Kaayguru.Marathi

शनिवार, सप्टेंबर २५, २०२१

कृष्णमुरारी

हे प्रभो कंसारी। तू कृष्ण मुरारी।
कुंजविहारी तू। गिरीधारी  ।।

देवकी नंदन  । पितांबरधारी।
बन्सीबिहारी तू ! मनोहारी ।।

कालियामर्दक । गोपालसखा तू ।
नंदनंदन तू   । वासुदेव ।।

राधारमण तू । मनमोहन तू
माखनचोर तू । वनमाळी  ।।

कंजलोचन तू। कमलवदन।
मधुसूदन तू । जगदिशा ।।

रुक्मिणी वल्लभ । शामसुंदर तू ।
पुरुषोत्तम तू । नारायण।।

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, सप्टेंबर २४, २०२१

यशसिद्धी

यशसिद्धी

आले अपयश जरी
खचून नका जाऊ
करा प्रयत्न पुन्हा पुन्हा
नक्की यशस्वी होऊ
          अपयशातून यशाची
          घडते पहिली कृती
          म्हणती थोर विभूती
          हिच तर खरी उक्ती
अपयश आले म्हणूनी
संपवू नको जीवन
ठेवा जिंकायचा ध्यास
शिखर बघाया शिका
          अपयश पचवायला
          काळीज ठेवा वाघाचे
          दडले त्यात रहस्य
          यशाकडे जाणाऱ्या श्रेयाचे
अपयश तर शिकवी
नवे ज्ञान क्षणोक्षणी
अशाच अनंत वेड्यांची
इतिहास सांगतो कहाणी

 © प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्पम् "
     म्हसावद, जि.नंदुरबार

गुरुवार, सप्टेंबर २३, २०२१

मनाचिये द्वारी

मनाचिये द्वारी.. 
मन… ज्याला रुप नाही, वर्ण नाही, गंध नाही,आकार नाही. अगदी अमूर्त. पण जीवनात त्याचं अस्तित्व आपल्याला विसरताच येत नाही. असे एक अदृश्य आणि अलौकिक इंद्रिय म्हणून ते ओळखले जाते. बहिणाबाईंनी तर त्यावर कविता लिहितांना सुंदर वर्णन केलंय,
“ मन पाखरु पाखरु
त्याची काय सांगू मात ?
आतां व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायांत. ” 
असं हे प्रचंड वेगांने धावणारं मन. जर ते रिकामं असलं तर कुठलीही गोष्ट सहजच स्विकारायला तयार असते. म्हणूनच म्हटले आहे की,
 “ रिकामं मन म्हणजे सैतानाचं घर ”
या मनरुपी घराची कवाडे कधीही पूर्ण उघडी ठेवणे आणि पूर्ण बंद ठेवणे व्यक्ती विकासासाठी कधीच योग्य ठरणार नाही. जसं बंदद्वार घर भूतबंगला म्हणून परिसरात परिचित होते ; मात्र अधून-मधून उघडणारे व बंद होणारे घर, पै-पाहूणे, ये-जा करणाऱ्यांना परके वाटत नाही. सतत माणसांचा राबता दिसून येतो.त्या घरातील माणसांची आपुलकीने विचारपुस्त होत राहते. तसंच मनाचेही आहे. 
मनाच्या अकल्पित वेग व कल्पना, भाव-भावना, विचार इत्यादिची प्रक्रिया सतत, अव्याहतपणे सुरुच असते. म्हणूनच मनाला दोन प्रकारे नियंत्रणात आणता आले पाहिजे. 
१) आपणास मनाचे द्वार आत्यंतिक संयमाने पूर्णपणे उघडता आले पाहिजे. 
२) आपणास मनाचे द्वार पुन्हा उघडता येईल हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बंदही करता आले पाहिजे. 
अर्थात ही बाब इतकी सहजच साध्य होणारी नाही. त्यासाठी प्रचंड आत्मबल व संयमित शक्तीची उपासना आवश्यक आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. ही शक्ती साध्य झालेले युधिष्ठिर,गौतम बुद्ध आणि आधुनिक काळातील विचारवंत महात्मा गांधी याच भूमीतले आहेत.त्यांचे आदर्श जीवन व मौलिक विचार आपणास याकामी मार्गदर्शक ठरावेत. 
    वरील दोन्ही मुद्यातील मतितार्थ असा की, एका कामातून दुसर्‍या कामात लक्ष घालतांना आधीच्या कामाचे द्वार पूर्ण बंद करण्याचा सराव करावा लागेल. तरच आपणास हाती घेतलेल्या कार्यात पूर्ण लक्ष देता येईल.अन्यथा एक ना धड भाराभर चिंध्या असे होऊ शकते. शिवाय मनात आधी सुरु असलेल्या कामाचे द्वार काही वेळेसाठी बंद केल्याने ताण हलका होण्यास मदत होईल.हा एक लाभ होतो. 
अशा रितीने संपूर्ण दिवसभरात मनाचे वेगवेगळे कप्पे कधी उघडे तर कधी बंद करता यायला हवेत. असे करता आले तर एका कामातून मिळणारा आनंद दुसर्‍या कामाचा ताण हलका करणारा ठरेल. ह्यात शंकाच नाही. 
समर्थ रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे,
 मन करा रे प्रसन्न। 
सर्व सिद्धिचे कारण।। ” 
मन प्रसन्न असेल तर सर्व काही प्राप्त करता येईल. म्हणून लेखनाचा किंवा कामाचा शीण घालवायचा असेल तर “ नको रे बाबा हे काम.. खूप थकलो. पुन्हा नकोच हे काम! ” असं म्हणू नका. कारण काम कोणतेही असो ते आपणास एकतरी कौशल्य नव्याने देऊन जाते.म्हणूनच संत तुकाराम महाराज अभंगात म्हणतात, 
“ निश्चियाचे बळ तुका म्हणे तेचि फळ. ” निश्चय करण्याचे आत्मिक बळ जागृत मनामुळेच शक्य आहे. 
“ केल्याने होत आहे रे..
आधी केलेचं पाहिजे. ” 
म्हणून गांधीजी म्हणत. प्रत्येक कार्य हे ईश्वरी आदेश आहे. त्यात स्वतःला झोकून द्यावे. ” म्हणून आधीच्या मनाचा कप्पा काही वेळेसाठी बंद करावा. त्याला रिजवण्यासाठी एखादे आवडते गाणे गाणे, संगीत ऐकणे वा आवडते वाद्य वाजविणे, अगदी तोंडाने शिळ वाजवली तरी एक नवीन उर्जा प्राप्त होते हा माझा अनुभव आहे. मन तरतरीत व नव्याला सामोरे जाण्यास सिद्ध होते. निसर्गसौंदर्याच्या आस्वाद घ्या, बाग बगीचा, उद्यानात फिरुन या, थोडावेळ लुसलुसित हिरव्या गवतावर अनवाणी चालून या किंवा थोडा वेळ बसा. कार्य केल्याने शरिराला आलेला थकवा दूर करण्यासाठी देवदर्शन घ्या, लहान मुलांशी खेळा, आवडत्या व्यक्तीशी गप्पा करा,आवडता खेळ खेळा.चहा-कॉफी, शरबत किंवा शहाळ्याचे पाणी प्या ताजेतवाने वाटू लागेल. असे करता येईल. 
© प्रा.पुरूषोत्तम पटेल, म्हसावद 
    मोबाईल नं-8208841364 

बुधवार, सप्टेंबर २२, २०२१

पांडुरंग

गोड तुझे नाम   ।   गाईन मी देवा ।
अंतरीचा ठेवा।  ।  पांडुरंगा ।।१।।

भक्तांचा कैवारी ।  धावतो सत्वरी
नाथांचा श्रीहरी  ।  पांडुरंगा ।।२।।

केशवा माधवा   ।  तूच रे विठ्ठल ।
तू भक्तवत्सल    ।  पांडुरंगा ।।३।।

वैंकुंठीचा राणा   ।  तुकाचा कानुड्या
जनीचा श्रीखंड्या। पांडुरंगा ।।४।।

देवा  वनमाळी  । प्रेमाची सावली ।
भक्तांची माऊली ।  पांडुरंगा ।।५।।

© प्रा.पुरुषोत्तम पटेल
             " पुष्प "

प्रेमस्वरूप आई!

प्रिय....
समस्ततिर्थदर्शिनी, प्रात:पूजनीय,आई...
तुला अनंत दंडवत प्रणाम !🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पत्र लिहिण्यास कारण की,
आज तुझा वाढदिवस ! 🎂
प्रथम तुला वाढदिवसाला माझ्याकडून आशुतोष भगवान शिवाला प्रार्थना ...!" माझ्या  आईच्या समस्त इच्छा पुर्ण झाल्याचे समाधान तिला लाभावे. इच्छापूर्तीच्या आनंद अनुभवण्यासाठी तिचे शरीर निरोगी ठेव!ही विनम्र प्रार्थना! "  
आई...केवळ दोनच अक्षरे ! पण त्या दोन अक्षरांचे सामर्थ्य कितीतरी मोठ्ठे आहे.त्या अक्षरात  त्रिखंडाचे साम्राज्य पुर्णतः सामावले आहे.मी एका प्रवचनात संतांनी सांगितलेला महिमा ऐकल्याचे आठवते.ते म्हटले होते, " आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर.ईश्वरच आत्मा होऊन जिथे स्थिरावतो.ती आई ! " सर्व तिर्थात पवित्र आणि महान असं तिर्थ तुझ्या चरणसेवेत आहे.म्हणून तर आई-बाबांची चरणसेवा करणा-या पुंडलिकाच्या भेटीसाठी वैंकुठनाथ पृथ्वीतलावर आला.आणि इथंच २८ युगे उभे स्थिरावला. आई,तुझ्याच ठायी मला अखिल त्रिखडांची दैवते दिसतात. म्हणून तू माझी तिर्थरुप आई...तुला माझा त्रिवार प्रणाम !🙏🙏🙏
आई,मला खूप दिवसांपासून इच्छा होती, तुझ्याबद्दल काहीतरी बोलावं ! लिहावं ! पण...तुझ्यावर लिहिता-लिहिता कित्येक ओळी,कित्येक पानं, कित्येक रात्री संपल्या ग् ऽऽ पण,तुझ्यावर लिहण्यासाठी शब्द अपुरे पडू लागलेत !
आई तुझ्याबद्दलच्या भावनांना योग्य असे स्थान देऊ शकतील असे शब्दच मला अजूनतरी मिळालेच नाही ग् !
माधव ज्युलियन यांनी लिहलंय तेच खरंय , पटलंय मला !
" प्रेमस्वरुप आई, वात्सल्यसिंधू आई,"
माझी आई ...अगदी तशीच आहे तू ! समुद्र जसा कधीच आटत नाही.त्यांचे पाणी कमी झाले असे दिसत नाही.
समुद्राला तरी भरती येते,ओहोटी ही येते.तुझ्या प्रेमाला
ओहोटी ठाऊकच नाही तर ठाऊक आहे फक्त प्रेम, जिव्हाळा , माया-ममत्वाची भरती! तुझेही प्रेम कधीच कमी होत नाही. उत्तरोत्तर ते वाढतच जाते.🙏
आई, मग तूच सांग...तुला,तुझ्या कर्तृत्वाला,तुझ्या त्यागाला,
तुझ्या प्रेमाला मांडू तरी मी कुठल्या शब्दात ? हे शब्दात मांडणं म्हणजेच अशक्य !
आई,मला आठवतंय , मी एकदा आजारी पडले.तू माझ्या उशाशी रात्र रात्र जागत बसली होती म्हणे ! मला शांत झोप लागावी म्हणून आपल्या मांडीची झोळी करुन मला हळूवार
थोपटत,सलग तीन रात्रीचे दिवस करुन बसून राहिली होतीस ना तू ? तुझ्या ह्या वागण्याला मला " त्याग " म्हणता येईल का ग्ं आई ?
शाळेत दररोज मी जाते...पण वेळेची शिस्त तू पाळते...अगदी घड्याळाचे काटे होऊन राहतेस तू ! पहाटे दोन तास माझ्या आधी  तू उठते.माझी सगळी तयारी तू करुन ठेवतेस.माझे दप्तर,माझा युनिफॉर्म,माझा खाऊचा डब्बा,सगळं काही काढून तय्यार ठेवतेस तू .
हे माझं काम, तू निरपेक्षपणे करते.तुझे हे वागणे " जिव्हाळा " ह्या भावनेत बांधता येईल का ग्ं आई ?
तूझी मला कळलेली अनेक रुपे...
तू माहेरची लेक, मामा-मावशीची ताई , सासरची सून , वहिणी , बाबाची बायको- अर्धांगिनी,आम्हा बहिणींची 
" आई " आणि आजी-आजोबांची सुनबाई तूच आहेस...ही नाती निभवताना तू स्वतःचे अस्तित्वच विसरुन गेलीय.
अस्तित्व विसरण्याची तुझ्या ह्या वृत्तीला " कर्तव्य " म्हणता येईल का ग्ं ?
मी म्हणेन की,आई,राखतो तो राक्षस ! देतो तो देव !
तू तर काहीही न मागता तुझ्या इच्छा,मौजमजा,नटण-
सजणं,सगळं काही माझ्यासाठी सोडून दिलंय ! म्हणून भक्तांसाठी देव जसा हातातील काम व मुखातला घास सोडून धावत येतो.तशी तू वागते !
म्हणून मी तुला " ईश्वरी " असंच म्हणेन . कारण फ.मुं.नी म्हटल्याप्रमाणे -


आई खरंच काय असते?
लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
लंगड्याचा पाय असते
धरणीची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही उरतही नाही!


कवी प्रा.पुरुषोत्तम पटेल आईपणाची थोरवी सुंदर शब्दांत वर्णन करतात,


" आईपणाची देवालाही वाटे नवलाई ।
वैंकुठींचा राणा पंढरीत झाला विठाई । "


तुझी माझ्याबाबत असलेली प्रिती,लळा,जिव्हाळा,ह्यात वापरलेले रसायन बाजारात मिळणे अशक्यच ! कुठून झिरपते ग् आई हे रसायन ? आई,त्याची धनी फक्त आणि फक्त तूच !
आई...पुन्हा एकदा तुला माझे त्रिवार वंदन !
आणि वाढदिवसाचे अभिष्टचिंतन!!!🎂💐🙏
@ तुझीच प्रिय ,
        स्विट

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...