Kaayguru.Marathi

सोमवार, सप्टेंबर २७, २०२१

आईचे मुलास पत्र...

आईचे मुलास पत्र…!

प्रिय लेकरा ,
तुला हृदयापासून अनंत आशीर्वाद !
आज तू शिकून सवरुन मोठ्ठा झालास.
नोकरीला लागून साईब झालास.
पण तुला माहित हाय का?
तुला लाहनचा मोठ्ठा कोणी केलाय ते ? नाहीना... ?
मग ऐक तं,कदाचित उद्या मीही नसेन…
लेकरा,अमरत्वाचे वरदान इथे भूतलावरील कोणत्याच मानवप्राण्याला नाय ! हे लक्षात असू दे
जवा तू जनमलास ,तवापासंन तू चार वरीसचा होईस्तो,
सगळं काय मी केलं व्हय ! नाय रं लेकरा …
तुझा जनमापासंनंच तुझं उठणं,बसणं,न्हाऊ-माखू
घालणं,इतकंच काय तुझे लंगोट बदलणं,नवीन लंगोट बांधण,ही सगळी कामं तुझा बाबानं स्वताच केलीत की!
बाळा,तुला सांगते,तुझा जनमापासंनंच माझी पाठ आजारपणानं धरली,
अन् मी सुद्धा चार वरीस खाटेलाच बसून व्हती !
माझंसुद्धा चार वरीसपावेतो उठणं,बसणं, औषधपाणी देणं अन् रांधणं,वाढणं,उष्टी-खरकटी भांडी धुणं-घासणं
ही सगळीच कामं तुझा बाबांनीच केली रं !
तुझे बाबा ते चार वरीस अन् ह्यात असेतो माझी आई 
अन् मैत्तर झाले…अन् तुझी आईही तेच झाले.
तुलाही असं काही जगता यावं म्हणून हा प्रपंच!
बाळा! तुला सांगते,मला आजारपणाने खूपच थकल्यागत वाटे ! तुझ्यासाठीचं दूधही आटलं व्हतं.
तुला दूध प्यायला मिळावं म्हणून त्यांनी द्रोणाचार्य परमाणं पिठात पाणी कालवून दूध पाजलं नाही तुला. तर…स्वतः रातदिन काबाडकष्ट करुन एक गाय विकत आणली.तुझ्या दूधापायी !
त्या गाईचा गुराखी बनुन सांभाळ करणं,चारा-पाणी करणं, शेणं-मूत आवरणंही,
सगळी कामं तुझ्या बाबांनीच केली.का?
तर तुला दूध पिऊन " कृष्ण-बलरामा " प्रमाणं
बलवान होता यावं हे तेंचं सपन व्हतं म्हणून... !
तू जव्हा दुडुदुडू चालू लागला,चालतांना पडू लागला तर धावत येऊन तुला मी नाय तर तुझ्या बाबांनीच सावरलं.
बोट धरुन चालायला ही त्यासनीच तर शिकवलं बाळा !
तुझा हट्टापायी ते घोडा झाले.तुला पाठीवर घेऊन घरभर फिरले.तू," चल रं घोडा टबऽऽडऽक टऽबऽऽडक " असं बोलून खुष व्हायचा.
तुला सांगते,तू नऊ महिण्याचा अस्ताना,तुला हगवण लागली तुझे हागरे लंगोट बदलणे,ते धुणे हे जीवावर गेले त्यास्नी.पण,एक शब्दानेही त्रागा नाही की राग नाही केला त्यास्नी . तुझ्यासाठी ते सगळं करीत व्हते!
तू काहीच खाईना,पिईना,अन् दिवसरात्र काही केल्या झोपेना...रडून रडून आकांत मांडला व्हतास तू !
चार दिवस तुला छातीशी - कडेवर घेऊन रात्रंदिन तुझी काळजी तुझा बाबांनीच घेतली.ते चार दिवस त्यांनी जागून काढल्या.
घरातली सगळी कामही त्यासनीच आवरली.कशी आवरली एवढी कामं? तेच जाणे !तुला तवा तर कायबी कळेना.तुला न कळणारी गोष्ट आज सांगितली तर खरी नाय वाटायची.जाऊ दे…!तू म्हणशील, " आई-बाबांनी ही काम करणं त्येचं कर्तव्यच सारे की ! " 
तुझं भी खरंच हाय म्हणा !
पण तू एकदा बोलला व्हता," बाबा, तुम्ही खूप कष्ट करतात.मी त्याचं मोल विसरणार नाही .नोकरीला लागलो न् की तुम्हा दोघांना खूप सुखात ठेवीन मी!
तुमच्या चाकरीला नोकर राखीन की! " 
हे ऐकून आम्हास्नी आभाळ चार बोटं दूर राहिल्याचं वाटलं व्हतं!
लेकरा,आम्ही काही तालेवार नव्हतो,पण तरी तूला शिकवलं,पोटाला चिमटा देऊनच! स्वतः दहा वेळा तुटलेली चप्पल शिवून वापरली.
पण तुला सायबांचे बुट विकत दिधले.
सवताचा घास तुझा मुखात भरवला.तू पोटभर जेवला की मगच आम्ही जेवलो.तू उपाशी राहायला नको म्हणून…!
तुझा बाबानं सवता ठिगळं लावलेलं धोतर अन् फाटका सदरा व मी सुद्धा ठिगळं लावलेली साडी वापरली,पण तुला महागातली सुटपॅन्ट अन् टयाय का काय ? तो घेऊन दिला." तू साईब व्हावा.हे सपन पुर्ण व्हावं.मग तुझ्यासाठी कायपण..." यासाठी त्येंनी सारी हौसमजा दूर सारली.
 तेंचं व माझं सपन आज पुरं झालं.तू मोठ्ठा सायब झाला.शिकता शिकता शिरमंताची लेक तुला बायको मिळाली.तू लग्नही उरकून घेतलं.त्येचा आम्हाला राग नाय !तुझा संसार सुखात चाललाय.तुला दोन पोरं होऊन ती घरभर हिंडाय लागलीत.कामाला नोकरचाकर ,फिरायला महागडी 
गाडी ...मोठ्ठा राजमहाल वाटावा असं घर आहे म्हणे तुझं! हे ऐकून आम्ही धन्य झालोय!🙏
ही सगळी सुवार्ता मला तुझ्या घरी कामाला असणारी रमाबाई येऊन सांगून गेली. ऐकूण मन भरुन आलं रं पोरा !
आम्ही काय ? जन्माचे दरिंदर,तुला आता कायबी देवू शकणार नाही.जेवढं आमच्या झोळीत होतं ते सर्व तुला देऊन झालं.आता म्हातारे झालो.हातापायातलं बळ संपतं चाललंय.तुला आमची आता गरजच नाय.पण तू आमच्यापासून दूर राहिला तरी त्येचं आम्हाला वाईट नाही. " तू सुखात रहा ! "
" तू खूप सुखात रहा! तुला दुखाचा कधी चटका लागू नये.म्हणून आई अंबाबाईला हात जोडून प्रार्थना! "
आणि बाळा,एक गोष्ट ऐक…चुकलो असू आम्ही तर माफ कर.🙏
रमाबाईचं ऐकूण तुझा बाबाला राहवलं नाही.तू बोलवलं नसलं तरी , ते तुला भेटण्यासाठी आठ दिवसांपुर्वी तुझ्या बंगल्यावर आले.पण,तुझ्या बंगल्याचा गेटजवळच तुझा बाबाला तुझ्या पट्यावाल्यांन अडवलं. 
" ए,भिकारड्या...कोण रं तू ?"
अरं दादा,मी तुझा सायबाचा बाप हाय.त्याला भेटाया आलोय ! त्याची आवडती ' मोहनथाळ ' घेऊन आलोय.मला आत जाऊ दे रं दादा.! "
" तू...अन सायबाचा बाप ! चोर , भिकारी,चल निघ इथनं! सायबांचा बाप कधीचा मेलाय !" म्हणत त्याने तुझा बाबाला ढकललं.त्ये भूईवर खाली पडले.तव्हा,तू बंगल्यातून बाहेर आला. " गणा,कोण आहे रे हा ? " विचारलं.
" साहेब,आहे कोण तरी भिकारी.तुम्हाला भेटायचं म्हणतो.मी म्हटलंय,साहेबांना वेळ नाही .चल निघ ! 
" तेव्हा तू " ठिक , निघतोय मी .जायला सांग त्याला! " असं म्हणत बाळा,तू गाडीत बसून निघून गेला.साधी विचारपुस सुद्धा केली नाहीस रे तू! पोरा,हा संस्कार केला नव्हता रे तुझ्यावर . इतका निर्दयी कसा झालास रे तू ? पोरा,मी विसरलेच रे,तू आता मोठा सायब झालास.शिरमंताचा जावाई झालास,पैसैवाला झालास,म्हणून गर्व तर नाही झालाय ना तुला ? पोरा,नको रे हा गर्व ! गर्वाचं काही काही टिकत नाही.ऐक माझं आणि सोडून दे हा विचार. माणसं ओळख,माणसं जोड.ती आयुष्यभर पुरतात.मान-पान-शान पद असे तो राहते.नंतर ते सरते.हे नको विसरु रं लेकरा ! "
 बाळा, तुझा घरुन परत आल्यावर तुझा बाबांन धिर सोडला.हाय खाल्ली.म्हणाले,
 " आपण आपल्या पोराला परके झालो गं! ओळख मोडली त्यानं ,ओळख मोडली…" म्हणत ते धाय मोकलून रडले.😭जेवण खाणं बंद केलं.तुझा वागण्याला बघून त्यांनी चार दिवसांत जगाचा निरोप घेतला.मी विधवा झाले पोरा,तुझे पितृछत्र असं कोसळलं.जे पुन्हा दिसणार नाही.काळाचा पोटात गुडुप झालं….!
रमाबाई मला म्हणाली," बाय,तुझी सून तूझ्या पोराला ईचारत होती," तुझ्यासाठी तुझा बाबानं काय केलं? "
या प्रश्नाला तू गप्प होतास म्हणे ! 
पण ...तूला तुझा बायकोसमोर जे बोलण्याचं धाडस झालं नाही.ते सगळं मी ह्या पत्रात लिहलंय.ते वाचून दाखव तिला.अन् सांग,तुझी बायको म्हणजे आमची सुन, कुटुंबाची गृहलक्ष्मी तिच्याबाबत आम्हाला कधी राग ना द्वेष नाहीच! तीही सुखात राहो हा आशीर्वाद सांग ! तुझे आई-बाबा म्हणून नातवांना डोळे भरुन पाहू शकलो नाही.म्हणून ह्या वेड्या आजीचा मंगल आशीर्वाद सांग! सांगशील ना! हे मागणे नव्हे तर विनंती समज पोरा!"🙏
पण शेवटी एकच मागणं ,तुला वाढवताना आम्ही जे घरंदाज संस्कार केले.ते संस्कार तू तुझ्या मुलांवर कर! न जाणो, आमच्या वाट्याला जे दुःख आलं ते तुम्हा नवरा बायकोच्या वाट्याला न येवो.ही अंबाबाई चरणी प्रार्थना!तुला नातवांनी विचारलंच ," आजी आजोबा कुठं राहतात.त्यांना भेटायचं आहे ."
" तू सांग,चिमण्यांनो, तुमचे आजी-आजोबा माझ्या लहानपणीच एका अपघातात मेले.ज्यांना मीही डोळे भरुन पाहिले नाही.असं सांग.पण,आमची ओळख करुन देऊ नकोस!ही तुला हात जोडून विनंती!🙏"
तू व तुझा परिवार सुखात राहो! हा आशीर्वाद!

✍️ तुझी आई 

© पत्रलेखन:-

प्रा.पुरुषोत्तम पटेल, म्हसावद
भ्रमणध्वनी-8208841364




रविवार, सप्टेंबर २६, २०२१

लेक माझी लाडकी

मित्रहो, आज राष्ट्रीय कन्यादिन... त्यानिमित्त माझ्या लेकीविषयीच्या मनभावना...

लेक माझी भाग्यश्री

       गुणांची हो खाण 

       लेक जन्मा येता लाभला 

       आई बाबांचा मान  ||१||

                      चाल तिची दुडूदुडू 

                      मन करते प्रसन्न 

                      बोल बोबडे बोबडे 

                      कोकिळेचे मंजुळ गान ||२||

       लेक माझी खेळे बागडे 

       घरी दारी अंगणात 

       सप्तसूर निनादती 

       तिच्या रुणुझुणू पैजणात ||३||

                     रुप लेकीचं गोजीरं 

                     जणू बावनखणी सोनं 

                     देवाजीनं दिलं आम्हा 

                     सारे कुबेराचं धन ||४||

       अहो.. लेक माझी भासे 

       जणू वडाचे झाड.. 

       जन्म एक अन् फेडिते

       दोन घरांचे पाड  ||५||

            © प्रा. पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शनिवार, सप्टेंबर २५, २०२१

भागाकार!

आयुष्या ! 
तुला लाविला मी लळा
माणसांचा जमवला गोतावळा
सोसिल्या अनंत कळा
विश्वासघाती लोकांनी
केसाने कापला गळा
असह्य झाल्या झळा

" त्यांना " सुख द्यायला
प्राजक्त झालो मी !
मनसोक्त बहरलो
नाजूक श्वेत पुष्पानी
स्नेहाचा परिमळ 
राखून न ठेवता
वाटतच सुटलो...
वा-याच्या अश्वावर
स्वार होऊन !

सुगंध घेऊन मात्र...
बहुतेकांनी तुडवले
पायदळी...!
छिन्न विछिन्न
रक्तरंग होईतो !

वाटलं...
स्वतःच्या आयुष्याचे
गणित सोडवताना
उगीच करीत राहीलो मी
स्वतःच्या जगण्याचा भागाकार
आणि इतरांचे गणित 
सोडवताना मात्र ... मी
करीत गेलो गुणाकार!

शेवटी आयुष्याला 
आकार देतांना
सांधताना बांधताना...
साधलं काहीच नाही
पण...अनुभवला मी
माझ्याच दुख-या मनाचा
भागाकार !!!

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


कृष्णमुरारी

हे प्रभो कंसारी। तू कृष्ण मुरारी।
कुंजविहारी तू। गिरीधारी  ।।

देवकी नंदन  । पितांबरधारी।
बन्सीबिहारी तू ! मनोहारी ।।

कालियामर्दक । गोपालसखा तू ।
नंदनंदन तू   । वासुदेव ।।

राधारमण तू । मनमोहन तू
माखनचोर तू । वनमाळी  ।।

कंजलोचन तू। कमलवदन।
मधुसूदन तू । जगदिशा ।।

रुक्मिणी वल्लभ । शामसुंदर तू ।
पुरुषोत्तम तू । नारायण।।

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, सप्टेंबर २४, २०२१

यशसिद्धी

यशसिद्धी

आले अपयश जरी
खचून नका जाऊ
करा प्रयत्न पुन्हा पुन्हा
नक्की यशस्वी होऊ
          अपयशातून यशाची
          घडते पहिली कृती
          म्हणती थोर विभूती
          हिच तर खरी उक्ती
अपयश आले म्हणूनी
संपवू नको जीवन
ठेवा जिंकायचा ध्यास
शिखर बघाया शिका
          अपयश पचवायला
          काळीज ठेवा वाघाचे
          दडले त्यात रहस्य
          यशाकडे जाणाऱ्या श्रेयाचे
अपयश तर शिकवी
नवे ज्ञान क्षणोक्षणी
अशाच अनंत वेड्यांची
इतिहास सांगतो कहाणी

 © प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्पम् "
     म्हसावद, जि.नंदुरबार

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...