Kaayguru.Marathi

सोमवार, जानेवारी ३१, २०२२

द्रोण काव्य लेखन नियम

द्रोण काव्य कसे लिहावे ? 
द्रोण काव्यरचना करतांना कोणते नियम लक्षात घ्यावे.याचे हे सुंदर नियम आज आपण समजून घेणार आहोत.
चला तर...नियम समजून घेऊन द्रोण काव्य लिहू या !
१) यमक गरजेचे नसते.
२) पहिल्या ओळीत जेवढी अक्षरे असतील, त्यापेक्षा दुसऱ्या ओळीत एक अक्षर घटलेले हवे. दुसऱ्या ओळीत जेवढी अक्षरे असतील त्यापेक्षा तिसऱ्या ओळीत एक अक्षर घटलेले हवे. असेच एकेक अक्षर घटवीत पुढे लिहीत जावे.
३) शेवटच्या ओळीत केवळ एक अक्षर असलेला शब्द हवा! 
४) खालील उदाहरण पहा म्हणजे नियम समजतील:
द्रोण काव्य : शिर्षक - का ?
पाणी काहीच का दाटत नाही -------------११
आता आधीसारखे डोळ्यात--------------१०
का कोण जाणे अलीकडे ----------------- ९
काही वाटतंच नाही -----------------------८
कोणाविषयी मला ------------------------७
का बरे रडावे ---------------------------- ६
नाहकच मी ------------------------------५
कुणासाठी--------------------------------४
कशाला----------------------------------३
नाही ----------------------------------- २
का ---------------------------------- ---१
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
म्हसावद.  

रविवार, जानेवारी ३०, २०२२

षढाक्षरी काव्यलेखन

षढाक्षरी काव्यलेखन 
------------------------------------------------------
षढाक्षरी काव्यलेखन हा कविता लेखनातील एक सहज सुलभ काव्यनिर्मितीचा प्रकार होय.
षढाक्षर शब्दांची फोड अशी करता येईल.
षढ् म्हणजे सहा .याचाच अर्थ सहा अक्षरात लिहायचे ते षढाक्षरी काव्य.
काव्य लेखन नियम :-
१) हे काव्य लिहितांना सामान्यतः चार ओळींचे एक कडवे असे लिहावे.
२) चार ओळींची कडवी किती असावी ? याला बंधन नाही.
३) पण...शक्यतो षढाक्षरी काव्यलेखन करतांना चार चार ओळींचे सहा कडवे रचिले तर ते अधिक सुंदर वाटावे.
[ माझे मत.]
४) हे काव्य लिहितांना काव्यातील प्रत्येक ओळीत मोजून सहाच अक्षरे असावीत.
५) ओळीच्या प्रारंभीच्या शब्द एक दोन तीन चार अक्षरी असला तरी चालतो.
६) अष्टाक्षरी काव्यलेखनाप्रमाणे शब्दलेखनाचे बंधन नाही.
७) कडव्यातील प्रत्येक ओळ ही सहा-सहा अक्षरांचीच असावी.
८) चार ओळीपैंकी दुस-या आणि चौथ्या ओळीत " यमक " साधला जावा.हे लक्षात घ्यावे.
९) कडव्यातील प्रत्येक ओळ ही सहा-सहा अक्षरांचीच असावी. 
उदा. १).                       २) 
काय मागू देवा.        * सखे तुझे रुप
तुजपाशी मी रे.        * वेड लावी मला
न मागता दिले          * काढू कसा ग मी
तू सर्वकाही रे.          * जीव हा गुंतला
चला तर मग...लिहू आपण षढाक्षरी काव्य !👍
          🙏🌹शुभस्य शिघ्रम !🌹🙏
         ©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मनसागर [ चारोळी ]


राणी...!
आकाश भरलंय ग् ता-यांनी
पहाटेचा सुटला शितल वारा
पण...तुझ्या  मुख  चंद्राविना
उधाणच  नाही ग्  मनसागरा

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, जानेवारी २८, २०२२

मनमीत [ भूलोळी लेखन ]


कुछ तो लोग कहेंगे
ही तर आहे जगाची रीत
उनकी बाते भूल जाना सजनी
नको करु विचार तू माझी मनमीत

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, जानेवारी २७, २०२२

माणूस

 
जीवन तुरुंगाच्या ऊंच भिंती
 येथे कुणी नाही कुणासाठी
 संपतात येथे रक्ताची नाती
 मातीही राखते ईमान
 ...जे पेरले ते अंकुरण्यासाठी
 मात्र...माणूस नेहमीच
 का असतो बेईमान ?
 स्वार्थाची माणसाला तहान
 मतलबासाठी स्वत्व ही गहाण
 आणि..जंगलही जळते 
 वणवा होऊन ..
 समर्पणाने ते ही होते बेभान
 मात्र...माणूस कृतघ्नपणे
 का होतो हैवान ?
 विश्वासाचे होतात घात
 रक्ताने माखतात हात
 श्वासाने फुंकायचा असतो श्वास
 मात्र... येथे का गळ्यात 
 वंचनेचे फास ?
 हे भग्न चित्र रंगविण्यासाठी
 अपुरा पडतो कँनव्हास
 अन्..इथेच संपते...
 जीवनायुष्याची आस ! 

         ■ प्रा.पुरूषोत्तम पटेल " पुष्प "
             म्हसावद.ता.शहादा

बुधवार, जानेवारी २६, २०२२

भारत माझा महान


७३   वा   प्रजासत्ताक  दिवशी
करीतो मी  हुतात्म्यांना प्रणाम
दिले  तयांनी प्राणांचे बलिदान
केला स्वतंत्र  भारत देश महान

करीतो  मी  आज  दृढ  संकल्प
तिरंगा  तुझी   ठेवून   मी  साक्ष
पंचखंडात  मी  वाढविन  कीर्ती
दे आशिष भूमाते वंदन तुजला दशलक्ष !

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, जानेवारी २५, २०२२

चतूर पोपट निर्बुद्ध राजा

  
   एक राजा होता.तो मृगया करण्यासाठी एका घनदाट अरण्यात गेला.शिकार करतांना तो खूप फिरला.पण,त्याला मृगाची शिकारच सापडली नाही.सूर्य डोक्यावर आला.
फिरता फिरता तो थकला,त्याला खूपच तहानही लागली.
त्याला धड चालण्याचे त्राण राहील की नाही,याची भिती वाटू लागली.राजा कठोर मन करुन आत्मविश्वासाने एकेक पाऊल चालत राहिला.
     खूप दूरपर्यंत राजाला एकही नदी,एकही ओहोळ ,
एकही सरोवर,एकही कुप दिसले नाही.त्याच्या घशाला आता कोरड पडू लागली होती.तेवढ्यात त्याला समोर एक हिरवेगार,डेरेदार वृक्ष दिसला.त्या वृक्षाच्या एका फांदीवरील पानावरुन त्याला नितळ जलाचे थेंब जमिनीवर नितळत असल्याचे भासमान झाले.ते दृष्टोत्पत्तीस पडताच राजाला अपार आनंद झाला.जणू देवच पावला,असे राजाला वाटले .
     राजा हर्षानंदाने जल निथळत असलेल्या वृक्षाच्या फांदीखाली जाऊन उभा राहिला.त्या फांदीच्या एका पानावरुन जमीनीवर निथळणारे पाणी पिण्याची त्यास तिव्र इच्छा झाली.ते पानावरुन गळणारे पाणी झेलण्यासाठी राजाने पळस पानांचे द्रोण बनविले.त्यात तो पानावरुन गळणा-या पाण्याचा एकेक थेंब झेलून घेत होता.अखेर थोड्या वेळाने तो द्रोण पाण्याने भरला गेला.राजाला आनंद झाला.तेवढ्यात त्या झाडाच्या एका फांदीवर एक पोपट येऊन बसला.भरलेल्या द्रोण पात्रातील पाणी पिण्याचा इच्छेने राजा तो द्रोण ओठांना लावणार,
तेवढ्यात तो पोपट मिठ्ठूऽऽ मिठ्ठूऽऽ करीत राजा जवळ गेला,व त्याने झडप मारुन राजाच्या हातातील द्रोण उलटा केला.व पोपट पुन्हा वृक्षावर जाऊन बसला.ओठाशी आलेला घोट वाया गेल्याने राजा खूपच निराश झाला.
     राजाने पुन्हा दुसरा प्रयत्न केला,व पुन्हा पानावरुन ओघळणारा पाण्याच्या एकेक थेंबाने त्याने द्रोण पात्र भरुन घेतले.तो पानी पिण्यासाठी ओठाला लावणार तेवढ्यात तो पोपट पुन्हा राजाच्या दिशेने उडाला.व त्याने पुन्हा झडप घालून पाण्याच्या द्रोण उलटा केला.पोपटाचा हा क्रूरपणा पाहून राजा आता क्रोधित झाला.तो मनाशी म्हणाला,
 " मी पुन्हा तिसरा प्रयत्न करेन.यावेळी मी सावध राहीन,
पोपट आला की त्याला तलवारीने कापूनच काढीन! " 
     संकल्प करुन राजा पुन्हा पाण्याच्या एकेक थेंब द्रोण पात्रात झेलू लागला.तिस-यांदा द्रोण पात्र त्याने मोठ्या कष्टाने भरले खरे! तो ते द्रोण पात्र ओठाला लावणार तेवढ्यात पोपट उडत उडत आला.द्रोणपात्रावर त्याने झडप घातली.त्या झटापटीत द्रोण पात्र खाली पडले,आणि उलटे होऊन रिकामे झाले.पण...राजाने त्या पोपटाला तलवारीने कापून टाकले होते.तो दोन तुकडे होऊन जमिनीवर मृत पडला होता.
     राजाची तहान आता शिगेला पोहोचली होती.त्याला एकेक थेंब गोळा करण्यात वेळ नव्हता.त्याने विचार केला," जिथून पाणी येत आहे,त्याच जागी जाऊन पाणी पिऊन तृप्त व्हावे."
     राजा त्या फांदीच्या मुख्य भागापर्यंत पोहचला.त्याने जे पाहिले,ते पाहून तो खूप घाबरला.त्या फांदीवर भला मोठा विषारी नाग विळखा घालून बसला होता.तो एकसारखा फुत्कार करीत होता.त्याच्या फुत्कारातून त्याच्या तोंडातील विषारी लाळ बाहेर पडत होती.तीच लाळ त्या फांदीवरुन त्या एका पानावरुन जमीनीवर निथळत होती.
     राजाला सर्व प्रकार समजला.पोपटाचे एकदा नव्हे,
तिनदा द्रोण पात्र उलटे करण्याचा प्रयत्न ही लक्षात आला.
आपण या नागाचे विष प्राशन करु नये म्हणून पोपटाने आपणास तीनवेळा वाचविण्याचा प्रयत्न केला.पण आपण त्याचे प्रामाणिक व निस्वार्थी प्रयत्न समजून घेऊ शकलो नाही.आपण कृतघ्न व महापापी ठरलो.याचे राजाला खूपच दुःख झाले.तो खूप हताश झाला.राजा पोपटाबद्दल दुःख करु लागला. " आपण माणूस असूनही,बुद्धीवान असूनही एका मुक्या पक्षाची भावना समजून घेऊ शकलो नाही.मी क्रुर व वधकर्ता ठरलो.मी जर माझ्या क्रोधाला नियंत्रणात ठेवले असते.व पोपट असे का करीत आहे,हे संयमाने व निरीक्षणाने जाणून घेतले असते तर,मी पोपटाला समजू शकलो असतो.त्याचे प्राण वाचवू शकलो असतो.मी तर प्राण वाचवणा-याचेच प्राण घेतले कृतघ्न ठरलो मी ! " 
राजाने मनोमन प्रतिज्ञा केली.  
" मी प्रतिज्ञा करतो की,आजपासून मी मुक्या प्राणी,
पक्ष्यांना समजून घेऊन तयांवर दया करीन ,क्रोधामुळे विवेक हरवतो. माणूस चांगले-वाईट समजून घेण्याची बुद्धी गमावून बसतो. मी कोणावरही क्रोध करणार नाही ! "

तात्पर्य :- क्रोधाने मनुष्याला दुःख मिळते.म्हणून क्रोधावर नियंत्रण ठेवा !


© प्रा.पुरुषोत्तम पटेल "पुष्प "


सोमवार, जानेवारी २४, २०२२

लेक माझी [कविता ]

आज ' राष्ट्रीय कन्या दिन ' समस्त लेकींना समर्पित 
माझे हे काव्य !
लेक माझी
  लेक माझी…
लाडाची गुणांची खाण
तिच्या जन्मानं गायलं
देवानं माझा जीवनाचं 
अविट सप्तसुरांचं गाण ।।१।।
माझ्या संसार अंगणी
उगवलं लख्ख चांदणं छान 
   लेक माझी…
भासे नवदुर्गा अंबा,भवानी
काली,अन्नपूर्णा,जगदिश्वरी,
नवविचार नऊ रुपांनी
माझा मना येई उधाण।।२।।
माझ्या संसार अंगणी 
उगवलं लख्ख चांदणं छान
  लेक माझी…
प्रात:काळची मधुर भूपाळी
माझा जगण्याचा श्वास
जन्म माझा धन्य कराया 
देवानं दिला पित्याच्या मान।।३।।
माझ्या संसार अंगणी 
उगवलं लख्ख चांदणं छान
लेक माझी…
माझा जीवनग्रंथाचं पान 
लेकीच्या रुपात धाडलं 
भगवंताने माझा दारी 
आनंदाचं शुभवर्तमान।।४।।
माझ्या संसार अंगणी 
उगवलं लख्ख चांदणं छान
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " म्हसावद

रविवार, जानेवारी २३, २०२२

आई

  आई

आई, माझ्या जन्मासाठी 
नऊ मास नऊ दिस तू
सोसल्या अनंत वेदना 
आई, तुझ्यामुळेच 
मी पाहतोय ही दुनिया ।।१।।

आई, जन्मापासून तूच
माझ्या आद्य वंद्य गुरु 
तुझ्याच संस्कार वाटेवर 
माझी वाटचाल सुरु.   ।।२।।

आई, तुझा एकेक शब्द 
मला गीता रामायण 
कृतघ्न अन् अधम ठरे 
तुझे होता विस्मरण    ।।३।।

◽प्रा.पुरूषोत्तम पटेल " पुष्प "
 म्हसावद

शनिवार, जानेवारी २२, २०२२

बुद्धदेवाचे दर्शन !


मन झाले हो आज माझे शुद्ध
दर्शनास आले आज मज बुद्ध

दिला उपदेश मज 
पाया चिरडू नये मुंगी
उतरली हो आज माझी
अभिमानाची गुंगी
सुविचारांचा पथावर झालो शुद्ध
दर्शनास आले आज मज बुद्ध

म्हणाले मज समजून घे
न दुखवावे काया वाचा कुणा
अहिंसा परमोधर्म
ध्यानी असू दे रे मना
जन्म एक कर्म नाही रे युद्ध
दर्शनास आले आज मज बुद्ध

सर्वाभूती मीच वसे
जे जे रंजले गांजले
म्हणू नये त्यासी हिन दिन
नाम अनंत रुप वेगळाले
दावी विश्वरुप प्रकटले अनिरुद्ध
दर्शनास आले आज मज बुद्ध

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, जानेवारी २१, २०२२

श्री रिद्धी सिद्धी विनायक यात्रा म्हसावद

   

 म्हसावद.... सातपुडा पायथ्यालगत नंदुरबार जिल्ह्य़ातील शहादा तालुक्याच्या उत्तर दिशेला वसलेले एक टुमदार गाव... म्हसावदच्या खांद्याला खांदा लावून स्थिरावलेले एक अनकवाडे आणि दुसरे कोकणवाडे यांची एकच ग्रुप ग्रामपंचायत कार्यान्वित आहे. वादविवाद माहिती नसलेली ही अभिमानास्पद वैशिष्ट्य असणारी ग्रामपंचायत होय. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, भौतिक, वैद्यकीय, शेती, व्यापार, उद्योग आणि  साहित्य व संस्कृती या विविधांगी  क्षेत्रात सदैव प्रयत्नशील, उल्लेखनीय नाव म्हसावद असून येथे अनेक  वर्षांपासून सातत्याने यात्रोत्सव आयोजित होत आहे. दरवर्षी पौष मासी शु.संकष्ट चतुर्थीला यात्रा भरते. म्हसावद-तोरणमाळ रस्त्यावर पुरातन नवसाला पावणारे श्री रिद्धी सिद्धी विनायक मंदिर आहे. या दैवतांच्या पावन सान्निध्यात यात्रोत्सव साजरा केला जातो.
येथील मंदिराची वैशिष्ट्ये :-

© मंदिरातील श्री. रिद्धी सिद्धी विनायक मूर्ती  ही स्वयंभू आहे.
© मंदिर पूर्वामुखी असून दोन भागात विभागलेले आहे.
© मंदिराच्या एका भागात दक्षिणेस श्री रिद्धी विनायक देवता स्थापित असून हे उजवी  सोंड असलेले  दैवत होय.
© आणि याच  भागातील मंदिरात  शिवलिंग   असून हे तारकेश्वर महादेव म्हणून प्रसिद्ध आहे.
© उत्तरेकडील दुसर्‍या भागात श्री सिद्धी विनायक देवता स्थापित आहे. हे डावी सोंड असलेले  दैवत आहे.
© याच भागातही शिवलिंग असून ते रुद्रेश्वर महादेव म्हणून पुजिले जाते.
© दर संकष्ट चतुर्थीला स्त्री पुरुष भाविक श्रद्धाभावाने दर्शनाला येतात.

© जीर्णोद्धार :-
म्हसावद येथील जुनी - जाणती जेष्ठ-वयोवृद्ध जनाकडून प्राप्त  माहिती नुसार:
© मंदिराच्या पहिला जीर्णोद्धार 1966 साली करण्यात आला.
© दुसरा जीर्णोद्धार 2003 साली करण्यात आला.

© यात्रा वैशिष्ट्ये :-
* ही यात्रा म्हसावदसह थेट सातपुडा  पर्वतराजीतील  गावपाड्यात, थेट नर्मदा काठापर्यंत आबालवृद्धाना एक वार्षिक आनंदोत्सव असते.
* यात्रेत म्हसावद आणि पंचक्रोशीतील आबालवृद्धांची हजेरी.
* महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश या तिन्ही राज्यांना एकत्र आणणारी यात्रा.
* विविध भाषा, संस्कृती व वेशभूषेचे दर्शन घडविणारी यात्रा.

© खवय्येगीरी :-
* विविध हॉटेल व स्टालची आकर्षक उभारणी.
* हॉटेलमधील खास गुळाची जिलेबीची लालपरी म्हणून चविष्ट  ओळख.
* गोडशेव इंडीयन चॉकलेट नावाने आस्वादक  परिचय. आणि  खास भजी,कचोडी या पदार्थांना खवैय्यांची प्रथम पसंती असते.
* म्हसावद आणि परिसर ऊसाचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे.यात्रेत ताजा ऊसाचा रस रसवंतिच्या छूनछून वाजणा-या घुंगरूच्या तालावर पिण्याची  मजा काही औरच!

© मनोरंजन :-
यात्रेत आबालवृद्धांसाठी मनोरंजनाच्या साधनांत बालगोपाळांसाठी पालखी झुले असतात. सेल्फीचा जमान्यातही कॅमेरात फोटो काढून देणारे फोटो स्टुडिओ देखील भाव खाऊन जातात. पालखी झुल्यांवर नवतरुण-तरुणी देखील  बसून आनंद लुटताना पाहायला मिळतात.लहान मुलांसाठी  किर्र.. किर्र, कर्रर्र-कर्र वाजत मुलांना आकर्षित करणारे विविधरंगी, विविधढंगी लहान मोठे फुगे पाहून श्रावणातील इंद्रधनु धरेवर उगवला की.. असे वाटते. मनमोहक सूर आळवत यात्रेत भटकंती  करणारे बासरी विक्रेता पाहताच कृष्णसख्याच्या भेटीस आसुसलेली प्रिय सखी राधा डोळ्यासमोर उभी राहते.
दिवसभर यात्रेत भटकंती करुन रात्री विसावलेल्या शौकीनांसाठी सिनेमा थिएटर, तमाशात काळू बाळू तमाशा मंडळ, रघुवीर खेडकर, मंगलाबाई बनसोडे हे तमाशा फड आवर्जून उपस्थिती लावतात.
अशी ही श्री रिद्धी सिद्धी विनायक यात्रा..
  दुसरीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार झालेले  चावी व रिमोट कंट्रोल द्वारा चालणारी खेळणी. मोठ्या प्रमाणावर विक्री होतांना दिसतात. खेळण्याचा स्टॉलवर ' हे नको, ते हवे'. असा हट्ट  धरुन रडून आकांत करणारी मुले व त्यांची समजूत काढतांना आई बाबाची होणारी जीवाची घालमेल, प्रसंगी नवरा बायकोतील वादही पाहायला मिळतात.

©शेतीपयोगी साहित्य :-
* म्हसावद  यात्रेत शेतीपयोगी साहित्य ही पाहायला मिळते.
© महिलासाठी सौदर्यप्रसाधने :-
यात्रेत  महिलांसाठी सर्व प्रकारची सौदर्यप्रसाधने, पायातील पैंजण, जोडवी, टिकली, बांगडी व अजूनही बरेच काही स्टॉलवर मांडलेले दिसतात.
   अशी ही म्हसावद, ता.शहादा. येथील श्री रिद्धी सिद्धी विनायक यात्रा... आनंदाची,  सुखाची, आपल्यातीलच हरवलेल्यांना शोधणारी, कधी हुरहुर लावणारी, ब-याच वर्षांनी आपल्या  प्रियजनांची गाठभेट घडविणारी, मनाला नवीन उर्मी देणारी, कधी आठवणींचा हुंदका दाटवून - भावनांना अश्रूद्वारा मोकळी वाट करुन देणारी... आठवणीतील मोरपीस...!
यंदा पौष ।। कृ.३।। शुक्रवार दि.२१ जानेवारी २०२२ रोजी संकष्ट चतुर्थीच्या पावन पर्वाला भरणारा म्हसावद,ता.
शहादा येथील श्री रिद्धी सिद्धी विनायक यात्रोत्सव कोरोना पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे.  यामुळे  ग्रामीण भागातील अर्थकारण पार कोलमडून गेल्याची चिंता सर्वांनाच दंश करुन गेली आहे.

पुढच्या वर्षी ही यात्रा उत्साहाने साजरी होऊ दे ! ही आर्त विनवणी यंदा सगळ्यांनी श्री रिद्धी सिद्धी विनायक चरणी मनोमन केली आहे..!🌹🙏🙏🙏

    🙏🌹 श्री रिद्धी सिद्धी विनायक नमः!🌹🙏

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " म्हसावद, ता.शहादा, जि.नंदुरबार भ्रमणध्वनी-९४२१५३०४१२

गुरुवार, जानेवारी २०, २०२२

वसुंधरे तू द्यावेस दान !

वसुंधरे तू द्यावेस दान !
हे वसुंधरे तू द्यावे मज मुक्तहस्ते
पेरीतो मुठीत  घेऊन एक दाणा
टाकून दे  भूवरी मोत्यांच्या सडा
तृप्त  होऊ   दे  सकल जीवांना !

हे वसुंधरे तू द्यावे मज मुक्तहस्ते
ओथंबून  यावे  मेघ  येथे सगळे
व्हावी शांत तृषा द्यावे समाधान 
विरुन जावी दिसणारी मृगजळे

हे वसुंधरे तू  द्यावे मज मुक्तहस्ते
फूलू  फळू   दे  शेतशिवार सारी
कणसात चमकू दे माणिक-मोती
दैन्य   सरु दे ! लक्ष्मी यावी  दारी

हे  वसुंधरे तू द्यावे मज मुक्तहस्ते
हाती न राखता नीती- मती दान
सरु दे  शत्रूबुद्धी द्वेष अन् क्लेश
दिगंतराळी जावो समृद्धीचे गाणं

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, जानेवारी १८, २०२२

टोपणनाव : कालचे आणि आजचे !

टोपणनाव:कालचे आणि आजचे !

     मी नोकरीच्या निमित्ताने जन्मगाव सोडून वालगावी आलो.कधी न पाहिलेले हे गाव.१९९१ चे ते दिवस होते.१९९० च्या दशकात महाराष्ट्रात बहुतांश शिक्षण संस्थांकडून शाळा सुरु करण्याचा सपाटा सुरु होता.जसा मृगाच्या सरी बरसल्या की, बळीराजाची पेरणीची लगबग सुरु होते.तशी गाव-खेड्यात-पाड्यात नवीन शाळा उघडल्या जाऊ लागल्या...अर्थात त्या शाळा विनाअनुदान तत्वावरच सुरु होत होत्या.आणि एक दोन वर्षांत सरकारी अनुदानावर येत होत्या.
     अशाच एका विनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयात मी रुजू झालो.नशिबाने म्हणा किंवा संस्थेचे पूर्वकार्य संचिताने म्हणा,ही शाळा दोनच वर्षांत अनुदानपात्र ठरली.माझे मूळ गाव पन्नास कि.मी.अंतरावर असल्याने (तेव्हा आजसारखी दळणवळणाची साधने मुबलक नव्हती.) मी एक खोली घेऊन वालगावीच राहू लागलो.माझे गाव जेमतेम आठशे हजार वस्तीचे ;तर वालगावं हे सुमारे आठ नऊ हजार लोकवस्तींचे गांव. गावात अठरापगड जाती सुखैनैव नांदत होत्या.असे चित्र मी अनुभवत येथे राहू लागलो.
     आपल्या मुला-मुलींना कोडकौतुकाने कसे बोलवावे.हे मी राहत असलेल्या गल्लीत अनुभवत होतो.प्रारंभी मीही नवीनच असल्याने घरातील, गल्लीतील बाया-माणसे ज्या नावांनी त्या मुला-मुलींना हाक मारीत त्याच नावाने मीही हाक मारु लागलो.त्यात प्रामुख्याने मुलींमध्ये " मुन्नी, गुड्डी, चक्कू, पिकी, टिंकी, भुरी, माई, आक्कू " ही नावे अग्रस्थानी होती.तर मुलांच्या नावात " भैय्या, लोदू, पप्पू, पिंटू, बापू, लोटू, गोटू,अण्णा, दादू " ही नावे अग्रस्थानी होती.मी विचार करायचो की, ह्या मुला-मुलींना ही खरी नावे असतील का ? हो ! ही नावे खरीच असली पाहिजे.
याला पुष्टी मिळणारी गोष्ट मी स्वतः आजमावली होती . अर्थात ह्याला कारणही तसेच होते म्हणा ना ! मी ज्या अकरावी वर्गाच्या वर्गशिक्षक होतो, त्याच वर्गाच्या कॅटलागवर मी एका विद्यार्थिनीचे नाव " अक्का *** पाटील " असेच लिहित असे.तर एका मुलाचे नाव लिहितांना " अजय अण्णा खैरनार '' असे लिहित असे.
दिवसामागून दिवस वर्षामागून वर्ष जाऊ लागली.मी राहत असलेल्या गल्लीतील मुलें मुली मोठी होत होती.ती आता माझ्या शाळेत शिकायला येऊ लागली.मग कळले " अरे ! यांची खरीखुरी नावे किती किती सुंदर आहे.त्यात कुणाचे नाव मुग्धा, मंदाकिनी, निलिमा ,गुणवंती, प्राजक्ता अशी तर मुलांच्या नावात चेतन,गौरव, राकेश, प्रकाश, ध्रुव,प्रजल अशी सुंदर आधुनिक नावे होती.पण घरातील वडीलधारी मंडळी, आई-वडील,आजी-आजोबा त्यांना आत्यंतिक प्रेमाने, कौतुकाने - मुन्नी, गुड्डी, चक्कू, पिकी,भुरी,टिकी , माई, आक्कू " या नावांनी संबोधित असत.मुलांना भैय्या, लोदू, पप्पू, पिंटू, बापू, अण्णा,लोटू, दादू ,भू-या " ही नावे होत.सुमारे सहा सात वर्षांनंतर हळुहळू कळू लागले की ,अरे... ही तर कोडकौतुकाने ठेवलेली टोपण नावे आहेत.
     माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षण घेतांना मराठी कथा, कविता,धडा अभ्यासतांना बरीच टोपण नावे तोंडपाठ करावी लागली होती.त्यात बालकवी, केशवसूत, गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, कवी बी, आरती प्रभू, माधव ज्यूलीयन, स्वातंत्र्यवीर, साने गुरुजी, अनिल, साहित्यसम्राट,ग्रेस,कुंजविहारी,दत्त, अज्ञातवासी असे अनेक साहित्यिकांची नावे मराठीच्या शिंदे सरांनी आमच्या कडून तोंडपाठ करवून घेतली होती.ही नावे मला ज्ञात होती.त्यांचे कार्यकर्तृत्वही सरांकडून जाणून घेतले होते.
ह्या नावांना साहित्याचा मलमली स्पर्श, अमृताची चव,आणि गंगेचे शुचित्व आणि गंधर्व नगरीचे सूर प्राप्त होते.ते तर महाराष्ट्रातील वाचकांच्या तना-मनात सतत रुंजी घालणारी नावे होती.
      ...पण एक शिक्षक म्हणून वालगावात मी जी काही टोपण नावे अनुभवत होतो.आणि आजही अनुभवतो आहे.त्यातील ९९.९९ टक्के मुला-मुलींची खरीखुरी नावे आजही गाव-गल्लीत ठाऊक नाहीत.सर्वांचीच लग्न झाली.मुली सासरी निघून गेल्या.तरी त्यांची ओळख अमक्याची मुन्नी, पिकी ! तमक्याची गुड्डी,भूरी,चक्कू हीच नावे सर्वामुखी टिकून आहेत.तर मुलांपैकी बहुसंख्य बाप बनले आहेत. त्यांच्या मुला मुलींना विचारले , तू कोणाचा मुलगा किंवा कोणाची मुलगी ग्ं ? " ती लहान मुलं आजही बोबड्या बोलात म्हणतात, " मी पिंट्याचा मुलगा, मी मुन्नी बाईची मुलगी, मी चक्कूचा, मी लोट्याचा मुलगा! " अशी गंमतीशीर व ओठांवर हसू आणणारी उत्तरे ऐकायला मिळतात.म्हणतात ना, " लहान मूल हे सर्व गोष्टी मोठ्यांच्या निरीक्षणातून, ऐकण्यातून, कृतीतून शिकतात.आपल्या आई-बाबांना घरातील मंडळी, नात्यातील मंडळी, गल्लीबोळातून कोणत्या नावाने हाक मारली जाते.ते ते ऐकतात.तीच नावे लक्षात ठेऊन स्वतःची ओळख गंमतीशीर नाव जोडून देतात. हा त्यांचा दोष म्हणता येणार नाही.मग हा सुद्धा एक संस्कार म्हणावा का ? तो चांगला की वाईट हे वैचारिक मंथनातून सिद्ध होईलच!
पण तत्पूर्वी गल्लीबोळातील या टोपणनावांना एक विशिष्ट वयाची मर्यादा असावीच! हे ठरवायलाच हवे!अशी टोपण नावे ठेवणे आपणास योग्य वाटते काय? 

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

सोमवार, जानेवारी १७, २०२२

कविता लेखन करतांना...

कविता म्हणजे काय ?
असे म्हणतात की, " गोष्टीला द्रवरूप होऊन भिडण्याची क्षमता म्हणजे कविता होय. " 
म्हणून म. सु. पाटील म्हणतात, 
‘ तिचा वेध घेण्यासाठी कवी स्वत:मध्ये जितका खोलवर बुडी घेतो, तितका तो कमी वैयक्तिक बनत जातो. तो मानवाच्या मूलभूत स्वभावापर्यंत पोचतो. अशा वेळी सर्वांना समान अशा मानवभावांची नाना रूपे आकलण्यात व ती अभिव्यक्त करण्यात तो गढून गेलेला असतो. तेथे कवीचे भाव वैयक्तिक राहत नाहीत. आविष्कार प्रक्रियेतच ते स्व-पर-तटस्थ
संबंधांच्या पलीकडे जातात.म्हणून ते कोणाचेही होतात. त्यांना विश्वात्मता प्राप्त होते. ’ त्यामुळे जगण्याच्या सर्वसामान्य तऱ्हांपेक्षा ती जाणिवेला अधिक तीव्र भासते. या तीव्रतेमागे चिरंतन आणि सार्वत्रिक होण्याची इच्छा प्रबळपणे कार्यरत असते. सर्वसामान्य चेहऱ्यांमधीलच एक स्वतंत्र आवाज म्हणजे " कविता " होय
२) रचना आणि धारणा यांमधील सगळ्यात कमी अंतर म्हणजे कविता होय. त्यामुळे ‘स्व’ला पुन:पुन्हा मोडण्यातून आणि रचण्यातून ती उत्पन्न पावते.
' स्वप्न रचणे ’ हा कवितेचा स्थायी भाव असतो. त्यामुळे ‘ कविता ’ ही रचना तीनही काळांच्या पार्श्वभूमीवर खरचटून उभी राहणारी रचना ठरते. ती विसंगतीने व्याकूळ होऊन घडणारी रचना आहे. त्यामुळे कवितेतील कुठलेही विधान जितके अधिक स्वप्नपूर्ण, तितके तीनही काळांच्या पार्श्वभूमीवर ते अधिकाधिक प्रभावी ठरते. कारण हे स्वप्नपूर्ण विधान काळाशी, वास्तवाशी फटकून उभे राहत नाही, तर काळाला सामावून त्याच्या पुनर्रचनेतून हे विधान उभे राहते.

@ प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

रविवार, जानेवारी १६, २०२२

भ्रम

मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो...
हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे...
खरं तर यापैकी आपलं नसतं काही
खरंतर तुमची फक्त वेळ आहे !
ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे
नाहीतर...
सर्व जवळ असून सुध्दा परके...!
बोलायचं असतं मनातलं सारं काही
पण ऐकणारं नसतं कुणी 
सल असली तर सांगायची राहते
बल असलं तर दाखवायचं
राहून जातं...सारं काही !
साठत जातं मनाच्या कप्प्यात
एखाद्या अडगळीच्या खोलीत 
साठत जावं तसं...!


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
      

  

शनिवार, जानेवारी १५, २०२२

व्यथा [ अलक ]

            रात्रीचे ११ वाजले . सज्जन म्हणाला, साहेब, " खूप उशीर होतोय ! रिमा घरी एकटीच आहे.आतापर्यंत चार कॉल येऊन गेले हो तिचे. निघू का ? " त्याचे बोल ऐकताच मी दचकलो.
" काय? रात्रीचे अकरा वाजलेत ? " टेबलवर पडलेला मोबाईल हाती घेतला तर काय, मोबाईल स्विचऑफ ?
मोबाईल ऑन केला , पण तो ऑन झालाच नाही.
अधिक वेळ न घालवता मी सज्जनचाच फोनवर स्मिताला फोन लावला. 
" मी मंदार बोलतोय ! " 
" साहेबांना आठवण झाली वाटतं ? " स्मिताने रागातच विचारले.
" स्मिता , अग् मी आता घरी यायलाच निघालो.दहा मिनिटांतच पोहचतो हं ! सगळं काही बोलतो तुझ्याशी ! ठेवतो गं फोन ! " सज्जनला फोन हाती देत ...
" सज्जन, ऑफिस लॉक कर ! " सूचना केली.
सज्जनने मला किल्ली दिली.ती बॅगेत ठेवून मी घाईतच कार स्टार्ट केली.सज्जनला चांदणी चौकात उतरवले.
 मेन रोडवरुन  गडद अंधारातून कार सुसाट धावत होती.अचानक हेडलाईटच्या उजेडात एक तरुणी कारसमोर आली.मी कर्चऽऽकऽन ब्रेक लावला.
नशीब...तीला ठोस लागली नाही की कार उलटली नाही.दैव बलवत्तर म्हणा ना ! 
मी हेडलाईट सुरु ठेवून उतरलो.
" ए , पागल आहेस की काय ? तू तर मरशील पण मलाही मारशील ना.कुठं जायचंय तुला ?... प्रेग्नंट दिसतेय तू तर ? आणि... " 
मला बोलू न देता ती म्हणाली ,
" नाही जगायचं मला . पोटातील बाळासह मरायचंय मला ! " ती रडतच कारसमोरच बसली.
"अग्ं बाई, तूला जगावंच लागेल.आईपण म्हणजे इतकं सोपं वाटतं तुला ? आई होणं म्हणजे देवाचं वरदान . नशिबानं लाभत पोरी हे ! चल, कुठं राहते तू ? तिथं सोडतो मी तुला . "
" नाही जायचं मला त्या नरकात ! त्या राक्षसांनी आधीच माझ्या दोन मुलींचे गळे दाबून मारलं.आताही धमकी दिली,मुलगी झाली तर ती तर मरेलच...पण, तुही मरशील ! मग का जगावं मी ? मरु द्या न मला नकोय हे जगणं ! "
" ऐंक पोरी, कितीही संकटे आली तरी आशेचा दिवा कधीच विझू द्यायचा नसतो. पोटातलं बाळ घेऊन आत्महत्या करणे हे तर महापाप आहे.आणि दुसरी गोष्ट , आई होता यावे म्हणून नवससायास करतात लोकं! बाई होणं सोपं पण, आई होणं महाकठीण असतं.आईपण ही बाजारात मिळणारी एखादी वस्तू नाही.तुला सहज लाभलंय हे आईपण ! नको करु हा वाईट विचार. " मी समजूत घातली.पण ती काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हतीच .
" माझं जगणं हे मरण यातनाहून कठीण आहे.मग मी जगायचं तरी कुणासाठी ? मी शरीराने जीवंत पण मनाने कधीच मेले आहे. मरु द्या ना दादा मला ! "
" तू दादा म्हटलंय न मला ? मग ऐंक तर. पोरी, आईपण हे हृदयातून पाझरावं लागतं. बाळाला जन्मतः मरण नकोय म्हणून तूच मरायला निघालीस की नाही.पण हे शक्य नाही हो ! तू आता माझ्या स्नेहालयात राहायचं ! स्नेहालय हेच तुझं घरं आणि संसार ! ऐकतेस ना ? "
तीनं होकार दिला.तीला कारमध्ये बसवून कारने यू टर्न घेतला.तिला स्नेहालयात पोहचवून मी घरी आलो.
रात्रीचे साडेबारा वाजले होते.स्मिताची समजूत घातली.
तीने वाद न घालता मला समजून घेतले.
सकाळी सहा वाजता लॅडलाईन खणखणला.फोनवर मेट्रो राणेमावशी बोलल्या, " दादा, तुम्ही रात्री आणलं त्या पोरीने जुळ्यांना जन्म दिला . दोघे... नाही हो तिघेजण सुखरुप आहेत ! "
मी मनोमन देवाला नमस्कार केला. 
" देवा ! तुही कमाल करतो की ! जिथं एकाची उणीव तिथं तू दोन दोन लेकरं दिली की ! जय हो ! "

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


 

शुक्रवार, जानेवारी १४, २०२२

मकरसंक्रांत


श्रीविघ्नहर्ता घालितो तुला मी विनम्र दंडवत
सकल  जनांसी बळ दे करु कोरोनावर मात

सूर्यदेवा ! उत्तरायण  होऊ  दे तू आता सुखी
दुःख  दैन्य  घालव उमलू  दे  गोड शब्द मुखी

गुळ-साखरेची गोडी अन् स्निग्धता तिळाची
तिळातिळाने  वाढावी नाती स्नेह-सौख्याची

देवा, तू  दाता ! पूर्ण  कर ही मनीची इच्छा !
आनंदाने  देतो  प्रभो  मी तुमच्या  कृपेने हो 
मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा !
        
       ©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, जानेवारी १३, २०२२

पोरा , ऐंक ना जरा !

पोरा , ऐंक ना जरा!

पोरा बैस  न् जरा जवळ ऐंक रं माझ्या मनातलं
तुझ्याच रं सुखासाठी  रक्त जाळलं मी उरातलं !

सांगणार  नव्हतो रं पण आज येळच तशी आली
वृद्धाश्रमी घाला थेरड्याला सून सकाळी म्हणली

स्वतः उपाशी राहून मी घास भरवला तुला मुखी
तुझ्या आजारपणी माझ्या मांडीची होती रं उशी

तुझ्या शाळंचा खर्चापायी नाही  केली मौजमजा
आणं... तू शिकून आता  साईब  झाला रं राजा!

तुला  मोठ्ठं  करतांना  मी  लई खाल्ल्या रं खस्ता 
आता म्हातारपणी नको दावू वृद्धाश्रमाचा रस्ता

पोरा, ऐंक ! पेरलं तेच  उगवतं  हा  दैवाचा न्याय 
पटतंय का  तुझ्या मनाला विचार करुन पाहायं !

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

बुधवार, जानेवारी १२, २०२२

शिवसूर्य जननी


स्वराज्यजननी राजमाता जिजाऊसाहेब यांना 
🙏🌹शब्दसुमनांनी विनम्र अभिवादन!🌹🙏
                       शिवसूर्य जननी
दशदिशांना काळोख असता
तू झाली सह्याद्रीच्या उषःकाल
तुझ्याच पोटी शिवसूर्य उदेला
जाळीयेला अन्यायाचा काळ 

तुझ्या रुपे प्रकटली भूवरी
अष्टभूजा जगतजननी भवानी
शब्दाशब्दात प्रसवे तुझ्या
दृष्ट दुर्जन संहारक वाणी

अनंत यातना सोसून वर्मी
आऊ ! तू मानिली ना हार
शून्यातून निर्मिले हिंदस्वराज्य
खजील केलेस शत्रू ते चार !

जिजाऊ तुमचे विचारधन
पेरीले हो मी माझ्या हृदयी 
कोटी कोटी विनम्र अभिवादन
करितो आज पावन समयी !🙏
   
🙏🙏🙏🌹विनम्र अभिवादन!🌹🙏🙏🙏
        ©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "



मंगळवार, जानेवारी ११, २०२२

मृगनयनी [भूलोळी]

जब तुझे देखा मैंने
प्रिये भासली मृगनयनी
ओ रुप सुहाना दिल में जा बैठा
शोधू का मी कुणी तूच आता माझी राणी !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

सोमवार, जानेवारी १०, २०२२

मानवा समजून घे !

मानवा जागा हो!

मतलबासाठी नेहमीच  पुढे  पुढे
अनंत  कोटी - कोटी अनंत हात
अखेरच्या  क्षणी रे   सरणावरती
शुष्क  लाकडांचीच मिळते साथ !

सुखात  आमचाच  म्हणणारे  ही 
संकटे  येताच  हो पळ  काढतात
अखेरच्या त्या  क्षणी  माणसाला
जमीन  पुरते  हो  साडेतीन  हात

जगी कोणीच  नसतो  रे कुणाचा
सगळेच  म्हणती  हे अंतीम सत्य
तरी  हा  माझा, ती माझी,ते माझे
म्हणतच जगती इथे हे नव्हे असत्य…!

म्हणूनच   म्हणे   हा  " पुरुषोत्तम "
नको  रे  करु  मोह  नको  रे माया
जन्मभर  का   झिजवशी  मानवा
सन्मार्ग  विसरुन  स्वार्थाने काया !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

रविवार, जानेवारी ०९, २०२२

मुखकमल


सखी पहाटेच्या त्या दवाने...
तन-मन ग्  भिजते
प्रेमकिरणात न्हाऊनी
मुखकमल तुझे फूलते 

कळी खुलता प्रीतिची
हृदय पुष्प दरवळते
फुलपाखरू होऊन मन माझे
तवभवती भिरभिरते 

सखी,देहफुलांच्या कोषी
मधुगंध वा-यासवे प्रसवे
मकरंद प्याया ज्वानीचा
अधीर ओढ मज लागते

मनमोहिनी रुप तुझे
क्षणाक्षणाला मोहविते
होऊन नक्षत्रमाला
डोळ्यात तव पाझरते.

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शनिवार, जानेवारी ०८, २०२२

बाप समजतो तेव्हा !


बापाची    नजर    होती   करारी
रुबाब  तर  काय सांगू लई भारी
रंजल्या    गांजल्या    माणसाला
आयुष्यभर  दिली त्यांनी  उभारी 

उपाशी राहून भरवला मुखी घास
मला   दिला आनंद सुखाची रास
काट्याकुट्याची    तुडवून    वाट
माझ्या भल्यासाठी सोसला त्रास !

बाप   हयात   होता  तोपर्यंत  तो
कळूनच  आला  नाही मला कधी
बाप   समजून   यावा   म्हणून...
बाप  व्हावे  लागते आपण आधी

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, जानेवारी ०७, २०२२

स्वप्नभ्रमर

                                
                  तुझी दैदिप्यमान यशकिर्ती 
                ऐकताच हृदयात तू बसला
                रोज स्वप्नी तू दिसू  लागला

तू  येतो  जातो त्या  वाटेवर
तुला   चोरुन   का   असेना
एकदा   तरी  पाहीन  रं  मी
   
    या जन्मी जवळून नाही पाहिले तुला
    पण...पुढच्या  जन्मी नक्कीच तुझ्या 
    शेजारच्याच  घरात  जन्मा  येईन  मी

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

बुधवार, जानेवारी ०५, २०२२

अनाथांची माय : सिंधुताई

अनाथांची माई : सिंधुताई !
[ शब्दसुमनांची ही श्रद्धांजली 🌹🙏]

अनाथांची     आई     तू 
नाव     तुझं     सिंधुताई
शब्दात    तुझी     महती
सांगता     यायची  नाही

माई     जन्मापासून   तू
खूप    खाल्ल्या   खस्ता
जिद्द       मनात     ठेवून 
शोधला    सेवेचा    रस्ता

माई  तू  जळत्या चितेवर
भाजून  खाल्ली  भाकरी
स्वाभिमाने  जगली माई 
केली नाही कधी चाकरी

माई तुझ्या शब्दा-शब्दांत 
माया -ममत्वाची पखरण
तुझ्या     दोन्ही    हातात
जणू   निर्धाराचा      घण

आई-बाबाविना पोरक्यांची
माई ,   झाली  तू  तर माय 
रंजल्या  गांजल्या बाळांना
झाली   चालण्याचा    पाय

माई   तू  जगविली  ममत्वे
जणू  दिड  सहस्र  बालतरु 
ममता  बालसदन   अंगणी
आनंदें   खेळतात   लेकरु !

माई...देश  विदेशात   आहे
तुझ्या   कार्याचे     गुणगान
मिळवले    स्वकर्तृत्वाने   तू
सातशेहून  अधिक   सन्मान

माई      तुझ्या     कार्यापुढे 
वाटे     गगनही    हे   खुजे
झाले    बहू   होतीलही बहू
पण    तुझ्यासम    न   दुजे

माई   तुझ्या  विचारात मज
दिसे   आभाळाची   निळाई
तुझे   एकमेवाद्वितीय  कार्य
अनंत  पिढ्यांना     नवलाई

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

सोमवार, जानेवारी ०३, २०२२

समजून घे !


हे  ही  माझं ते ही माझं
हव्यास  संपतच   नाही
गड्या,असं करुन करुन
पोट  कधी  भरत  नाही

गुंठा गुंठा जमिनीसाठी
तू आयष्यभर राबलास
शेवटच्या  क्षणी  सगळं
ते  इथेच सोडून गेलास

शेत  कसता  कसता  तू 
जन्माची खाल्ली खस्ता
बांध  कोरुन  कोरुन  तू
चोरला रे  वहिवाट रस्ता

हिस्से  वाटणी  करतांना
तोलून    मापून    घेतलं
अन् एका एका इंचासाठी
भावांचंच  डोके  फोडलं

तू गेल्यावर पोराबाळांनी
गुंठा  विकून  श्राद्ध  केलं 
घामाचा  थेंब  न गाळता
मौज   मस्तीतचं  खाल्लं

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...