Kaayguru.Marathi

रविवार, सप्टेंबर १४, २०२५

लोकं काय म्हणतील?

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र. ५७
विषय- लोकं काय म्हणतील?
सूचक- सौ.राजश्री जाधव,पुणे
दि.१४/०९/२०२५
-----------------------------------------------------------
लोकं काय म्हणतील?[कविता]
लोकं काय म्हणतील 
मला  नाही घेणं देणं
सखे,मी फक्त जाणतो
आपलं प्रेम निभवणं!

सखे,तुझं सोबत येणं
माझ्यासाठी परिसस्पर्श 
तुझ्या एक एक शब्द
जगण्याला देतो  हर्ष!

सखे,तू  गंध फुलांचा
करिते प्रसन्न तन मन
नको घाबरु ग् जगाला
तू राधा मी  मनमोहन

सखे,मी तुझ्या प्राजक्त 
तू तर माझी चाफेकळी 
सखे, मिठीत  ये ना तू
चांदण्यात या तरुतळी

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेंन म.पटेल " पुष्प "

बुधवार, ऑगस्ट २७, २०२५

देवा,एक हे मागणे!



गणराया कृपा तुझी लाभू दे
दुःखहर्ता चरण तुझे पाहू दे
जन्मोजन्मी असावा तू सांगाती
देवा,एवढेच माझे हे मागणे !

देवा दर्शन घडो नित्य तुझे
ओठी गुणगुणू दे तुझे गाणे
जेथे जातो तेथे तू रहा सांगाती
देवा,एवढेच माझे हे मागणे !

रुप तुझे सदैव राहो डोळा
मुखी असू दे नाम आळवणे
दुःख संकटी तू व्हावा सांगाती
देवा,एवढेच माझे हे मागणे !

गर्व न निपजो दे सद्बुद्धी 
मनमंदिरी व्हावे सदैव येणे
नको दुरावा तुझ्या माझ्यात 
देवा,एवढेच माझे हे मागणे !

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल " पुष्प ”

मंगळवार, ऑगस्ट २६, २०२५

ओल्या सांजवेळी


ओल्या या सांजवेळी
नको   राहू   तू   दूर
तू    नसता   जवळी
मनी   दाटते   काहूर

ओल्या या सांजवेळी
भेटीस  झाले  आतूर
सख्या आळवू आपण
प्रीतीचे   मधुर   सुर

ओल्या या सांजवेळी
यावा  मिलनाचा पूर
तुझ्या  मिठीत  येता
वदनी   हर्षाचा  नूर

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल " पुष्प "

शुक्रवार, ऑगस्ट २२, २०२५

आम्ही सर्जा-राजा बोलतोय!

आम्ही सर्जा-राजा बोलतोय!
[ आज पोळा: वृषभांसाठी आनंदसोहळा ! शेतकरी धन्यासाठी सर्जा-राजाची भावना सांगणारे काव्य!]
----------------------------------------------------------
धनी… आज आमुची दिवाळी 
समस्त हिंदुवर्षातील हो “पोळा”
विसरुन वर्षभरीचे दुःख क्लेश
हर्ष भरे साजरा करू “सोहळा!”

धनी… तुमच्यासाठी हा सर्जा
अख्खं आयुष्य पणाला लावील
अंगात अखेरच्या श्वास असेतो
तुमच्या संग इमाने उभा राहिल!

धनी…ह्यो राजाच्या मनात सुद्धा 
तुमच्याविषयी खच्चून आदर !
उन पाऊस वा असो वादळ वारा
तुमच्या सेवेसी सदैव मी सादर!

धनी…आम्ही जगू तुमच्यासाठी 
विनंती आमची एक नक्की ऐका
कितीही आली संकट तरीही…
आत्महत्येचा धरु नका हो हेका!

धनी…तुम्हीच आमचं मायबाप
तुम्हासाठी आमची जीवनज्योती
विनंती मेल्यावर शेतातच पुरा 
नका हो देऊ कसायाच्या हाती !

धनी…आम्ही तुमच्यासाठी राबू
काळ्या आईशी निभावू नाती !
रात्रंदिन सेवा करता करता…
पिकवू सुखाचे माणिकमोती !

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल “ पुष्प ”

रविवार, ऑगस्ट १७, २०२५

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय?
भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज' म्हणजे 'भक्ती करणे' किंवा 'देवाचे गुणगान, जप करणे', आणि भज शब्दाला 'अन' हा प्रत्यय लागून 'भजन' हा शब्द तयार होतो, ज्याचा अर्थ 'देवाचे गुणगान करण्यासाठी गायलेले गाणे' असा घेता येईल.
  भजनात  टाळ,चिपळी,मृदंग, पखवाज,तबला, हार्मोनियम ,बासरी या वाद्यांसह भगवंताची स्तुती गायन व नामस्मरण केले जाते.विशेषत: आजही महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील देवळात वा मंदिरात बसून आठवड्यातील निदान एक दिवस तरी भजन गायन करण्याची प्रथा सुरू असल्याचे दिसून येते.चातुर्मासात तर अनेक गावांत मंदिरांमध्ये चार महिने दररोज रात्री नित्य भजनाचे गायन होते.
भजन म्हणजे देवाचे गुणगान करणारे एक प्रकारचे धार्मिक गीत किंवा भक्तीगीत.देवाची स्तुतीपर काव्यरचना साग्रसंगीत गाऊन देवाला भजणे किंवा आळविणे यालाच भजन असे म्हणतात. हा योगसाधनेतील भक्तियोगाचा भाग आहे. ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय लोककला आहे. वारकरी संप्रदायात भजनाला आत्यंतिक महत्व आहे. पूर्वीच्या संतपरंपरेतील संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वरमाऊली, संत निळोबा महाराज,संत तुकाराम महाराज,संत सोपानदेव महाराज, संत एकनाथ महाराज,संत नामदेव महाराज,संत चोखामेळा महाराज, समर्थ रामदास स्वामी,संत जनाबाई,संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई, कृष्ण भक्त संत मिराबाई इत्यादी पुरुष - स्री संतांनी अनेक भजने अर्थात लहान अभंग,मोठा अभंग, गवळणी, विरहिणी,रचियेल्या आहेत. त्यांपैकी काही रचना भीमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी, अजित कडकडे, सुधीर फडके, लता मंगेशकर आणि अन्य अनेक गायकांनी गाऊन अजरामर केल्या आहेत.
   भजन गाण्याला कोणत्याही भाषेचे बंधन नाही. अभंग, श्लोक,साधे मंत्र किंवा शास्त्रीय संगीतावर आधारित विविध प्रकारच्या भक्तीगीतातून ते  सादर करता येते.
भजनाचे महत्त्व:
भजन हे भक्तांना आध्यात्मिक आनंद, शांती आणि एकाग्रता प्रदान करते. ते देवाशी नाते जोडण्याचा एक प्रभावी मार्ग आहे, असे मानले जाते. 
भजनाचे दोन मुख्य प्रकार आहेत: 
१) चक्री भजन :
ज्यामध्ये अनेक भजन गायक असतात.ते एका विशिष्ट पद्धतीने फेर धरून, चक्राकार फिरत भजने म्हणतात.हे भजन करताना,एक अभंग म्हटल्यानंतर लगेचच दुसरा अभंग, पहिल्या अभंगाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू करतात. यालाच चक्री भजन म्हणतात, या भजनामुळे गायकाला एक खास ऊर्जा आणि आनंद मिळतो.
२) सोंगी भजन: 
ज्यामध्ये कलाकार विशिष्ट वेषभूषा (सोंगे) करून विविध पात्रांच्या रूपात अभिनय करतात व भजन गातात.यात देव-भक्तांमधील संवाद किंवा पौराणिक कथांचे सादरीकरण केले जाते,ज्यामुळे श्रोत्यांना एक वेगळा अनुभव मिळतो.
भजनाचा अजून एक प्रकार सांगितला जातो.
३) खंजिरी भजन :
तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भजनाचा हा एक नवीन प्रकार सादर केला आहे. त्यांनी खंजिरी या वाद्याचा वापर करून भजनाच्या माध्यमातून जनजागृती आणि समाजसुधारणेचे कार्य केले.
  खंजिरी भजनाद्वारे, अंधश्रद्धा निर्मूलन, जातीय भेदभावाचे उच्चाटन, स्वच्छता,शांतता, समता, हे ग्रामविकासाचे सामाजिक संदेश लोकांपर्यंत सहज पोहोचवले जातात.  

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल " पुष्प"

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...