🌹🙏
श्री गणेशाय नमः!🌹🙏संकेत अंक - ४
चतुर्थ - चार वस्तूचा समुच्चयापैंकी चौथ्या वस्तू/पदार्थाला संकेतांने " चतुर्थ " असे म्हणतात .
अ - धर्म ,अर्थ, काम , आणि मोक्ष.
ब - साम ,दाम, भेद, आणि दंड.
क - पान , सुपारी , चुना , कात / काथ.
चतुराक्षरी मंत्र -
(अ ) - राधाकृष्ण (ब ) - दत्तात्रय
(क) - रामकृष्ण (ड ) - वासुदेव
चतुरानंद -
आत्मानंद , ब्रम्हानंद, अविद्यानंद , विषयानंद.
चार आयुध - शंख, चक्र, गदा, आणि पद्म ही श्रीविष्णूची चार आयुधे होत.
चतुर्विध अन्न -
भक्ष्य - चावून खाण्याचे पदार्थ.-भाकरी,पोळी वगैरे.
लेह्य - जसे पंचामृत,रायते वगैरे.
चोष्य - चोखून खाण्याचे पदार्थ - ऊस इत्यादि
पेय - पिण्याचे पदार्थ - दूध , ताक वगैरे.
चतुर्विध आसव - (चित्त - मळ )-
कामासव, दृष्टि आसव , मताभिमान , भवासव म्हणजेच पारलौकिकेच्छा.
चतुर्विध जीव -
देव, मनुष्य , तिर्यक (मनुष्येतर जीव ), नरकी.
चार कर्तव्य विद्यार्थ्यांचे -
स्वतंत्र बुद्धी, स्वतःवर ताबा , सेवापरायणता, सर्वसावधानता. [संदर्भ - भूदान गंगा -भाग -६]
चार दाने - आहारदान - क्षुधा तृप्त करते.
ज्ञानदान - अज्ञान दूर करते.
औषधीदान - व्याधीमुक्त करते.
अभयदान - आयुष्य वाढविते.[ संदर्भ- जैन धर्म ]
चार पुरुषार्थ - धर्म, अर्थ, काम, मोक्ष .
(ज्ञानी भक्त " भक्ती " हा पंचम पुरुषार्थ मानतात.]
चतुर्विध प्रलय - (१) नित्य प्रलय (२) प्राकृत प्रलय (३) नैमित्तिक प्रलय (४) आत्यंतिक प्रलय
चार अलौकीक भक्त -
(१) आर्तभक्त - द्रौपदी (२) जिज्ञासूभक्त - उद्धव.
(३) अर्थार्थीभक्त - ध्रूव (४) ज्ञानीभक्त - शुकदेवमुनी.
" आर्तो जिज्ञासूरथार्थी ज्ञानी च् भरतर्षभ !"
[ संदर्भ - भगवदगीता अध्याय ७-१६]
चार भद्र -
अ - औषधी समूह - सुंठ, अतिविष, मुस्तागवत, गुळवेल.
ब - गोड शब्दांचे दान , गर्वरहित ज्ञान, क्षमाशिल शौर्य, त्याग युक्त वित्त.
चार प्रकारचे मित्र - औरस , नात्यागोत्यातले, वंशपरंपरा ऋणानुबंधी , आणि आपत्कालीन रक्षण करणारे
चार मुक्ती - सलोकता, समीपता,सायुज्जता, सरुपता
[ दासबोध - ४-१०-२८]
चार रुपातील मूर्ती -
विराट, सुत्रात्मा, व्याकृत, तुरीय, या चारही ब्रम्हाच्या चतुर्भुज मूर्ती होत.म्हणून त्यास चतुर्भूज म्हणतात.
[ संदर्भ - विष्णू सहस्त्रनाम ]
चार व्यूह -
अ- वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुध्द. हे पृथ्वीस आधारभूत चार व्यूह होत.
ब - रोग , आरोग्य, निदान, वैद्यशास्र
इ - शरीर पुरुष, छंद:पुरुष ,वेदपुरुष, महापुरुष .असे परब्रम्हाचे चार व्यूह आहेत.
चतु:श्लोकी भागवत -
श्रीमद् भाग्वदताच्या दुस-या स्कंधातील नवव्या अध्यायातील ३२ ते ३५ हे चार श्लोक.यांत ब्रम्हदेवाला भगवंताने सांगितलेले गुह्य ज्ञान अथवा सर्व भागवत ग्रंथा चे सार आहे.म्हणून त्यास चतु:श्लोकी भागवत असे म्हणतात.
श्रीभगवानुवाच :
अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत् सदसत् परम्।
पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहम् ॥(१)
अर्थ - श्री भगवान म्हणतात की, सृष्टिनिर्मितीपूर्वी फक्त माझेच अस्तित्व होते.
माझ्याहून वेगळे सृष्टीत काहीही नव्हते.प्रलय काळी सृष्टीच्या विनाश झाला असता माझेच अस्तित्व उरते.ह्या सृष्टी रुपात मीच उरलो आहे.आणि जे काही या सृष्टीत प्रलयानंतर उरते ते सुद्धा मीच आहे.
ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि।
तद्विद्यादात्मनो मायां यथाऽऽभासो यथा तमः ॥(२)
अर्थ- जे काही माझ्या मूळ तत्वाहून वेगळे प्रतीत होते.पण ते आत्म्यास प्रतीत होत नाही.त्या अज्ञाज्ञास आत्म्याची माया समज.कारण ते सावली प्रमाणे किंवा अंधारासारखे मिथ्या समजावे.
यथा महान्ति भूतानि भूतेषूच्चावचेष्वनु।
प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्॥(३)
अर्थ- जसे पंचमहाभूते ही संसारात लहान मोठ्या सर्व पदार्थात भरुन आहेत; पण ते दिसून येत नाही.तसा मी सुद्धा सर्वांभूती व्याप्त असूनही सर्वांहून वेगळा आहे.
एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनाऽऽत्मनः।
अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा॥(४)
अर्थ - आत्मतत्त्व समजून घेण्याची इच्छा असलेल्यांनी ही गोष्ट जाणून घ्यावी की, सृष्टी प्रलय प्रसंगी जे तत्व स्थान आणि काळाच्याही पुढे असते.ते माझेच आत्मतत्त्व आहे.
चार अपाय श्रवणाचे - १) लय- निद्रा (२) विक्षेप- वृत्तीची बहिर्मुखता (३) कषाय - राग, द्वेष इत्यादिकाचे योगाने चित्त स्तब्ध होणे.(४) रसास्वाद - प्रसंगोपात आलेली वर्णने तीच तीच ऐकण्याविषयीची आसक्ती
[संदर्भ- - एकनाथी भागवत ११-७०५ ]
चार अश्व श्रीकृष्णाच्या रथाचे -
शैब्य , सुग्रीव , मेघपुष्प , बलाहक
[संदर्भ- महाभारत उद्योगपर्व- ८३-१९]
चार आदर्श कामिनीचे -
अ- १) जुनो (२) व्हिनस (३) मिनर्व्हा (४) डायना हे चार आदर्श ग्रीक रोमन समाजाने कल्पिले आहेत.
ब - १) मानिनी -सती , (२) रुपसम्राज्ञी -रती (३) शारदा (४) युद्धप्रिया -दुर्गा ह्या होत.
चार आचार्यपीठ ( श्रीशंकराचार्य स्थापित )-
१) पुर्वेस - जगन्नाथपुरी-गोवर्धन मठ (२) पश्चिमेस - द्वारकापुरी -शारदा पीठ (३) उत्तरेस -बद्रीनारायण-ज्योतिर्मठ (४) दक्षिणेस - शृंगेरी- म्हैसूर हे मुख्यपीठ होय.
चार द्वारे आपत्तीची -
१) अयोग्यकर्माचा आरंभ (२) स्वजनांशी वैर (३) बलवंताशी स्पर्धा (४) दृष्ट स्त्रीवर विश्वास
चार शत्रू आरोग्याचे -
१) रसनेची विकृत रुची (२) देहातील मृत तंतू (३) अनावश्यक अन्न (४) न पचता जठरात सांचणारे अन्न.
चार उपाय (ज्ञानप्राप्तीचे)-
श्रद्धा, तत्परता, इंद्रियसंयम, योगसंसिद्धी
चार ऋणे -
देवऋण, ऋषीऋण, पितृऋण, मनुष्यऋण.
चार ऋत्विज -
अध्वर्यू, ब्रम्हा, होता ,उद्गाता यज्ञात हे चार मुख्य ऋत्विज असतात.
चार गुण कोंबड्यापासून शिकावेत.
१) पहाटे उठणे (२) युद्ध करणे (३) स्वकष्टार्जित भाग बंधु वर्गास देणे. (४) स्रिचे आपत्तीपासून रक्षण करणे.
" युद्धं च् प्रातरुत्थानं भोजनं सहबंधुभि: ।
स्रियमापद्मता रक्षेच्चतु: शिक्षेच्च कुक्कुटात ।।"
चार गुण दुर्लभ -
१) दान - संतोषाने (२) ज्ञान - निर्गवी (३) शौर्याचे अंगी क्षमा (४) संपत्तीत - त्याग
चार गुण शाश्वत स्रित्वाचे -
१) रजोदर्शन (२) गर्भधारण (३) प्रजोत्पादन (४) प्रजापोषण [ संदर्भ-नारदिय सूक्त भाष्य -उत्तरार्ध ]
चार गुण वृद्धसन्मानाने प्राप्ती-
१) आयुष्य (२) सौंदर्य (३) सुख (४) बल
चार गुण स्वभावसिद्ध असतात.
१) औदार्य (२) मधुर भाषण (३) धैर्य (४) युक्तायुक्त विचार.
चार गोष्टी गेल्या की पुन्हा न मिळणा-या -
१) गेलेली अब्रु (२) बोललेला शब्द (३) दवडलेली संधी
(४) गेलेले आयुष्य.
चार गोष्टी कल्याणकारी -
१) वाणीचा संयम (२) अल्पनिद्रा (३) अल्प आहार (४) एकाग्र चित्ते भगवंत स्मरण.
चार गोष्टी नसतील तिथे वास्तव्य करु नये -
(१) मान किंवा प्रतिष्ठा (२) प्रीति (३) गोत्रज
(४) ज्ञानसंपादन
चार गोष्टी पडद्याआड ठेवाव्या -
१) भोजन (२) भजन (३) संपत्ती (४) रुपवान स्री
चार गोष्टी पवित्र -
१) झ-याचे पाणी (२) पतिव्रता स्री (३) कल्याण करणारा राजा (४) संतुष्ट ब्राम्हण.
चार गोष्टी माणसाला बिघडवतात-
यौवन,धन,अधिकार ,अविवेक
चार गोष्टी लहान म्हणून उपेक्षा करु नये.
रोग , सर्प, अग्नि, शत्रू .
चार गोष्टी वर्ज्य -
आत्मनिंदा, आत्मस्तुती, परनिंदा, परस्तुती
या चार गोष्टी भल्या माणसाने वर्ज्य मानाव्यात.
चार दुर्गुण विनाशाकडे नेणारे -
आळस, निद्रा, विसराळूपणा, दिरंगाई.
चार पण -
१) अज्ञानी-बालपण. (२) धुंद-तरुणपण,(३) पराधीन-म्हातारपण (४) बाळंतपण .
चार पार्वतीच्या सख्या-
जया , विजया, जयंती आणि मंगलारुणा
चार प्रकार प्रेमाचे -
(१) लालन प्रेम (२) वात्सल्य प्रेम (३) सख्यप्रेम (४) माधुर्य प्रेम
चार प्रकारचे मेघ -
(१) आवर्त - विशेषस्थानी वृष्टी (२) संवर्त - सर्वत्र वृष्टी
३) पुष्कर - अल्प पर्जन्य (४) द्रोण - विपूल पर्जन्य
चार प्रकारचे वाद्य -
१) तंत -तारेची वाद्ये (२) वितंत- टाळ,चिपळ्या, (३) घन- नगारा डफ वगैरे.(४) सुस्वर - सनई, बासरी वगैरे
चार प्रकारची वैद्याची वृत्ती असावी -
१) रोग्याविषयीची ममता (२) दया (३) साधा रोग बरा करण्याचा उत्साह (४) रोग असाध्य असेल तर सोडणे.ही वैद्यांची वृत्ती असावी.
चार मित्र -
१) विद्या -प्रवासात (२) पत्नी - घरी (३) औषध - व्याधिग्रस्तावस्थेत (४) धर्म - अंतसमयी
चार रत्ने -
१) सूर्य -आकाशी (२) बालक -घरी (३) स्री - शयनप्रसंगी
(४) पंडित - सभेत.
चार वेदांचे चार द्रष्टे -
१) ऋग्वेद - अग्निऋषी (२) यजुर्वेद - वायुऋषी
(३) सामवेद- आदित्यऋषी (४) अथर्ववेद - अंगिरसऋषी
चार व्यसने सत्ताधा-यांना असणारी -
१) मृगया, मद्यपान, द्युत, अतिरिक्त कामासक्ती.
चार शक्ती राष्ट्र जिवंत ठेवतात-
१) शिक्षकशक्ती - ब्राम्हण (२) रक्षकशक्ती - क्षत्रिय
(३) पोषकशक्ती - वैश्य (४) सेवकशक्ती.
चार जण शत्रू वत समजावे -
१) रुपवती भार्या (२) निरक्षर पूत्र (३) ऋणकर्ता बाप
(४) अकुलीन माता
चौघांचे स्मरणाने कलिनाश होतो-
( १) कर्कोटक नाग (२) दमयंती (३) नळराजा
(४) राजा ऋतुपर्ण
चांडाळ चौकडी / चार- (पुराणकालीन )-
१) दुर्योधन (२) दु:शासन (३) कर्ण (४) शकूनी.
[ पुढील भागात संकेत अंक - ५ ची माहिती ]
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "