Kaayguru.Marathi
गुरुवार, सप्टेंबर ३०, २०२१
प्रिये (भूलोळी)
राग नको रे!(शिरोमणी काव्य)
" शिरोमणी काव्य रचना' ’ हा एक शब्दाधारीत काव्य प्रकार आहे. हा फारच सुंदर आणि मनाला भावणारा काव्यप्रकार आहे. काही जण याला " काव्य शिरोमणी " असेही म्हणतात.
१) या काव्यात प्रत्येक कडवे चार ओळींचे असते.
२) चार ओळीत दहा शब्दांची खालील प्रमाणे विभागणी असते.....
पहिल्या ओळीत एक शब्द,
दुसऱ्या ओळीत दोन शब्द
तिसऱ्या ओळीत तीन शब्द आणि
चवथ्या ओळीत चार शब्द
अशी एकूण दहा शब्दांची मांडणी असते.
३) एका विशिष्ट गोष्टीभोवती या काव्याची पूर्ण वीण गुंफलेली असते. हा शब्द प्रत्येक कडव्यात पहील्या ओळीत स्थायी असतो. म्हणूनच कदाचित या काव्यप्रकाराला शिरोमणी हे नाव पडले असावे. बाकीच्या तीन ओळीत त्याचे गुणवर्णन अथवा सकारात्मक किंवा नकारात्मक भाव दर्शविलेले असतात.
४) प्रत्येक कडव्यातील दुसऱ्या-चौथ्या किंवा तिसऱ्या-चौथ्या ओळीत यमक जुळलेले असावे.
५) कडवी किती असावी, याला मर्यादा नाही.
-: माझी स्वरचित शिरोमणी काव्य रचना :-
राग
असतो वाईट
लागू नये नादी
करतो तो जीवनाची बर्बादी
राग
नसे चांगला
करु नये जवळ
नष्ट करीतो जगण्याचे बळ
राग
ठेवा नियंत्रित
सोडू नये मुक्त
देहाचे प्रतिक्षण आटवी रक्त
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
बुधवार, सप्टेंबर २९, २०२१
हृदयदिन
अहो बाबा..!
तुम्ही नका हो तंबाखू खाऊ
तंबाखूविना आपण सारे
नक्की आरोग्यसंपन्न होऊ
शाळेत गुरुजींनी सांगितले
आज तंबाखूचे दुष्परिणाम
ते तुम्हा सर्व मी सांगतो
बसा शांतपणे ऐका पाहू
बाबा,तंबाखू विडी कॅन्सरची
आहे की खूप दाट दोस्ती
त्यांच्या जाळ्यात नका जाऊ
हे भयानक चित्र बघा पाहू.
बाबा, तुम्ही आमचे आधारवड
संकट येता शितलछाया
नवा संकल्प हृदयी धरु
तंबाखुमूक्त मंत्र जगी देऊ
©प्रा.पुरूषोत्तम पटेल,
मुं.पो.म्हसावद
मंगळवार, सप्टेंबर २८, २०२१
आजोबांचे नातवास पत्र
सोमवार, सप्टेंबर २७, २०२१
आईचे मुलास पत्र...
रविवार, सप्टेंबर २६, २०२१
लेक माझी लाडकी
मित्रहो, आज राष्ट्रीय कन्यादिन... त्यानिमित्त माझ्या लेकीविषयीच्या मनभावना...
लेक माझी भाग्यश्री
गुणांची हो खाण
लेक जन्मा येता लाभला
आई बाबांचा मान ||१||
चाल तिची दुडूदुडू
मन करते प्रसन्न
बोल बोबडे बोबडे
कोकिळेचे मंजुळ गान ||२||
लेक माझी खेळे बागडे
घरी दारी अंगणात
सप्तसूर निनादती
तिच्या रुणुझुणू पैजणात ||३||
रुप लेकीचं गोजीरं
जणू बावनखणी सोनं
देवाजीनं दिलं आम्हा
सारे कुबेराचं धन ||४||
अहो.. लेक माझी भासे
जणू वडाचे झाड..
जन्म एक अन् फेडिते
दोन घरांचे पाड ||५||
© प्रा. पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
शनिवार, सप्टेंबर २५, २०२१
भागाकार!
कृष्णमुरारी
शुक्रवार, सप्टेंबर २४, २०२१
यशसिद्धी
गुरुवार, सप्टेंबर २३, २०२१
मनाचिये द्वारी
बुधवार, सप्टेंबर २२, २०२१
पांडुरंग
प्रेमस्वरूप आई!
प्रिय....
समस्ततिर्थदर्शिनी, प्रात:पूजनीय,आई...
तुला अनंत दंडवत प्रणाम !🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पत्र लिहिण्यास कारण की,
आज तुझा वाढदिवस ! 🎂
प्रथम तुला वाढदिवसाला माझ्याकडून आशुतोष भगवान शिवाला प्रार्थना ...!" माझ्या आईच्या समस्त इच्छा पुर्ण झाल्याचे समाधान तिला लाभावे. इच्छापूर्तीच्या आनंद अनुभवण्यासाठी तिचे शरीर निरोगी ठेव!ही विनम्र प्रार्थना! "
आई...केवळ दोनच अक्षरे ! पण त्या दोन अक्षरांचे सामर्थ्य कितीतरी मोठ्ठे आहे.त्या अक्षरात त्रिखंडाचे साम्राज्य पुर्णतः सामावले आहे.मी एका प्रवचनात संतांनी सांगितलेला महिमा ऐकल्याचे आठवते.ते म्हटले होते, " आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर.ईश्वरच आत्मा होऊन जिथे स्थिरावतो.ती आई ! " सर्व तिर्थात पवित्र आणि महान असं तिर्थ तुझ्या चरणसेवेत आहे.म्हणून तर आई-बाबांची चरणसेवा करणा-या पुंडलिकाच्या भेटीसाठी वैंकुठनाथ पृथ्वीतलावर आला.आणि इथंच २८ युगे उभे स्थिरावला. आई,तुझ्याच ठायी मला अखिल त्रिखडांची दैवते दिसतात. म्हणून तू माझी तिर्थरुप आई...तुला माझा त्रिवार प्रणाम !🙏🙏🙏
आई,मला खूप दिवसांपासून इच्छा होती, तुझ्याबद्दल काहीतरी बोलावं ! लिहावं ! पण...तुझ्यावर लिहिता-लिहिता कित्येक ओळी,कित्येक पानं, कित्येक रात्री संपल्या ग् ऽऽ पण,तुझ्यावर लिहण्यासाठी शब्द अपुरे पडू लागलेत !
आई तुझ्याबद्दलच्या भावनांना योग्य असे स्थान देऊ शकतील असे शब्दच मला अजूनतरी मिळालेच नाही ग् !
माधव ज्युलियन यांनी लिहलंय तेच खरंय , पटलंय मला !
" प्रेमस्वरुप आई, वात्सल्यसिंधू आई,"
माझी आई ...अगदी तशीच आहे तू ! समुद्र जसा कधीच आटत नाही.त्यांचे पाणी कमी झाले असे दिसत नाही.
समुद्राला तरी भरती येते,ओहोटी ही येते.तुझ्या प्रेमाला
ओहोटी ठाऊकच नाही तर ठाऊक आहे फक्त प्रेम, जिव्हाळा , माया-ममत्वाची भरती! तुझेही प्रेम कधीच कमी होत नाही. उत्तरोत्तर ते वाढतच जाते.🙏
आई, मग तूच सांग...तुला,तुझ्या कर्तृत्वाला,तुझ्या त्यागाला,
तुझ्या प्रेमाला मांडू तरी मी कुठल्या शब्दात ? हे शब्दात मांडणं म्हणजेच अशक्य !
आई,मला आठवतंय , मी एकदा आजारी पडले.तू माझ्या उशाशी रात्र रात्र जागत बसली होती म्हणे ! मला शांत झोप लागावी म्हणून आपल्या मांडीची झोळी करुन मला हळूवार
थोपटत,सलग तीन रात्रीचे दिवस करुन बसून राहिली होतीस ना तू ? तुझ्या ह्या वागण्याला मला " त्याग " म्हणता येईल का ग्ं आई ?
शाळेत दररोज मी जाते...पण वेळेची शिस्त तू पाळते...अगदी घड्याळाचे काटे होऊन राहतेस तू ! पहाटे दोन तास माझ्या आधी तू उठते.माझी सगळी तयारी तू करुन ठेवतेस.माझे दप्तर,माझा युनिफॉर्म,माझा खाऊचा डब्बा,सगळं काही काढून तय्यार ठेवतेस तू .
हे माझं काम, तू निरपेक्षपणे करते.तुझे हे वागणे " जिव्हाळा " ह्या भावनेत बांधता येईल का ग्ं आई ?
तूझी मला कळलेली अनेक रुपे...
तू माहेरची लेक, मामा-मावशीची ताई , सासरची सून , वहिणी , बाबाची बायको- अर्धांगिनी,आम्हा बहिणींची
" आई " आणि आजी-आजोबांची सुनबाई तूच आहेस...ही नाती निभवताना तू स्वतःचे अस्तित्वच विसरुन गेलीय.
अस्तित्व विसरण्याची तुझ्या ह्या वृत्तीला " कर्तव्य " म्हणता येईल का ग्ं ?
मी म्हणेन की,आई,राखतो तो राक्षस ! देतो तो देव !
तू तर काहीही न मागता तुझ्या इच्छा,मौजमजा,नटण-
सजणं,सगळं काही माझ्यासाठी सोडून दिलंय ! म्हणून भक्तांसाठी देव जसा हातातील काम व मुखातला घास सोडून धावत येतो.तशी तू वागते !
म्हणून मी तुला " ईश्वरी " असंच म्हणेन . कारण फ.मुं.नी म्हटल्याप्रमाणे -
आई खरंच काय असते?
लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
लंगड्याचा पाय असते
धरणीची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही उरतही नाही!
कवी प्रा.पुरुषोत्तम पटेल आईपणाची थोरवी सुंदर शब्दांत वर्णन करतात,
" आईपणाची देवालाही वाटे नवलाई ।
वैंकुठींचा राणा पंढरीत झाला विठाई । "
तुझी माझ्याबाबत असलेली प्रिती,लळा,जिव्हाळा,ह्यात वापरलेले रसायन बाजारात मिळणे अशक्यच ! कुठून झिरपते ग् आई हे रसायन ? आई,त्याची धनी फक्त आणि फक्त तूच !
आई...पुन्हा एकदा तुला माझे त्रिवार वंदन !
आणि वाढदिवसाचे अभिष्टचिंतन!!!🎂💐🙏
@ तुझीच प्रिय ,
स्विट
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
पर्णपिसारा
मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१
माझे राणी (भूलोळी)
बाबा...तुम्ही जगायचंय!
शेतकरीराजा ... जगाच्या पोशिंदा ! पण.. त्याचा कष्टाला मोल नाही ; तो अख्ख्या जगाला पोसतो.पण...त्याला पोसण्याची ताकद कोणत्याही व्यवस्थेत नाही. हेच सर्वात मोठे दुःख होय. इतरांना सहज मिळते ; पण या ख-या राजाला मागुनही मिळत नाही. त्याची स्वप्न कधीच पूर्ण होतांना दिसत नाही.कधी अस्मानी तर कधी सुलतानी(सरकारी) संकटे त्याचा सतत पाठलाग करतात. त्यातच शेतकरी राजाचे आत्मबळ संपते. आणि तो हताश होऊन "आत्महत्येचा " मार्ग स्विकारतांना दिसतो. एका शेतक-याला त्याचा मुलगा सर्व संकटे झेलून जगण्याची विनंती करतो आहे.
बाबा... तुम्ही हरायचं नाय
आत्महत्येचा इच्चार
डोस्क्यात आणायचा नाय
तुमचं बोट धरुन मला
हे जग वाचायचं हाय...!
तुमच्या प्रामाणिकपणा अन् जिद्द
मला घ्यायची हाय!
हरामाने नव्हं ; घामातून पिकत्यात मोती
हे अख्ख्या जगताला दावायचं हाय!
बाबा तुम्ही तर माझ्या
जगण्याचा कणा हाय
आईच्या कुंकवाचे लेणं हाय
वादळ वारं येवोत कितीही
त्यांची दिशाच मी बदलणार हाय
तुम्ही फक्त माझ्यासवे पाय घट्ट रोवून
उभं राहायचं हाय
आमच्यासाठी तुम्हाला जगायचं हाय!
काळ्या आईशी ईमान जोडणार हाय
सेवा करुन हे जीवन बदलणार हाय
बाबा... तुम्ही फक्त माझं ऐंका..!
हे पाहण्यासाठी तुम्ही जगायचं हाय
आत्महत्येचा इच्चार...
डोस्क्यात आणायचा नाय!
©प्रा.पुरूषोत्तम पटेल
म्हसावद
रविवार, सप्टेंबर १९, २०२१
कवितेची मैत्री
कवितेची मैत्री
कविता असते
अज्ञाताच्या पलीकडची
चित्रकाराच्या कुंचल्यातली
हृदयात साठवायाची...
कवितेचा प्रत्येक टिंब
शब्दाचा प्रतिबिंब...
नकळत एकेक टिंबातून
द्रौपदीचे वस्त्र...
कितीतरी रेशमी
सहस्त्र अर्थ...!
अर्थाची सृष्टी.. आणि
जिव्हाळा भरायचा असतो
मनात काठोकाठ..!
कवितेच्या प्रवासाला असतो
युगायुगाचा पल्ला...
तो गाठतांना
अनुभवाच्या गाठी
घ्याव्या लागतात पाठी
पिढ्यांचा हे संचीत
म्हणूनच... ह्रदयापासून
जपायचे असते
नुसती ठेव म्हणून नव्हे ;
तर... वापरण्यासाठी!
जीवनाच्या समृद्धीला
घेऊन तिच्या आधार
कविता जगायची असते...
जगायची असते..!
©प्रा. पुरुषोत्तम पटेल
मु.पो.म्हसावद
शनिवार, सप्टेंबर १८, २०२१
पत्रलेखन
आईचे मुलास पत्र…!
प्रिय लेकरा ,
तुला हृदयापासून अनंत आशीर्वाद !
आज तू शिकून सवरुन मोठ्ठा झालास.
नोकरीला लागून साईब झालास.
पण तुला माहित हाय का?
तुला लाहनचा मोठ्ठा कोणी केलाय ते ? नाहीना... ?
मग ऐक तं,कदाचित उद्या मीही नसेन…
लेकरा,अमरत्वाचे वरदान इथे भूतलावरील कोणत्याच मानवप्राण्याला नाय ! हे लक्षात असू दे
जवा तू जनमलास ,तवापासंन तू चार वरीसचा होईस्तो,
सगळं काय मी केलं व्हय ! नाय रं लेकरा …
तुझा जनमापासंनंच तुझं उठणं,बसणं,न्हाऊ-माखू
घालणं,इतकंच काय तुझे लंगोट बदलणं,नवीन लंगोट बांधण,ही सगळी कामं तुझा बाबानं स्वताच केलीत की!
बाळा,तुला सांगते,तुझा जनमापासंनंच माझी पाठ आजारपणानं धरली,
अन् मी सुद्धा चार वरीस खाटेलाच बसून व्हती !
माझंसुद्धा चार वरीसपावेतो उठणं,बसणं, औषधपाणी देणं अन् रांधणं,वाढणं,उष्टी-खरकटी भांडी धुणं-घासणं
ही सगळीच कामं तुझा बाबांनीच केली रं !
तुझे बाबा ते चार वरीस अन् ह्यात असेतो माझी आई
अन् मैत्तर झाले…अन् तुझी आईही तेच झाले.
तुलाही असं काही जगता यावं म्हणून हा प्रपंच!
बाळा! तुला सांगते,मला आजारपणाने खूपच थकल्यागत वाटे ! तुझ्यासाठीचं दूधही आटलं व्हतं.
तुला दूध प्यायला मिळावं म्हणून त्यांनी द्रोणाचार्य परमाणं पिठात पाणी कालवून दूध पाजलं नाही तुला. तर…स्वतः रातदिन काबाडकष्ट करुन एक गाय विकत आणली.तुझ्या दूधापायी !
त्या गाईचा गुराखी बनुन सांभाळ करणं,चारा-पाणी करणं, शेणं-मूत आवरणंही,
सगळी कामं तुझ्या बाबांनीच केली.का?
तर तुला दूध पिऊन " कृष्ण-बलरामा " प्रमाणं
बलवान होता यावं हे तेंचं सपन व्हतं म्हणून... !
तू जव्हा दुडुदुडू चालू लागला,चालतांना पडू लागला तर धावत येऊन तुला मी नाय तर तुझ्या बाबांनीच सावरलं.
बोट धरुन चालायला ही त्यासनीच तर शिकवलं बाळा !
तुझा हट्टापायी ते घोडा झाले.तुला पाठीवर घेऊन घरभर फिरले.तू," चल रं घोडा टबऽऽडऽक टऽबऽऽडक " असं बोलून खुष व्हायचा.
तुला सांगते,तू नऊ महिण्याचा अस्ताना,तुला हगवण लागली तुझे हागरे लंगोट बदलणे,ते धुणे हे जीवावर गेले त्यास्नी.पण,एक शब्दानेही त्रागा नाही की राग नाही केला त्यास्नी . तुझ्यासाठी ते सगळं करीत व्हते!
तू काहीच खाईना,पिईना,अन् दिवसरात्र काही केल्या झोपेना...रडून रडून आकांत मांडला व्हतास तू !
चार दिवस तुला छातीशी - कडेवर घेऊन रात्रंदिन तुझी काळजी तुझा बाबांनीच घेतली.ते चार दिवस त्यांनी जागून काढल्या.
घरातली सगळी कामही त्यासनीच आवरली.कशी आवरली एवढी कामं? तेच जाणे !तुला तवा तर कायबी कळेना.तुला न कळणारी गोष्ट आज सांगितली तर खरी नाय वाटायची.जाऊ दे…!तू म्हणशील, " आई-बाबांनी ही काम करणं त्येचं कर्तव्यच सारे की ! "
तुझं भी खरंच हाय म्हणा !
पण तू एकदा बोलला व्हता," बाबा, तुम्ही खूप कष्ट करतात.मी त्याचं मोल विसरणार नाही .नोकरीला लागलो न् की तुम्हा दोघांना खूप सुखात ठेवीन मी!
तुमच्या चाकरीला नोकर राखीन की! "
हे ऐकून आम्हास्नी आभाळ चार बोटं दूर राहिल्याचं वाटलं व्हतं!
लेकरा,आम्ही काही तालेवार नव्हतो,पण तरी तूला शिकवलं,पोटाला चिमटा देऊनच! स्वतः दहा वेळा तुटलेली चप्पल शिवून वापरली.
पण तुला सायबांचे बुट विकत दिधले.
सवताचा घास तुझा मुखात भरवला.तू पोटभर जेवला की मगच आम्ही जेवलो.तू उपाशी राहायला नको म्हणून…!
तुझा बाबानं सवता ठिगळं लावलेलं धोतर अन् फाटका सदरा व मी सुद्धा ठिगळं लावलेली साडी वापरली,पण तुला महागातली सुटपॅन्ट अन् टयाय का काय ? तो घेऊन दिला." तू साईब व्हावा.हे सपन पुर्ण व्हावं.मग तुझ्यासाठी कायपण..." यासाठी त्येंनी सारी हौसमजा दूर सारली.
तेंचं व माझं सपन आज पुरं झालं.तू मोठ्ठा सायब झाला.शिकता शिकता शिरमंताची लेक तुला बायको मिळाली.तू लग्नही उरकून घेतलं.त्येचा आम्हाला राग नाय !तुझा संसार सुखात चाललाय.तुला दोन पोरं होऊन ती घरभर हिंडाय लागलीत.कामाला नोकरचाकर ,फिरायला महागडी
गाडी ...मोठ्ठा राजमहाल वाटावा असं घर आहे म्हणे तुझं! हे ऐकून आम्ही धन्य झालोय!🙏
ही सगळी सुवार्ता मला तुझ्या घरी कामाला असणारी रमाबाई येऊन सांगून गेली. ऐकूण मन भरुन आलं रं पोरा !
आम्ही काय ? जन्माचे दरिंदर,तुला आता कायबी देवू शकणार नाही.जेवढं आमच्या झोळीत होतं ते सर्व तुला देऊन झालं.आता म्हातारे झालो.हातापायातलं बळ संपतं चाललंय.तुला आमची आता गरजच नाय.पण तू आमच्यापासून दूर राहिला तरी त्येचं आम्हाला वाईट नाही. " तू सुखात रहा ! "
" तू खूप सुखात रहा! तुला दुखाचा कधी चटका लागू नये.म्हणून आई अंबाबाईला हात जोडून प्रार्थना! "
आणि बाळा,एक गोष्ट ऐक…चुकलो असू आम्ही तर माफ कर.🙏
रमाबाईचं ऐकूण तुझा बाबाला राहवलं नाही.तू बोलवलं नसलं तरी , ते तुला भेटण्यासाठी आठ दिवसांपुर्वी तुझ्या बंगल्यावर आले.पण,तुझ्या बंगल्याचा गेटजवळच तुझा बाबाला तुझ्या पट्यावाल्यांन अडवलं.
" ए,भिकारड्या...कोण रं तू ?"
अरं दादा,मी तुझा सायबाचा बाप हाय.त्याला भेटाया आलोय ! त्याची आवडती ' मोहनथाळ ' घेऊन आलोय.मला आत जाऊ दे रं दादा.! "
" तू...अन सायबाचा बाप ! चोर , भिकारी,चल निघ इथनं! सायबांचा बाप कधीचा मेलाय !" म्हणत त्याने तुझा बाबाला ढकललं.त्ये भूईवर खाली पडले.तव्हा,तू बंगल्यातून बाहेर आला. " गणा,कोण आहे रे हा ? " विचारलं.
" साहेब,आहे कोण तरी भिकारी.तुम्हाला भेटायचं म्हणतो.मी म्हटलंय,साहेबांना वेळ नाही .चल निघ !
" तेव्हा तू " ठिक , निघतोय मी .जायला सांग त्याला! " असं म्हणत बाळा,तू गाडीत बसून निघून गेला.साधी विचारपुस सुद्धा केली नाहीस रे तू! पोरा,हा संस्कार केला नव्हता रे तुझ्यावर . इतका निर्दयी कसा झालास रे तू ? पोरा,मी विसरलेच रे,तू आता मोठा सायब झालास.शिरमंताचा जावाई झालास,पैसैवाला झालास,म्हणून गर्व तर नाही झालाय ना तुला ? पोरा,नको रे हा गर्व ! गर्वाचं काही काही टिकत नाही.ऐक माझं आणि सोडून दे हा विचार. माणसं ओळख,माणसं जोड.ती आयुष्यभर पुरतात.मान-पान-शान पद असे तो राहते.नंतर ते सरते.हे नको विसरु रं लेकरा ! "
बाळा, तुझा घरुन परत आल्यावर तुझा बाबांन धिर सोडला.हाय खाल्ली.म्हणाले,
" आपण आपल्या पोराला परके झालो गं! ओळख मोडली त्यानं ,ओळख मोडली…" म्हणत ते धाय मोकलून रडले.😭जेवण खाणं बंद केलं.तुझा वागण्याला बघून त्यांनी चार दिवसांत जगाचा निरोप घेतला.मी विधवा झाले पोरा,तुझे पितृछत्र असं कोसळलं.जे पुन्हा दिसणार नाही.काळाचा पोटात गुडुप झालं….!
रमाबाई मला म्हणाली," बाय,तुझी सून तूझ्या पोराला ईचारत होती," तुझ्यासाठी तुझा बाबानं काय केलं? "
या प्रश्नाला तू गप्प होतास म्हणे !
पण ...तूला तुझा बायकोसमोर जे बोलण्याचं धाडस झालं नाही.ते सगळं मी ह्या पत्रात लिहलंय.ते वाचून दाखव तिला.अन् सांग,तुझी बायको म्हणजे आमची सुन, कुटुंबाची गृहलक्ष्मी तिच्याबाबत आम्हाला कधी राग ना द्वेष नाहीच! तीही सुखात राहो हा आशीर्वाद सांग ! तुझे आई-बाबा म्हणून नातवांना डोळे भरुन पाहू शकलो नाही.म्हणून ह्या वेड्या आजीचा मंगल आशीर्वाद सांग! सांगशील ना! हे मागणे नव्हे तर विनंती समज पोरा!"🙏
पण शेवटी एकच मागणं ,तुला वाढवताना आम्ही जे घरंदाज संस्कार केले.ते संस्कार तू तुझ्या मुलांवर कर! न जाणो, आमच्या वाट्याला जे दुःख आलं ते तुम्हा नवरा बायकोच्या वाट्याला न येवो.ही अंबाबाई चरणी प्रार्थना!तुला नातवांनी विचारलंच ," आजी आजोबा कुठं राहतात.त्यांना भेटायचं आहे ."
" तू सांग,चिमण्यांनो, तुमचे आजी-आजोबा माझ्या लहानपणीच एका अपघातात मेले.ज्यांना मीही डोळे भरुन पाहिले नाही.असं सांग.पण,आमची ओळख करुन देऊ नकोस!ही तुला हात जोडून विनंती!🙏"
तू व तुझा परिवार सुखात राहो! हा आशीर्वाद!
✍️ तुझी आई
प्रा.पुरुषोत्तम पटेल, म्हसावद
भ्रमणध्वनी-8208841364
पत्रलेखन
मुलाचे आई-बाबांना पत्र…
महाशक्तीरुपी, प्रेरणाशक्ती,सकलगुणनिधी,तिर्थरुप आई-बाबा…
तुम्हाला शिरसावंद्य नमस्कार !🙏
आई,मला अमेरिकेला येऊन एक वर्ष झाले.ह्या एक वर्षाच्या काळात तुझी अन् बाबांची आठवण आलीच नाही,असा एकही दिवस गेला नाही.
आई ! आज सकाळी सकाळी व्हॉटसअपवर एक व्हिडिओ पाहिला.
" या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या
जाहल्या,तिन्ही सांजा जाहल्या…"
आई,त्या भावगीतातील एकेक शब्द ऐकताना हृदय विदिर्ण होत होते.हृदयावर कोणीतरी जोरजोराने मोठ्ठा हातोडा मारीत आहे असे वाटत होते...डोळ्यातील अश्रूधारा धबधबा कोसळावा तसे बाहेर येत होते.
मी ते गीत ऐकूण भावविव्हळ झालो.
मन सांगत होते, ' ही अवस्था आई-बाबांची तर नसेल ना ? ' वाटले,आत्ताच निघावे.आणि तुम्हाला मिठी मारावी.
आई-बाबा, मला रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही हो !शंकेचे मुषक माझे मन क्षणाक्षणाला कुरतडत होते.
तू आणि बाबा सुखात आहात ना? आई,प्रात:काळी उठून " बाप्पा ,माझ्या जन्मदात्यांना सुखात ठेव रे ! प्रार्थना केलीय मी !"🙏
ते गीत ऐकल्यापासून रोज उठल्यावर ते रात्री झोपेपर्यंत अनेकवेळा तुम्ही माझ्या डोळ्यासमोर उभे असल्याचे मला भास होतात.आई-बाबा ! तुमच्या प्रेमळ आठवणी मला आजही अस्वस्थ करतात हो.डोळे ओलावतात ग् आई.
पण,डोळे पुसणारे तुम्ही कोणीच जवळ नसतात.
मराठीच्या पीएम सरांनी शिकविलेला
" जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी । " हे संस्कृत सुभाषित आठवलं.आई त्यांनी समजावले होते, " जगात आई आणि जन्मभूमी हे दोन्ही स्वर्गाहून ही मोठे होत.म्हणून स्वर्गाची अपेक्षा फोल आहे.खरा स्वर्ग तर ह्या दोन्हींचा ठिकाणीच वसला आहे.त्यांची सेवा केली तर स्वर्गसुख मिळणारच."
आई, मी इथे अमेरिकेत आपलेपणा हरवल्याचे अनुभवतोय ! जन्मदाते आणि आपल्या जन्मभूमी पासून दूर झाल्याशिवाय त्यांचा माया-ममत्वाची ऊब नाही कळत !
आई,हे अमेरिकेत आल्यावर कळलंय ग् मला !
आई-बाबा,तुम्हाला सांगतो, अमेरिकेत मला सर्व सुख-सुविधा लिलया मिळताहेत! माझी नोकरी म्हणजे ' सोन्याचं अंडी देणारी कोंबडीच ! ' इथे मोठ्या रकमेचा पगार मिळतोय मला.पण त्या पैशाला की ना आई, मी शाळेत जातांना तू देत असलेल्या एक रुपयाची देखील मोल नाही,असं वाटतं गं...
एक बेल वाजवली,की सेवेला माणूस हजर! एक फोन केला की,जे हवे ते निमिषार्धात माझ्या टेबलावर ठेवले जाते.पण,त्या वस्तुंना,त्या पेय व पदार्थांना तुझ्या मायेच्या आणि सुगरण हाताचा स्पर्शच नाही. हे सारे खूप महागडे असले तरी मला निरस,कंटाळवाणे,बेचव भासते.आई,मला कळत नाही तू इतकं प्रेम का लावले ग् मला ? तुझे हे प्रेम मला जन्मोजन्मी लाभ दे ! तुझ्या प्रेमाचे रसायन अजुनतरी जगातील कोणत्याच कंपनीला बनवता आलेले नाही हे अगदी खरंय!❤️ कुठे झिरपते आई-बाबा हे जिव्हाळ्याचे न विसरता येणारे रसायन ? सांगा ना !
आई,मी अमेरिकेत यायला निघालो तेव्हा बाबांनी मला गणपती बाप्पाची एक छोटीसी तसबिर दिली होती.आठवते न् आई तुला ?
तेव्हा तू म्हणाली होतीस, " हा गणपती बाप्पा म्हणजे बुद्धिदाता,सुखकर्ता व दुःखहर्ता.तोच तुझी माऊली आणि साऊलीही! तोच चिंतामणीही आहे ! तू जेव्हा नवीन कामाला सुरुवात करशील तेव्हा त्यास प्रथम नमस्कार कर!🙏तुला एकटे वाटेल तेव्हा त्याच्याशी बोल! तुझ्या मनातील सर्व चिंता तो दूर करिल."
आई तू सांगितल्याप्रमाणे मी रोज सकाळी माझ्या ड्युटीवर जाण्यापुर्वी ह्या विघ्नहराला नमस्कार करतो.🙏 मला एकटे वाटले तेव्हा त्याच्याशी गप्पा करतो.खरंच खूप हायसे वाटते मला !अन् जणू तुम्हीच माझ्याशी बोलत असल्याचा भास होऊ लागतो.
माझे रोजचे कार्य तुझ्या अन् बाबांच्या आठवणीनेच सुरु होते...
आई-बाबा,मी खेड्यातला एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा साता समुद्रापार आलो. सुरुवातीला मी वामनाने तीन पावलात त्रिखंड व्यापले तेवढा आनंद अनुभवला.पण महिन्याभरातच तो कापूर उडून जावा,तसा उडून गेला. आनंद शोधूनही सापडत नाही हो मला ! गलेलठ्ठ पगाराची नोकरी आहे,पण... आपल्या प्रेमाच्या माणसांची सोबत हरवून अमेरिकेत आलो की काय असे वाटतेय मला इथे ! कोणावर रागही करता येत नाही अन् मनातला एकटेपणा भडाभडा बोलून मोकळं ही होता येत नाही.इथं जो तो आपापल्या धुंदीत जगतो.शान-शौकी,मद्य आणि सिगारेट्स तर इथल्या तरुण-तरुणींची आवडती व्यसनं,ही व्यसने इथल्या समाजाची गरज झालीय जणू!
त्यांच्यासोबत जावे तर,friend,This is a beer, please try once, atleast a half peg..आई,मी त्यांना विनम्रपणे म्हणतो,Sorry to say that but I'm not interested in any kind of drinks... असं काही सांगितले तर Yor are silly म्हणून हिणवले जाते.म्हणून मी ड्युटीवरुन आलो की घरी एकटाच थांबतो.अगदी कात्रित अडकल्यासारखी गत झालीय हो माझी!
तुमची आठवण येऊन मन प्रचंड होमसिक होतं.
पण मी भारतात सहज परत येऊही शकत नाही.ते काय मुंबई टू गोवा थोडेच आहे.शिवाय मी कुबेरपुत्रही नाही.चार सहा तासांत फ्लाईटने यायला !
मला आठवते,माझ्या शिक्षणासाठी व फ्लाईटच्या तिकीटासाठी तुमच्याहाती पुरेशी रक्कम नव्हती.एवढी ऐपत नसतांनाही मला अमेरिकेला जाऊन शिकण्याची व नोकरीची तिव्र इच्छा होती.आई,वेडच म्हण ना ! माझी इच्छा पुर्ण करण्यासाठी बाबांनी रक्ताचा घाम गाळून कमविलेली चार एकर शेती सावकाराला गहाण ठेवण्याचा बाबांना तू आग्रह केला.आणि बाबांनी,हजारदा सावकाराच्या विनवण्या केल्या.हे काय माहिती नाही का मला?
तुम्ही चार लाख मिळवून मला अमेरिकेत पाठविले.तेव्हा बाबांना तूच म्हणाली होतीस की,
" जाऊ द्या की ...आपला लेक अमेरिकेत जाऊन खूप शिकेल हो…मोठ्या पगाराची नोकरी करेन.रग्गड पैसा कमवून शेती परत मिळवून देईन...पैसा पैसा काय करताय हो,पैसा तर सळ्ळी कोंबडीही खात नाही." असं म्हणून तूच तर धिर दिला होतास बाबांना.हे मी नाही विसरु शकत आई.
आई,इथे आपल्या घरात असलेली आपुलकी,आनंद पैशांनी ही मिळत नाही ग्.निदान तुमची भेट होईपर्यंत काही दिवस का असेना अनुभवता आला असता.पण ते सुखही इथे नाही हो बाबा !म्हणून वाटते.भारतात उडत उडत यावे.तुम्हाला कडकडून मिठी मारावी.
असो. भारतात परत यायची इच्छा असूनही मी परत येऊ शकत नाही.सावकाराची रक्कम परत करायची न् आई ? मग तेवढी रक्कम होइस्तो थांबावेच लागेल न् मला. हट्ट माझाच होता.त्याची शिक्षा मला भोगलीच पाहिजे की नाही आई ?
दहावीच्या पुस्तकात वि.दा.सावरकरांची ' सागरा प्राण तळमळला ' ही कविता अभ्यासतांना इंग्लंडला असलेल्या स्वातंत्रवीर सावरकरांना मायभूमीला भेटण्याची जी तळमळ लागली होती,तीच तळमळ मलाही लागलीय गं ! पण मी केलेल्या वेडेपणामुळे प्रोग्नो कंपनीशी किमान तीन वर्षांचा बॉण्ड लिहून झाल्याने मला तो मोडताही येणार नाही.
अगदी कात्रित अडकल्यासारखी गत झालीय हो माझी!
तुम्ही आठवले की मन प्रचंड होमसिक होतं.धरलं तर चावतं,सोडलं तर पळतं ! अशी अवस्था झालीय माझी.मी काय करु आई? सांग ना ग् !सांग ना ?
पण तुला सांगतो आई,
बाबांनी मला सांगितलेले ते वाक्य," बाळा,तू जिथे जाशील तिथे तुला मी शिकविलेला सुसंस्कार इतरांना दे.पण इतरांचा एकही वाईट दुर्गुण घेऊ नकोस.हे मी जीवापाड जपतोय.
बाबा,मला समजावताना तुम्ही सांगितलेली गोष्ट - देवगुरु बृहस्पतीपूत्र कच असूर गुरु शुक्राचार्याकडे संजीवनी विद्या घ्यायला गेला होता.असूरांसोबत विद्या ग्रहण करतांना त्याने असूरांचा एकही दुर्गुण घेतला नाही की देवयांनी त्याचा प्रेमात पडली असताही तिला विनम्रपणे त्याने नकार दिला.उचलला फक्त संजीवनी विद्येच्या मंत्र.आणि घरुन जसा निर्मळ गेला तसाच तन-मनाने निर्मळच घरी परतला.तूही तसाच तन-मनाने निर्मळ रहा."
बाबा, ही शिकवण मी माझ्या हृदयाच्या पटलावर कोरुन ठेवलीय ! मी सुद्धा इथे कुणीही तरुणीचा प्रेमात पडणार नाही.व प्रेमात पडूही देणार नाही.कचासारखाच शुद्ध येऊन मिळेल तुम्हाला.आई,हे वचन आहे माझे !
ते प्राणपणे पार पाडीन मी .
आई-बाबा,एक सांगतो, अमेरिकेत येणा-या माझ्या सर्व नवतरुणांना इथे सर्वकाही सुख मिळेल,जगातील ऐंशी टक्के श्रीमंती इथे नांदते...पण येथील माणसं केवळ वीस टक्के सुख अनुभवताना दिसतात.जगातील सगळ्यात जास्त घटस्फोट इथे होतात. एकत्र कुटुंब पद्धती इथे दिसणे महामुश्कीलच!लग्न झाले की,मुलगा आपली बायको घेऊन आई-बाबांपासून विभक्त होतो.
ह्यालाच इथे ' जीवन ऐसे नाव ! ' असा हा देश!
ज्या भूमित आई-बाबांना केवळ जन्माचे साधन मानले जाते,ज्या भूमीत मनाचे समाधान नसेल त्या भूमीत सोन्याचा खाणी असल्या तरी त्या भूमीत वास्तव्य नको.अशी भूमी मानवातील माणूसकी जाळून असुरी प्रवृत्ती जोपासते,ती भूमी त्याज्य करावी.असे आपले जुने-जानते म्हणून गेले.हे मला इथे आल्यावर पटलंय आई!
म्हणून हात जोडून शेवटचे एकच आग्रहाचे सांगतो,
गड्यांनो,आपली भारतमाताच श्रेष्ठ होय! तिची सेवा करता करता स्वर्गसुखाचा मेवा खाऊ या!मी पण लवकरच परत येतो आपल्या भारतमातेच्या सेवेला…!
जय हिंद!🙏 वंदे मातरम् !🙏
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
म्हसावद
शुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१
चिऊताई , कविता
चिऊताई
चिऊताई,चिऊताई
कुठे गेली ग् बाई ?
तुला टाकून घास मला
गोड लागतच नाही
सोड रुसवा ऐक विनवणी परत ये ग् बाई
प्रेमळ माझी आई
घास भरवते मला
राखून ठेवते रोज
एक घास तुझाच
जेवायला माझ्याशी तू परत ये ग् बाई
सिमेंटच्या गावात
घरटी मोडून गेली
म्हणून रागावून तू
उडून का दूर झाली
देईन तुला सुंदर घरटे परत ये ग् बाई
पिल्लांना तुझ्या मी
खूप लळा लावीन
तांदळाची कणी
खायला गे घालीन
अंगणात बागडाया तू परत ये ग् बाई
तुझा चिवचिवाट
मला हवासा वाटे
काऊच्या कावकाव
भयकारीच वाटे
आनंदें नाचू आपण तू परत ये ग् बाई
तुझे आणि माझे
जन्मजन्माचे सख्य
जीवापाड जपेन मी
पुरविन सारे लक्ष
गप्पा करु एकमेकी तू परत ये ग् बाई
नको धरु चिऊताई
माणसांची ग् भिती
प्रेमाने जोपासू दोघी
घट्ट मैत्रीची नाती
माणसाला साद द्याया तू परत ये ग् बाई
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
Mhasawad.blogspot.com
श्रीशिवस्तुति
shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...
-
तंबाखू टाळा, आरोग्य सांभाळा ! मानवी जन्म आणि मिळालेला हा देह आपण प्रत्येकाने सार्थकी लावलाच पाहिजे. परंतु सध्याचा परिस्थितीचा विचार करता म्...
-
म्हसावद, ता.शहादा येथील कुबेर हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय या विद्यामंदिर विषयी कविता माझी शाळा माझी शाळा लळा लाविते बाळा उपदेशाचा ...
-
भारतीय संस्कृतीचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गुरुबद्दल आदर भावना प्रकट करणे होय. " गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्व...
-
देवा... माझा एकेक श्वास तू दिलेली अप्रतिम भेट ! कृतज्ञ मी जपीन हृदयात गाईन तुझे अमृतगाणे थेट! देवा...चालतो मी त...
-
विठ्ठल माझा गाव विठ्ठल माझा भाव । हृदयी विराजे विठ्ठल माझा ।। विठ्ठल माझा देव विठ्ठल माझी ठेव । अंतरीची तळमळ विठ्ठल माझा ।। विठ्...
-
सखी पहाटेच्या त्या दवाने... तन-मन ग् भिजते प्रेमकिरणात न्हाऊनी मुखकमल तुझे फूलते कळी खुलता प्रीतिची हृदय पुष्प दरवळते फुलपाखरू...
-
देवा,तू आहेस फुलात म्हणून दरवळे परिमळ गुंततो फुलात मी रे विसरुन भान सारे देवा तूच आहे पाऊसधारा म्हणून खुलते वसुंधरा नयनी भरतो...
-
क्या कहूॅं मैं। कॉलेज के वो दिन। युग जैसा लगता था। इक दिन तुम बीन। क्या कहूॅं मैं। कॉलेज की वो मौजमस्ती। आप और मैं थे। प...
-
वर्ष २०२४ मधील पुण्यपावन श्रावण मास… श्रावणसरी अंगावर बरसु लागल्या की, मला बालकवी त्र्यंबक बापुजी ठोमरे यांच्या सिद्धहस्त ...
-
राष्ट्रीय गृहीणी दिवस मित्र मैत्रिणींनो आज ३ नोव्हेंबरचा दिवस. हा दिवस आपण भारतीय नागरिक " राष्ट्रीय गृहिणी दिवस " ...