Kaayguru.Marathi

मंगळवार, जानेवारी १८, २०२२

टोपणनाव : कालचे आणि आजचे !

टोपणनाव:कालचे आणि आजचे !

     मी नोकरीच्या निमित्ताने जन्मगाव सोडून वालगावी आलो.कधी न पाहिलेले हे गाव.१९९१ चे ते दिवस होते.१९९० च्या दशकात महाराष्ट्रात बहुतांश शिक्षण संस्थांकडून शाळा सुरु करण्याचा सपाटा सुरु होता.जसा मृगाच्या सरी बरसल्या की, बळीराजाची पेरणीची लगबग सुरु होते.तशी गाव-खेड्यात-पाड्यात नवीन शाळा उघडल्या जाऊ लागल्या...अर्थात त्या शाळा विनाअनुदान तत्वावरच सुरु होत होत्या.आणि एक दोन वर्षांत सरकारी अनुदानावर येत होत्या.
     अशाच एका विनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयात मी रुजू झालो.नशिबाने म्हणा किंवा संस्थेचे पूर्वकार्य संचिताने म्हणा,ही शाळा दोनच वर्षांत अनुदानपात्र ठरली.माझे मूळ गाव पन्नास कि.मी.अंतरावर असल्याने (तेव्हा आजसारखी दळणवळणाची साधने मुबलक नव्हती.) मी एक खोली घेऊन वालगावीच राहू लागलो.माझे गाव जेमतेम आठशे हजार वस्तीचे ;तर वालगावं हे सुमारे आठ नऊ हजार लोकवस्तींचे गांव. गावात अठरापगड जाती सुखैनैव नांदत होत्या.असे चित्र मी अनुभवत येथे राहू लागलो.
     आपल्या मुला-मुलींना कोडकौतुकाने कसे बोलवावे.हे मी राहत असलेल्या गल्लीत अनुभवत होतो.प्रारंभी मीही नवीनच असल्याने घरातील, गल्लीतील बाया-माणसे ज्या नावांनी त्या मुला-मुलींना हाक मारीत त्याच नावाने मीही हाक मारु लागलो.त्यात प्रामुख्याने मुलींमध्ये " मुन्नी, गुड्डी, चक्कू, पिकी, टिंकी, भुरी, माई, आक्कू " ही नावे अग्रस्थानी होती.तर मुलांच्या नावात " भैय्या, लोदू, पप्पू, पिंटू, बापू, लोटू, गोटू,अण्णा, दादू " ही नावे अग्रस्थानी होती.मी विचार करायचो की, ह्या मुला-मुलींना ही खरी नावे असतील का ? हो ! ही नावे खरीच असली पाहिजे.
याला पुष्टी मिळणारी गोष्ट मी स्वतः आजमावली होती . अर्थात ह्याला कारणही तसेच होते म्हणा ना ! मी ज्या अकरावी वर्गाच्या वर्गशिक्षक होतो, त्याच वर्गाच्या कॅटलागवर मी एका विद्यार्थिनीचे नाव " अक्का *** पाटील " असेच लिहित असे.तर एका मुलाचे नाव लिहितांना " अजय अण्णा खैरनार '' असे लिहित असे.
दिवसामागून दिवस वर्षामागून वर्ष जाऊ लागली.मी राहत असलेल्या गल्लीतील मुलें मुली मोठी होत होती.ती आता माझ्या शाळेत शिकायला येऊ लागली.मग कळले " अरे ! यांची खरीखुरी नावे किती किती सुंदर आहे.त्यात कुणाचे नाव मुग्धा, मंदाकिनी, निलिमा ,गुणवंती, प्राजक्ता अशी तर मुलांच्या नावात चेतन,गौरव, राकेश, प्रकाश, ध्रुव,प्रजल अशी सुंदर आधुनिक नावे होती.पण घरातील वडीलधारी मंडळी, आई-वडील,आजी-आजोबा त्यांना आत्यंतिक प्रेमाने, कौतुकाने - मुन्नी, गुड्डी, चक्कू, पिकी,भुरी,टिकी , माई, आक्कू " या नावांनी संबोधित असत.मुलांना भैय्या, लोदू, पप्पू, पिंटू, बापू, अण्णा,लोटू, दादू ,भू-या " ही नावे होत.सुमारे सहा सात वर्षांनंतर हळुहळू कळू लागले की ,अरे... ही तर कोडकौतुकाने ठेवलेली टोपण नावे आहेत.
     माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षण घेतांना मराठी कथा, कविता,धडा अभ्यासतांना बरीच टोपण नावे तोंडपाठ करावी लागली होती.त्यात बालकवी, केशवसूत, गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, कवी बी, आरती प्रभू, माधव ज्यूलीयन, स्वातंत्र्यवीर, साने गुरुजी, अनिल, साहित्यसम्राट,ग्रेस,कुंजविहारी,दत्त, अज्ञातवासी असे अनेक साहित्यिकांची नावे मराठीच्या शिंदे सरांनी आमच्या कडून तोंडपाठ करवून घेतली होती.ही नावे मला ज्ञात होती.त्यांचे कार्यकर्तृत्वही सरांकडून जाणून घेतले होते.
ह्या नावांना साहित्याचा मलमली स्पर्श, अमृताची चव,आणि गंगेचे शुचित्व आणि गंधर्व नगरीचे सूर प्राप्त होते.ते तर महाराष्ट्रातील वाचकांच्या तना-मनात सतत रुंजी घालणारी नावे होती.
      ...पण एक शिक्षक म्हणून वालगावात मी जी काही टोपण नावे अनुभवत होतो.आणि आजही अनुभवतो आहे.त्यातील ९९.९९ टक्के मुला-मुलींची खरीखुरी नावे आजही गाव-गल्लीत ठाऊक नाहीत.सर्वांचीच लग्न झाली.मुली सासरी निघून गेल्या.तरी त्यांची ओळख अमक्याची मुन्नी, पिकी ! तमक्याची गुड्डी,भूरी,चक्कू हीच नावे सर्वामुखी टिकून आहेत.तर मुलांपैकी बहुसंख्य बाप बनले आहेत. त्यांच्या मुला मुलींना विचारले , तू कोणाचा मुलगा किंवा कोणाची मुलगी ग्ं ? " ती लहान मुलं आजही बोबड्या बोलात म्हणतात, " मी पिंट्याचा मुलगा, मी मुन्नी बाईची मुलगी, मी चक्कूचा, मी लोट्याचा मुलगा! " अशी गंमतीशीर व ओठांवर हसू आणणारी उत्तरे ऐकायला मिळतात.म्हणतात ना, " लहान मूल हे सर्व गोष्टी मोठ्यांच्या निरीक्षणातून, ऐकण्यातून, कृतीतून शिकतात.आपल्या आई-बाबांना घरातील मंडळी, नात्यातील मंडळी, गल्लीबोळातून कोणत्या नावाने हाक मारली जाते.ते ते ऐकतात.तीच नावे लक्षात ठेऊन स्वतःची ओळख गंमतीशीर नाव जोडून देतात. हा त्यांचा दोष म्हणता येणार नाही.मग हा सुद्धा एक संस्कार म्हणावा का ? तो चांगला की वाईट हे वैचारिक मंथनातून सिद्ध होईलच!
पण तत्पूर्वी गल्लीबोळातील या टोपणनावांना एक विशिष्ट वयाची मर्यादा असावीच! हे ठरवायलाच हवे!अशी टोपण नावे ठेवणे आपणास योग्य वाटते काय? 

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

सोमवार, जानेवारी १७, २०२२

कविता लेखन करतांना...

कविता म्हणजे काय ?
असे म्हणतात की, " गोष्टीला द्रवरूप होऊन भिडण्याची क्षमता म्हणजे कविता होय. " 
म्हणून म. सु. पाटील म्हणतात, 
‘ तिचा वेध घेण्यासाठी कवी स्वत:मध्ये जितका खोलवर बुडी घेतो, तितका तो कमी वैयक्तिक बनत जातो. तो मानवाच्या मूलभूत स्वभावापर्यंत पोचतो. अशा वेळी सर्वांना समान अशा मानवभावांची नाना रूपे आकलण्यात व ती अभिव्यक्त करण्यात तो गढून गेलेला असतो. तेथे कवीचे भाव वैयक्तिक राहत नाहीत. आविष्कार प्रक्रियेतच ते स्व-पर-तटस्थ
संबंधांच्या पलीकडे जातात.म्हणून ते कोणाचेही होतात. त्यांना विश्वात्मता प्राप्त होते. ’ त्यामुळे जगण्याच्या सर्वसामान्य तऱ्हांपेक्षा ती जाणिवेला अधिक तीव्र भासते. या तीव्रतेमागे चिरंतन आणि सार्वत्रिक होण्याची इच्छा प्रबळपणे कार्यरत असते. सर्वसामान्य चेहऱ्यांमधीलच एक स्वतंत्र आवाज म्हणजे " कविता " होय
२) रचना आणि धारणा यांमधील सगळ्यात कमी अंतर म्हणजे कविता होय. त्यामुळे ‘स्व’ला पुन:पुन्हा मोडण्यातून आणि रचण्यातून ती उत्पन्न पावते.
' स्वप्न रचणे ’ हा कवितेचा स्थायी भाव असतो. त्यामुळे ‘ कविता ’ ही रचना तीनही काळांच्या पार्श्वभूमीवर खरचटून उभी राहणारी रचना ठरते. ती विसंगतीने व्याकूळ होऊन घडणारी रचना आहे. त्यामुळे कवितेतील कुठलेही विधान जितके अधिक स्वप्नपूर्ण, तितके तीनही काळांच्या पार्श्वभूमीवर ते अधिकाधिक प्रभावी ठरते. कारण हे स्वप्नपूर्ण विधान काळाशी, वास्तवाशी फटकून उभे राहत नाही, तर काळाला सामावून त्याच्या पुनर्रचनेतून हे विधान उभे राहते.

@ प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

रविवार, जानेवारी १६, २०२२

भ्रम

मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो...
हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे...
खरं तर यापैकी आपलं नसतं काही
खरंतर तुमची फक्त वेळ आहे !
ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे
नाहीतर...
सर्व जवळ असून सुध्दा परके...!
बोलायचं असतं मनातलं सारं काही
पण ऐकणारं नसतं कुणी 
सल असली तर सांगायची राहते
बल असलं तर दाखवायचं
राहून जातं...सारं काही !
साठत जातं मनाच्या कप्प्यात
एखाद्या अडगळीच्या खोलीत 
साठत जावं तसं...!


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
      

  

शनिवार, जानेवारी १५, २०२२

व्यथा [ अलक ]

            रात्रीचे ११ वाजले . सज्जन म्हणाला, साहेब, " खूप उशीर होतोय ! रिमा घरी एकटीच आहे.आतापर्यंत चार कॉल येऊन गेले हो तिचे. निघू का ? " त्याचे बोल ऐकताच मी दचकलो.
" काय? रात्रीचे अकरा वाजलेत ? " टेबलवर पडलेला मोबाईल हाती घेतला तर काय, मोबाईल स्विचऑफ ?
मोबाईल ऑन केला , पण तो ऑन झालाच नाही.
अधिक वेळ न घालवता मी सज्जनचाच फोनवर स्मिताला फोन लावला. 
" मी मंदार बोलतोय ! " 
" साहेबांना आठवण झाली वाटतं ? " स्मिताने रागातच विचारले.
" स्मिता , अग् मी आता घरी यायलाच निघालो.दहा मिनिटांतच पोहचतो हं ! सगळं काही बोलतो तुझ्याशी ! ठेवतो गं फोन ! " सज्जनला फोन हाती देत ...
" सज्जन, ऑफिस लॉक कर ! " सूचना केली.
सज्जनने मला किल्ली दिली.ती बॅगेत ठेवून मी घाईतच कार स्टार्ट केली.सज्जनला चांदणी चौकात उतरवले.
 मेन रोडवरुन  गडद अंधारातून कार सुसाट धावत होती.अचानक हेडलाईटच्या उजेडात एक तरुणी कारसमोर आली.मी कर्चऽऽकऽन ब्रेक लावला.
नशीब...तीला ठोस लागली नाही की कार उलटली नाही.दैव बलवत्तर म्हणा ना ! 
मी हेडलाईट सुरु ठेवून उतरलो.
" ए , पागल आहेस की काय ? तू तर मरशील पण मलाही मारशील ना.कुठं जायचंय तुला ?... प्रेग्नंट दिसतेय तू तर ? आणि... " 
मला बोलू न देता ती म्हणाली ,
" नाही जगायचं मला . पोटातील बाळासह मरायचंय मला ! " ती रडतच कारसमोरच बसली.
"अग्ं बाई, तूला जगावंच लागेल.आईपण म्हणजे इतकं सोपं वाटतं तुला ? आई होणं म्हणजे देवाचं वरदान . नशिबानं लाभत पोरी हे ! चल, कुठं राहते तू ? तिथं सोडतो मी तुला . "
" नाही जायचं मला त्या नरकात ! त्या राक्षसांनी आधीच माझ्या दोन मुलींचे गळे दाबून मारलं.आताही धमकी दिली,मुलगी झाली तर ती तर मरेलच...पण, तुही मरशील ! मग का जगावं मी ? मरु द्या न मला नकोय हे जगणं ! "
" ऐंक पोरी, कितीही संकटे आली तरी आशेचा दिवा कधीच विझू द्यायचा नसतो. पोटातलं बाळ घेऊन आत्महत्या करणे हे तर महापाप आहे.आणि दुसरी गोष्ट , आई होता यावे म्हणून नवससायास करतात लोकं! बाई होणं सोपं पण, आई होणं महाकठीण असतं.आईपण ही बाजारात मिळणारी एखादी वस्तू नाही.तुला सहज लाभलंय हे आईपण ! नको करु हा वाईट विचार. " मी समजूत घातली.पण ती काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हतीच .
" माझं जगणं हे मरण यातनाहून कठीण आहे.मग मी जगायचं तरी कुणासाठी ? मी शरीराने जीवंत पण मनाने कधीच मेले आहे. मरु द्या ना दादा मला ! "
" तू दादा म्हटलंय न मला ? मग ऐंक तर. पोरी, आईपण हे हृदयातून पाझरावं लागतं. बाळाला जन्मतः मरण नकोय म्हणून तूच मरायला निघालीस की नाही.पण हे शक्य नाही हो ! तू आता माझ्या स्नेहालयात राहायचं ! स्नेहालय हेच तुझं घरं आणि संसार ! ऐकतेस ना ? "
तीनं होकार दिला.तीला कारमध्ये बसवून कारने यू टर्न घेतला.तिला स्नेहालयात पोहचवून मी घरी आलो.
रात्रीचे साडेबारा वाजले होते.स्मिताची समजूत घातली.
तीने वाद न घालता मला समजून घेतले.
सकाळी सहा वाजता लॅडलाईन खणखणला.फोनवर मेट्रो राणेमावशी बोलल्या, " दादा, तुम्ही रात्री आणलं त्या पोरीने जुळ्यांना जन्म दिला . दोघे... नाही हो तिघेजण सुखरुप आहेत ! "
मी मनोमन देवाला नमस्कार केला. 
" देवा ! तुही कमाल करतो की ! जिथं एकाची उणीव तिथं तू दोन दोन लेकरं दिली की ! जय हो ! "

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


 

शुक्रवार, जानेवारी १४, २०२२

मकरसंक्रांत


श्रीविघ्नहर्ता घालितो तुला मी विनम्र दंडवत
सकल  जनांसी बळ दे करु कोरोनावर मात

सूर्यदेवा ! उत्तरायण  होऊ  दे तू आता सुखी
दुःख  दैन्य  घालव उमलू  दे  गोड शब्द मुखी

गुळ-साखरेची गोडी अन् स्निग्धता तिळाची
तिळातिळाने  वाढावी नाती स्नेह-सौख्याची

देवा, तू  दाता ! पूर्ण  कर ही मनीची इच्छा !
आनंदाने  देतो  प्रभो  मी तुमच्या  कृपेने हो 
मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा !
        
       ©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...