट उष्टे शिल्लक राहते.व ते कचरा कुंडीत तसेच फेकून दिले जाते. या प्रकारामुळं अन्नाची डोळ्यांदेखत नासाडी होत आहे. त्यापेक्षा हवे ते पदार्थ,हवे तितकेच घेऊन " अन्न हे पुर्णब्रम्ह " हा विचार केला तर अन्नाची नासाडी टळेल. उरलेलं अन्न गरजूंना वाटता येईल.

💎 पंगतीत आग्रहाने जेवण वाढणे 

आमच्या भागात अनेक लग्न समारंभात ,कार्यकमाप्रसंगी दिड दोन हजार लोकांची एकच पंगत बसविली जाते.त्यात खास अतिथींना,व-हाडींना, व्याही मंडळींना खास आग्रह करुन " नको ,नको, म्हणतानाही " वाढलं जात.ते खाल्ले न गेल्याने पत्रावळीवर शिल्लक राहते.व उष्टे आणि वाया म्हणून फेकून दिले जाते.हा अनावश्यक खर्च सद्विवेक बुद्धीने टाळता येईल.व अन्नाची नासाडी थांबवता येईल.

💎 ​विविध उपक्रम

अन्नाची नासाडी टाळण्यासाठी तरुण समाजसेवक आणि स्वयंसेवी संस्था यांनी पुढे यावे. संस्था, समाजसेवक ,यांनी जनप्रबोधन करावे.लग्नसमारंभ,कार्यक्रमातील, हॉटेल्समधलं उरलेलं अन्न मिळवावे आणि भुकेल्या गरिबांमध्ये त्याचे वाटप करावे. यामुळं शिजवलेलं अन्न वाया जाणार नाही ते गरजू व्यक्तींच्या मुखात पडेल.व भूक शमविल्याचे आशीर्वाद घेता येईल.

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


वाढदिवस (अलककथा)

                           🎂 💐 वाढदिवस ❤️💎

भूमिका घरातील कामं नेहमीप्रमाणेच लगबगीनं आवरण्यात गुंग होती. ट्रिंगऽऽऽट्रिंग फोनची घंटी वाजली. दुपारचा एक वाजला होता.तीने धावत जाऊन फोन घेतला.
" हॅलो! मॅम, भूमिका बोलताहेत का ? " 
" हो.मी भूमिकाच बोलतेय ? आपण कोण ?"
" मॅम ! जिज्ञासा..तिचा गाडीला अपघात झाला.आम्ही तिला लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये नेतोय,तुम्ही तिथेच या ! "
" ती बरी आ...ऽऽऽहॅलो,हॅलो…! फोन कट झाला होता."
तिच्या मनाची घालमेल सुरु झाली.तिच्या मनात शंका-कुशंकाचे लहान मोठे बेडूक टूणऽऽकन उड्या मारुन एकेक करीत बाहेर पडू लागले.तीला क्षणात घाम फूटून ती घाबरली.अस्वस्थपणे येरझाऱ्या घालू लागली.
   अंगणात बाईक थांबली.दररोज पाच वाजता येणारा अमेय आज एक वाजताच घरी पोहचला होता.त्याला पाहताच ती धावतच बाहेर आली. " बाळ,चल! बाईक स्टार्ट कर.लवकर....लाईफलाईनला पोहचायचयं आपल्याला ! जिज्ञासाला अपघात झालाय रे ! "
दहा मिनिटातच अमेय आणि भूमिका धावतच विचारांचे वावटळ घेऊन लाईफलाईनच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहचले.पाहतात तर,जिज्ञासा हातात बुके घेऊन हास्य करीत तिच्याकडे धावतच आली.

" Happy Birthday My Dear…💐💐💐"

आणि तिने तिला चक्क मिठीच मारली.
"जिज्ञासा,काय हा मुर्खपणा ? तू,आणि मग तो फोन ?"
भूमिकाला पुढे बोलू न देता ती म्हणाली, 
" वेडाबाई, I Lied ! Prank होता तो ! रांधा-वाढा-उष्टी-काढा ह्या वातावरणातून तुला बाहेर काढण्यासाठी…! बाहेरही एक सुंदर विश्व आहे ते आपली आतुरतेने वाट पाहतेय.हे तुला कळावे म्हणून ! चल, खूप मस्ती, मज्जा, धम्माल करु आपण ! "
अमेय त्या दोघीकडे अचंबीत होऊन पाहत होता.
[ टिप: ही कथा एक निव्वळ कल्पनारम्यता असून वास्तवाशी संबंधित नाही.तसे आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.]  
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
    म्हसावद


शुक्रवार, ऑक्टोबर १५, २०२१

बापरे🤭 रावण बोलतोय !🤔

      ✍️जय श्रीराम!🌹🙏
    🤭 बापरे,रावण बोलतोय!🤭

आज विजयादशमी...रावण दहनाचा कार्यक्रम करण्यात आला.मी तिथे उत्सुकता म्हणून गेलो होतो.रावण (प्रतिकात्मक पुतळा) जळतांना चक्क बोलू लागला…!
लोकहो,मी सितेचे एकदाच
अपहरण केले हो !
पण...तुम्ही मला दरवर्षीच
जाळतात हो ! का अन्याय ?

मी सीतादेवीच्या मनाविरुद्ध 
कधी अघोरी वागलोच नाही
अशोक वनात तिच्या सावलीला
क्षणभरसुद्धा थांबलो नाही

सितादेवीच्या अंगालाच काय
नाही घातला वस्रालाही हात 
खरे तर तुम्हीच वागता अघोरी
उत्तर द्या! हिंमत आहे कुणात

तुमच्या राज्यात पावलोपावली
रोज होतात अन्याय अत्याचार
श्रीराम होऊन रामराज्य आणा
करा सारासार तुम्ही विचार !

पोरी- बाळींच्या ईभ्रतीचे तर
तुम्ही लचकेच तोडतात
जाळण्याचा लायकीचे तुम्ही
पण...मलाच का जाळतात?

ऐका,प्रश्न आहे तुम्हाला माझा 
तुमच्या हृदयात आहे न् राम ?
असाल लक्ष्मणाइतके पावन
तरच करा मला जाळायचे काम

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " 






जय श्रीराम

         ✒️जय श्रीराम 🌹🙏
हृदयी वसावा राम नयनी दिसावा राम

विचारात असावा राम ओठी वदावा राम

मनात ठसावा राम कामात बसावा राम

शब्दांत मिळावा राम कर्मात लाभावा राम

सत्य शिव सुंदर राम मी करीतो प्रणाम

वाचावा राम बोलावा राम स्मरावा राम

चौ-याशीचा मुक्तीदाता जन्माचा पूर्णविराम

✒️ विजयादशमी-दसरा पावन पर्वाला
आपणास महन्मंगल शुभदायक 
🙏🙏🙏🌹हार्दिक शुभेच्छा!🌹🙏🙏🙏

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, ऑक्टोबर १४, २०२१

कळी (हायकू )

आठवणीची
कळी हो उमलली
फूल ती झाली
भावार्थ :- कळीची फूल झाल्याचे पाहून अतिव आनंद होतो.तशा सुंदर आठवणी मनाला प्रसन्नता देतात.व त्या आठवणीत आपण हरवून जातो.
पसरे गंध
दशदिशांना मंद
वारा ही धुंद
भावार्थ :- फुलांचा गंध दशदिशांना मंद मंद पसरतो.वाराही धुंदीत न्हाहतो.तसेच आठवणीं ताज्या झाल्या की मनाला धुंद करुन तजेला देतात.
झाला सूर्यास्त
आली कातरवेळ
स्मृतींचा खेळ
भावार्थ:- सूर्यास्त झाला की, कातरवेळ होते.ही कातरवेळ मोठी जीवघेणी.नको त्या स्मृती जीवंत करते.प्रेमात अडचणी आणणा-या व्यक्ती अनेकदा आपलेच प्रियजन असतात.पण,प्रेमात ब-याचदा तेच दुरावतात.ही स्मृती मन विषण्ण करुन जाते.

 © प्रा.पुरुषोत्तम पटेल   " पुष्प "

शारदीय नवरात्रोत्सव: देवी सिद्धिदात्री

🌹शारदीय नवरात्र : नववा दिवस/नववी माळा 🌹
           💎 देवी स्वरुप- सिद्धिदात्री 💎
शारदीय नवरात्र (ऑक्टोबर २०२१) मधील आजच्या नवव्या नवदुर्गेचे स्वरुप सिद्धदात्री...नवव्या माळेला देवी सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते. अश्विन/शारदीय नवरात्रीची सांगता विजयादशमीने होते. आज नवदुर्गा देवी स्वरुप हे सिद्धिदात्री देवीच्या स्वरुपात आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या पृथ्वीतलावर संचार असल्याचे म्हटले जाते.

💎 कमळावर आरूढ सिद्धदात्री देवीचे स्वरुप
दुर्गा देवीचे नववे स्वरुप म्हणजे सिद्धिदात्री देवी. सर्व सिद्धींची अधिष्ठात्री देवी म्हणून देवीच्या या स्वरुपाला
 " सिद्धिदात्री " असे संबोधले जाते. सिद्धिदात्री देवी
 भगवान विष्णूची प्रियतमा देवीलक्ष्मी प्रमाणेच कमलपुष्पाच्या आसनावर विराजमान आहे. देवी मधुर व गोड स्वरांनी आपल्या भक्तांना वरदान प्रदान करते. सिद्धिदात्री देवी सिंहावर स्वार असून चतूर्भूज आहे. एका हातांमध्ये कमळ,दुस-या हाती शंख, तिसऱ्या हातात गदा, आणि चौथ्या हातात सुदर्शन चक्र धारण केले आहे. सिद्धिदात्री देवी सरस्वती देवीचेही एक रुप मानले जाते. देवीने श्वेत वस्त्र परिधान केल्याने तिचे स्वरुप अधिकच मनमोहक भासते.म्हणून देवीला " प्रसन्न वदना " असेही म्हणतात. सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने महाविद्या आणि अष्टसिद्धी प्राप्त होते, अशी भक्तांची श्रद्धा व मान्यता आहे.

💎 अर्धनारीश्वर

१) अणिमा, २) महिमा, ३) गरीमा, ४) लघिमा, ५) प्राप्ती, ६) प्राकाम्य, ७) ईशित्व आणि ८) वशित्व या आठ सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत. देवी सिद्धीदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे. देवी पुराणात वर्णन मिळते की, भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झाले होते. या कारणामुळे भक्त श्री शंकराला ''अर्धनारीनटेश्वर '' या नावानेही ओळखतात.

💎 मंत्र

वन्दे वांछित मनोरथार्थ चन्द्रार्घकृत शेखराम्।
कमलस्थितां चतुर्भुजा सिद्धीदात्री यशस्वनीम्॥

💎 देवी सिद्धिदात्रीचा ध्यान मंत्र

सिद्धगंधर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि ।
सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी।।


💎 सिद्धिदात्री देवीचे पूजन 

     असे म्हणतात की, नवव्या दिवशी सिद्धिदात्रीची पूजा ऋषि-मुनि, साधक, यक्ष, किन्नर, देवता, दानव आणि गृहस्थाश्रमी जीवन व्यतीत करणारे सांसारिक स्री-पुरुष पूजन करतात.देवीची पूजा व व्रत ठेवल्याने व्यक्तीला यश, धन आणि बलाची प्राप्ती होते.
      सिद्धिदात्री देवीचे पूजन करतांना नऊ प्रकारची फुले अर्पण करावे. नऊ जातीची फळ,आणि नऊरसांनी युक्त प्रसादाचा देवीला नैवेद्य दाखवून तो प्रसाद द्यावा.असे केल्याने भक्ताला धर्म, अर्थ,काम,मोक्ष या चार पुरुषार्थाची प्राप्ती होती.


💎 व्रताची सांगता आणि महत्त्व

देवीच्या पूजनाने यश, बल आणि धन प्राप्ती होते, असे म्हटले जाते. देवी आपल्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते, असे सांगितले जाते. तसेच नवरात्राची सांगता सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने होत असल्यामुळे काही ठिकाणी या दिवशीही कुमारिका पूजन करण्यात येते.कुमारिका पुजनानेहीही अनन्य साधारण फळप्राप्ती होते. ९ हा अंक देवीच्या नऊ रुपांचे व नऊ शक्तीचे द्योतक असल्याने या दिवशी ९ कुमारिकांचे मनोभावे पूजन, मान-पान करावे .तसेच भैरव रुपात एका बालकाचीही
पूजा करावी. आणि नवरात्रीच्या विशेष व्रताची सांगता करावी, असे सांगितले आहे.

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
 

बुधवार, ऑक्टोबर १३, २०२१

शारदीय नवरात्रोत्सव: आठवां दिवस : महागौरी

शारदीय नवरात्रोत्सव :आठवा दिवस/आठवी माळ🌹
           💎 नवदुर्गा स्वरुप : महागौरी 💎
 
शारदीय ( ऑक्टोबर २०२१ ) नवरात्रीच्या आठवा दिवस हा देवी महागौरी पुजनाचा असतो. 
२०२१ च्या शारदीय नवरात्रोत्सव यंदा नऊ दिवसांसाठी नाहीतर, आठच दिवसांसाठी साजरा केला जाणार आहे. शारदीय नवरात्र, यंदाच्या वर्षी गुरुवारी ७ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरु होऊन, १४ ऑक्टोबर गुरुवारीच संपन्न होणार आहे. एक तिथीचा लोप झाल्यानं यंदा नवरात्री आठ दिवसच साजरा होणार आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत गुरुचा विशेष योग जुळून येणार आहे. ७ ऑक्टोबर गुरुवारी अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदापासून सुरु होऊन दुर्गा महानवमी १४ ऑक्टोबरपर्यंत साजरी होणार आहे. तसेच १५ ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाणार आहे.

 💎 काय आहे गुरुचा विशेष योग?

भारतीय धर्मशास्त्रानुसार, गुरु हे ज्ञान आणि बुद्धिचे दैवत मानले जातात.. त्यांना सर्व देवांचं गुरु मानलं जातं. यंदाच्या वर्षी गुरुवारी नवरात्री सुरु झाली आणि गुरुवारीच नवरात्रोत्थान होणं शुभं मानलं जात आहे. असा योग अनेक वर्षांतून एकदाच जुळून येतो. 
म्हाळसा फलज्योतिष केंद्राचे (ज्योतिष प्रविण) श्री. वसंत कुलकर्णी ( म्हसावद,ता.शहादा) म्हणाले की, "अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा ६ ऑक्टोबर बुधवारी संध्याकाळी ४.३४ वाजता प्रारंभ झाली आणि जी गुरुवारी ७ ऑक्टोबर दुपारी १.४६ वाजेपर्यंत राहिली.त्यामुळे ७ ऑक्टोबर या दिवशी सकाळी घटस्थापना झाली असून याच दिवसापासून देवीची आराधनाही केली जाते आहे.

💎 देवीचा आवडता रंग
  
आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. देवीला गुलाबी रंग अत्यंत प्रिय असून हा सौभाग्य आणि प्रेमाचे प्रतिक समजला जातो. 

💎 का आठच दिवस साजरी केली जाणार नवरात्र? 

यंदाच्या वर्षी तृतीया तिथी आणि चतुर्थी शनिवारी एकाच दिवशी आली आहे. ज्यामुळे चतुर्थीचा लोप झाला. म्हणून यंदा चंद्रघंटा आणि कुष्मांडा या देवीच्या रुपांची एकाच दिवशी पूजा करण्यात आली आहे. याच कारणामुळं नवरात्रोत्सव आठ दिवस साजरा करण्यात येत आहे. 

💎 देवी स्वरुप: महागौरी 
शारदीय नवरात्रोत्सवात महालक्ष्मी व्रताला आत्यंतिक महत्व आहे.जे भाविक भक्त नवरात्रीला पहिल्या दिवसापासून व्रत ठेवतात.ते नवरात्रीत दुर्गाअष्टमीचे व्रत हमखास ठेवतात.
पौराणिक मान्यतेनुसार भगवान श्रीशिवशंकर आपल्याला पती म्हणून लाभावे.यासाठी पार्वतीने कठोर व घोर तपश्चर्या केली होती.तपाचरणामुळे देवी पार्वतीच्या देहाचा गौर रंग काळा झाला होता.पार्वतीच्या कठोर तपश्चर्येने भगवान कैलासनाथ प्रसन्न झाले त्यांनी देवीला पुन्हा गौरवर्ण प्राप्तीचे वरदान दिले.म्हणून देवी पार्वती ही " महागौरी " म्हणून ओळखली जाऊ लागली.महागौरीचे श्रद्धापूर्वक पूजन करुन आणि महालक्ष्मीचे व्रत राखल्यास भक्तांना सुख,समृद्धी,प्राप्त होऊन त्यांचे पाप नष्ट होते.अशी भक्तांची श्रद्धा आहे.

💎 होम हवन :-

दुर्गा अष्टमीच्या पावन पर्वाला अनेक ठिकाणी होम हवन विधी केला जातो.

💎 देवीचा बीज मंत्र: 

" श्री क्लीं ह्रीं वरदायै नम:। "

अन्य मंत्र:

१] " माहेश्वरी वृष आरूढ़ कौमारी शिखिवाहना।

      श्वेत रूप धरा देवी ईश्वरी वृष वाहना।। "

२] ओम देवी महागौर्यै नमः।

💎 कन्या पूजन व महत्त्व

देवीच्या उत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीत स्त्रीशक्तीची उपासना केली जाते. सरस्वती, दुर्गा,भवानी,अंबा, काली, चंडिका,लक्ष्मी ही स्त्रीशक्तीची प्रमुख रूपे. महन्मंगल मातृरूप पार्वती, कलासक्त गौरी अशा अनेक रूपात तिची आराधना केली जाते. संपूर्ण भारतवर्षात देवीची ५१ शक्तिपीठे असून त्यापैकी साडेतीन पीठे महाराष्ट्रात आहेत.
ती शक्तीपीठे :-
(१) कोल्हापूरची महालक्ष्मी (२) तुळजापूरची भवानी (३) माहुरगडाची रेणुका ही तीन पूर्ण पीठे व (४) वणीची सप्तश्रृंगीनिवासिनी हे अर्धपीठ. महिषासुराचा वध केल्यानंतर काही काळच आदिशक्ती येथे विसावली होती. म्हणून हे अर्धेपीठ मानले जाते.
नवरात्रीचा संबंध जगत्जननी दुर्गा देवीशी आहे. नवरात्रीत शक्तीची उपासना केली जाते. देवी दुर्गाची उपासना केल्याशिवाय शक्ती येत नसते. असे म्हणतात की,ह्या विश्वात स्त्रीत्वात देवीचा अंश असतो.आणि म्हणूनच. नवरात्रीत दोन ते दहा वर्ष वयाच्या नऊ मुलींची/ कुमारिकांची पूजा करण्याची अनादिकाळापासून परंपरा आहे. या बालिकांना साक्षात ९ देवीचे रूप मानले जाते. यांना कुमारिका असे म्हणतात. कुमारिकांचे पायांचे पूजन करून त्यांना जेवायला घालण्याची प्रथा चालत आली आहे..
     कुमारिकांना पाय धुऊन आसनावर बसवावे. हातावर लाल रंगाचा धागा बांधून कपाळी कुंकू लावावे. प्रसाद आणि दक्षिणा द्यावी. घरातून पाठवताना पाया पडून आशीर्वाद घ्यावा. 
कुमारिका वयाच्या कितव्या वर्षी देवीच्या कोणत्या रूपात असते. आणि तिचे पूजन केल्याने काय फळ मिळते ते पुढीलप्रमाणे :-

 १) दोन वर्षाची बालिका कुमारिका म्हणून ओळखली जाते. हिचे पूजन केल्याने दारिद्र्य नष्ट होते.
२) तीन वर्षाची बालिका त्रिमूर्ती रूपात असते. हिचे पूजन केल्याने सुख-समृद्धी नांदते.
३) चार वर्षाची बालिका कल्याणी असते. हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होतं.
४) पाच वर्षाची बालिका रोहिणी रूपात असते. ती संपूर्ण घर रोगमुक्त ठेवते.
५) सहा वर्षाची बालिका कालिका रूपात असते. हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते.
६) सात वर्षाची बालिका चंडिका या रूपात असते. ही ऐश्वर्य प्रदान करते.
७) आठ वर्षाची बालिका शांभवी रूपात असते. हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होते.
९) नऊ वर्षाची बालिका दुर्गा देवीचे रूप असते. ही शत्रूंचा नाश करते.
१०) दहा वर्षाची बालिका सुभद्रा रूपात असते. सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते.

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

आयुष्य (चारोळी)

गड्या आयुष्य खूप सुंदर आहे
🌺❤️🌺❤️🌺❤️🌺❤️🌺

ते आनंद - मस्तीत जगावे,पण
🌹💎🌹💎🌹💎🌹💎🌹

ऐसे  करावे  कर्म - धर्म आपुले
🦚🦋🦚🦋🦚🦋🦚🦋🦚

चंद्र - सूर्य असे  तो अमर व्हावे
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, ऑक्टोबर १२, २०२१

शारदीय नवरात्रोत्सव : देवी कालरात्री

🌹 नवरात्रोत्सव : सातवी माळा : 🌹


💎 देवी स्वरुप : देवी कालरात्री 💎


नवरात्रोत्सवातील  सप्‍तमी त‍िथी ही देवी कालरात्रीला समर्पित आहे. सातवी माळ झेंडूच्या फुलांची बांधावी, व भक्ताने  देवीची श्रद्धाभावे उपासना करावी.

💎 कालरात्री देवीचे स्वरुप 

देवीचे स्वरुप रात्रीच्या अंधारासारखे काळे आहे.देवीच्या श्वासातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडतात.देवीचे केस विस्कटलेले असून गळ्यात विद्युल्लता सारखी चमकणारी नर मुंडमाला घातली आहे.देवी कालरात्री चतुर्भूज असून देवीच्या एका होती कटोरा,एका हातात लोहंकुश आहे.आणि उर्वरित दोन हात मुद्रा स्थितीत असून पैकी एक हात वर मुद्रा आणि दुसरा  अभय मुद्रेत आहे.देवी त्रीनेत्रा असून गर्दभावर स्वार आहे.तिची भावमुद्रा भयानक कोपीष्ट अशी आहे.

 💎 देवीची प्रकट कथा     

असे म्हटले जाते की, भगवती कालरात्री देवीची उत्पत्ती असूर चण्ड-मुण्ड यांच्या निर्दालनासाठीच झाली.कथानुसार दैत्य राज शुंभच्या आज्ञेने चण्ड-मुण्ड आपली चतुरंग सेना घेऊन प्रत्यक्ष देवीला बंदी करण्याच्या हेतूने गिरीराज हिमालय पर्वतावर गेले.तेथे जाऊन त्यांनी प्रत्यक्ष देवीला बंदिवान करण्याचे धाडस केले.त्यांच्या त्या दृष्ट कृत्याने देवी भगवती अत्यंत क्रोधीत झाली.देवीला प्रचंड संताप झाला..क्रोधाने भगवतीचे वदन प्रचंड काळे झाले आणि बाहू मध्ये प्रचंड स्फूरण निर्माण झाले.त्याक्षणी अत्यंत क्रुद्ध देवी भगवतीने कालीस्वरुप धारण केले.

💎 देवीचे आवडते रंग 

आज बुधवार तिथी महाष्टमीच्या पावक पर्वाला नवरात्रोत्सवाला कालरात्रीची पूजा करण्यात येते. देवीला गडद नीळा रंग अतिप्रिय असून या रंगदर्शनाने देवीचे रुप अतुलनीय आनन्दाची अनुभूती देते. निळा रंग हा समृद्धी आणि शांतीचे प्रतिक म्हणून वापरला जातो.नवदुर्गा देवीने कालरात्री रुपात चण्ड-मुण्ड दैत्यांचा विनाश करुन त्रिखंडात सुख ,समृद्धी आणि शांतता निर्माण केली होती.देवीच्या या रुपातील दर्शनाने भक्तांच्या जीवनात चैतन्य येऊन समृद्धी आणि शांतता निर्माण होते.अशी दृढ समज आहे.

💎 कालरात्री देवीची आयुधे 

देवी कालरात्रीने आपल्या एका हातात तलवार आणि एका हातात पाशांकुश,शरीरावर लाल रंगाचे चर्मांबर परिधान केले असून,आणि गळ्यात नरमुण्डमाला विराजित आहेत. प्रकटप्रसंगी  देवी कालरात्रीच्या अंगावरील मांस पुर्णपणे नष्ट होऊन देवीचे शरीर हे फक्त हाडांचा सापळाच उरला होता.असे वर्णन आढळते.भगवतीचे  हे रुप प्रचंड भितीकारक व क्रुद्ध भासत होते.देवीचे तोंड प्रचंड विशाल ,आणि सळसळत्या जीभेमुळे देवीचे स्वरूप पाहताच भिती वाटावी इतके भयप्रद बनले होते.डोळ्यातून क्रोधाचा अंगार बाहेर पडत होता.देवीच्या भयंकर गर्जंनांनी दशदिशा जणू प्रचंड नाद उमटत होता.देवीने कालरात्री रुपात महाभयानक अशा दैत्यांचा वधाचे सत्र आरंभिले.आणि चण्ड-मुण्डच्या चतुरंग सेनेवर देवी कालरात्री वायुवेगे तुटून पडली व सैन्याचे भक्षण करीत देत्य सेनेला त्राहीमाम करीत सुटली.

💎 देवी कालरात्रीच्या जप  मंत्र

 " दंष्ट्राकरालवदने शिरोमालाविभूषणे।

   चामुण्डेुण्डमथने नारायणी नमोऽस्तु ते।

   या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता।

   नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।। " 

देवी कालरात्री भक्तवत्सला असून सदैव आपल्या भक्तांवर कृपा करणारी म्हणून ओळखली जाते. ती भक्तांनी केलेल्या भक्तीने प्रसन्न होऊन शुभदायक फल देते.म्हणून देवी कालरात्रीला " शुभंकरी " असेही म्हणतात.भक्तांच्या सर्व दुःख,दैन्य,व्याधी,ताप दूर करणारी ही कालरात्री समस्त संकटे दूर करण्याचे वरदान देणारी म्हणून तिची ख्याती आहे.

💎 देवी कालरात्री पूजनाचे फलित 

देवीची कृपा मिळविण्यासाठी तिला अनन्य भावे शरण जाऊन भक्ती,पूजन केले असता,ती भक्तांना पावते.देवीचे पवित्र गंगाजलाने,पंचामृताने आणि फुलं,गंध, अक्षतांनी पूजा करावी.देवीला गुळाचा प्रसाद अती प्रिय असून हा प्रसाद द्यावा.देवी कालरात्री चे पूजन करतांना ब्रम्हचर्य व्रताचे पालन करणे अत्यंत आवश्यक असून काया वाचा मनाने भक्त पावक असावा.

[ टिप - सदर लेखातील माहिती ही सामान्य माहिती असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ पंडीताची मदत घ्यावी.ब्लाॅग लेखक कोणतीही हमी देत नाही.]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

भ्रम

मनुष्य भ्रमात जीवन जगतो...
हा माझा तो माझा
 माझ्या जवळचे माझे...
खरं तर यापैकी कोणीही आपलं नसतं काही
खरंतर तुमची फक्त वेळ आहे !
ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे !!!
नाहीतर...सर्व जवळ असून सुध्दा परके...!
बोलायचं असतं मनातलं सारं काही
पण ऐकणारं नसतं कुणी !
सल असली तर सांगायची राहते
बल असलं तरी
दाखवायचं राहून जातं...सारं काही !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

नवरात्रोत्सव : देवी स्वरुप :कात्यायनी

🌹 शारदीय नवरात्र: सहावी माळ : 🌹
💎 देवी स्वरुप : कात्यायनी 💎
    
    ऋषी कात्यायण यांनी देवीला आपल्या तपोबलाने प्रार्थना केली की, " हे देवी ! तू माझ्या कन्येच्या रुपात माझ्या घरी जन्म घे! " देवीने ऋषी कात्यायन यांच्या इच्छेनुसार कन्या रुपात जन्म घेतला.
 सर्वप्रथम कात्यायन ऋषींनी देवीची पुजा केल्याने तिचे नाव
 " कात्यायनी " असे झाले.देवी भागवत, मार्कण्डेय पुराण आणि स्कंद पुराणात देवी कात्यायनीची कथा वाचावयास मिळते.
तत्प्रसंगी महिषासूर हा उन्मत्त झालेला होता.त्याने तिन्ही लोकी उत्पात माजविला होता.देवीने उग्र रुप धारण करुन महिषासूराचा वध केला.तिन्ही लोकी आनंद निर्माण झाला. 
 दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायणी देवीचा उल्लेख म्हणून
" महिषासुरमर्दिनी " असा केल्याचे सांगितले जाते. 

💎 कात्यायनी देवीचे स्वरुप 

कात्यायणी देवीचे स्वरुप चतुर्भुज आहे. देवीच्या एका हातात खड्ग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. तर दोन हात अभय मुद्रा आणि वर मुद्रेत आशीर्वादरुपी आहेत. कात्यायणी देवीचे स्वरुप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे सांगितले जाते.देवीचा अवतार धारण करण्याचा मुख्य उद्देश असूरांचा वध, धर्माची पुनर्स्थापना, धर्मसंरक्षण असल्याचे म्हटले जाते. 
देवीला लाल रंग अधिक प्रिय असल्याने लाल रंगाची वस्त्रे परिधान करुन देवीची पूजा,भक्ती करणे फलदायक ठरते.

💎 कात्यायणी देवीचे पूजन

दुर्गा देवीच्या पूजनासह कात्यायणी देवीचे पूजन करताना गंगाजल, कलावा, नारळ, कलश, तांदूळ, लाल वस्त्र, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. कात्यायणी देवीला मध अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे देवीच्या पूजनात तसेच नैवेद्यात मधाचा आवर्जुन समावेश केल्यास अधिक लाभ मिळतो तसेच देवीला गोडधोड नैवेद्यही अधिकच प्रिय असल्याचे म्हटले जाते.म्हणून कात्यायनी देवीला दुध-साखरेचा गोड प्रसाद अर्पण करता येईल. त्रास नाहीसा होईल आणि लाभ होईल.


💎 कात्यायनी देवी पूजनाचे फलित :-

मान्यता आहे कि देवी कात्यायनीला प्रसन्न करण्यासाठी ३ ते ४ फूलं घेऊन
 " कंचनाभा वराभयं पद्मधरां मुकटोज्जवलां।
   स्मेरमुखीं शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते॥ "
हा मंत्र १०८ वेळा जप केल्यास व नंतर ही फुलं देवीचरणी अर्पण केल्यास फलदायी ठरते.कात्यायणी देवीचे पूजनाने सुयोग्य जोडीदार प्राप्त होऊ शकतो.श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनीही देवीचे पूजन केले असल्याचे सांगितले जाते. देवीच्या कृपेने विवाहात येणाऱ्या अडचणी, समस्या दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. भाविकांना सुख, समृद्धी प्राप्त करणे सुलभ होते.

[टिप: या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य ऐकीव,श्रवणीय माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करावा.]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...