Kaayguru.Marathi

सोमवार, फेब्रुवारी ०७, २०२२

स्वप्न [ चारोळी ]

सोड ना रे तू आता
रोज स्वप्नात माझ्या येणे
आता झाले मी दुज्याची
गाऊ दे मज सुखाचे गाणे 

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

रविवार, फेब्रुवारी ०६, २०२२

भेटेन मी!

[ आपल्या मायभूमीच्या रक्षणार्थ आई-बाबा,पत्नी व घरदार सोडून सीमेवर अहोरात्र पहारा देत  उभ्या असलेल्या सैनिकाची आई,पत्नी यांची आणि विर सैनिकाची हृदयस्पर्शी भावना....!]
* आई -
बाळा...करु नको माझी चिंता
आणू नको तू डोळ्यांत पाणी
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपी गरियसी
शिकवण रे दिधली ऋषीमुनी

बाळा जन्मदात्री ही  मी रे तुझी
परी  तुज पोशिते ही माय भूमी
सेवा  कर  तू प्राणाहून प्रियही
आशिष ठेविते  तुझा  शिरी  मी

* अर्धांगिनी -
हे  औक्षण  करीते तुम्हा मी !
दिव्य  ज्योती  पेटवुनी नयनी
वाट  पाहीन  द्यावे वचन मज
भेटावे हो तुम्ही सुखे परतोनी

* वीर सैनिक-
लाज राखाया  मातृतभूमीची
प्रिये, लढता लढता  मरेन मी
नऊ महिन्यांनी  पुन्हा भेटाया
तुझ्याच उदरी जन्मेन मी !

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


शनिवार, फेब्रुवारी ०५, २०२२

माणूसघाणा (अलक )

     अमित... स्वत:ला खूप महान समजायचा.त्याला वाटे,मी एकटा फर्डा वक्ता आहे,मी सुरेल गायक आहे,मी अप्रतिम कुंचल्याचा धनी आहे;सप्तरंगाची जाण माझ्याशिवाय दुस-या कोणालाच नाही.मी सिद्धहस्त लेखक,कवी,गीतकारआहे,संगीतकार आहे. सर्वांनी आपलं 
कौतुक करावं.असे त्याला मनातून वाटायचे.पण,दुस-यांचे कौतुक करणे त्याला आवडायचेच नाही.तरीही सुरुवातीच्या काही दिवसांत त्याचे कौतुक झालेही.इतरांनी कविता,गीतलेखन,गीतगायन,व्याख्यान असं काही केलं की, मनातल्या मनातच कुढत राही.त्यांचे सतत दोष काढत राही.तो हेवा करु लागे.दुर्मुखलेलाच होई.सुंदर,छान,असे शब्दहीत्याचा ओठांवर येत नसत. किंवा चांगले,ठिक, वाईट कोणतीही प्रतिक्रिया देणे त्याला मोठे संकटच वाटायला लागे.त्याला मनातून वाटे,'आपल्यावाटेवर कोणी चालूच नये! इतरांनी मोठे होऊच नये.'
     म्हणतात ना ! ' समय बडा बलवान है। ' मन चिंती ते वैरी न चिंती या उक्तीप्रमाणे उत्तरोत्तर अमितची लोकप्रियता कमी होऊ लागली.त्याचाच काळात ,त्याचाच समोर अनेकांनी जनमानसात राहून सर्वांगीण क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठले.आणि आपल्या यशाचे खरे श्रेय आपल्या हितचिंतकांना, समिक्षकांना,वाचकांना दिलेही. त्यांच्याच ‌ऋणात राहून वाटचाल करण्याचे संकल्पही केले.ते बहुसंख्य आज लोकप्रियतेच्या शिखरावर दैदिप्यमान होऊन विराजित झाले आहे.त्यांनी इतरांसाठी मनात असूया न जोपासता आपुलकी जोपासली.आपल्या पदपथावर ते इतरांसोबत चालत आहेत ते आजही समाजात कौतुकाचे धनी ठरत आहेत.त्यांच्या एका शब्दाला हजारोंची ' वाहवा ' मिळत आहे.
    अमित मात्र आज ' व्वाव, बहोत खूब 'अशा शब्दांनाही पारखा झाला आहे.त्याची ' माणूसघाणा ' प्रवृत्तीच त्याचा लयाला कारणीभूत ठरली आहे.
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, फेब्रुवारी ०३, २०२२

कुमुदिनी

जीवन  आहे एक उद्यान
निष्ठेने  करावी   मशागत
उमलतील  मग  पदोपदी
कोमल  पुष्प  शत - शत

सुख म्हणजे काय असते
शिकवते  हो  ही हिरवाई
दुःख   विसरावे  कसे   ते
सांगून  जाते  जाई - जुई

आज उमलले  ते उद्याला
कोमेजणार  आहे   जरुर
अखेरचा  श्वासा  पर्यंतची 
किर्ति  गंध वाटावा भरपूर

दुःख  क्लेश  चिंता समज
तू  गुलाबपुष्पाची पाकळी
काट्यासवे   राहून   सुद्धा 
ती आनंदें  फुलवा उद्यानी

करु  नये आयुष्यात कधी
घरोबा  गर्व  अभिमानाशी
सांगून  जाती पिवळी पर्णे
नाते  जोडताना मृत्तिकेशी

बहरु  द्यावी  हो आनंदवेल
अनुभवा  फुले  ताजेतवाने
भ्रमर  होऊन  कुमुदिनीशी
गुणगुणावे गोड जीवनगाणे 

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


मंगळवार, फेब्रुवारी ०१, २०२२

सूर्योदय


अंधकारातून होतो उष:काल
उषःकाल दाखवतो उजेडाची वाट
घाट माथ्यावर प्रकटतात नाजूक किरण
किरणांच्या जमून गोतावळा
भरतो प्रकाशकिरणांचा मेळा
करती ते आनंदाची बरसात
आशेच्या सरोवरात फुलतात
कल्पनेचा अगणित कुमुदिनी ...
मनाला उल्हसित करणारी प्रतिदिनी
सुगंधित प्रकाश वाटेच्या 
होतो मी पांथस्थ
चालू लागतो संथ-संथ
जूने टाकून घेतो मी नवे
सुसंस्कार सुविचार जे जे हवे
उघडतो मी विचारकप्पा
सोडून देतो दिगंतराळी
दुःख क्लेश चिंतेचे कातरवेळी जमलेले
अगणित  पाखरांचे थवे !
सूर्योदय होताच...!

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...