Kaayguru.Marathi

शनिवार, जानेवारी १५, २०२२

व्यथा [ अलक ]

            रात्रीचे ११ वाजले . सज्जन म्हणाला, साहेब, " खूप उशीर होतोय ! रिमा घरी एकटीच आहे.आतापर्यंत चार कॉल येऊन गेले हो तिचे. निघू का ? " त्याचे बोल ऐकताच मी दचकलो.
" काय? रात्रीचे अकरा वाजलेत ? " टेबलवर पडलेला मोबाईल हाती घेतला तर काय, मोबाईल स्विचऑफ ?
मोबाईल ऑन केला , पण तो ऑन झालाच नाही.
अधिक वेळ न घालवता मी सज्जनचाच फोनवर स्मिताला फोन लावला. 
" मी मंदार बोलतोय ! " 
" साहेबांना आठवण झाली वाटतं ? " स्मिताने रागातच विचारले.
" स्मिता , अग् मी आता घरी यायलाच निघालो.दहा मिनिटांतच पोहचतो हं ! सगळं काही बोलतो तुझ्याशी ! ठेवतो गं फोन ! " सज्जनला फोन हाती देत ...
" सज्जन, ऑफिस लॉक कर ! " सूचना केली.
सज्जनने मला किल्ली दिली.ती बॅगेत ठेवून मी घाईतच कार स्टार्ट केली.सज्जनला चांदणी चौकात उतरवले.
 मेन रोडवरुन  गडद अंधारातून कार सुसाट धावत होती.अचानक हेडलाईटच्या उजेडात एक तरुणी कारसमोर आली.मी कर्चऽऽकऽन ब्रेक लावला.
नशीब...तीला ठोस लागली नाही की कार उलटली नाही.दैव बलवत्तर म्हणा ना ! 
मी हेडलाईट सुरु ठेवून उतरलो.
" ए , पागल आहेस की काय ? तू तर मरशील पण मलाही मारशील ना.कुठं जायचंय तुला ?... प्रेग्नंट दिसतेय तू तर ? आणि... " 
मला बोलू न देता ती म्हणाली ,
" नाही जगायचं मला . पोटातील बाळासह मरायचंय मला ! " ती रडतच कारसमोरच बसली.
"अग्ं बाई, तूला जगावंच लागेल.आईपण म्हणजे इतकं सोपं वाटतं तुला ? आई होणं म्हणजे देवाचं वरदान . नशिबानं लाभत पोरी हे ! चल, कुठं राहते तू ? तिथं सोडतो मी तुला . "
" नाही जायचं मला त्या नरकात ! त्या राक्षसांनी आधीच माझ्या दोन मुलींचे गळे दाबून मारलं.आताही धमकी दिली,मुलगी झाली तर ती तर मरेलच...पण, तुही मरशील ! मग का जगावं मी ? मरु द्या न मला नकोय हे जगणं ! "
" ऐंक पोरी, कितीही संकटे आली तरी आशेचा दिवा कधीच विझू द्यायचा नसतो. पोटातलं बाळ घेऊन आत्महत्या करणे हे तर महापाप आहे.आणि दुसरी गोष्ट , आई होता यावे म्हणून नवससायास करतात लोकं! बाई होणं सोपं पण, आई होणं महाकठीण असतं.आईपण ही बाजारात मिळणारी एखादी वस्तू नाही.तुला सहज लाभलंय हे आईपण ! नको करु हा वाईट विचार. " मी समजूत घातली.पण ती काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हतीच .
" माझं जगणं हे मरण यातनाहून कठीण आहे.मग मी जगायचं तरी कुणासाठी ? मी शरीराने जीवंत पण मनाने कधीच मेले आहे. मरु द्या ना दादा मला ! "
" तू दादा म्हटलंय न मला ? मग ऐंक तर. पोरी, आईपण हे हृदयातून पाझरावं लागतं. बाळाला जन्मतः मरण नकोय म्हणून तूच मरायला निघालीस की नाही.पण हे शक्य नाही हो ! तू आता माझ्या स्नेहालयात राहायचं ! स्नेहालय हेच तुझं घरं आणि संसार ! ऐकतेस ना ? "
तीनं होकार दिला.तीला कारमध्ये बसवून कारने यू टर्न घेतला.तिला स्नेहालयात पोहचवून मी घरी आलो.
रात्रीचे साडेबारा वाजले होते.स्मिताची समजूत घातली.
तीने वाद न घालता मला समजून घेतले.
सकाळी सहा वाजता लॅडलाईन खणखणला.फोनवर मेट्रो राणेमावशी बोलल्या, " दादा, तुम्ही रात्री आणलं त्या पोरीने जुळ्यांना जन्म दिला . दोघे... नाही हो तिघेजण सुखरुप आहेत ! "
मी मनोमन देवाला नमस्कार केला. 
" देवा ! तुही कमाल करतो की ! जिथं एकाची उणीव तिथं तू दोन दोन लेकरं दिली की ! जय हो ! "

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


 

१४ टिप्पण्या:

  1. ह‌दयस्पर्शी कथालैखन केले सरजी ✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. वास्तव स्थितीचे दर्शन घडवले सरजी✍️✍️👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. व्वा...!अतिशय सुरेख लिखाण..खूपच सुंदर विचार..👌👌👌👍👍👍💐💐

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...