Kaayguru.Marathi

गुरुवार, मार्च ०५, २०२६

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित 
सगळे सारखे दिसतात
आपला परका कोण ?
ओळखतांना फसतात

रंगोत्सव म्हणे लोकांना
माझ्याशी करा दोस्ती
विसरुन जाल तुम्ही...
जात धर्म पंथाची मस्ती!

काळा असो वा गोरा
मला सगळेच सारखे !
सगळ्यांना चिकटतो मी
राहू देत नाही मी परके 

माणसा घे माझा गुण
समृद्ध होईल जीवन
रंगवून घे तनामनावर
माणुसकीच्या प्रत्येक क्षण!

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल " पुष्प "


मंगळवार, मार्च ०३, २०२६

चिमणीची गोष्ट!


चिमणीने  चोचीत  पाणी घेऊन

आग  विझवण्याची लहान गोष्ट

सामाजिक ऐक्य रुजवायचे देते

प्रत्येक वाचकाला शिक्षण स्पष्ट!

वाचू या गोष्ट...

एक होती चिमणी...


गोष्ट आहे छोटीशी दिसणा-या चिमणी आणि सहज नजरेत भरणा-या कावळ्याची ! एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात विविध प्राणी,पक्षी राहत होते.एक दिवसजंगलाला मोठी आग लागली.आगीच्या भीतीने सर्व प्राणी, पक्षी इकडे तिकडे पळू लागले.त्यावेळी चिमणीने विचार केला ही आग विझली तरच आपले घरटे वाचेल! ध्येयाने झपाटलेली चिमणी आपल्या इवल्याशा चोचीमध्ये पाणी भरून त्या आगीवर आणून टाकू लागली. तिची ती धडपड बराच वेळ चालली.पण,आग काही आटोक्यात येईना. तिथे असलेला एक कावळा त्या चिमणीला पाहत होता.न राहवून त्या कावळ्याने चिमणीला प्रश्न केला. " चिऊताई, चिऊताई तुझ्या इवल्याशा चोचीमधील पाण्याने जंगलाला लागलेली ही आग विझणार नाही ग ?" असे म्हणून तो कावळा हसला.

       चिमणीने त्याच्या हसण्याकडे लक्ष न देता ती पुन्हा आपल्या कामात गर्क झाली.चिमणी धडपड करून चोचीत जेवढे पाणी मावेल तेवढे आणून त्या आगीवर ओतत होती.पण...ती आग वाढतच चालली होती.मात्र चिमणीची धडपड कमालीची होती.चिमणीची ती धडपड बघून कावळा आणखी मोठ्याने हसला.त्याचे ते हास्य कुत्सित होते हे मात्र खरे हं ! तो कावळा पुन्हा चिमणीला म्हणाला-
"चिऊताई,चिऊताई  तुझ्या चोचीतल्या पाण्याने आग विझेल असे वाटतंय का तुला?छे...तू ना वेडी झालीस ग बाई?" आता मात्र चिमणीला रहावले नाही.चिमणी कावळ्याला म्हणाली
" अहो कावळेदादा, कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी वेडेच व्हावे लागते.अन् हो...या जंगलाला आग लागली असता ह्या आगीला विझविण्याचा प्रयत्न करणा-यांचा जेंव्हा इतिहास लिहिला जाईल न... तेंव्हा त्यात माझे नाव आग लावणा-याच्या किंवा आग लावणाऱ्यां लोकांचा समर्थकांच्या यादीत नसेल.माझे नाव नक्कीच आग विझवणा-यांच्या यादीत सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल !"

तात्पर्य -  प्रामाणिकपणे कर्तव्य करणारा किती मोठा वा किती लहान याला महत्व नसून त्याने अंगिकारलेले विचार व कृतीतून जे सामाजिक ऐक्य, शांतता,समृद्धी, शांतता, स्थैर्य निर्माण होते.अशा कर्तृत्ववान व्यक्तीचेच कार्य समाज अनंत काळापर्यंत आदर्श म्हणून स्मरणात ठेवतो.

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल " पुष्प"


गुरुवार, फेब्रुवारी १९, २०२६

छत्रपती शिवाजीराजे बोलले अन्...!

छत्रपती शिवाजीराजे बोलले अन्...!
आज अखिल महाराष्ट्राचे...नव्हे; संपूर्ण हिंदूस्थानाचे दैवत, प्रेरणास्रोत, अन्याय अत्याचाराविरूद्ध लढण्याचे, तन मनाचे सामर्थ्य निर्माण करणारे,“अरे,सुलतानांनो…जर माझ्या माय भगिनींना वाकड्या नजरेने बघाल तर,तुमचे डोळे काढून शिर धडावेगळे करीन!” असा खंबीर इशारा देणारे शहाजीराजे अन् मॉंजिजाऊसाहेब यांचे पुत्र…नाही हो…सुपुत्र, आमच्या श्वासाश्वासातील हुंकाराची प्रचंड ताकद, प्रचंड सामर्थ्यवान कंसाचा जुलमी सत्तेच्या छातीवर जसा श्रीकृष्ण उभे राहीला होता तसेच जुलमी राजवटी़च्या कर्दनकाळ ठरलेले,शून्यातून वाटचाल करीत आत्मविश्वासाने हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे नरसिंह छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिनशे शहाण्णवावी जयंती…! 
पुण्यपावन, प्रेरणादायी कर्तृत्वाचे महामेरू छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन!💐 🙏 🙏 🙏 

आज छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करताना माझ्या कानावर आवाज आला. “ ए माझ्या मावळा!” मी गर्रकन् मागे वळून पाहिले.कोणीच दिसेना आवाज कुठून आला.कोण बोलले बरे? मी विचार करु लागलो.पुन्हा आवाज … “ अरे,मी तुझ्या राजा,मी शिवराय बोलतोय!” 

“ राजे…तुम्ही! राजे मुजरा करतो!” म्हणत मी पुन्हा चक्क राजांना तिनदा वाकून मुजरा केला.तसा राजे आशीर्वाद देत बोलले.

“ आज तू आणि तुझ्याप्रमाणे माझ्यावर प्रेम करणारे अनंत मावळे मला भेटून आशीर्वाद घेत आहेत.हे पाहून आनंद वाटतोय मला.पण…दुःखही वाटतेय गड्या!”

मी धीर धरुन बोललो.

 “ राजे,माफ करा.काही चुकलंय का हो माझं?” 

“तुम्ही सगळेच तर चुकताय.रोज नव नव्या चुका करताय.मला वर्षातून दोन वेळा वंदन केले,माझे स्टेटस ठेवले,मला मुजरा केला की संपलं आपलं काम!असं वाटतंय ना  तुम्हा सर्वांना ! एवढंच काय रे माझे कार्य? एवढे मर्यादित आहे का रे माझे विचार?याचसाठी मी आयुष्यभर शत्रुशी लढलोय का रे? ” 

राजांचे हे शब्द माझ्या हृदयावर हातोडा मारावा तसे पडत होते.मला तर शब्दच ओठावर येईना.मी खाली मान घालून गप्पच! 

राजे बोलले, “ ए बाळा!ऐंकतोय ना?” 

“ अ…हं. राजे ! काय आज्ञा?” मी कसाबसा बोललो.

“ ऐंक तर…तुम्ही आज दिवसभर जय भवानी! जय शिवाजी! या नावाने जयघोष करणार.लहान मोठे कार्यक्रम घेणार.मला वंदन करणार.मी कोणत्या काळात जन्मलो,मॉसाहेबांनी मला कसा घडविला,मी रायरेश्वरी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणासोबत घेतली, तोरणा किल्ला कसा सर केला,  मॉसाहेबांची शिकवण स्मरुन आदिलशहाला नतमस्तक झालो नाही, एकेक किल्ला सर करून त्याला धडकी भरवली,रांझाच्या पाटलाने एका भगिनीवर अत्याचार केला म्हणून त्याला चौरंग शिक्षा केली, सुरत शहर लुटून अपार धन दौलत मिळवली,जुलमी मत्तवाल अफजलखानाचा कोथळा काढून स्वराज्य रक्षण केले.तानाजीचे कार्य अमर रहावे, म्हणून कोंढाणा किल्ल्याला सिंहगड ,बाजीप्रभूचे कार्य सतत प्रेरणा देत रहावे म्हणून घोडखिंडला पावनखिंड हे नामकरण केले, आग्र्याहून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन सहीसलामत स्वराज्यात परतलो, कल्याणच्या सुभेदार स्वराज्याचा शत्रू असूनही त्याचा रुपवान सुनेकडे मी वाकड्या नजरेने न पाहता माय भगिनी मानून तिला सन्मानाने कल्याणला पाठविले.माझ्या खांद्याला सतत आधार देऊन,स्वराज्यासाठी प्राणार्पण करणा-या मावळ्यांचा मान सन्मान राखला.ह्या सर्व गोष्टीचे तुम्ही गुणगौरव कराल.पण खरं सांगतो….मला हे तुमच्याकडून अपेक्षित नाही बरं का?” बोलतांना महाराज थांबले.गहिवरून आले त्यांना.मी चोरट्या नजरेने महाराजांकडे पाहिले.तर महाराजांच्या मुद्रेवर नैराश्य जाणवले.माझी बोलण्याची हिंमत झाली नाही.

महाराज पुन्हा बोलू लागले. 

“ ऐक गड्या, आज महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर माता भगिनींवर,लेकी-सुनांवर रात्री…नव्हे; दिवसाढवळ्या अन्याय अत्याचार होतोय. अत्याचारी रंगेहाथ सापडला तरी तो सहिसलामत सुटतोच कसा? अरे,हे लोकं मला आदर्श मानतात ना? माझे नाव घेऊन प्रत्येक सभेची सुरुवात करता ना…? मग मी निर्माण केलेले कायदे, बलात्कारीसाठीची “ चौरंग शिक्षा” अंमलात आणायला लाज वाटते का रे यांना?

रस्त्यावर चालणाऱ्या,शाळा महाविद्यालयात जाणा-या लेकींना छळता…त्यांना त्रास देतांना यांना माझी शिकवण,माझे आदर्श आठवत नाही का? माझे वडील शहाजीराजे यांना आदिलशहाच्या आदेशाने अफजल्याने अटक केली.का ? तर मी त्यांचे जिंकून घेतलेले किल्ले परत द्यावे म्हणून! मला त्याचा हा फतवा मिळताच मी जिंकलेल्या किल्ल्यांचा क्षणाचाही मोह न धरता ‘ पिताश्रीच्या मुक्ततेसाठी’ आदिलशहाचे किल्ले परत देऊन त्यांना मुक्त करविले.ही पितृ सेवा मला का दिसत नाही. गुंठाभर जमिनीच्या तुकड्यासाठी आज बापाचे खून करणारे महाभाग राज्यात पाहतो तेव्हा किळस वाटते मला या वृत्तीची!

आजही आठवतो मला ११ मे १६६६ रोजीचा आग्रा येथील औंरंगजेबासमोरील प्रसंग…मला औंरंगजेबाने आग्र्याचा दरबारात मलाच पाठ दाखवून धुम पळालेल्या कनिष्ठ दर्जाच्या सरदारांच्या रांगेत उभे करून अपमानित केले,ह्या गोष्टीचा मी भर दरबारात निषेध नोंदवला.व तडक दरबारातून बाहेर पडलो.हा स्वाभिमान कुठे हरवलाय? स्वाभिमान दिल्लीच्या पायावर घातल्याचे मी ऐकतो तेव्हा मला वाटते…याच साठी तर नव्हता माझ्या अट्टाहास? माझ्या महाराष्ट्राने वैचारिक गुलामगिरी, चापलूसी स्विकारल्याचे पाहताच माझी तळपायाची आग मस्तकी पोहचते रे!आणि हो…मी माझ्या हिंदवी स्वराज्यात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज द्यायचो.शेतसारा माफ करायचो. शेतक-यांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या सावकारांना भर चौकात शिक्षा द्यायचो.हे धोरण माझे नाव घेऊन राज्य करणा-या सत्ताधिशांना आठवत नाही काय? हा निर्लज्जपणा,कोडगेपणा असलेल्यांना धडा शिकविण्याचे तुमचे बळ कुठे हरवले रे? अन्याय, अत्याचाराविरुद्ध पेटून उठा.ही माझी शिकवण का विसरलाय तुम्ही? माझ्या राज्यात भ्रष्टाचार करणा-यास

हत्तीच्या पायी देणे वा टकमक टोकावरून कडेलोट करण्याची शिक्षा होती.त्यामुळे सहजासहजी भ्रष्टाचार करायची हिंमत कोणी करीत नव्हता.आज मी काय ऐंकतोय.भ्रष्टाचार करणारा लोकप्रतिनिधी बनतो,मंत्री बनतो.हे तर अती निंदनीय! हे पाहता मला खूप वेदना होतात रे! धर्म म्हणजे कर्तव्य! पण…आज तर हिंदू मुस्लिम असा धर्मभेद करुन धर्माधर्मात भांडणे लावल्याची गोष्ट ऐकून येतेय.विसरलेत का? माझ्या हिंदवी स्वराज्यात अनेक निष्ठवान मुस्लिम अधिकारी व सैनिक उच्च पदांवर कार्यरत होते. यामध्ये आरमाराचे प्रमुख दर्यासारंग व दौलत खान, पायदळ प्रमुख नूरखान बेग, तसेच सिद्धी हिलाल, सिद्धी इब्राहिम (अंगरक्षक), काझी हैदर (वकील) आणि मदारी मेहतर यांसारख्या प्रमुख व्यक्तींचा समावेश होता.हे सर्व जीवाला जीव देणारे होते.सर्वधर्मसमभाव स्विकारून मी स्वराज्य स्थापन केले.म्हणून ते तडीस गेले.या गोष्टींचा आज सर्वांना विसर‌ पडला काय? आणि जेव्हा अन्याय, अत्याचार होतो तेव्हा बहुतांश पिडीत म्हणतात…’ राजे, जन्माला या! का? मीच का हवाय तुम्हाला? अरे,मी माझ्या एकोणपन्नास वर्षाच्या आयुष्यात जीवाचा विचार न करता अनेक लढाया धिरोदात्तपणे लढलो.शत्रुला सळो की पळो करुन सोडले.माय माऊलींनो “ शिवाजी जन्मावा!पण…शेजारच्या घरात!” हा संकुचित विचार सोडून द्या . तुम्हाला एक विनंती की,तुमच्या प्रत्येकीचा शब्दांशब्दांत माझ्यासारखा शिवबा घडविण्याच्या विचार येऊ द्या. स्वकिय व परकीय जुलूमांपासून रक्षण करण्यासाठी  जिजाऊसाहेबांनी अखेरच्या श्वासापर्यंत मेहनत घेतली.आऊसाहेबांचा हाच विचार आत्मसात करून बघा.घराघरात माझेच प्रतीरुप जन्माला येऊन तुमच्यावरील अन्याय अत्याचार नक्की दूर होईल.

  मी शून्यातून गड,किल्ले,हत्ती, घोडे, पायदळ,आरमार, तोफखाना, स्वतःची टांकसाळ हे सर्व केले.राजमुद्रा करवून हिंदवी स्वराज्याचा छत्रपती झालो.हे करतांना मी वतनदारी नामशेष केली.हे लक्षात घ्या.आज मात्र गुंडगिरीच्या माध्यमातून आधुनिक वतनदारी निर्माण होत असल्याचे पाहून‌ मला खूप दुःख वाटते.कुठून उगवली ही वतनदारीची पिलावळं? अन् मनात विचार येतो…पुन्हा जन्म घ्यावा अन्‌ हाती भवानी तलवार घेऊन कापून टाकावे या एकेक नराधमाला!

तुला सांगतो,ऐंक! तू आता तुझ्या लेखणीतून प्रत्येक घराघरातून माझ्या विचारांचा एक निष्ठावंत पाईक घडव! हीच तुझ्याकडून मला माझ्या जयंतीची खरी वंदना ठरेल!”

हं.जाता जाता एक सांगतो,ज्यांना कोणाला माझे नाव घेऊन मिरवायचे असेल तर,माझ्या विचारांचे गोडवे आज एक दिवस गाऊ नका…तर,आयुष्यभरासाठी अंमलात आणा.प्रत्येक स्त्रीकडे माय भगिनींच्या निर्मळ नजरेने पहा. राज्यकर्ते वा अधिकारी असाल तर कर्तव्य व जबाबदारी ओळखून काम करा. नागरिक व वनाधिकारी म्हणून हिरवे तरुवर न तोडता त्यांची जोपासना करा.वन वाढवा.पर्यावरण वाचवण्याचे, न्याय,निती,समता,स्वातंत्र्य ,सहिष्णुता शत्रु-मित्र,रयतेचे कल्याण,राज्यकर्त्यांची जबाबदारी व कर्तव्य, याबद्दलचे माझे विचार मी तयार केलेल्या “ आज्ञापत्र” या ग्रंथात वाचन करून त्याप्रमाणे कर्तव्य करा.अन्याय अत्याचार लाथाडून जगायला शिका.न्यायाधिश असाल तर निःपक्ष, निःसंशयपणे न्यायदान करायला शिका.तरच माझे नाव घ्या.तरच माझ्या जयजयकार करा.मला तोंडदेखलेपणा आवडत नाही.हे सदैव लक्षात ठेवायला शिकव.

माझे हे विचार नुसते कागदावर ठेवू नको.व्याख्यानातून बोलू नको. प्रत्यक्ष घराघरांतून आत्मसात करण्याचे बाळकडू प्रत्येक मातेने बाळाला पाजण्याचे आवाहन कर! तर...तर महाराष्ट्रात सुरु असलेले महिलांवरील अन्याय,अत्याचार थांबतील. न्याय,नितिचे सुराज्य निर्माण होईल.यात शंकाच नाही.” 

मी विनम्र होत महाराजांना म्हटले,

“ राजे,आपली आज्ञा शिरसावंद्य मानून मी कार्याला लागतो. आशीर्वाद द्या राजे!”

“ तथास्तु! शुभास्ते पन्थानः सन्तु” आशीर्वाद देऊन महाराज क्षणार्धात दिसेनासे झाले! धिरोदात्त आवाज शांत झाला.

 जय शिवाजी जय भवानी! 🚩🌹🙏

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल “पुष्प”
वाकड,पुणे.

बुधवार, फेब्रुवारी १८, २०२६

शिवराय जन्मले !

शिवनेरीवर जिजाऊसाहेबांच्या पोटी पुत्र जन्मला !


   फाल्गुन वद्य तृतीयेची पहाट झाली.आकाशांतल्या चांदण्या हळूहळू विरघळू लागल्या. प्रभेचे तीक्ष्ण बाण सोडीत व अंधाराचा विध्वंस उडवीत उषा आणि प्रत्युषा क्षितिजावर आल्या.सगळी सृष्टी उजळू लागली.
बालसूर्याच्या स्वागतार्थ स्वर्गाचे देव जणूं पूर्वेकडे ओंजळी भरभरून गुलाल उधळू लागले.पूर्वा रंगली.वारा हर्षावला.पांखरें आकाश घुमवू लागली.शिवनेरीच्या नगारखान्यात सनई-चौघडा वाजू लागला आणि अत्यंत गतिमान् सप्तअश्व उधळीत बालसूर्याचा रथ क्षितिजावर आला !
घटकांमागून घटका जाऊ लागल्या. जिजाबाईसाहेबांचे पोट दुखूं लागलें.सुइणीची,कुळंबिणीची आणि वैद्यांची गडबड सुरू झाली. जिजाबाईसाहेबांनी बाळंतपणाच्या खोलीत प्रवेश केला.
  विश्वासराव,नारोपंत,गोमाजी नाईक वगैरे सर्वच मायेची माणसे जिजाबाईसाहेबांच्या काळजींत व तितक्याच उत्सुकतेत चूर झार्ली.आनंद,औत्सुक्य,भीती,पुन्हा आनंद, पुन्हा काळजी, पुन्हा औत्सुक्य त्या सर्वांच्या मुखांवर आलटूनपालटून उड्या मारीत होतें. एका जागी त्यांना कसें स्वस्थ बसवलें असेल ? फार फार प्रेमळ माणसे हो हीं…!
उत्सुकता वाढत होती. मागचा क्षण पुढच्या क्षणाला उत्सुकतेने पुसत होता, "काय ?"
"अजून काही नाही !" पुढचा क्षण मागच्या क्षणाला उत्तर देत होता.
एकेक निमिष तासासारखे जड जाऊं लागलें होतें.
आणि दारावरचा पडदा हलला. एकदम बाजूला झाला. उत्सुकतेच्या भिवया वर चढल्या.माना उंचावल्या.
"काय ? काय ? काय ?"
"पुत्र !"
बातमी हसत हसत ओठांवर आली.ऐकणा-या कामांनाही शतपटीने आनंद देऊन गेली.
"पुत्र ? पुत्र ?"
" हो.होय! जिजाऊसाहेबांच्या पोटी...पुत्र ! पुत्र !!पुत्र जन्मला !!!"
बातमी कानावर पडताच शिवनेरी किल्ल्यावर आनंदाचा कल्लोळ उडाला.वाद्ये कडाडूं लागली.संबळ,झांजा झणाणूं लागल्या. गडावरच्या नगारखान्यांत सनई चौघडा झडूं लागला. नौबत सहस्रशः दणाणूं लागली. नद्या, वारे, तारे, अग्नी सारे आनंदले. तो दिवस सोन्याचा ! तो दिवस रत्नांचा ! तो दिवस कौस्तुभाचा,अमृताचा ! छे: हो, छेः छेः छेः ! त्या दिवसाला उपमाच नाही ! शुभ ग्रह, शुभनक्षत्रं, शुभ तारे, शुभ घटका, शुभ पळें, शुभ निमिषे तो शुभ क्षण गाठण्यासाठीच गेली तीनशे वर्षे शिवनेरीच्या भवती घिरट्या घालीत होती !आज त्यांना नेमकी चाहूल लागली! आज तर ती सर्वजण जिजाबाईसाहेबांच्या सूतिकागृहाच्या दाराशी थबकली, थांबली, खोळंबली, अधीरलीं आणि पकडलाच त्यांनी तो शुभ क्षण ! तीनशे वर्षांनंतर ! तीनशे वर्षांनंतर ! कोणत्या शब्दात त्या सुवर्णक्षणाचे मोल सांगू ? अहो,ते अशक्य ! केवळ शतका-शतकांनीच नव्हे, युगायुगांनीच असा शुभ क्षण निर्माण होतो. त्याचे मोल अमोल ! शालिवाहन शकाच्या १५५१ व्या वर्षी, शुक्लनाम संवत्सरांत, उत्तरायणांत,फाल्गुन महिन्यांत, वद्य तृतीयेला, शिशिर ऋतूंत, हस्त नक्षत्रावर, सिंह लग्नावर, शुक्रवारी सूर्यास्तानंतर पूर्ण अंधार पडल्यावर शुभ क्षणी, अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचे वैभव व्यक्त करणारे पांच ग्रह अनुकूल व उच्चीचे असताना जिजाबाईसाहेब- आईसाहेबांच्या उदरी शिवनेरी किल्यावर पुत्र जन्माला आला ! दि. १९ फेब्रुवारी, शुक्रवार, १६३० शुभमंगल मुहूर्तावर!

शुक्ल संवत्सराने आपले नांव सार्थ केले ! शुक्ल संवत्सर ! शुभसंवत्सर ! शिव संवत्सर !

गडाचे तोंड साखरेहून गोड झालें.जिजाबाईसाहेबांच्या महालापुढे पखालीतून आणि घागरींतून घो धो धबधबलेले पाणी बारा वाटा वाहत निघालें. खळाळणारा ओघ वेशीला आला ! अन् ओघ वेशीला आला. पुत्र कोणाला झाला ? पुत्र जिजाबाईसाहेबांना झाला ! पुत्र शहाजीराजांना झाला ! पुत्र सह्याद्रीला झाला ! पुत्र महाराष्ट्राला झाला ! पुत्र भारतवर्षाला झाला ! प्रत्येक जलौघ वळसे घेत घेत दिल्लीच्या,विजापूरच्या,गोव्याच्या,मुरूडजंजिऱ्याच्या आणि गोवळकोंड्याच्या वेशीकडे धावत होता.तेथल्या मग्रुर सुलतानांना बातमी सांगायला की, “सुलतान्यांनो,आला.आला ! तुमचा काळ जन्माला आला रेऽऽ ! तुमच्या आणि तुमच्या उन्मत्त तख्ताच्या चिरफळ्या उडविण्याकरिता आला!जसा मग्रुर कंसाचा वध करायला कृष्ण जन्माला आला होता ना ! तसाच तुमच्या वध करायला आज शिव जन्माला आलाय रेऽऽ!” शहाजीराजांकडे पुत्र जन्माच्या बातमीची साखरथैली रवाना झाली.
   शिवनेरीगडावर शीतल व सुगंधी वारे वाहू लागले. गडाच्या परिसरांतील खेड्यापाड्यात ही पुत्रजन्माची बातमी वारा घराघरात देऊ लागला.बातमी ऐंकून अख्खे जुन्नरमावळ आनंदले!
शिवनेरीवर कारभाऱ्यांची आनंदाने धांदल उडाली. त्यांनी वेदशास्त्रसंपन्नांना बोलावून आणलें. त्या वेदमूर्तीनी बाळाला शुभ आशीर्वाद दिले. स्वस्तिवाचन केले. नंतर सुइणींनी बाळबाळंतिणीला कढत पाण्याने न्हाऊ घातलें.

कारभाऱ्यांनी  हुशार ज्योतिष्यांना  सन्मानाने  सदरेवर बसविलें. त्यांच्याभोवती सर्व वडिलधारी मंडळी बसली. जणू लहानशी सभाच बसली. मंडळीनी ज्योतिषीबुवांना बाळाची कुंडली मांडण्याची विनंती केली. ज्योतिष्यांनी मखर आखीत 'श्रीगणेशाय नमः।' केलें. मोठ्या चिकित्सापूर्वक, चौकस गणिताने त्यांनी नवग्रहांची स्थापना ज्याच्या त्याच्या घरात केली. कुंडली मांडली.
ती कुंडली अशी,
।। श्रीगणेशाय नमः ।।

शुभं भवतु, स्वस्ति श्रीशालिवाहननृप शके १५५१ फाल्गुन वद्य ३, शुक्लनाम संवत्सर, शुक्रवार, हस्तनक्षत्र, शिशिर ऋतु, सिंह लग्न. कन्या रास. पुत्रजन्म.

सिद्ध झालेली कुंडली हाती घेऊन त्यांनी अवलोकिली. त्या ज्योतिष्यांचे चित्त आश्चर्यमुग्ध होऊन गेलें. प्रातःकालच्या प्रफुल्ल कमलपुष्पाप्रमाणे आनंदित होत्साते ते विद्वद्वर्य आपल्या सन्मुख बसलेल्या सज्जनांप्रत माना डोलावीत त्यासमयी सांगते झालें,

"महाजनहो ! पृथ्वीचे भाग्य उदेले ! या भूमंडळाचे ठायी अति थोर सौभाग्यमुहूर्तावर हा कुमार जन्माला आला आहे ! याची कुंडली अत्यंत मोठ्या अशा भाग्ययोगांनी परिप्लुत आहे. अहो, हा सुपुत्र दिग्विजय करील ! हा परम साहसें करील ! आपली कीर्ती दिगंताला पोहोचवील ! हा आपल्या सत्तेत गिरिदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग, स्थलदुर्ग ठेवील! श्रांत पृथ्वीस शांत करील ! सकल भूमीचे ठायी हा सुपुत्र यशकीर्तिप्रतापमहिमा वाढवून चिरंजीव होईल !"
   हे शुभ भविष्य ऐकून कारभाऱ्यांच्या माना डोलल्या. मुद्रा आनंदल्या. त्यांना धन्य धन्य वाटले. ओंजळी भरभरून दक्षिणा देऊन त्या ब्राह्मणांची त्यांनी संभावना केली. इवलेंसें बाळ तें ! त्याला अजून धड रडतासुद्धा येत नव्हतें. पण त्याच्याकडून अपेक्षा केवढ्या मोठ्या !आईसाहेबांच्या सौम्य मातृदृष्टीतही त्याच अपेक्षा दाटलेल्या होत्या. सह्याद्री तर आनंदाने खदखदत होता. जणू म्हणत होता, “अरे ह्या पोराची कुंडली विती दीडवितीच्या अशा चिठोऱ्यावर काय मांडता ! सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पसरलेल्या ह्या अफाट आकाशावर ब्रह्मदेवाने याची कुंडली केव्हाच मांडून ठेवली आहे !”

मुठी वळीत बाळाने पहिला टाहो फोडला !जणू सर्व जुलुमी सुलतानांना तो इशारा होता…"मी आलोय रेऽ!अन् रयतेला साद होती…भिऊ नका.आता मी सगळा जुलूम,
अन्याय,अत्याचार दूर करीन!"

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल “पुष्प


शनिवार, फेब्रुवारी १४, २०२६

दहशतवाद

सिमेवरचा     दहशतवाद
भीती  घालतो  सीमावर्ती
क्षणा-क्षणाला     हादरते
बंदुकीचा गोळ्यांनी धरती

कुठून   येतील  अतिरेकी
कळत नाही कुणा  काही
क्षणभरात पसरे  अशांती
लोकं पळतात दिशा दाही

भौतिक सुखापोटी  आज
माणसांत  जन्मला दानव
निष्पाप ,लोकांप्रती हृदयी
नसे त्यांना तिळभर कणव

देवा  संपू दे रे हा हव्यास
जळू दे माणसातला स्वार्थ
मानव  तितुका  मेळवावा
कळू दे सकला जगण्याचा अर्थ!

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"


शुक्रवार, फेब्रुवारी १३, २०२६

भारताची कोकिळा: सरोजिनी नायडू

 आज सरोजिनी नायडू यांच्या जन्मदिवस.त्यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८७९ रोजी भारतातील हैदराबाद येथे झाला.स्वतंत्र भारतातील उत्तर प्रदेशच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. त्यांचे वडील अघोरनाथ चट्टोपाध्याय हे एक प्रसिद्ध विद्वान होते आणि त्यांची आई कवी होती आणि त्या बंगाली भाषेत कविता लिहित असे. सरोजिनी लहानपणापासूनच तीक्ष्ण बुद्धीच्या असल्याने, त्यांनी १२ व्या वर्षी चांगल्या गुणांनी १२ वी परीक्षा उत्तीर्ण केली आणि १३ व्या वर्षी "लेडी ऑफ द लेक " या शिर्षकाची कविता लिहिली.
(The Lady of the Lake) ही सुमारे १३०० ओळींची एक प्रदीर्घ कथात्मक कविता आहे. ही कविता त्यांच्या विलक्षण काव्यप्रतिभेचे दर्शन घडवणारी पहिली मोठी रचना मानली जाते, ज्यामुळे प्रभावित होऊन त्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती.
सरोजिनी नायडूंच्या काव्यात भारतीयत्व,निसर्ग, उदात्त देशभक्ती आणि महिलांच्या भावना यांचे सुंदर चित्रण आढळते.म्हणूनच त्या " भारताची कोकिळा " (Nightingale of India) म्हणून ओळखल्या जातात.कवितालेखनातून त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि १८९५ मध्ये त्या उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेल्या.तेथेही अभ्यासासोबत कविता लिहू लागल्या. "गोल्डन थ्रेशोल्ड" हा त्यांचा पहिला कवितासंग्रह होता. "बर्ड ऑफ टाइम" हा त्यांचा दुसरा आणि "ब्रोकन विंग" हा तिसरा कवितासंग्रह. या कवितांनी त्यांना एक प्रसिद्ध कवयित्री बनवले.स्वातंत्र्यपूर्व भारतातील  एक दिग्गज प्रेरणास्थान कवी रवींद्रनाथ टागोर यांनीही त्यांच्या अद्भुत काव्यात्मक लेखन कौशल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
       १९१४ मध्ये त्या पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये गांधीजींना भेटल्या आणि त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन, त्यांनी स्वतःला राष्ट्रासाठी समर्पित केले. कुशल सेनापतीप्रमाणे, त्यांनी प्रत्येक क्षेत्रात...मग ते सत्याग्रह असो,संघटना असो आपली प्रतिभा दाखवली.त्यांनी अनेक राष्ट्रीय चळवळींचे नेतृत्व केले आणि तुरुंगातही गेल्या.
     त्या बहुभाषिक असल्याने त्यांनी प्रदेशानुसार इंग्रजी हिंदी ,बंगाली  गुजराती  भाषेत भाषणे दिली.लंडनमधील एका मेळाव्यात इंग्रजीत बोलताना त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.त्या आपल्या भाषणातून सतत भारतीयांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित करीत असत.
सरोजिनी नायडू यांचे प्रमुख सुविचार:-
१) " जीवन एक आव्हान आहे - ते स्वीकारा. जीवन एक स्वप्न आहे - ते साकार करा. जीवन एक त्याग आहे - ते अर्पण करा. जीवन प्रेम आहे त्याचा आनंद घ्या."
२) " देशप्रेम ही केवळ भावना नसून ती कृतीत उतरवणे आवश्यक गोष्ट आहे."
३) " स्त्री ही केवळ घर सांभाळणारी नाही, ती समाज घडवणारी महत्वपूर्ण आद्यशक्ती आहे."
४) " स्वातंत्र्य हे संघर्षाशिवाय मिळत नाही, त्यासाठी परिश्रम आवश्यक असतात."
५) " जेव्हा दडपशाही असते, तेव्हा फक्त स्वाभिमानी गोष्ट म्हणजे उठणे आणि सांगणे की हे थांबले पाहिजे, कारण माझा अधिकार हा न्याय आहे."
६) " आम्हाला हेतूचा सखोल प्रामाणिकपणा, बोलण्यात मोठे धैर्य आणि कृतीत प्रामाणिकपणा हवा आहे." 
   सरोजिनी नायडू यांचे हे विचार आजही तरुणांना आणि महिलांना समाजकार्यासाठी प्रेरित करतात.भारताच्या स्वातंत्र्यानंतर, त्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या राज्यपाल झाल्या. श्रीमती अ‍ॅनी बेझंट यांची प्रिय मैत्रीण आणि गांधीजींची प्रिय शिष्या, म्हणून त्यांनी संपूर्ण आयुष्य भारत देशासाठी समर्पित केले.दि. २ मार्च १९४९ रोजी त्यांचे निधन झाले. 
        १९६४ मध्ये मरणोपरांत १३ फेब्रुवारी रोजी भारत सरकारने त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ १५ पैशांचे टपाल तिकीट जारी करुन त्यांच्या राष्ट्रीय कार्यातील योगदानाबद्दल गौरव केला.स्वातंत्र्यसेनानी, कवयित्री, धुरंधर राजकारणी सरोजिनी नायडू यांना 
विनम्र अभिवादन!💐 🙏
©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"


रविवार, फेब्रुवारी ०८, २०२६

अस्तित्व

शेतकरी आणि त्याचा सर्जा-राजा यांचं नातं अतूट असतं!आपल्या  धन्याशी इमान राखण्याचे वचन देऊन त्यास धिरोदात्तपणे जगण्याचे बळ देणारी ही भावस्पर्शी रचना !

मालक, कितीही  येवू द्या...
पाऊस वादळ अन्  वारा
आम्ही सर्जा राजा सदा सोबत
येऊ  देऊ नका अश्रुधारा

श्वास असेतो तुमच्यासाठी
चिखलात चालू आम्ही वाट
तुमच्यासवे दिवसरात्र राबू
पाहू आपण समृद्धीचा घाट

उन्ह  असो  वा कडक थंडी
तमा आम्ही बाळगणार नाही
स्वेदगंगेत न्हाऊ दोघे  सदैव
शेत  फुलवायला  बारमाही

जगाचा  पोशिंदा  म्हणून ...
मालक, जपून  ठेवा  सत्व
विनंती आहे माझी तुम्हाला
राखा बळीराजा म्हणून अस्तित्व!

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...