Kaayguru.Marathi

शुक्रवार, फेब्रुवारी १३, २०२६

भारताची कोकिळा: सरोजिनी नायडू

 आज सरोजिनी नायडू यांच्या जन्मदिवस.त्यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८७९ रोजी भारतातील हैदराबाद येथे झाला.स्वतंत्र भारतातील उत्तर प्रदेशच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. त्यांचे वडील अघोरनाथ चट्टोपाध्याय हे एक प्रसिद्ध विद्वान होते आणि त्यांची आई कवी होती आणि त्या बंगाली भाषेत कविता लिहित असे. सरोजिनी लहानपणापासूनच तीक्ष्ण बुद्धीच्या असल्याने, त्यांनी १२ व्या वर्षी चांगल्या गुणांनी १२ वी परीक्षा उत्तीर्ण केली आणि १३ व्या वर्षी "लेडी ऑफ द लेक " या शिर्षकाची कविता लिहिली.
(The Lady of the Lake) ही सुमारे १३०० ओळींची एक प्रदीर्घ कथात्मक कविता आहे. ही कविता त्यांच्या विलक्षण काव्यप्रतिभेचे दर्शन घडवणारी पहिली मोठी रचना मानली जाते, ज्यामुळे प्रभावित होऊन त्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती.
सरोजिनी नायडूंच्या काव्यात भारतीयत्व,निसर्ग, उदात्त देशभक्ती आणि महिलांच्या भावना यांचे सुंदर चित्रण आढळते.म्हणूनच त्या " भारताची कोकिळा " (Nightingale of India) म्हणून ओळखल्या जातात.कवितालेखनातून त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि १८९५ मध्ये त्या उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेल्या.तेथेही अभ्यासासोबत कविता लिहू लागल्या. "गोल्डन थ्रेशोल्ड" हा त्यांचा पहिला कवितासंग्रह होता. "बर्ड ऑफ टाइम" हा त्यांचा दुसरा आणि "ब्रोकन विंग" हा तिसरा कवितासंग्रह. या कवितांनी त्यांना एक प्रसिद्ध कवयित्री बनवले.स्वातंत्र्यपूर्व भारतातील  एक दिग्गज प्रेरणास्थान कवी रवींद्रनाथ टागोर यांनीही त्यांच्या अद्भुत काव्यात्मक लेखन कौशल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
       १९१४ मध्ये त्या पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये गांधीजींना भेटल्या आणि त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन, त्यांनी स्वतःला राष्ट्रासाठी समर्पित केले. कुशल सेनापतीप्रमाणे, त्यांनी प्रत्येक क्षेत्रात...मग ते सत्याग्रह असो,संघटना असो आपली प्रतिभा दाखवली.त्यांनी अनेक राष्ट्रीय चळवळींचे नेतृत्व केले आणि तुरुंगातही गेल्या.
     त्या बहुभाषिक असल्याने त्यांनी प्रदेशानुसार इंग्रजी हिंदी ,बंगाली  गुजराती  भाषेत भाषणे दिली.लंडनमधील एका मेळाव्यात इंग्रजीत बोलताना त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.त्या आपल्या भाषणातून सतत भारतीयांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित करीत असत.
सरोजिनी नायडू यांचे प्रमुख सुविचार:-
१) " जीवन एक आव्हान आहे - ते स्वीकारा. जीवन एक स्वप्न आहे - ते साकार करा. जीवन एक त्याग आहे - ते अर्पण करा. जीवन प्रेम आहे त्याचा आनंद घ्या."
२) " देशप्रेम ही केवळ भावना नसून ती कृतीत उतरवणे आवश्यक गोष्ट आहे."
३) " स्त्री ही केवळ घर सांभाळणारी नाही, ती समाज घडवणारी महत्वपूर्ण आद्यशक्ती आहे."
४) " स्वातंत्र्य हे संघर्षाशिवाय मिळत नाही, त्यासाठी परिश्रम आवश्यक असतात."
५) " जेव्हा दडपशाही असते, तेव्हा फक्त स्वाभिमानी गोष्ट म्हणजे उठणे आणि सांगणे की हे थांबले पाहिजे, कारण माझा अधिकार हा न्याय आहे."
६) " आम्हाला हेतूचा सखोल प्रामाणिकपणा, बोलण्यात मोठे धैर्य आणि कृतीत प्रामाणिकपणा हवा आहे." 
   सरोजिनी नायडू यांचे हे विचार आजही तरुणांना आणि महिलांना समाजकार्यासाठी प्रेरित करतात.भारताच्या स्वातंत्र्यानंतर, त्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या राज्यपाल झाल्या. श्रीमती अ‍ॅनी बेझंट यांची प्रिय मैत्रीण आणि गांधीजींची प्रिय शिष्या, म्हणून त्यांनी संपूर्ण आयुष्य भारत देशासाठी समर्पित केले.दि. २ मार्च १९४९ रोजी त्यांचे निधन झाले. 
        १९६४ मध्ये मरणोपरांत १३ फेब्रुवारी रोजी भारत सरकारने त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ १५ पैशांचे टपाल तिकीट जारी करुन त्यांच्या राष्ट्रीय कार्यातील योगदानाबद्दल गौरव केला.स्वातंत्र्यसेनानी, कवयित्री, धुरंधर राजकारणी सरोजिनी नायडू यांना 
विनम्र अभिवादन!💐 🙏
©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"


रविवार, फेब्रुवारी ०८, २०२६

अस्तित्व

शेतकरी आणि त्याचा सर्जा-राजा यांचं नातं अतूट असतं!आपल्या  धन्याशी इमान राखण्याचे वचन देऊन त्यास धिरोदात्तपणे जगण्याचे बळ देणारी ही भावस्पर्शी रचना !

मालक, कितीही  येवू द्या...
पाऊस वादळ अन्  वारा
आम्ही सर्जा राजा सदा सोबत
येऊ  देऊ नका अश्रुधारा

श्वास असेतो तुमच्यासाठी
चिखलात चालू आम्ही वाट
तुमच्यासवे दिवसरात्र राबू
पाहू आपण समृद्धीचा घाट

उन्ह  असो  वा कडक थंडी
तमा आम्ही बाळगणार नाही
स्वेदगंगेत न्हाऊ दोघे  सदैव
शेत  फुलवायला  बारमाही

जगाचा  पोशिंदा  म्हणून ...
मालक, जपून  ठेवा  सत्व
विनंती आहे माझी तुम्हाला
राखा बळीराजा म्हणून अस्तित्व!

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"

शनिवार, डिसेंबर ०६, २०२५

कुणाच्या प्रेमात?


कुणाच्या  प्रेमात कोण?
आपण  विचारावे  कसे
सवाल ऐकताच  येते हो
दुसऱ्याला आपल्यावर हसे !

पुत्र म्हणून...मी आहे हो
आईच्या वात्सल्य प्रेमात
अन् आकंठ बुडालोय मी
प्रिय बाबाचा विश्वासात!

पती   म्हणून... पत्नीवर
करतो मी जिवापाड प्रेम
मला वाटते  तुमचे माझे
अन् जगभर असेल सेम!

कुटुंब  प्रमुख म्हणून तर
सगळ्यांचा  मला  लळा
चंदनाची शितलता जपून
फुलवितो प्रेमाचा  मळा !

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"


रविवार, नोव्हेंबर ०९, २०२५

माझा पहिला प्रवास


माझा   पहिला   प्रवास 
आजही आठवतो मला 
आईसोबत नावेत बसून
गेलो मामाच्या  गावाला 

नावाड्याने मग सोडले
नावेवरचे  पांढरे  शिड 
नाव वल्हवत पाहताना 
पळून गेली मनीची भिड

भरले होते सूर्यकन्येचे 
दोन्ही काठ पूर्ण जलपात्र
नाव डोलतांना व्हायचा
बालमनाला आनंद मात्र

मध्यभागी नाव येताच 
आईने एक रुपया काढला  
तापीमायला केला अर्पण
मनोभावे नमस्कार केला

प्रकाशा क्षेत्रावर जाताच
आजही स्मरतो तो प्रवास
पुलावरुन गाडीत जातांना
होत  नाही आनंद खास !

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...