Kaayguru.Marathi

शनिवार, डिसेंबर ३१, २०२२

२०२३ चे स्वागत…नव्हे,स्मरण दिव्यत्वाचे !

२०२३ चे स्वागत…नव्हे,स्मरण दिव्यत्वाचे!
   

   मित्रहो…आज संपूर्ण जगात दूरदूरपर्यंत पाहता २०२२ या सरत्या वर्षाला निरोप देण्याची जय्यत तयारी सुरु असल्याचे चित्र दिसून येते आहे.२०२२ च्या अंतिम दिवसांच्या अस्ताला जाणारा सूर्य आपल्या डोळ्यात साठवून घेण्यासाठी,तसेच आपल्या मोबाईल कॅमे-यात टिपून घेण्यासाठी आबालवृद्ध,त्यातही
तरुणाई सज्ज झाली आहे.जगभरातील सनसेट ( सूर्यास्त) पॉईंट आज तरुणाईच्या गर्दिने फुलून आलेले पाहायला मिळतील.
   …आणि त्याचबरोबर येणारे नुतन वर्ष २०२३ च्या घड्याळातील पहिला ठोका कानात भरुन घेण्यासाठी,उदयाला येणारा रविराज त्याचा सहस्ररश्मींसह डोळ्यात साठवून घेण्यासाठी, उगवत्या रविला साक्ष ठेवून आनंद अनुभवायला तरुणाई उल्हसित झाली आहे. त्यासाठी जगभरातील सनराईज पॉईंट तरुण- तरुणींच्या आगमनाने फुल्लमऽऽफूल झालेले बघायला मिळताहेत.केवढा उल्ल्हास ? केवढी उत्सुकता?किती आतुरता? वर्णन करायला शब्दही कमी पडावेत!
  मित्रहो,ही तर अस्ताचलाकडे जाणा-या सरत्या वर्षातील सूर्याला निरोप देण्याची तयारी मात्र हा सायंकाळी अस्ताचलाकडे जाणारा सूर्य उद्या प्रभाती,वेळ न चुकता,न विसरता, चराचर सृष्टीला नवचैतन्य घेऊन येणारच आहे ना! मला वाटते,सूर्य हा तर जीव सृष्टीचा प्राण. जीव सृष्टीचा चैतन्याचा स्रोत.जीवसृष्टीचा संजीवक.त्याचा एक एक किरण जणू जीवसृष्टीसाठी जगण्याचा श्वासच म्हणा ना! तो आहे म्हणून तर जीवसृष्टीला उभारी देणा-या जलाची ( जल हेच जीवन ) निर्मिती होते.त्याच जलाने जीवसृष्टीची तृषा,तल्ल्खली, दाह ,शांत होतो.मग हे एवढे महान कार्याची जबाबदारी टाकून तो रवीराज जाणार आहे का? नाही जाऊ शकत.जो कायमचा जाणारच नाही,मग त्याला निरोप देणे कितपत योग्य आहे हो? हा माझ्या मनात आलेला मोठ्ठा गुढ प्रश्न ! 
  या गुढ प्रश्नाचे उत्तर शोधतांना मी दृष्टीसमोर एक दिव्य गोष्ट अनुभवली.ती म्हणजे सूर्य रोज प्रभाती रक्तवर्णी रुपाने येतो.रक्ताचा रंग लाल. रक्त हे चैतन्य शक्तीचे अमृतच ! जीव चैतन्यमय व जीवंत असणेचं सिद्ध करणारा महान घटक होय.रोज निवांत झोपलेल्या चराचर सृष्टीला जागृत करण्यासाठी त्यांचे हे रक्तवर्णी रुप.तद्नंतर तो उत्तरोत्तर रजतवर्णी म्हणजेच लख्ख श्वेतवर्णी होतो.जसे रजत म्हणजे चांदी त्यांचा वर्ण रजत…हे धातूबल वाढविणारे रसायन औषध आहे, जे शरीराची ताकद वाढवून पुनरुत्थानास मदत करते.शरीराला ताकत देते, उत्साह निर्माण करते.अगदी तसेच फायदे सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेतल्याने शरीराला भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व " डी " प्राप्त होते. जे हाडांच्या मजबुतीकरिता आवश्यक असते. कोवळ्या उन्हात अंग शेकल्याने सांधेदुखी आणि थंडीमुळे होणारा अंगदुखीचा त्रास दूर होऊन आराम मिळतो.नवीन ताकद अंगात येऊन नवी स्फूर्ती,प्रेरणा अंगी बळावते.
  हाच सूर्य उत्तरोत्तर अस्ताचलाकडे सरकू  
लागतो. पूर्ण अस्ताचलाजवळ जातो तेव्हा त्यांचा वर्ण पित होतो.सूर्याला पाहतांना जणू तो सोन्याचा गोळाच आहे असे भासते.कवी बालकवींची त्याला " सोन्याचा गोळा " ही उपमा दिली आहे.ती अगदी सार्थ वाटते
तेव्हा सुवर्णाचे गुण जणू त्याच्यात उतरतात.
जसे सुवर्णभस्म प्राशन केले तर– मानवी
शरीरावर आलेला तणाव दूर होतो.व शांत झोप लागते असे म्हणतात.त्याचप्रमाणे दिवसभर काम-धाम करुन घरी आल्यावर माणसाला रात्रीची शांत झोप घेता यावी म्हणून सूर्य अस्ताला जातो.जणू पित रंगाने सुवर्णभस्म देऊनच तो जातो.पण…माणसाला आश्वस्त करुन जातो की, 
" बाळा,तू रात्रीची शांत झोप घे.मी तुला प्रभाती चैतन्य देण्यासाठी परत येतोय !" आहे की नाही गंमत ? म्हणूनच तर कुमुदिनीच्या पाकळीत रात्रभर विसावलेला भ्रमर सूर्यतेजाने नवतेज घेऊन मुक्त होतो. खोप्यात विसावलेली पाखरे नभाकडे झेप घेऊ लागतात.वृक्षाची मिटलेली पाने हरित चैतन्याने सळसळू लागतात.कळीची फूले होऊन सुगंध दशदिशांना बागडू लागतो. मंदिरात भाट भूपाळी आळवू लागतात. गायींना पान्हा फूटतो. दवबिंदूंचे मोती-हिरे होतात.हे केवळ सहस्ररश्मींच्या उदयानेच!
     आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आपली भारतीय संस्कृती ही दिव्य,भव्य आणि सुवर्णमयी आहे.तीचे नववर्ष हे चैत्र मासाच्या  प्रारंभी म्हणजेच " चैत्र प्रतिपदेपासून " सुरु होते.त्यामागची कथा  थोडक्यात - आजच्याच दिवशी प्रभू श्रीराम हे वनवासातून सीतामाई,बंधु लक्ष्मणासह अयोध्यापुरीत परतले.तो आनंद शब्दातीत! या दिवशी खूप छान गोडधोड,खिर-पुरणपोळी, श्रीखंड,बासुंदी-पुरी पदार्थ बनवून एकमेकांसोबत आनंदाने आस्वाद घेतो.कोणत्याही पक्षी,प्राण्यांचा जीवावर उठून हा उत्सव साजरा होत नाही.ही वैभवशाली संस्कृती आपली आहे.
     गुढीला कुंकू अक्षता वाहून मनोभावे आपल्या नवीन वर्षाला सुरवात करतात. हा आपल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण. त्याचे दिव्य स्मरण म्हणूनच आपण घराच्या मुख्य दरवाजाच्या समोरच गुढी उभारुन आनंदोत्सव साजरा करतो.हेही विसरणे म्हणजे कृतघ्नपणाचे ठरेल. 
  अजून एक गोष्ट सांगता येईल.हा सूर्य बारा तासांसाठी आपली विश्रांतीसाठी काळजी घेतो.त्याचे हे किती मोठे औदार्य ! आई जितके प्रेम, जिव्हाळा आपल्या बाळावर करते,तिला बाळाचा जितका लळा असतो. तितकेच प्रेम हा सूर्य देव चराचर सृष्टीतील आपल्या लेकरांवर करतो.जणू चैतन्यमयी आई बनून! प्रत्येक लेकराला आईची माया, कृपेची छाया सदैव जवळच असावीशी वाटते.आई जिथे जाईल, तिथे त्याच्याबरोबर तिच्या पदराला धरुन लेकरु-बाळ सोबत जाणारच ! हे सांगण्यासाठी कोणी तज्ज्ञ ज्योतिषाची गरज नाही ते तर अटळ सत्यच! आपल्या बाळाला आराम मिळावा म्हणून आई अंगाई गाऊन त्याला जोजवते; झोपवते.अन् ती स्वतः काम-धाम करते.
अशा आईला आपण कधीच निरोप देऊ शकतच नाही. का ? तर तिचा प्रेमपान्हा, ममत्वाचा झरा,तो आपणास कायम प्राशन करता यावा.अगदी तसेच सूर्याचेही ! अशा चैतन्यशक्तीच्या महानस्रोताला निरोप दिला तर…तर त्याचा अस्तित्वाविना ही जीवसृष्टीच संपून जाईल.म्हणून मी तर म्हणेेन,ज्याचातून संपूर्ण ब्रम्हांडाची निर्मिती करणा-या ब्रम्हाची निर्मिती झाली.त्याला निरोप देणे योग्य नव्हेच ! तर त्या हिरण्यगर्भाची प्रार्थना करणे मनुष्यासाठी चराचर सृष्टीचा हितासाठी योग्य ठरेल.
🌹।। ॐ हिरण्यगर्भाय नमः ।।🙏

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, डिसेंबर ३०, २०२२

मैत्रीची गंगोत्री!

मैत्रीची गंगोत्री!

  मैत्री म्हणजे काय? याचे उत्तर जर मी दिले तर ते असे असेल–
" मैत्री म्हणजे निखळ, निकोप असा भाव असलेले आणि कुठलेही अंतर न ठेवता दोघांनीही जपलेले एक नि:शब्द नाते होय."
🔻आता दोघांत वा परस्परात मैत्री कशी असते ? याबाबत विचार करता-- 
१) मैत्री एकमेकांना सन्मानित करणारी असते.
२) मैत्री मित्राला अवमानित करणारी नसते, तर एकमेकांचा मान वाढविणारी असते.
३) मैत्री वेदना देणारी नसते तर प्रेरणा देणारी असते. 
४) मैत्री मित्रांसाठी वेळ देणारी असते. मित्रावर कपट-कारस्थान करुन घाव घालून काळ ठरणारी नसते.
५) मैत्री नि:स्वार्थ साथ देणारी असते.प्रसंगी स्वतः जवळ असेल ते मित्राला देणारी असते. स्वार्थ पाहणारी नसते.
६) मैत्री बेचैन मनाला सुखावणारी असते,मन दुखावणारी नसते. 
७) मैत्री बदल घडवणारी असते, बदला घेणारी नसते.
८) मित्र हा आपल्याला अत्यंत जवळचा वाटणारा असतो .
९) आपला मन:स्थिती निराश असताना सुद्धा तो स्वतःला विसरुन आपल्याला हसवण्याचा प्रयत्न करतो. 
🔻 मैत्री कोणात होऊ शकते? यांचे उत्तर – मैत्री ही मित्राची मित्रांशी होते.तशी मैत्री ही मित्रांशी तशीच मैत्रीणीशीही असू शकते. का? तर मैत्रीत स्त्री - पुरुष हा भेदभाव मुळी नसतो. मैत्री हे एक अनमोल नाते आहे.त्याचे मोल होऊच शकत नाही.उदा.कर्ण हा दुर्योधनाचा अत्यंत जवळचा मित्र होता.कुरुक्षेत्रावर महायुद्धात कुंतीमातेद्वारा त्याला समजले की, पांडवांचे आपण जेष्ठ भाऊ आहोत.तरी त्याला त्याक्षणी बंधुप्रेम रोखू शकले नाही.तर त्याने मातेला वचन दिले की, " उद्या तुझे पाच पुत्र जीवंत पाहशील.त्यात एक तर मी कर्ण असेन किंवा अर्जुन असेल!" असे सांगितले.मात्र दुर्योधनाशी असलेली मैत्री न त्यागता,युद्धात त्याचा बाजूने लढणे सोडले नाही.कारण, प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची असते.  
  असे सांगितले जाते की,प्रेम तर सगळ्यांना एकदा तरी रडवतेच आणि मैत्री ही दुःखातही हसवण्याचे कार्य करते. उदास मनाला खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देते.
   मैत्री हा असा वटवृक्ष आहे की,त्याचा विश्वासाचा पारंब्या ह्या सदोदित आकाशाला नव्हे;तर जमीनीलाच स्पर्श करतात.[पारंब्या ह्या जिव्हाळा,ममत्वाचे प्रतिक आणि जमीन हे हृद्य आत्मियतेचे व निगर्वीतेचे प्रतिक होत. ]  
  मैत्रीचा विचार करता,मित्रांचे प्रकार पाडता येतील.म्हणजे बालपणापासूनचा मित्र तो लंगोटी मित्र, सुख-दु:खात धिर देतो तो हृदयमित्र,शाळा-कॉलेजात सर्व सहकार्य करतो तो पेनमित्र-शाळामित्र, एखादी कला,विद्या मिळविताना सोबत असलेला गुरुमित्र असे सांगता येतील. पाळीव प्राणी सुद्धा आपले मित्र असू शकतात.उदा.हत्ती या प्राण्याची मैत्री दाखविणारा राजेश खन्नाचा चित्रपट " हाथी मेरे साथी " , कुत्र्याचा मित्रनिष्ठा आपण सर्व जाणून आहोत-ती मैत्री दाखविणारा जॅंकी श्राॅफचा " तेरी मेहेरबानीयॉं " आणि गायीची मैत्री सिद्ध करणारा " गाय और गौरी " हा जया भादुडी-बच्चनचा चित्रपट.हे चित्रपट पाळीव प्राणी आणि माणसाचे आदर्श मित्रत्वाचे नाते सिद्ध करतात. 
  मैत्री हे असे नाते आहे ज्या नात्याला रंग,रुप, जात,धर्म,
पंथ,भाषा,लिंग,वय,प्रांत,संपत्तीशी काही देणेघेणे नसते.
मैत्रीचे नाते निरपेक्ष असते
जे रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट बनते. 
उत्तम मित्राची लक्षणे:-
🔻मित्राला मनातील भावना व्यक्त करताना कधीच संकोच वाटत नाही.
🔻 स्वतःकडून अनावधानाने काही चूक वा अयोग्य घडलेच तर,मित्राला सांगण्यात व कबुली देण्यास तो कधीच कचरत नाही.
🔻एक मित्र आपले पराक्रम, कर्तृत्व आनंदाने कथन करतो.
🔻त्याच्या मनात मित्राविषयी कधीच वाईट विचार येत नाही.
🔻 मैत्रीचे प्रकार - 
पौराणिक मैत्री-
श्रीराम आणि रावणाचा बंधु बिभिषण,तसेच श्रीराम आणि सुग्रीव यांची मित्रता,श्रीकृष्ण आणि सुदामदेव यांच्यातील मैत्री ही त्रिखंडात पौराणिक मैत्रीचे आदर्शवत उदाहरण म्हणून प्रसिद्ध आहे.
   मैत्री ही निर्मळ आणि वासना विरहित असते.तिला स्वार्थाचा लवलेशही नसतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील स्नेहबंध होय. तसेच राधा आणि कृष्ण यांच्यात असलेला मैत्रीच्या संबंध सांगता येईल.
🔻ऐतिहासिक मैत्री-
इतिहासाचा विचार करता,मला तर वाटते की, सम्राट पृथ्वीराज चौहान आणि त्याचे जीवलग मित्र चांदबराई यांच्या मैत्रीचा उल्लेख करता येईल.सम्राटांच्या अखेरपर्यंत त्यांना सोबत तर केलीच! पण,योग्य ती क्लुप्ती वापरुन मोहम्मद घोरीच्या वध सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्याच हातून ' शब्दवेधी ' बाणाने करविला. 
 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपतीं शिवाजी 
महाराज व तानाजी मालुसरेंची मैत्री-- त्यातून " आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे!" म्हणत कोंढाणा सर करणारे तानाजी मालुसरे व राजांनी तानाजीच्या बलिदानाचे स्मरण येणा-या पिढ्यांना कायम होण्यासाठी नामकरण केलेला सिंहगड विसरता येणार नाही.
दुसरी मैत्री- " महाराज ! तुम्ही विशाळगडावर पोहचा.तो पर्यंत मी ह्या घोडखिंडीत शत्रूला अडवूनच ठेवतो !" हा शब्द देऊन शिवराजांच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावणारे बाजीप्रभू देशपांडे, त्यांनी आपले बाजी हे नावच सार्थकी लावले...त्यांचा त्यागाचे स्मरण करुन देणारी पावनखिंड आज आपल्याला विसरता येणार नाही.असे  अगणित मित्र छत्रपती शिवाजी महाराजांनी जमविले.त्यांच्या मैत्रीला शतशः प्रणाम!🙏
पाळीव प्राण्यांची मैत्री-
  पाळीव प्राणी हे सुद्धा उत्तम मैत्रीचे उदाहरण देता येईल.ते तर माणूसही निभावणार नाही अशी मैत्री करतात.ही उदाहरणे प्रमाणभूत सिद्ध झाली आहेत.राजा महाराणा प्रतापांचा घोडा ,अत्यंत जखमी झाला असतानाही स्वतःच्या प्राणांची तमा न बाळगता,राणांना शत्रूपासून वाचविण्यासाठी दूर सुखरुपस्थळी घेऊन विसावला.राणाजीकडे पाहून अश्रू निमाले.व तिथेच धन्याला सुखरुप पाहून त्याने प्राण सोडले " धन्य धन्य चेतक घोडा! " त्यांची ही कृतज्ञता सारथ्य आजही चितोडगडात " चेतक का चबुतरा " स्थळी मैत्रीची धन्यता सिद्ध करतो आहे..
   छत्रपती शिवाजीराजे यांचा मोती श्वान रायगडावर पाहता आपली धन्यता सिद्ध करतो आहे.आणि कृष्णा घोडी हे आदर्श सारथीची उदाहरणे देता येतील. हे प्राणी असले तरी,त्यांची मैत्री,अढळ निष्ठा मानवाला पुसून काढता येणार नाही.मानवी ( राजे) मैत्रीचे हे अतुलनीय उदाहरण म्हणून इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली गेली आहेत.
  सोबत असताना कधी कधी रडता रडता हसवणारी, तर कधी दूर गेल्यावर त्याच मित्र आणि मैत्रिणीच्या आठवणी मध्ये हसता हसता रडवणारी अशी घट्ट मैत्री असावी.तर कधी प्रेमामध्ये हरल्यानंतर घनदाट अंधारामध्ये हरवलेल्या मनाला देखील काजव्याच्या प्रकाशाने प्रसन्न करणारी मैत्री असावी.हीच मैत्री जीवनात सुखाचे नंदनवन फुलवू शकते.

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

रविवार, डिसेंबर ११, २०२२

प्यारी यारी!


प्यारी तुझी माझी यारी
दोस्ता  रेऽ  जगावेगळी
प्यारीराहो   अशीच   टिकून
यथा  तथा   सर्वकाळी ।।१।।

एक    सिनेमा  आपण
बघायचो     एकेकटे !
अर्ध्या अर्ध्या सिनेमाची
दोन    मिळून   तिकिटे ।।२।।

झाला   सिनेमा   पाहून
सांगायचे   दोघे   स्टोरी
आहे  की नाही आमची
गोष्ट  अशी  लई   भारी ।।३।।

मित्रा  तुझ्या रे  प्रेमाची
तोड नाही  रे  या जगी
भेट  तुझी माझी  होता
जणू   आनंदाची  सुगी ।।४।।

यारी  तुझी  अन् माझी
राहो   टिकून    अभंग
देवा जन्मोजन्मी लाभो
आम्हा  मित्रसख्य  संग ।।५।।

एक   मागणे    मागतो
सुखेनैव    राहो    यारी
यावी   कधी  न  कटुता
बुद्धी   दे    कृष्णमुरारी ।।६।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


बुधवार, नोव्हेंबर १६, २०२२

निरागस प्रेम [ अष्टाक्षरी]

निरागस प्रेम [ अष्टाक्षरी]
मुली  तुझे  येणे  वाटे  
निरागस  असे  काही
बोल  तुझे   ते बोबडे
संजिवक  स्फूर्तीदायी ।।१।।

तुझे    लटके   रुसणे
देतो   आनंद  मजला
मुली  तुझा   आगमने
मन   निवास  सजला ।।२।।

बोट तुझे  हाती  घेता
लाभे  स्वर्गीचा आनंद
बाप लेकीच्या नात्याचा
घट्ट    रेशमाचा   बंध ।।३।।

दुडूदुडू     चालतांना
वाजे  पायीचे  पैंजण
स्वर  ऐकताना  वाटे
पावा  वाजवी   मोहन ।।४।।

खेळ  खेळता अंगणी
रंगे   भातुकली  छान
कळी कधी झाली फूल
नसे तिला मला भान ।।५।।

निरागस  लेक  माझी
अहाऽ   झाली  उपवर
सेतू   होऊन    निघेल
बांधी   माहेर   सासर ।।६।।

नातीगोती   घेऊनिया
लेक  निघाली सासरी
मन    अडकले   तिचे
प्रिय  बापाच्या अंतरी ।।७।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल
" पुष्प "

शुक्रवार, नोव्हेंबर ११, २०२२

माझी जाणू !

प्रसिद्ध लेखक,पटकथाकार,दिग्दर्शक,गायक ,
अभिनेता,विनोदी वक्ता , महाराष्ट्रभुषण पु.ल.देशपांडे यांच्या आज जन्मदिवस (जयंती) निमित्ताने केलेले " विनोदी काव्य लेखन " 
--------------------------------------------------------
माझी जाणू [ अष्टाक्षरी ]
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
कॉलेजला    असताना
होतो   की   मी  प्रेमाळू
एक     होती   लाडबाई
तिचा  होतो  मी  काळू ।।१।।

माझ्या  स्वप्नी  येई  एक
नाव   होते  तिचे   माया
खूप   आवडायची    हो 
मला  तिची गोरी  काया।।२।।

मैत्री   केली   कल्पनाशी
लग्न    करावे      म्हणून
पण     जुळलेच     नाही
तिचे   माझे   तन   मन।।३।।

मग    भेटली       मजला 
रुपवती      नाव     रंभा
जिथे   जाई   तिथे  तिचा
क्षणोक्षणी    सुरु    दंगा।।४।।

कॉलेजात    आली   एक
सुंदरशी       छान      परी
पण....  हाय   माझे   दैव
होती   परक्याची    नारी।।५।।

मन      माझे     म्हणायचे
शोध      एखादी  करिश्मा
सापडली     नाही    कुणी
मात्र    लागलाय    चष्मा।।६।।

झालं.  ! शोधून    थकलो
आणि   बसलो  शांत  मी 
नशिबाने     दिली    साथ
दिली  युक्ती आली कामी।।७।।

अवचित    आली    पुष्पा
गुलाबाची    कळी   जणू
आल्या  त्या सर्वच गेल्या
हीच  खरी माझी  जाणू !।।८।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल 
            "  पुष्प "
      


सोमवार, नोव्हेंबर ०७, २०२२

छम्मकछल्लो (भूलोळी )


ए मेरी छम्मकछल्लो
रुप तुझे भासे गुलजार
तुझे गले लगाने की है चाहत
करोडोतील तू तर खरी एक नार

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

बुधवार, ऑक्टोबर २६, २०२२

गुलजार [ अष्टाक्षरी ]



प्रिये   किती  सुंदर  ग्    रुप   तुझे  गुलजार
तुला  बनविले ज्याने  त्याचे मानितो आभार 

प्रिये पाहिली  मेनका  रंभा  उर्वशी  स्वर्गीची
तुझ्या  पुढे  न टिकती  तू  ग  रती   मदनाची

पित  वर्णी  तुझी  काया वाटे  ग् बावणकशी
केस  सोनेरी  उडता  भासे तू  नागीन  जशी

डोळे   पाहता  वाटे   तू   मज  ग्   मृगनयनी
चाल तुझी मस्तानी ग  जणू  तू  गजगामिनी

माझा संसाराची  शोभे  तूच  तर खरी  राणी
तुझ्या संगती  लिहिली आपुली प्रीतकहाणी

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, ऑक्टोबर १८, २०२२

राजकारण

राजकारण 

जिथे नीतिला मिळत नाही गती
शब्दांची जिथे वाटत नाही भीती
राजकारण…

गल्ली ते दिल्ली सतत चालत राहते
मिडीयात अग्रस्थानी जाऊन बसते
राजकारण…

रक्त नात्यात दुरावा निर्माण करते
स्वार्थी पोळी सतत भाजत रहाते
राजकारण…

क्षणोक्षणी करते शब्दांची चिरफाड 
दिल्या वचनांची ठेवत नाही चाड
राजकारण…

रातोरात रंकाचा राव करुन देई
रावालाही रातोरात रंक करील
राजकारण…

खुर्चीसाठी सतराशे साठ उड्या
मतदारांना देते भूलथापांचा पुड्या
राजकारण…

आज या पक्षात उद्या त्या पक्षात
मर्यादा सोडून वागते जनमानसात
राजकारण…

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
 

शनिवार, ऑक्टोबर ०८, २०२२

आई-बाबा

आई माझी सरस्वती
जणू दिपकाची वाती
संस्कार तिचे संजीवक
लाभे जीवना सन्मती

सकल ज्ञानाचे आगर
बाबा माझे बृहस्पती
आशिष मिळता तयांचा
संकटे दूर हो पळती

आईच्या चरणी लाभे
मज स्वर्गसुखाची प्राप्ती
निराश मना मिळते
आनंदे जगण्याची गती

बाबांच्या एक एक शब्द
शिकवी मज प्रेमाची नाती
आयुष्याच्या वाटेवरती
टळे दुःख दैन्याची भीती

फिटे ना आई बाबांचे ऋण 
जरी घेतले जन्म साती
करीता आईबाबांची सेवा 
लाभे प्रभुकृपेचे माणिक मोती

शब्दार्थ - साती= सात

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल," पुष्प "

शुक्रवार, ऑक्टोबर ०७, २०२२

नवरात्रोत्सव:अर्थ व बोध

  नवरात्रोत्सव: अर्थ व बोध 
   
 हा देवी आदिशक्ती,आदिमातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक पवित्र पावन हिंदू सण आहे. 
   नवरात्री म्हणजे नऊ रात्रींचा समूह. असा शब्दशः अर्थ घेता येईल. हा सण पूर्वापार नऊ रात्री आणि दहा दिवस असा साजरा केला जातो.
१) प्रथम नवरात्री ही वर्षात चैत्र महिन्यात (मार्च/एप्रिलमध्ये) साजरी केली जाते. हा वासंतिक नवरात्रोत्सव. हा चैत्र शु।। प्रतिपदा ते चैत्र शु।। नवमीपर्यंत साजरा होत असतो.
२) दुसरी नवरात्री अश्विन महिन्यात ( सप्टेंबर -ऑक्टोबरमध्ये) साजरी केली जाते. हा शारदीय नवरात्रोत्सव होय. हा देवीउत्सव अश्विन महिन्याचा शुक्ल पंधरवड्यात शु।। प्रतिपदा ते शु।। नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. 
    अशा रितीने हिंदू धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून चैत्र मासी आणि अश्विन मासी अशी दोन वेळा केली जाते. आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात या नवरात्रोत्सवाला
ग्लोबल स्वरुप प्राप्त झाल्याचे दिसते.
    सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूप चैतन्यालाच देवी- आई - माता असे नाव देण्यात येऊन तिची पूजा करण्याची आदर्श प्रथा सुरु झाली. शाक्त संप्रदायी लोकांनी तर तिला विश्वजननी म्हटले.शाक्त पंथात शक्ती ही उपास्य देवता असून तिची परमतत्त्व या स्वरूपात उपासना केली जाते. हीच संवित्स्वरूपा देवी भगवती आपल्या अंतर्गत असलेल्या सृष्टीस बाह्य स्वरूपात प्रकट करते.
    शाक्त पंथ हा शक्तिप्रधान आहे. बऱ्याचशा ग्रंथांची रचना शिव व शक्ती यांच्या संवादाच्या रूपात केलेली आहे. ज्या ग्रंथात शक्ती किंवा पार्वती ही उत्तर देणारी असून शिव हा प्रश्नकर्ता असतो, तो शाक्त संप्रदायातील ग्रंथ होय.शैव संप्रदायात याच्या उलट ग्रंथरचना दिसते.शाक्त संप्रदायींनी या देवी भगवतीलाच
सर्वश्रेष्ठ देवता,आदिमाया,आदिशक्ती, जगदंबा म्हणून गौरविले. 
   देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात. ती पुढीलप्रमाणे:- 
सौम्य रुपातील देवी :- 
उमा, गौरी, पार्वती, जगदंबा,भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे आहेत.
उग्र रुपातील देवी :-
दुर्गा, काली, चंडी, भैरवी,चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.
नवरात्रोत्सवातील देवीची नऊ रुपे :-

" प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति,कूष्मांडीति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि,ब्रह्मणैव महात्मना।।"
 १. शैलपुत्री २. ब्रह्मचारिणी ३. चंद्रघंटा 
 ४. कुष्मांडा ५. स्कंदमाता ६. कात्यायनी 
 ७. कालरात्री ८. महागौरी ९ सिद्धिदात्री
अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.
     नवरात्रोत्सव हा ऋतू परिवर्तनाचा काळ म्हटला तर चुकीचे ठरणार नाही. नवरात्रीमुळे आपल्यात नवीन शक्ती, नवा उत्साह,नवीन उमेद निर्माण होत असते. बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभावही मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो.असे वर्णन आहे.
 ✨ वासंतिक नवरात्रोत्सव हा विशेषत्वाने ऋतूराज वसंताच्या काळात येतो.रानावनातील वृक्षराजीची पर्णगळती झालेली असते. सर्वत्र रानावनात वाहत्या वा-याबरोबर कोरड्या पर्णाचा भितीप्रद खडऽखळाट सळसळ ऐकू येऊ लागते.हिरव्या पर्णाअभावी वृक्षही निस्तेज वाटू लागतात.रानात सर्वत्र जणू भकासलेपण पसरल्याचे दिसते.रानाची चैतन्य शक्ती क्षीण झाल्याचे दिसते.अशा वेळी ऋतूराज वसंत येतो.निष्पर्ण वृक्षराजी चैत्रपालवीची प्रसन्नता घेऊन षोढषवर्षीय कन्येसारखी लाजू लागते. जणू कोवळ्या लाल,केशरी, हिरव्या रंगांच्या साज लेवून रान नटू थटू लागते.पाहता पाहता रानात चैतन्याची सळसळ दौडू लागते.वृक्षराजी फुलांनी आणि फळांनी बहरते.नव्या,लाजरी नवरीसारखा साजशृंगार करुन, मोठ्या दिमाखात झुलणा-या आम्रमंजरीच्या मनमोहक पुष्पभाराला अलवार स्पर्श करुन वारा रानावनात,द-याखो-यात अमृतवार्ता सांगत सुटतो.हवालदिल झालेल्या रानपाखरांना सावलीचा गारवा मिळाल्याने त्यांनाही नवीन जीणे जगण्याची शक्ती मिळते.हा आगळा चैतन्यशक्तीचा आगमनाचा आनंदसोहळा म्हणजेच वासंतिक नवरात्रोत्सव म्हणता येईल.
असे हे सृष्टीतील परिवर्तन म्हणजे शक्तीचाच हा खेळ होय.
✨ शारदीय नवरात्रोत्सव हा शरद ऋतूच्या सुरूवातीलाच येत असल्यामुळे या उत्सवाला शारदीय नवरात्रोत्सव असे म्हटले जाते. अनादी काळापासून हा उत्सव साजरा करण्यात येतो. पाऊसाचे चार महिने शेतीची कामे सुरु असत. पूर्वीच्या काळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असे. त्यामुळे त्या काळी समाजातील लोकांना बाहेर फिरणे,एकत्र येऊन आनंदसोहळे साजरे करणे शक्य होत नसे.काही वेळा तर पाऊस अखंड संततधार लावायचा.तर काही वेळा पाऊस महिनाभर मुक्कामही करायचा.धो धो कोसळणारा पाऊस नद्या नाल्यांना पूर- महापूर आणत असे.अशावेळी एका गावाचा दुस-या गावाशी संपर्क तुटायचा.परिणामी त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्रीया,पुरुष घरातच थांबत असत. गावात मंदिर वा मठ असलाच तर तिथे पावसाच्या चातुर्मासात पांडवप्रताप,महाभारत, रामायण, किंवा अठरा पुराणांचे वाचन,तसेच भजन गायन असे मन प्रसन्न करणारे कार्यक्रम होत असत.किंवा नामसप्ताहाचेही आयोजन होत असे.हाच काय तो त्या काळी एक विरंगुळा होता.
    हळूहळू पाऊस ओसरु लागे,शेतातील पेरलेली पिके तरारुन येत.ज्वारी,बाजरीच्या कणसात मोत्यासारखे दाणे चमकू लागत. कणसे पक्व होऊन पावसाळ्यात पेरण्यात आलेले पीक हे पहिल्यांदा घरात येण्याचा हा काळ असे.भारत हा कृषिप्रधान देश व कृषीसंस्कृतीचा देश म्हणूनच ओळखला जातो. त्याकाळी शरद ऋतूत येणारा हा नवरात्रोत्सव समाजातील धुरीणांनी कृषिविषयक लोकोत्सव बनवला. त्यामुळे शेतकरी व सगळा समाज हा उत्सव अत्यंत आनंदाने,प्रेमाने साजरा करु लागले. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत असे. म्हणूनच नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घराखालच्या स्थंडिलावर नऊ धान्याची पेरणी करीत, व दसऱ्याच्या दिवशी ते धान्यांचे वाढलेले कोवळेंकूर उपटून देवीला वाहत. ही पद्धत या सणाचे कृषिविषयक स्वरूपच व्यक्त करते. पुढे प्रगतीपथाकडे वाटचाल करणा-या समाजात या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले व नवरात्री हा भगवती देवीच्या उपासनेचा उत्सव बनला.
      नवरात्रोत्सवात ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते.शक्तीच्या ( देवीच्या) उपासनेतून कुंडलिनी जागृती करता येते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्रोत्सव हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचे पर्व आहे असेही म्हणता येईल.
 ✨ नवरात्रोत्सव: अर्थ -
वरवर विचार करता ' नवरात्री म्हणजे नऊ रात्री ' असे म्हणता येईल. भारतीय संख्याशास्राचा विचार करता आठ या संख्येला वृद्धी,क्षय ही दोन्ही आहेत.मात्र नऊ ही संख्या अशी आहे की ती कोणत्याही परिस्थितीत मैत्री वाढवेल, पण क्षीण होणार नाही.उदा.
९×२=१८ , १+८= ९.       ९×७=६३ , ६+३=९
९×३=२७ , २+७= ९.       ९×८=७२ , ७+२=९
९×४=३६ , ३+६= ९.       ९×९=८१ , ८+१=९
९×५=४५ , ४+५= ९.       ९×०=०९, ०+९=९
९×६=५४ , ५+४= ९ 
गुणाकाराअंती आलेल्या संख्यांची बेरीज केली तर---- १८+२७+३६+४५+५४+७२+८१+०९=४०५ही संख्या येते.त्यातही ४+०+५=९ हाच मित्र अंक मध्यवर्ती होय.
   असा हा नऊ अंक म्हणजे परिपूर्णता….! पूर्णत्वाचे प्रतिक ! नऊ म्हणजे चक्राचे शेवटचे टोक ! नऊ म्हणजे संपूर्णत्व ! अथपासून ते इतिपर्यंत! सर्वांना आपल्यात सामावून घेणारे ! सर्वांगीण,सर्वदा ! शिवाय मानवाचा शरीराची सुद्धा नऊद्वारे होत.ती पुढीलप्रमाणे - 
दोन डोळे,दोन कान,दोन नाकपुड्या, एक मूत्रद्वार(शिश्न) ,एक गुदद्वार अशी दोन गुप्तांगे आणि एक तोंड. 
आणि या नऊद्वारांचा संबंध नऊ मुलभूत जीवन प्रेरणांशी पुढीलप्रमाणे जोडता येईल:-
तोंड- पोषणेच्छा , दोन डोळे - संरक्षणेच्छा,व प्रभुत्वेच्छा,दोन कान- अनुसरेणेच्छा व श्रवणेच्छा,दोन नाकपुड्या म्हणजे गंधेच्छा [ सुगंध व दुर्गंध] मूत्रमार्ग - कामेच्छा आणि गुदद्वार - उत्सर्जनेच्छा हे सुद्धा नऊ या संख्येत मोजले जातात.यांचेही संयम,तप, बल,शौर्य, तेज वाढविण्यासाठी सुद्धा नवरात्री उत्सव साजरा होत असावा.असे वाटते.
✨ नवरात्रोत्सव: बोध -
म्हणतात ना…
" यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ।।"
अर्थ - जिथे स्त्रियांची पूजा होते,तिथे देवतांचा सतत वास असतो.आणि जिथे स्त्रियांची पूजा होत नाही तिथे सकल चांगले कर्म सुद्धा निष्फळ होते.
     आधुनिक संत प्रवृत्तीचे भारतीय थोर विचारवंत महात्मा गांधी म्हणतात की,
" जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी ! " अशा शब्दात त्यांनी स्त्रीला महत्त्व देऊन तिला सबला करण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुलेंनी आपल्या पत्नीचा स्त्रीत्वाचा दर्जा उंचावून स्त्री अबला नसून सबला आहे हे सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यातून व प्रत्यक्ष जगण्यातून सिद्ध केले. 
   हा विचार लक्षात घेता समाजाच्या संरक्षण संवर्धन, समृद्धीसाठी स्री शक्तीचा केलेला सन्मान,स्री शक्तीविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता,तिचे पावित्र्य जपण्यासाठी सर्व स्वरुपी,सर्वरुपी स्रीची पूजा करण्याची ही कल्पकता खूपच थोर वाटते.अनादि काळी आपल्या पुर्वजांनी मांडलेला हा विचार प्रत्यक्षात साकार करण्यासाठी नवरात्रीच्या उत्सवातून निकोप विचारांचा पेरणीचा,समाज एकात्मतेचा जागर सुरु केला.त्यांना कृतज्ञतेने नमन केल्यावाचून पुढे जाणे शक्यच नाही!🌹🙏🙏🙏
    स्री म्हणजे प्रकृतीचे महन्मंगल रुप! जननी,माता,आई,जन्मदात्री,माय,अंगाई गाऊन जोजवणारी स्तनदा,कोणी वाकड्या नजरेने आपल्या बाळाकडे पाहिले तर त्याचे लचके तोडण्याचे सामर्थ्य असलेली वाघीण ! बाळाला लहानाचे मोठे करतांना आपल्या पंचप्राण एकत्र करुन सावली धरणारा वटवृक्ष,बाळाचा भार नऊ महिने नऊ दिवस आपल्या पोटात जीवापाड सांभाळून,त्यास जन्म देऊन पूर्णत्वास नेणारी, वंदनीय स्त्रीला माता, देवी रुप समजून तिची नऊ रुपांत पूजा करणे म्हणजे कृतज्ञतेचा हा दिव्य भव्य विनम्र सोहळाच !
   असंख्य रुपांनी, असंख्य हातांनी विश्व पुरुषाच्या वंशवेलीची केलेली ही जपणूक… नित्य…अव्याहत…निरंतर त्याची कृतज्ञतापूर्वक केलेली पूजा ! आंतरिक जिव्हाळ्याने केलेले स्मरण ! 
   मातेच्या ऋणातून परतफेड करणे शक्य नाहीच…! मात्र तिच्या अगणित ऋणातून काही अंशी उतराई होण्याचा हा अल्पसा प्रयत्न! अखंड पूजा ! नऊ दिवस ! नऊ रात्री ! म्हणजे नवरात्री!
  नवरात्रोत्सवप्रेमींनो… शेवटी एक नम्र विनंती !🙏 
✨घटस्थापना करणे म्हणजे नवरात्री नव्हे...!
✨अखंड ज्योत लावणे म्हणजे नवरात्री नव्हे...!
✨दांडिया खेळणे म्हणजे नवरात्री नव्हे...!
तर नवरात्री म्हणजे या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेता घेता बालिका जन्माचा आणि 
समस्त माता,भगिनिंचा,लेकी-सुनांचा सन्मान करणे म्हणजेच नवरात्री होय ! व ह्या सर्वांचा जागरण म्हणजे " नवरात्रोत्सव ! " होय.

सर्व मंगल मांगल्ये ।
शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरी ।
नारायणी नमोस्तुते ।।

चला तर …आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवानिमित्ताने नवसंकल्प करु या! 

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्पम् "





गुरुवार, सप्टेंबर १५, २०२२

राणीचे प्रीतसाम्राज्य

माझा राणीचे प्रीतसाम्राज्य  पसरले दशदिशी !
सगळेच  प्रजाजन येथे उपभोगती  सुखराशी !

राणीच्या  साम्राज्याला चहुदिशी  माया तटबंदी
दररोज  नाश्त्याला इथे फळे  लाडू  अन्   बुंदी

राणीच्या साम्राज्यात... वाहे तेला - तुपाचे पाट
दूध  आणि  दहीचे  तर कधी रिते न होती माठ

राणीच्या साम्राज्यात... नेसायला जरतारी वस्र
जिव्हाळा स्नेह- सौख्य  राज्याची शोभती शस्र

राणीच्या साम्राज्यात...भेद नसे आपला परका
गरीब श्रीमंत स्री पुरुष न्याय मिळे इथे सारखा

राणीच्या  साम्राज्यात... गुणांची होते हो कदर
जया अंगी जैसे गुण त्यास दरबारी मिळे आदर

जनहो,एकदा याच माझा राणीच्या साम्राज्याला
येता व्हाल मोहित मन तयार होईना परतायला

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


शुक्रवार, ऑगस्ट २६, २०२२

सर्जा राजा

पोळा सणाला सजलायं
माझा सखा सर्जा राजा
कृतज्ञ मी आज सेवेला
कौतूकाला त्यांचा बॅडबाजा

कुंकू अक्षतां लावते मी
औक्षण करिते सर्जा राजा 
पाटलाचा तू खरा मैतर
ऋणी तुझी करते पूजा

सर्जा राजा तू राबतो…
तेव्हा शेत शिवार फुलते 
आनंदाने मी तुझा मुखी
घास पुरणपोळीचा भरविते

महादेवा,करीतो आम्ही 
तुझी प्रार्थना जोडीने !
सर्जा राजाची लाभू दे संगत
नांदू दे बळिराजा सुखाने!

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


गुरुवार, ऑगस्ट ११, २०२२

रक्षाबंधन

रक्षा सूत्र बांधते तव हाती
औक्षण  करिते भाऊराया
विजयोस्तू  भव  तू  सदा!
अबाधित राहो  प्रेम माया

धागा एक हा रेशमाचा
आत स्नेह जिव्हाळाचे झरे 
दारी लखलख चंद्र सूर्य तारे
लाभो तुज प्रभूकृपेची छाया

सासरच्या परसात फुलवेन
मी प्राजक्ताची शुभ्र फुले
वा-यासवे धाडीन सुखगंध तुले 
आनंदे यावे तू मज भेटाया

जीवनात कधी न होवो
तुज षढ्रीपुंच्या विषारी स्पर्श
अंगणी नांदो गोकुळाचा हर्ष 
संकटात द्यावी कृष्णाची माया

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल 
" पुष्प "


बुधवार, ऑगस्ट १०, २०२२

लव्ह स्टोरी [ भूलोळी]

अपनी है लव्ह स्टोरी
सात आश्चर्यापैंकीची एक
प्यार करनेवाले देते मिसाल
शरिर दोन आत्मा एक वचन नेक

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, ऑगस्ट ०२, २०२२

सांजवेळ

सांजवेळ
ही ओली सांजवेळ
तू जाऊ नकोस दूर
का  हे पेटले मनात
आज कळेना काहूर

गेला निघून सूर्यदेव
मिठीत  घेई प्रतीची
सख्या ये शांतवाया
ही   भेटीची   हुरहूर

डोळ्याच्या नंदादिपी
प्रीतिचा केल्या वाती
ये ! मालवून टाक तू
होऊ  मिलनात चूर !

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल 
" पुष्प "

बुधवार, जुलै २७, २०२२

तू जिथे तिथे मी !

तू जिथे तिथे मी!

प्रिये,  तुझे   अन्   माझे 
वेगळे नाहीच ग् काही असे
तू जिथे तिथे मी आहेच!
शरिरं दोन आत्मा एकच वसे 

आपली फक्त दोन शरिरं 
तरी...तुझं माझं नाही अलग
एक श्वास तुझा एक माझा
एकमेकांना देवू जगू सलग ! 

प्रिये,तू पुष्परिणी मी जलतळे
मी चंद्र नभीचा तू शुक्रतारा
तू अधीर मन मी क्षण प्रीतिचा 
तू आस मिलनाची मी उनाड वारा

प्रिये,तू जल मी मासा ना वेगळे 
तुझ्याविना जीव हा तळमळे
प्रार्थना श्री विघ्नहर्ता चरणी 
आयुष्य सोबती जगू दे सगळे!🙏 

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

रविवार, जुलै २४, २०२२

देवा तुझा छंद


देवा तुझा छंद   । लागला रे मला।
तुझा विना काही । आवडेना ।।१।।
सावळी ती कांती । पाहतो मी नित्य।
गातो गोड नाम  ।  आवडीने ।।२।।
चतुर्भूज मूर्ती  ।  भाळी गंध टिळा ।
छंद लागे जीवा । डोळीयासी ।।३।।
कर कटेवरी  ।  उभा विटेवरी ।
पंढरी नगरी  । पांडुरंग ।।४।।
चंद्रभागा तिरी । मेळा वैष्णवांचा ।
किर्तनात रंगे । जगजेठी ।।५।।
भक्त भेटी लागी । वेडावला हरी।
वाट पाही कांता । उभी दारी ।।६।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, जुलै २१, २०२२

लग्नाची बेडी

लग्नाची बेडी...
नवी असता वाटे गोड
काही दिवस गेले की
भासू लागते अवजड

लग्नाची बेडी...
प्रारंभी वाटे सुंदर दागिना
संसाराचा गाडा ओढताना
जीवाची होई मग दैना !

लग्नाची बेडी...
जणू लाडू वाटे गोड गोड
जो न खाई त्याला पश्चात्ताप
जो खाई त्याचा जिभेला होई फोड

लग्नाची बेडी...
हाती घालावी विचार करुन
ती तुटता तुटत नाही
आयुष्य जाते हो सरुन...!

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


बुधवार, जुलै २०, २०२२

आत्मविश्वास

आत्मविश्वास  असे एक शस्त्र
हाती  असू  द्यावे  आयुष्यभर
शत्रू  कितीही  असो  बलवान
विजय मिळतोच रणांगणावर !

आत्मविश्वास मनी भरुन लंकेत
वानरसेना  बळे लढले  श्रीराम 
वधिला बलवान दशानन रावण
सितेसह परतले प्रभू अयोध्याधाम 

आत्मविश्वास बळे महाभारतात
कुरुक्षेत्री  लढले ते  पाच पांडव
शुर  विर महारथींना  पुरुनसुद्धा
दुर्योधनासह  मारिले शत कौरव

आत्मविश्वास  मनात  रुजवावा
त्यास  घालावे गुरुनिष्ठेचे  पाणी
अपंगही  लांघतो  मग उंच गिरी
त्या वेड्यांची इतिहास गातो गाणी 

आत्मविश्वासाचे एक स्फूलिंग
असाध्य ते साध्य करीते...
ध्येयाप्रती जो झाला वेडा
दुनिया त्याचे चरणी झुकते !

आत्मविश्वास  ज्याचा  हरवला
त्यावर काडीपैलवान भारी पडे
अंगी  कितीही असू द्या हो बळ
भाळी पराभवाचा  शिक्का चढे

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, जुलै १९, २०२२

प्रेमनगर

प्रेमाच्या वाटेवर आहे
माझ्या  सखीचं  गाव
दुरदूर   देशी  ओळख
प्रेमनगर   त्याचे  नाव

लता - वेलीची  वसने
करीती  येथे परिधान
पुष्परिणीच्या   बागेत
करिती   मंगल  स्नान

बासुरीची धुन साधते
मंजूळ   मधुर  संवाद
येथे   सान असो थोर
ठाऊक  नसे हो  वाद

पुष्प  कळ्यांचा माळा
शोभे  ललनांचा  गळा
कुंतली  सुगंधी  गजरा
धन्य वाटे पाहता डोळा

गाव वेशीवर येता होई
स्नेह -सौख्याने स्वागत
नक्की या  हं भेटायला
प्रेमनगरच्या  दुनियेत ! 

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल
" पुष्प "

सोमवार, जुलै १८, २०२२

सप्त रेशमी धागा

प्रिये,एक रेशमी धागा 
तुझ्या माझ्या प्रीतिचा 
नाजूक नात्याचा !        
 प्रिये,दुसरा रेशमी धागा 
आपल्या सहजीवनाचा 
अतूट विश्वासाचा!
 प्रिये,तिसरा रेशमी धागा 
आपल्या मनगटावर बांधलेला 
आयुष्यभर सोबतीचा! 
प्रिये,चौथा रेशमी धागा 
संसाररथ बांधणारा
सुखी नातेसंबधाचा ! 
प्रिये,पाचवा रेशिम धागा 
एकमेकां समर्पणाचा 
जसा शत जन्मीचा! 
प्रिये,सहावा रेशमी धागा 
न्याय-नीति-धर्माचा 
सप्तवचन पालनाचा! 
प्रिये,सातवा रेशमी धागा 
घरादाराला बांधणारा 
संकटातही टिकून राहणारा!   
 
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " 

बुधवार, जुलै १३, २०२२

माझे गुरु

आज आषाढ शुद्ध पौर्णिमा: व्यासपौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा - या पावन दिनी समस्त ज्ञात अज्ञात गुरुंना विनम्र साष्टांग नमन!💐🙏
आज उगवला अती पावन दिन
आपण गुरुदेवा चरणी होऊ लिन

आई बाप आद्य गुरु आपुले
जन्म देऊनी जग त्यांनी शिकविले

द्वितीय गुरु ते गुरुकुली भेटे
त्यांचा शब्द जणू अमृत वाटे

कृष्णासम सखा तृतीय गुरु
संकटात दूर करीतो अंधारु

चतुर्थ गुरु सखी सचिव ती
देतसे संसाराला सामर्थ्य ती

गुरु तो पंचम मानावी सृष्टी
दुःख क्लेश जाळाया देई दृष्टी

षष्ठ गुरु केली मी वसुंधरा
देते पेरावे ते उगवे संदेश खरा

सप्तम गुरु करावा घननीळा
शिकवी रिते व्हावे देऊन सकळा

अष्ट गुरु सागर सरिता झरा
तिरा येता जीव उद्धरावा खरा 

नवम् गुरु पुष्प लता वृक्षवल्ली
शत्रू मित्र विसावता तळी देती सावली

दशम गुरु चंद्र सूर्य ग्रह तारे
भेद न करता नित्य सृष्टी उदधारे

घडले दर्शन जसे गायिली गाथा
सकल गुरु चरणी ठेवितो माथा

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...