भारतीय संस्कृतीचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गुरुबद्दल आदर भावना प्रकट करणे होय.
" गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: |
गुरु: साक्षात परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नम: || "
अशी वचने याची साक्ष पटवितात.
शिक्षक हा देश काल व परिस्थिती ओळखून समाजाला घडविणारा असतो. त्याकरिता -
" न ही ज्ञानेनं सदृशं पवित्रयिहं विद्यते " हा सुसंस्कार जनमानसावर बिंबवण्याचे कार्य ही शिक्षकच करतात.
समाजात सत्य, सद्वर्तन, सदाचार, सुनीति, सुविचार हे पंचप्राण जिवंत ठेवण्याचे मह्तकार्य शिक्षकालाच करावे लागते. म्हणून तर शिक्षकास समाजाचा नवचैतन्याचा निधी म्हटले जाते. अशा शिक्षकाविषयी भारतातील थोर विभूतींनी उच्च अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
१) महात्मा गांधीजी :-
गांधीजी म्हणत की, " कितीही किंमत द्यावी लागेल, परंतु आपल्या मुलांसाठी उत्तम शिक्षक मिळविता आले पाहिजे! बापूजी पुढे म्हणतात, की प्रत्येक विद्यार्थ्यांच्या ठायी सत्य, प्रिती, सहिष्णुता व सहानुभूती निर्माण करण्याचे संस्कार शिक्षकांनीच केले पाहिजे. जर हे कार्य शिक्षकाच्या हातून होत नसेल तर विद्यार्थ्यांचे अधोगतीला प्रमुख कारण म्हणून शिक्षणाकडे बोट दाखविता येईल.
विद्यार्थ्याने कोणते गुण-संस्कार ग्रहण करावे व कोणते विचार ग्रहण करु नये याचा विवेक शिकविणारा शिक्षकच विद्यार्थ्यांचे खरे पाठ्यपुस्तक होय. शिक्षकाचा प्रत्येक शब्द वेदवाक्य समजून विद्यार्थीशिक्षण घेत असतो. करिता शिक्षकास स्वविषयाचे परिपूर्ण ज्ञान असलेच पाहिजे.शिक्षक हा चारित्र्यसंपन् व श्रद्धावान असणे आवश्यक आहे.
२) स्वामी विवेकानंद :-
स्वामीजींच्या मते निस्पृहता हा शिक्षकाचा सर्वात मोठा गुण आहे. शिक्षकाचा मनात विद्यार्थ्याविषयी अपार सहानुभूती व प्रेम असावे. तरच खरेखुरे शिक्षण घडून येईल. शिक्षकाने स्वतः शिष्याच्या दृष्टीने एक क्षणभर का होईना जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन . हा दृष्टिकोन शिक्षकात असला तर शिक्षणाची कोणतीही समस्या सहज सुटू शकते. इतका मोठा आत्मविश्वास स्वामींनी शिक्षकातील या दृष्टिकोनाबद्दल व्यक्त केला आहे.
३) गुरुदेव रविद्रनाथ टागोर :-
गुरुदेवांच्या विचारानुसार शाळेतील संपूर्ण वातावरणात अत्यंत प्रभावी व्यक्ती म्हणजे शिक्षक होय. शिक्षक हा प्रचंड ज्ञानी असावा. परंतु ज्ञानाचा ओझ्याखाली स्नेह, श्रद्धा, निष्ठा, व समर्पन या श्रेष्ठ गुणांना पायदळी तुडवणारा नसावा. शिक्षक हा प्रथम विद्यार्थी असला पाहिजे. स्वतः प्रज्वलित असणारा दिपच दुसरा दिप प्रज्वलित करु शकतो. यास्तव शिक्षकाची ज्ञानज्योत सतत प्रज्वलित असेल तरच विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी सलोखा, प्रेम व आदर निर्माण होतो. शिक्षक हा एखादा भितीदायक राक्षस न भासता अंत:करणाने कोमल, निर्मळ, प्रेमळ, व आईचा जिव्हाळ्याचा असावा. आईला जशा बाळाच्या ईच्छा - अपेक्षा, भावभावना सहज कळतात, तसे शिक्षकाला विद्यार्थ्याबाबत कळलेच पाहिजे. गुरुदेवांना विद्यार्थ्याना शिक्षा करणारा शिक्षक दुर्बल मनाचा होय. करुणा हा शिक्षकाचा स्थायीभाव असला पाहिजे.
शिक्षकाचा संबंध विद्यार्थ्यांचा नाजूक भावनांशी असतो. म्हणूनच शिक्षकाची भूमिका ही माया-ममता असणाऱ्या माता-पित्याचीच असली पाहिजे.
४) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन :-
एक आदर्श शिक्षक म्हणून अध्यापनाचे कार्य करुन अखिल विश्वाचे आचार्य (शिक्षक) म्हणून ओळख असलेले डॉ. राधाकृष्णन यांच्या विचारानुसार "जो अज्ञानाचा अंधकार नष्ट करतो तो खरा शिक्षक होय. " शिक्षक हा विद्यार्थ्यांचा अपरिपक्व मनावर आपल्या उज्ज्वल अशा व्यक्तीमत्वाचा ठसा उमटविणारा असावा. शिक्षकाचे आचरण पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचे डोळे व विचार ऐकण्यासाठी कान नेहमीच तत्पर असतात. शिवाय शिक्षक जीवन जगतात कसे हे पाहण्यासाठी विद्यार्थी सदैव उत्सुक असतो. यास्तव शिक्षक गुणांची खाण असावा. शिक्षकांनी करुणा व उदारता, साहस व शौर्य निर्माण करुन समर्थ समाज उभा करण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे.
आज केवळ संस्कृतीच नव्हे;संपूर्ण मानवजातीचे भवितव्य धोक्यात आले आहे ही जाणीव डॉ. राधाकृष्णन यांना असल्याने ते बोलत की, माणसाने माणसांसारखे राहावे, जगावे. या विचाराचा वसा घेऊन, स्वतःचे नैतिक आचरण सिद्ध करणारा शिक्षकच समाजाचा शिक्षक बनतो.
५) डॉ. झाकीर हुसेन :-
डॉ. झाकीर हुसेन भारतातील सृजनशील व प्रतिष्ठीत शिक्षणतज्ज्ञापैकी एक होत. नवी सांस्कृतिक मूल्ये आणि राष्ट्रीय चारित्र्याचा बांधणीसाठी नवे शिक्षण देण्याचा योजनेचे ते पहिले द्रष्टा होत. ते स्वतः एक आदर्श शिक्षक होते. ते म्हणत, आदर्श शिक्षकाच्या जीवन पुस्तकाचे आवरण ज्ञान प्रधान असता कामा नये. तर ते प्रेमप्रधान असावे. प्रेम हाच शिक्षकाचा स्थायीभाव असावा. आपल्या दुधावर वाढलेल्या मुला-मुलीबद्दल आईला जे प्रेम वाटते तेच प्रेम विद्यार्थ्याविषयी शिक्षकांना वाटले पाहिजे. शिक्षक हा प्रत्येक विद्यार्थ्यांला स्वतंत्र व्यक्तिमत्व असते हे ओळखून अध्यापन करणारा, विद्यार्थ्यांचा प्रगतीला पंख देणारा असावा.शिक्षकात नेतृत्व करण्याची क्षमता, सांस्कृतिक व परंपरागत श्रेष्ठ मूल्यांचे संक्रमण करण्याची शक्ती असावी.
विद्यार्थ्याचे कोवळी मने ओळखून त्यास सुयोग्य आकार देणारा, परस्परविश्वास, प्रेम आणि आदर निर्माण करणारा शिक्षक खऱ्या अर्थाने समाजाच्या सेवक, शिल्पकार होऊ शकतो. शिक्षकाचा हृदयात न्याय, पावित्र्य, सदाचार, सहिष्णुता इत्यादि नैतिक गुण ठासून भरलेले असावेत. शिक्षकाची महानता व्यक्त करतांना ते नेहमी म्हणत की, व्यक्तीला जेव्हा सारे विश्व उद्विग्न भासते त्यावेळी फक्त दोनच व्यक्तींच्या अंत:करणात सदिच्छा शिल्लक राहते यापैकी एक व्यक्ती " आई " व दुसरी व्यक्ती असते " शिक्षक! " हाच शिक्षक विद्यार्थ्यांना जीवनाचे नवे मार्ग दाखविण्यास समर्थ असतो.
६) कर्मवीर भाऊराव पाटील :-
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मते, " शिक्षणाचा मंडप ज्याचा आधारे ऊभा करावयाचा आहे ; तो आधार आहे शिक्षक ! " हा शिक्षक सत्शील, सदाचारी, सद्वर्तनी, सद्गुणी, सुसंस्कृत व परिश्रमावर निष्ठा ठेवणारा असावा. त्याची वृत्ती अत्यंत साधी राहणी पण अत्यंत पवित्र, अव्यभिचारी, सहिष्णू असावी. शिक्षक हा पदवीचे ओझे सांभाळून नुसती पोपटपंची करणारा नसावा तर कर्तव्यनिष्ठ, मन आणि मनगट मजबूत असणारा असावा. बहुजन अज्ञ समाजाला ज्ञान देण्याचा ध्येयाने प्रेरित झालेला असावा. नवविचारांची समाजमनावर मशागत करणारा असावा.
७) आचार्य विनोबा भावे :-
विनोबांजींच्या मते, " मुले शिकतील अशा रितीने जो त्यांना शिकवतो तोच आदर्श शिक्षक होय." विद्यार्थ्यांनी काही शिकावे म्हणून बोलणारा व काही लिहावे म्हणून मार्गदर्शन करणारा शिक्षक असावा. वेदग्रंथानी शिक्षकास श्रेष्ठ शक्तीशाली मार्गशोधक म्हटले आहे. म्हणून शिक्षकाने सामाजिक अज्ञान, भूक व व्याधी यांच्या निरसनासाठी मार्गदर्शी होण्याचे कार्य हाती घेतले पाहिजे .
खरा शिक्षक हा शिक्षण देत नाही तर स्वाभाविकपणे त्याच्यापासून शिकायला मिळते. जसा सूर्यापासून स्वाभाविकपणे प्रकाश मिळतो. तसाच खरा शिक्षक हा ज्ञान, निष्ठा व प्रेमाचा प्रकाश देणारा असतो.
शिक्षकाविषयी वर उद्धृत केलेल्या थोर भारतीय विभूतींनी महान विचारधारा व्यक्त केल्या आहेत. त्यांनी स्वतःच्या आचरणातून सिद्ध केलेला शिक्षक आजच्या शिक्षकाला होता यावे, यासाठी या महान विभूतींनी " आधी केले मग सांगीतले " या कृतीतून शिक्षकाविषयी व्यक्त केलेली मते आजच्या शिक्षकांसाठी खरोखर तेजस्वी मार्गदिपीकाच होय!!!!
©प्रा.पुरुषोत्तम पटेल
सुपुष्पमणी, म्हसावद
सर्व महान विभुतींची माहीती करुन देणारा उत्तम लेख.... धन्यवाद....👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाछान मार्गदर्शन
उत्तर द्याहटवाअतिशय उपयुक्त आणि अलौकिक माहितीपूर्ण लेख सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर सर 👌👌
उत्तर द्याहटवाउपयुक्त माहिती 👌
उत्तर द्याहटवाआपल्या लेखणीतून थोर व श्रेष्ठ लोकांचे विचार वाचायला मिळाले
उत्तर द्याहटवाछान माहिती मिळाली सर, धन्यवाद 👌👌
विजय बोरदे
अतिशय उपयुक्त असे संकलन छान माहिती मिळाली .
उत्तर द्याहटवाखूप सुंदर विचार, माहिती लेखातून वाचण्यास मिळाली आहे.👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर माहिती पट सादर केला सर जी।...👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर माहिती..अप्रतिम लेख. 👍👌✍️🍫
उत्तर द्याहटवा