Kaayguru.Marathi

बुधवार, ऑक्टोबर १३, २०२१

शारदीय नवरात्रोत्सव: आठवां दिवस : महागौरी

शारदीय नवरात्रोत्सव :आठवा दिवस/आठवी माळ🌹
           💎 नवदुर्गा स्वरुप : महागौरी 💎
 
शारदीय ( ऑक्टोबर २०२१ ) नवरात्रीच्या आठवा दिवस हा देवी महागौरी पुजनाचा असतो. 
२०२१ च्या शारदीय नवरात्रोत्सव यंदा नऊ दिवसांसाठी नाहीतर, आठच दिवसांसाठी साजरा केला जाणार आहे. शारदीय नवरात्र, यंदाच्या वर्षी गुरुवारी ७ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरु होऊन, १४ ऑक्टोबर गुरुवारीच संपन्न होणार आहे. एक तिथीचा लोप झाल्यानं यंदा नवरात्री आठ दिवसच साजरा होणार आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत गुरुचा विशेष योग जुळून येणार आहे. ७ ऑक्टोबर गुरुवारी अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदापासून सुरु होऊन दुर्गा महानवमी १४ ऑक्टोबरपर्यंत साजरी होणार आहे. तसेच १५ ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाणार आहे.

 💎 काय आहे गुरुचा विशेष योग?

भारतीय धर्मशास्त्रानुसार, गुरु हे ज्ञान आणि बुद्धिचे दैवत मानले जातात.. त्यांना सर्व देवांचं गुरु मानलं जातं. यंदाच्या वर्षी गुरुवारी नवरात्री सुरु झाली आणि गुरुवारीच नवरात्रोत्थान होणं शुभं मानलं जात आहे. असा योग अनेक वर्षांतून एकदाच जुळून येतो. 
म्हाळसा फलज्योतिष केंद्राचे (ज्योतिष प्रविण) श्री. वसंत कुलकर्णी ( म्हसावद,ता.शहादा) म्हणाले की, "अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा ६ ऑक्टोबर बुधवारी संध्याकाळी ४.३४ वाजता प्रारंभ झाली आणि जी गुरुवारी ७ ऑक्टोबर दुपारी १.४६ वाजेपर्यंत राहिली.त्यामुळे ७ ऑक्टोबर या दिवशी सकाळी घटस्थापना झाली असून याच दिवसापासून देवीची आराधनाही केली जाते आहे.

💎 देवीचा आवडता रंग
  
आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. देवीला गुलाबी रंग अत्यंत प्रिय असून हा सौभाग्य आणि प्रेमाचे प्रतिक समजला जातो. 

💎 का आठच दिवस साजरी केली जाणार नवरात्र? 

यंदाच्या वर्षी तृतीया तिथी आणि चतुर्थी शनिवारी एकाच दिवशी आली आहे. ज्यामुळे चतुर्थीचा लोप झाला. म्हणून यंदा चंद्रघंटा आणि कुष्मांडा या देवीच्या रुपांची एकाच दिवशी पूजा करण्यात आली आहे. याच कारणामुळं नवरात्रोत्सव आठ दिवस साजरा करण्यात येत आहे. 

💎 देवी स्वरुप: महागौरी 
शारदीय नवरात्रोत्सवात महालक्ष्मी व्रताला आत्यंतिक महत्व आहे.जे भाविक भक्त नवरात्रीला पहिल्या दिवसापासून व्रत ठेवतात.ते नवरात्रीत दुर्गाअष्टमीचे व्रत हमखास ठेवतात.
पौराणिक मान्यतेनुसार भगवान श्रीशिवशंकर आपल्याला पती म्हणून लाभावे.यासाठी पार्वतीने कठोर व घोर तपश्चर्या केली होती.तपाचरणामुळे देवी पार्वतीच्या देहाचा गौर रंग काळा झाला होता.पार्वतीच्या कठोर तपश्चर्येने भगवान कैलासनाथ प्रसन्न झाले त्यांनी देवीला पुन्हा गौरवर्ण प्राप्तीचे वरदान दिले.म्हणून देवी पार्वती ही " महागौरी " म्हणून ओळखली जाऊ लागली.महागौरीचे श्रद्धापूर्वक पूजन करुन आणि महालक्ष्मीचे व्रत राखल्यास भक्तांना सुख,समृद्धी,प्राप्त होऊन त्यांचे पाप नष्ट होते.अशी भक्तांची श्रद्धा आहे.

💎 होम हवन :-

दुर्गा अष्टमीच्या पावन पर्वाला अनेक ठिकाणी होम हवन विधी केला जातो.

💎 देवीचा बीज मंत्र: 

" श्री क्लीं ह्रीं वरदायै नम:। "

अन्य मंत्र:

१] " माहेश्वरी वृष आरूढ़ कौमारी शिखिवाहना।

      श्वेत रूप धरा देवी ईश्वरी वृष वाहना।। "

२] ओम देवी महागौर्यै नमः।

💎 कन्या पूजन व महत्त्व

देवीच्या उत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीत स्त्रीशक्तीची उपासना केली जाते. सरस्वती, दुर्गा,भवानी,अंबा, काली, चंडिका,लक्ष्मी ही स्त्रीशक्तीची प्रमुख रूपे. महन्मंगल मातृरूप पार्वती, कलासक्त गौरी अशा अनेक रूपात तिची आराधना केली जाते. संपूर्ण भारतवर्षात देवीची ५१ शक्तिपीठे असून त्यापैकी साडेतीन पीठे महाराष्ट्रात आहेत.
ती शक्तीपीठे :-
(१) कोल्हापूरची महालक्ष्मी (२) तुळजापूरची भवानी (३) माहुरगडाची रेणुका ही तीन पूर्ण पीठे व (४) वणीची सप्तश्रृंगीनिवासिनी हे अर्धपीठ. महिषासुराचा वध केल्यानंतर काही काळच आदिशक्ती येथे विसावली होती. म्हणून हे अर्धेपीठ मानले जाते.
नवरात्रीचा संबंध जगत्जननी दुर्गा देवीशी आहे. नवरात्रीत शक्तीची उपासना केली जाते. देवी दुर्गाची उपासना केल्याशिवाय शक्ती येत नसते. असे म्हणतात की,ह्या विश्वात स्त्रीत्वात देवीचा अंश असतो.आणि म्हणूनच. नवरात्रीत दोन ते दहा वर्ष वयाच्या नऊ मुलींची/ कुमारिकांची पूजा करण्याची अनादिकाळापासून परंपरा आहे. या बालिकांना साक्षात ९ देवीचे रूप मानले जाते. यांना कुमारिका असे म्हणतात. कुमारिकांचे पायांचे पूजन करून त्यांना जेवायला घालण्याची प्रथा चालत आली आहे..
     कुमारिकांना पाय धुऊन आसनावर बसवावे. हातावर लाल रंगाचा धागा बांधून कपाळी कुंकू लावावे. प्रसाद आणि दक्षिणा द्यावी. घरातून पाठवताना पाया पडून आशीर्वाद घ्यावा. 
कुमारिका वयाच्या कितव्या वर्षी देवीच्या कोणत्या रूपात असते. आणि तिचे पूजन केल्याने काय फळ मिळते ते पुढीलप्रमाणे :-

 १) दोन वर्षाची बालिका कुमारिका म्हणून ओळखली जाते. हिचे पूजन केल्याने दारिद्र्य नष्ट होते.
२) तीन वर्षाची बालिका त्रिमूर्ती रूपात असते. हिचे पूजन केल्याने सुख-समृद्धी नांदते.
३) चार वर्षाची बालिका कल्याणी असते. हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होतं.
४) पाच वर्षाची बालिका रोहिणी रूपात असते. ती संपूर्ण घर रोगमुक्त ठेवते.
५) सहा वर्षाची बालिका कालिका रूपात असते. हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते.
६) सात वर्षाची बालिका चंडिका या रूपात असते. ही ऐश्वर्य प्रदान करते.
७) आठ वर्षाची बालिका शांभवी रूपात असते. हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होते.
९) नऊ वर्षाची बालिका दुर्गा देवीचे रूप असते. ही शत्रूंचा नाश करते.
१०) दहा वर्षाची बालिका सुभद्रा रूपात असते. सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते.

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

आयुष्य (चारोळी)

गड्या आयुष्य खूप सुंदर आहे
🌺❤️🌺❤️🌺❤️🌺❤️🌺

ते आनंद - मस्तीत जगावे,पण
🌹💎🌹💎🌹💎🌹💎🌹

ऐसे  करावे  कर्म - धर्म आपुले
🦚🦋🦚🦋🦚🦋🦚🦋🦚

चंद्र - सूर्य असे  तो अमर व्हावे
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, ऑक्टोबर १२, २०२१

शारदीय नवरात्रोत्सव : देवी कालरात्री

🌹 नवरात्रोत्सव : सातवी माळा : 🌹


💎 देवी स्वरुप : देवी कालरात्री 💎


नवरात्रोत्सवातील  सप्‍तमी त‍िथी ही देवी कालरात्रीला समर्पित आहे. सातवी माळ झेंडूच्या फुलांची बांधावी, व भक्ताने  देवीची श्रद्धाभावे उपासना करावी.

💎 कालरात्री देवीचे स्वरुप 

देवीचे स्वरुप रात्रीच्या अंधारासारखे काळे आहे.देवीच्या श्वासातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडतात.देवीचे केस विस्कटलेले असून गळ्यात विद्युल्लता सारखी चमकणारी नर मुंडमाला घातली आहे.देवी कालरात्री चतुर्भूज असून देवीच्या एका होती कटोरा,एका हातात लोहंकुश आहे.आणि उर्वरित दोन हात मुद्रा स्थितीत असून पैकी एक हात वर मुद्रा आणि दुसरा  अभय मुद्रेत आहे.देवी त्रीनेत्रा असून गर्दभावर स्वार आहे.तिची भावमुद्रा भयानक कोपीष्ट अशी आहे.

 💎 देवीची प्रकट कथा     

असे म्हटले जाते की, भगवती कालरात्री देवीची उत्पत्ती असूर चण्ड-मुण्ड यांच्या निर्दालनासाठीच झाली.कथानुसार दैत्य राज शुंभच्या आज्ञेने चण्ड-मुण्ड आपली चतुरंग सेना घेऊन प्रत्यक्ष देवीला बंदी करण्याच्या हेतूने गिरीराज हिमालय पर्वतावर गेले.तेथे जाऊन त्यांनी प्रत्यक्ष देवीला बंदिवान करण्याचे धाडस केले.त्यांच्या त्या दृष्ट कृत्याने देवी भगवती अत्यंत क्रोधीत झाली.देवीला प्रचंड संताप झाला..क्रोधाने भगवतीचे वदन प्रचंड काळे झाले आणि बाहू मध्ये प्रचंड स्फूरण निर्माण झाले.त्याक्षणी अत्यंत क्रुद्ध देवी भगवतीने कालीस्वरुप धारण केले.

💎 देवीचे आवडते रंग 

आज बुधवार तिथी महाष्टमीच्या पावक पर्वाला नवरात्रोत्सवाला कालरात्रीची पूजा करण्यात येते. देवीला गडद नीळा रंग अतिप्रिय असून या रंगदर्शनाने देवीचे रुप अतुलनीय आनन्दाची अनुभूती देते. निळा रंग हा समृद्धी आणि शांतीचे प्रतिक म्हणून वापरला जातो.नवदुर्गा देवीने कालरात्री रुपात चण्ड-मुण्ड दैत्यांचा विनाश करुन त्रिखंडात सुख ,समृद्धी आणि शांतता निर्माण केली होती.देवीच्या या रुपातील दर्शनाने भक्तांच्या जीवनात चैतन्य येऊन समृद्धी आणि शांतता निर्माण होते.अशी दृढ समज आहे.

💎 कालरात्री देवीची आयुधे 

देवी कालरात्रीने आपल्या एका हातात तलवार आणि एका हातात पाशांकुश,शरीरावर लाल रंगाचे चर्मांबर परिधान केले असून,आणि गळ्यात नरमुण्डमाला विराजित आहेत. प्रकटप्रसंगी  देवी कालरात्रीच्या अंगावरील मांस पुर्णपणे नष्ट होऊन देवीचे शरीर हे फक्त हाडांचा सापळाच उरला होता.असे वर्णन आढळते.भगवतीचे  हे रुप प्रचंड भितीकारक व क्रुद्ध भासत होते.देवीचे तोंड प्रचंड विशाल ,आणि सळसळत्या जीभेमुळे देवीचे स्वरूप पाहताच भिती वाटावी इतके भयप्रद बनले होते.डोळ्यातून क्रोधाचा अंगार बाहेर पडत होता.देवीच्या भयंकर गर्जंनांनी दशदिशा जणू प्रचंड नाद उमटत होता.देवीने कालरात्री रुपात महाभयानक अशा दैत्यांचा वधाचे सत्र आरंभिले.आणि चण्ड-मुण्डच्या चतुरंग सेनेवर देवी कालरात्री वायुवेगे तुटून पडली व सैन्याचे भक्षण करीत देत्य सेनेला त्राहीमाम करीत सुटली.

💎 देवी कालरात्रीच्या जप  मंत्र

 " दंष्ट्राकरालवदने शिरोमालाविभूषणे।

   चामुण्डेुण्डमथने नारायणी नमोऽस्तु ते।

   या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता।

   नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।। " 

देवी कालरात्री भक्तवत्सला असून सदैव आपल्या भक्तांवर कृपा करणारी म्हणून ओळखली जाते. ती भक्तांनी केलेल्या भक्तीने प्रसन्न होऊन शुभदायक फल देते.म्हणून देवी कालरात्रीला " शुभंकरी " असेही म्हणतात.भक्तांच्या सर्व दुःख,दैन्य,व्याधी,ताप दूर करणारी ही कालरात्री समस्त संकटे दूर करण्याचे वरदान देणारी म्हणून तिची ख्याती आहे.

💎 देवी कालरात्री पूजनाचे फलित 

देवीची कृपा मिळविण्यासाठी तिला अनन्य भावे शरण जाऊन भक्ती,पूजन केले असता,ती भक्तांना पावते.देवीचे पवित्र गंगाजलाने,पंचामृताने आणि फुलं,गंध, अक्षतांनी पूजा करावी.देवीला गुळाचा प्रसाद अती प्रिय असून हा प्रसाद द्यावा.देवी कालरात्री चे पूजन करतांना ब्रम्हचर्य व्रताचे पालन करणे अत्यंत आवश्यक असून काया वाचा मनाने भक्त पावक असावा.

[ टिप - सदर लेखातील माहिती ही सामान्य माहिती असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ पंडीताची मदत घ्यावी.ब्लाॅग लेखक कोणतीही हमी देत नाही.]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

भ्रम

मनुष्य भ्रमात जीवन जगतो...
हा माझा तो माझा
 माझ्या जवळचे माझे...
खरं तर यापैकी कोणीही आपलं नसतं काही
खरंतर तुमची फक्त वेळ आहे !
ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे !!!
नाहीतर...सर्व जवळ असून सुध्दा परके...!
बोलायचं असतं मनातलं सारं काही
पण ऐकणारं नसतं कुणी !
सल असली तर सांगायची राहते
बल असलं तरी
दाखवायचं राहून जातं...सारं काही !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

नवरात्रोत्सव : देवी स्वरुप :कात्यायनी

🌹 शारदीय नवरात्र: सहावी माळ : 🌹
💎 देवी स्वरुप : कात्यायनी 💎
    
    ऋषी कात्यायण यांनी देवीला आपल्या तपोबलाने प्रार्थना केली की, " हे देवी ! तू माझ्या कन्येच्या रुपात माझ्या घरी जन्म घे! " देवीने ऋषी कात्यायन यांच्या इच्छेनुसार कन्या रुपात जन्म घेतला.
 सर्वप्रथम कात्यायन ऋषींनी देवीची पुजा केल्याने तिचे नाव
 " कात्यायनी " असे झाले.देवी भागवत, मार्कण्डेय पुराण आणि स्कंद पुराणात देवी कात्यायनीची कथा वाचावयास मिळते.
तत्प्रसंगी महिषासूर हा उन्मत्त झालेला होता.त्याने तिन्ही लोकी उत्पात माजविला होता.देवीने उग्र रुप धारण करुन महिषासूराचा वध केला.तिन्ही लोकी आनंद निर्माण झाला. 
 दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायणी देवीचा उल्लेख म्हणून
" महिषासुरमर्दिनी " असा केल्याचे सांगितले जाते. 

💎 कात्यायनी देवीचे स्वरुप 

कात्यायणी देवीचे स्वरुप चतुर्भुज आहे. देवीच्या एका हातात खड्ग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. तर दोन हात अभय मुद्रा आणि वर मुद्रेत आशीर्वादरुपी आहेत. कात्यायणी देवीचे स्वरुप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे सांगितले जाते.देवीचा अवतार धारण करण्याचा मुख्य उद्देश असूरांचा वध, धर्माची पुनर्स्थापना, धर्मसंरक्षण असल्याचे म्हटले जाते. 
देवीला लाल रंग अधिक प्रिय असल्याने लाल रंगाची वस्त्रे परिधान करुन देवीची पूजा,भक्ती करणे फलदायक ठरते.

💎 कात्यायणी देवीचे पूजन

दुर्गा देवीच्या पूजनासह कात्यायणी देवीचे पूजन करताना गंगाजल, कलावा, नारळ, कलश, तांदूळ, लाल वस्त्र, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. कात्यायणी देवीला मध अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे देवीच्या पूजनात तसेच नैवेद्यात मधाचा आवर्जुन समावेश केल्यास अधिक लाभ मिळतो तसेच देवीला गोडधोड नैवेद्यही अधिकच प्रिय असल्याचे म्हटले जाते.म्हणून कात्यायनी देवीला दुध-साखरेचा गोड प्रसाद अर्पण करता येईल. त्रास नाहीसा होईल आणि लाभ होईल.


💎 कात्यायनी देवी पूजनाचे फलित :-

मान्यता आहे कि देवी कात्यायनीला प्रसन्न करण्यासाठी ३ ते ४ फूलं घेऊन
 " कंचनाभा वराभयं पद्मधरां मुकटोज्जवलां।
   स्मेरमुखीं शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते॥ "
हा मंत्र १०८ वेळा जप केल्यास व नंतर ही फुलं देवीचरणी अर्पण केल्यास फलदायी ठरते.कात्यायणी देवीचे पूजनाने सुयोग्य जोडीदार प्राप्त होऊ शकतो.श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनीही देवीचे पूजन केले असल्याचे सांगितले जाते. देवीच्या कृपेने विवाहात येणाऱ्या अडचणी, समस्या दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. भाविकांना सुख, समृद्धी प्राप्त करणे सुलभ होते.

[टिप: या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य ऐकीव,श्रवणीय माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करावा.]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...