Kaayguru.Marathi

बुधवार, डिसेंबर २६, २०१८

क्रांतीरत्न शिवराम हरी राजगुरु

पवित्र स्मरण -
मृत्यूला हसत हसत आलिंगन देणारा महाराष्ट्राच्या मातीतील थोर क्रांतिकारक - शहिद शिवराम हरी राजगुरु.

भारतीय स्वातंत्र्यलढा म्हणजे जगातील सर्वोत्तम क्रांतिपर्वांपैकी एक होय.   जीवाची पर्वा न करता इंग्रजांच्या नाकी नऊ आणणा-या या थोर क्रांतिकारकाची ‘शहिदगाथा’!

‘ शिवराम हरी राजगुरू ’ ! लहानपणी त्यांना ‘रघुनाथ’ या नावाने ओळखले जात. राजगुरू म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र!

२४ ऑगस्ट१९०८ रोजी पुणे जिल्ह्यातील खेड गावात त्यांचा जन्म झाला.  त्यांना अचूक नेमबाजी आणि दांडगी स्मरणशक्तीचे वरदान होते. त्यातूनच त्यांच्या बुद्धीला  खाद्य पुरवले जात असे .
    वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी घर सोडल्यानंतर. सर्वप्रथम  नाशिकला काही काळ वास्तव्य केले. नंतर शिक्षणाच्या उद्देशाने ते काशीला पोचले. तेथे पुस्तकांत, राजकीय वातावरणात आणि व्यायामशाळेत लाठीकाठी, दांडपट्टा यांसारख्या खेळात ते रमून गेले.त्याकाळी काशी येथील पंडीत मदनमोहन मालवीयांचे हिंदू विद्यापीठ हे साऱ्या क्रांतिकारकांचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जायचे. तेथे अनेक गुप्त खलबतेही होत असतं. याच काळात काशीमध्येच राजगुरूंची भेट चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत झाली. राजगुरूंचे निडर व्यक्तिमत्त्व पाहून आझादांनी राजगुरूंना क्रांतिकारकांच्या गटात सामील करून घेतले. त्या क्रांतिमय वातावरणात वावरताना राजगुरूंमधील क्रांतिकारक घडत गेला. कोणत्याही मोहिमेसाठी ते एका पायावर तयार असतं. वेळ पडली तर या क्रांती संग्रामात बलिदान देण्याची देखील त्यांची तयारी होती.
पुढे राजगुरूंनी केलेली अजून एक जबरदस्त कामगिरी म्हणजे सॉंंडर्सचा वध होय. पंजाबकेसरी लाल लजपतराय यांच्यावर निर्दयीपणे लाठीहल्ला करून त्यांना ठार मारणाऱ्या पोलीस अधिकारी स्कॉटला जगण्याचा अधिकार नाही अशी गर्जना करीत भगतसिंगांनी त्याचा वध करण्याचा विडा उचलला. राजगुरूंनी हट्ट केल्यामुळे भगतसिंगांनी त्यांना देखील आपल्या बरोबर सामील करून घेतले. त्यांचा अजून एक साथीदार जय गोपाळ पोलीस स्टेशनवर स्कॉटच्या हालचालीवर पाळत ठेवून होता. पण ४-५ दिवस स्कॉट त्या भागात आलाच नाही.
अखेर दुसऱ्या दिवशी एक गोरा अधिकारी डॉ पोलीस स्टेशनमधून बाहेर पडला. जय गोपाळला वाटले की हाच स्कॉट आहे, म्हणून त्याने दबा धरून बसलेल्या भगतसिंग आणि राजगुरूंना खुण केली. पण भगतसिंगांनी हा स्कॉट नसावा अशी प्रतिक्रिया दिली, परंतु राजगुरूंचं त्यांच्याकडे लक्षच नव्हते. भगतसिंगांनी नकार देण्यापूर्वीच राजगुरूंनी त्या गोऱ्या अधिकाऱ्यावर गोळी झाडली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून भगतसिंगांनी सलग आठ गोळ्या झाडत त्या गोऱ्या अधिकाऱ्याला यमसदनी धाडले. त्या सगळ्या गोंधळातून बाहेर पडण्यात मात्र ते यशस्वी झाले. नंतर दोघांनाही कळले की तो स्कॉट नसून सॉंंडर्स होता. माणूस चुकला पण मोहीम अयशस्वी राहिली नाही यातच भगतसिंग आणि राजगुरू या दोघांनीही समाधान मानले.

   इकडे मारेकऱ्यांच्या मागावर पोलीस हात धुवून लागले होते, पण शेवटी वेषांतर करून भगतसिंग आणि राजगुरू दोघेही दिवसाढवळ्या एकाच गाडीतून लाहोरहून राजकोटला निसटले. पुन्हा काशीत परतल्यावर राजगुरू उघडपणे वावरू लागले. लोकांना संशय येऊ नये म्हणून त्यांच्यात मिसळू लागले. परंतु फार काळ ते पोलिसांना गुंगारा देऊ शकले नाहीत आणि १९२९ सालच्या सप्टेंबर महिन्यात ते पोलिसांच्या हाती लागले.
त्यांनी साथीदारांची नावे सांगावीत म्हणून कारागृहात त्यांचा अमानवी छळ करण्यात आला. शेवटी छळ करणारे थकले पण राजगुरूंनी त्यांना आपल्या साथीदारांच्या नावाची साधी पुसटशी कल्पनाही येऊ दिली नाही. यावरून त्यांची निष्ठा दिसून येते.
पुढे कारावासात शिक्षा भोगत असताना भगतसिंग आणि सुखदेव या आपल्या सहकाऱ्यांसोबत त्यांची पुन्हा भेट झाली. तेथेही त्यांनी आपलं क्रांतिकारी बाणा ढळू दिला नाही. अखेर लाहोर खटल्याचा निकाल आला आणि भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांनाही लाहोर जेलमध्ये २३ मार्च, इ.स. १९३१ ला संध्याकाळी ७.३३ वाजता फासावर चढवण्यात आले आणि तीन पेटत्या निखाऱ्यांची धग विझली. त्यांच्या बलिदानाचा २३ मार्च हा दिवस आपल्याकडे शहीद दिन म्हणून साजरा केला जातो.

स्वातंत्र्यप्राप्ती वगळता कोणतीही अभिलाषा मनात न धरता केवळ आणि केवळ देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या आणि महाराष्ट्राचे नाव क्रांतिपर्वात सुवर्णाक्षरांनी  कोरणाऱ्या राजगुरु नामक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला  त्रिवार मानाचा मुजरा!!!
🔹प्रा.पुरूषोत्तम पटेल
Mhasawad.blogspot.in

रविवार, डिसेंबर ०९, २०१८

शुक्रवार, नोव्हेंबर ०९, २०१८

पाय आणि पाऊल

पाऊल आणि पाय
शब्द जरी सारखे
अर्थ विचारात घेता
दोघे एकमेका पारखे ||१||
पाऊलावर पाऊल ठेवतांना
पाहावी लागते व्यक्ती
पायावर पाय ठेवतांना
विचारात घ्यावी शक्ती ||२||
संस्काराचा शाळेत
पाऊलाची होते पाटी
जीवनाची वाट तुडवताना
पायांची लागते कसोटी ||३||
पाऊल वाकडे पडताच
समाजात येते विकृती
लाथ मारुन काढीन पाणी
पायाची दृठ संस्कृती ||४||
पाऊल सांगतसे
निती नियमांची दिशा
पाय लागता पायाला
विचाराची होई दुर्दशा ||५||
म्हणूनच... पाय ठेवतांना
मना नसावा विकार
पाऊल उचलतांना
करावा हजारदा विचार ||||
© प्रा.पुरुषोत्तम पटेल,
    मु.पो.म्हसावद 

शनिवार, ऑक्टोबर २०, २०१८

तोरणमाळ :खान्देशी सौदर्याची माळ

     तोरणमाळ : खान्देशी सौदर्याची माळ
    नंदुरबार जिल्ह्याच्या व शहादा तालुक्याच्या उत्तरेस असलेल्या सातपुडा आणि जिल्ह्याच्या पूर्वेस वाहणारी सूर्यकन्या तापीनदी ही खान्देशच्या इतिहासाची दोन जिवंत साधने आहेत. सूर्यकन्या तापीचा उल्लेख पुराणात सापडतो, तसाच सातपुड्याचा उल्लेखही महाभारत व रामायण या महाकाव्यात सापडतो. यावरून या दोहोंचा प्राचीनतेची कल्पना लक्षात येते. सातपुड्याच्या विचार केल्यास महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर हा पर्वत विस्तारला आहे. या मध्यकालीन पर्वताचे आयुष्य तेरा कोटी वर्ष असल्याचे संशोधकांचे मत आहे.
    पर्वताच्या एकामागे एक अशा सात रांगा असलेल्या सातपुड्याची पूर्व-पच्छिम लांबी ७२५ कि.मी. आहे, तर उत्तर-दक्षिण रुंदी साधारणत: १२ कि.मी. आहे. पच्छिमेस गुजरातमधील भडोच जिल्ह्यातील राजपिपला या गावाजवळील टेकड्यापासून या पर्वतमालेची सुरवात होते. या पर्वतरांगा लहानमोठ्या प्रमाणात एकमेकांना समांतर खेटून आहेत. सातपुड्यात तीन शिखरे आहेत. सर्वाधिक उंचीचे गुलीअंबा हे शिखर गुजरात हद्दीत येते. अस्तंबा हे दुसऱ्या क्रमांकाचे  तिसरे तोरणमाळ हे एक शिखर. ही दोन्ही महाराष्ट्रात येतात. तोरणमाळ हे या पर्वतीय प्रदेशात असून ते एक पर्वतांतर्गत पठार आहे. या पठाराचे क्षेत्रफळ ३.२ चौ.मै. इतके आहे. लहानमोठी असंख्य शिखरे, कडा, दरी, स्तर इ. या पर्वतरांगात आढळतात. तोरणमाळ हा भाग दुरस्थ क्षेत्र म्हणून ओळखला जातो. हे सातपुड्याच्या चौथ्या पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून १०७६ मी. उंचीवर उत्तर अक्षांश २१ अंश ५३ मिनिट आणि पूर्व रेखांशावर ७४ अंश ४२ मिनिट असे वसले आहे. तोरणमाळ हे ता. धडगाव जि. नंदुरबार म्हणून परिचित आहे.
    तोरणमाळचे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील हे दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून शासनदरबारी ओळखले जाते. तेवढेच ते पर्याटकांसाठीही मोहक आहे. नंदुरबार या जिल्हा मुख्यालयापासून ते ९५ कि.मी. आणि धुळे येथून १४० कि.मी. अंतरावर आहे. तोरणमाळला जाण्यासाठी नंदुरबारकडून किंवा धुळ्याकडून येतांनाही शहादा हा मध्यवर्ती थांबा लागतोच! शहादा तोरणमाळ हा पक्क्या स्वरूपाचा रस्ता असून राणीपूरपासून घाटरस्ता प्रारंभ होतो. शहाद्याहून लोणखेडा-जुनवणे-म्हसावद- कुबेर हायस्कूल-राणीपूर-नागझरी-कालापाणी  ते तोरणमाळ अशा मार्गाने पोहचता येते. येथे जाण्या-येण्यासाठी दररोज  शहादा आगारातून नियमित एस.टी. बसेस आहेत. खाजगी वाहनांनी देखील जाता येते.तोरणमाळला जातांना पर्वतरांगा ,पर्वत पठार ,आणि घाटरस्ता मार्गक्रमण करतांना पर्यटकांचा थकवा सहजच नष्ट होतो.घनदाट  व उंच उंच वृक्ष ऊंच ऊंच शिखरे, त्यावरुन लोळणारे मेघांचे लोट पाहून कवी कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती ओठांवर रुंजी घालू लागतात.
“आकाशातुन घनश्याम आळविती धरणीला
आणि सखीच्या गळा घाली मोत्यांची माळा ” हे अनुभवता येते.म्हणूनच तोरणमाळ येथे जाण्यासाठी वर्षातील वर्षा ऋतु मनमोहक आहे. पण.. इतर कोणताही दिवस पर्यटनासाठी योग्यच आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडे आस्वादक दृष्टी असली तर येथला कण अन् कण आणि प्रत्येक श्वास आनंददायी ठरतो. .सातपुड्याकडे  बघताना त्याची उंच उंच शिखरे जणू त्याचा दिलदार रुपाची आपल्याशी चर्चा करू लागतात .
    शहादा तालुक्याची हद्द संपताच तोरणमाळच्या  वाटेवर प्रथम भेटतो ; तो सातपायरी घाट.एकेका पायरीने सात घाट वळणं घेत मार्गक्रमण करताना होणारा आंनद शब्दातीतच ! हा प्रत्यक्ष अनुभवावाच. सातपायरी घाट चढल्यावर डाव्या बाजूवर दर्शन होते ते येथील पुरातन लेणीचे व त्यातील नागार्जुनाचे.ही देवता हिंदू जैन आणि बुद्ध या तिनही धर्मवीचारात दिसते. मूर्तीची भव्यता आणि शिल्पाची प्राचीनता आपल्याला इतिहासात घेवून जाते.येथेच थांबून सातपायरीघाटाचे विहंगम दृश्य पाहण्याचा  आंनद लुटता येतो.हे दृश्य डोळ्यात साठवून पुढे गेल्यावर उजव्या हातावर साधारणतः सात कि.मी.अंतरावर जालंन्धरनाथाचे भग्नावषेशातील मंदिर आहे. या ठीकानीच तोरणमाळ किल्यातील भव्य परंतु भग्न तटाचा रुंदीची प्रचीती येते. येथेच अभिरराजा युवानाश्व हा महाभारतकालीन राजा राज्य करीत होता. तो न्याय नितीचा वाली असून कौरवांचा बाजूने न लढता पांडवाचा बाजूने लढला होता असे या परिसरात म्हटले जाते. थोडं पुढे गेल्यावर ज्या शिखराने तोरणमाळला त्याचा नावाची ओळख व अस्तित्वाची ओळख करून दिली ,ते तोरणाईदेवीचे शिखर व तेथील मंदिर  दृष्टोत्पतीस पडते. नंतर भेटीची साद घालतो; यशवंत तलाव आणि गोरक्षनाथ मंदिराचा प्रसन्न व मोक्षदाई परिसर. येथे नवनाथांपैकी गोरक्षनाथ-मच्छीन्द्रनाथ यांचे वास्तव्य होते. हे पाहिल्यावर तोरणमाळचा खरा अनभिषिक्त सम्राट भगवान शंकरच असावेत ,असे जाणवते. याच भक्ती आसक्तीतून येथे  दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रोत्सव होतो. यावेळी आदिवासी स्त्री-पुरुषांची वेशभूषा त्यांचे दाग-दागिने त्यातून निसर्गविषयक साकारलेल्या कल्पना यांचे दर्शन घडते महाराष्ट्रासह गुजराथ, मध्यप्रदेश या तीनही राज्यातून भाविक भक्त लाखोंच्या संख्येने उपस्थित राहतात. हा भक्ताचा मेळा श्रद्धा - भक्ति - विश्वास यांचा संगमात मनसोक्त न्हाऊन धन्य होतांनाचा भाव प्रत्येक चेह-यावर दिसून येतो.
    भगवान चंद्रमौळी व गोरक्षनाथांचा दर्शनानंतर खुणावतो यशवंत तलाव ! महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हान यांनी या ठिकाणी भेट दिल्याची आठवण म्हणून तलावाला दिलेले हे नाव तोरणमाळच्या रुंद छातीवर करुणा, स्नेह आणि बलिदान या तीन पवित्र मूल्यांचा संगम म्हणजे हा यशवंत तलाव. अतिशय विस्तीर्ण, स्वच्छ, आणि अखंड जलसाठा असलेला, दोन्हीकडे उंच टेकड्यांच्या आत सुरक्षित कडेवर असलेला नैसर्गिक तलाव होय. वनविभागाच्या माहितीनुसार त्याची खोली ९.२० मी. असून पाणी साठवण क्षमता ३५०० टी.एम.सी. आहे. तलावाचा परीघ ४ कि.मी. असून त्याला प्रदक्षणा घालण्याचा आनंदही लुटता येतो. याशिवाय येथे बोटिंगचा आनंदही घेता येतो.
    जवळच तोरणमाळ हिल रिसोर्ट आहे. त्याजवळच खडकी पॉईंट आहे. येथून सातपुड्याचे विहंगम दृश्य डोळ्यात साठविता येते. हिल रिसोर्ट पासून एक कि.मी अंतरावर सनराईज पॉईंट असून तेथून उगवत्या सूर्याच्या साक्षीने नवनवे संकल्प करता येतात. संपूर्ण जगाला चैतन्याचा थरार देणारा रविकिरण येथूच अनुभवने म्हणजे एक आनंदोत्सवच ! हिल रिसोर्ट पासून सुमारे दिड कि.मी. अंतरावर सनसेट पॉईंट असून अस्तंगत होणाऱ्या सुर्याला अभिवादन करून प्रकाशाचा वसा थोडासा कवडशासारखा आपल्या हृदयात जपता येतो.
    तोरणमाळच्या माथ्यावर ईशान्य कोपर्‍यात एक खोलदरी आहे. या दरीची खोली सुमारे १०० ते १२५ फुट आहे. हिलाच सिताखाई पॉईंट असे म्हणतात. ही खाई तीनही बाजूंनी प्रचंड पाषाण व उंच-उंच तासीव कड्यांनी वेढलेली असल्याने नयनरम्य भासते. खाईच्या तळाला एक कुंड  असल्याचे सांगितले जाते. त्याला सिताकुंड म्हणतात. सिताखाईच्या ठिकाणी पाऊसाळ्यात मोठा फेनिक धबधबा पाहता येतो. शिवाय येथे उभे राहून आवाज दिल्यास आवाजाचे प्रतिध्वनी तीनवेळा ऐकू येतात. याला इकोपॉईंट म्हणतात. सिताखाई जवळच कमळाचे एक तळे आहे. त्याला कृष्ण तलाव म्हणतात. तेथे उमलणारी पांढरी व गुलाबी रंगाची कमळपुष्प पर्यटकांना आकर्षित करतात.ते पाहण्याचा अनूभव काही औरच..!
    तोरणमाळ येथे १९व्या शतकाच्या पहिल्या दशकाअखेर उभारण्यात आलेली चर्च आहे. चर्चचे भव्य रूप बघून बुद्धी थक्क होते.  जाण्यायेण्यासाठी रस्ता किंवा साधने नसतांना चर्चचे बांधकाम चिरेबंदी दगडात  कसे केले असेल हा स्वतंत्र संशोधनाचा विषय ठरावा. अनाकलनीय गोष्ट प्रयत्नपूर्वक मूर्त रूपात स्थापित करणाऱ्या वास्तूनिर्मिकाला अभिवादन केल्याशिवाय राहवत नाही.
    तोरणमाळचे एक प्राकृतिक वैशिष्ट म्हणजे हे जंगल कोरडे जंगल प्रकारात मोडते. म्हणून रखरखत्या उन्हाळ्यात येथील वृक्षराजी पर्णहीन होते व हवेच्या तालावर कोरडी पाने जणू विविध सप्तसूर आळवतात. पण .... चैत्रातील नवपल्लविने संपूर्ण दऱ्या खोऱ्या नव लेणं घेऊन नटून येतात.व मानवाला जणू उपदेश करतात, नवनिर्मितीसाठीच आम्ही हा त्याग करीत आहोत. तूही आमच्या सोबतीला ये! आणि कवी मंगेश पाडगावकरांची कविता आठवू लागते.
        “ या जन्मावर या जगण्यावर
               शतदा प्रेम करावे…! ”
    तोरणमाळच्या  रानात सलई, महू, चारोळी, टेंम्भूर्णी, तिवस, कुडा, खैर, जांबूळ, आवळा, आंबा, सीताफळ, बोर, भेडा , पळस आणि साग,बांबू इ. वृक्ष दिमाखदारपणे उभे असलेले पाहता येतात. चैत्र पालवीने लालबुंद झालेला पळस पाहतांना वाटू लागते की  जणू लाजेने लालीलाल झालेली नववधूच येथे उभी असावी! पळसाचे पर्णरहित फुलणे बघून जन्माचे सार्थक झाल्याचा आनंद मिळतो. वृक्षसंपदा बरोबरच येथे कारवी , धायटी, तोरण , करवंद अशी विविध झुडूपेही तसेच विविध प्रकारचे औषधी वनस्पती ,कंदमुळे आढळतात. यांचे संवर्धन करण्यासाठी वनविभागाने औषधी वनस्पती , कंद व फुले संवर्धन केंद्र सुरु केले असून तेथील विविध रंगी गुलाबाची फुले मनमोहक ठरतात.
तोरणमाळचे जंगल पक्षी संपदेनेही समृद्ध आहे. येथे एकूण २३३ प्रजातीचे पक्षी असल्याचे नोंद वनविभागाकडे आढळते. शिवाय हवामान आणि मनुष्य स्वभावाच्या वेडातून नामशेष होत असलेला एक पक्षी म्हणजे वनपिंगळा.जगभरात वनपिंगळ्याचा ३३प्रजाती आढळतात.पैकी येथील जंगलात त्यांचा ९ जाती आढळून आल्याची नोंद बाॅबे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या पक्षी तज्ज्ञांनी केली आहे. हा पक्षी केवळ सातपुडा पर्वतराजीत तोरणमाळ जंगलात, आणि मेळघाटच्या जंगलात, ओरिसाच्या जंगलात सापडतो. . हा पक्षी निशाचर नसून दिवसा भ्रमंती करतो. त्यालाही अनुभवणे म्हणजेच जागतिक लेणं अनुभवल्याचा आनंद पक्षी निरीक्षकांना मिळतो. दरवर्षी हिवाळ्यात येथे हिमालयातील ब्लॅक रेड स्टार , वारवब्लर आणि इतर बरेच पक्षी नियमित नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येतात व एप्रिल मे अखेर परतीच्या मार्गाला असतात. विदेशी पक्ष्यात प्रामुख्याने युरोपियन रोलर, हेन हॅरीयर, पेल हॅरीयर, ग्रे वॅगटेल, ग्रीन सॅडे पायपर इ. युरोपियन देशातील सायबेरीयातून हे पक्षी तोरणमाळला पाहुणे येतात.पक्षी अभ्यासकाना हे सारे काही संशोधनासाठी उपयुक्त खजिनाच होय . तोरणमाळ येथील निसर्गसौदर्याचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना विश्रांती व सुविधा देणारे ठिकाण म्हणजे वनविभागाचे विश्राम गृह होय. त्या शिवाय दुसरे तोरणमाळ हिल रिसोर्ट होय. रिसोर्टद्वारा लाकडीफळीपासून आकर्षक पद्धतीने तयार केलेली मोबाईल घरे पर्यटकांना सुखावतात. खास सुविधा म्हणून अमरविला हा सुट बनविला आहे. तसेच प्राचीन आश्रमपद्ध्तीचा आनंद अनुभवन्याकरिता ऋषीमुनीच्या जीवनपद्धतीची व्यवस्था केली आहे.
सातपुड्याचे रुप मुळातच रौद्र असे आहे. हा शुरांचाही भूभाग म्हणून इतिहासाला परिचित आहे. स्वातंत्र्य पुर्व काळात इंग्रजांना सळो की पळो करुन सोडणारा नेमाडातील स्वातंत्र्यदेवीचे उपासक, स्वातंत्र्यवीर तंट्या भिल ह्याच सातपुड्यात भूमिगत राहून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी कार्य करीत होते. हे आपणास विसरता येणार नाही. ह्या स्वातंत्र्यवीराच्या पदस्पर्शाने पावन भूमीत फिरण्याचा अभिमान आपणास अनुभवता येतो.
तोरणमाळ (ता.धडगाव ,जि.नंदुरबार) हे पर्यटनाचे ठिकाण आबाल स्री-पुरुषांना वेड लावणारे, नियमित भेटीची ओढ निर्माण करणारे, निसर्गसौदर्याने नटलेले,खान्देशातील एकमेव गिरीस्थान. महाराष्ट्राचे पर्यटनाचे दुसऱ्या क्रमाकाचे थंड हवेचे ठिकाण.
सातपुड्याचा कुशीत, नंदुरबारच्या प्राकृतिक चेहरा खुलविणारे, वनउपजांनी व विविध वृक्ष-लतानी वेढलेले निसर्गाचे आवडते व मुक्त हस्ताने आनंदाची उधळण करणारे,
आल्हाददायक .ठिकाण तोरणमाळ...!
तोरणमाळला जाताना सातपुड्याचा चार रांगातून, घनदाट जंगलातून, वेडावाकड्या वळणातून सात घाट चढतांना निसर्गाचे नयनमनोहर दृश पाहून आनंदाने वेडावून टाकणारे रम्य   तोरणमाळ...!!!
नक्की या हं ..! तोरणमाळ प्रतिक्षा करते आहे. आपल्या आगमनाची !
( लेखकाच्या खाली दिलेल्या ब्लॉगवर वाचा तोरणमाळचे काव्यात्मक सुंदर वर्णन : माझे तोरणमाळ ही कविता.)
     शब्दसौदर्य :-  प्रा.पुरुषोत्तम पटेल,               उपप्राचार्य,                               
कुबेर हायस्कूलउच्च माध्यमिक
विद्यालय म्हसावद, ता.शहादा
जि. नंदुरबार   ४२५४३२
मोबा  : ८२०८८४१३६४,
          इ-मेल- patelpm31@gmail.com
          Blog- mhasawad.blogspot.in

मंगळवार, ऑगस्ट २८, २०१८

श्रीशंकरा

              * श्रीशंकरा *

दारी तुझा आलो मी करुणावतारा

दर्शन दे रे शंभो मज कर्पूरगौरा ||धृ||

देवांचा देव तू रे तू महादेव

तूच शोभे देवा पार्वतीवरा       ।।१।।

दर्शन दे रे शंभो मज कर्पूरगौरा…  

हलाहल विष भोला तूच पचविले

निलकंठ झाला रे तू  जगउद्धारा।।२।।

दर्शन दे रे शंभो…

बेलपान कन्हेर धतूरा तुला आवडे

ॐ नमो ऐकता पावसी ओंकारा।।३।।

दर्शन दे रे शंभो…

तांडव नृत्याचा तू धनी आद्य नर्तक

नर्तनात तूच रमतो हे नटेश्वरा।।४।।

दर्शन दे रे शंभो…

जटा शोभे गंगा माथी चंद्रकोर

रुळे मुंडमाळ गळा भस्म कपाळा।।५।।

दर्शन दे रे शंभो मज

महाकाल नाव  तू काशीअधिपती

भक्त उद्धारक देवा तू विश्वेश्वरा।।६।।

दर्शन दे रे शंभो मज…

नाग तनुवरी विलसे  हाती डमरु

तूच हरितो चिंता नमन चिंतेश्वरा।।६।।

दर्शन दे रे शंभो मज कर्पूरगौरा

© प्रा.पुरूषोत्तम पटेल

म्हसावद ता.शहादा

रक्षाबंधन.

       रक्षाबंधन
नातं तुझं नी माझं
बहिण अन् भावाचं
रक्षाबंधन सणाला
जपू स्नेह-सौख्याचं   ।।१।।
राखीचा प्रितगंध
दुरदुरी हो  दरवळला
बहिण घरी आज
जणू श्रीहरी आला    ।।२।।
हाती तूझा बांधते
धागा रेशमाचा
त्यात गुंफला मी
प्राण द्रोपदीचा         ।।३।।
कुंकुम अक्षत टिळा
लाविते तुझा कपाळी
लाभो सुख-समृद्धी
दादा तुला सर्वकाळी।।४।।
भाऊ म्हणे बहिणीस
देतो तुला वचन
तुझी ऐकता हाक   
करीन तुझे रक्षण    ।।५।।
प्रा. पुरुषोत्तम पटेल

©

गुरुवार, ऑगस्ट १६, २०१८

डॉक्टर डे निमित्ताने कविता.

डॉक्टर डे निमित्ताने….

प्रिय डॉक्टर

डॉक्टर…,

तुम्ही आमच्या आयुष्याचे शिल्पकार

अन् सुखाचे सार

दुःख व्याधीला तुम्ही

जगण्याचा आधार ||१||

डॉक्टर…,

तुम्हाला माहिती केवळ

मानवतावादी धर्म

अहोरात्र रुग्णसेवा

हेच तुमचे कर्म ||२||

डॉक्टर…,

तुम्ही दुःखाचे भाजक

अन् सुखाचे गुणक

सामाजिक आनंदाचे

तुम्हीच खरे जनक ||३||

डॉक्टर…,

तुमच्या एका स्पर्शात

वाढते जगण्याची आस

तुमच्या एका शब्दात

श्वासाला लाभे श्वास ||४||

डॉक्टर…,

तुम्हालाच असते खरे

रुग्णसेवेचे भान

तुम्ही अहर्निश प्रयत्ने

वाचविता रुग्णप्राण ||५||

डॉक्टर…,

आमच्या जन्ममरणाची

तुम्ही जाणतात नाडी

तुमच्या औषधोपचारे

आयुष्याची चाले गाडी ||६||

डॉक्टर…,

तुम्हालाच आमुच्या

आरोग्याची चिंता

तुमच्याविना रोजच

पेटतील अनंत चिता ||७||

आज डॉक्टर डे

करितो तुम्हाला

मी हृदयापासून

प्रणाम ! प्रणाम!! प्रणाम !!! ||८||

© प्रा.पुरुषोत्तम पटेल, 

mhasawad.blogspot.in



स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!

        स्वातंत्र्य दिन चिरायु होवो !

   उद्या आपल्या भारतमातेच्या ७२वा स्वातंत्र्यदिवस. जाज्वल्य राष्टप्रेमाने भारावलेल्या १५ अॉगष्ट १९४७ च्या हर्षोल्होसित दिवशी भारतमातेच्या मुकुटातील लाल किल्ल्यावर तिरंगा राष्ट्रध्वजाचे डौलाने ध्वजारोहण करण्यात आले. आसमंत दशदिशांनी फूलून आला होता. स्वातंत्र्य सूर्याने भारत माता की जय…..! च्या निनादात आपले नवचैतन्याचे किरण दशदिशांना पसरवले. तेव्हापासून तर आजपर्यंत आपण सर्व जण देशभरातून हा चैतन्यदायक, स्फूर्तीदायक असा  स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आलो आहोत.

  भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनंत स्त्री-पुरुषांनी आणि बालगोपाळांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. जुलमी इंग्रजानी त्या थोर स्वातंत्र्यविरांना अतोनात छळले असल्याचा इतिहास आजही विसरणे शक्य नाही. आठवते ना ती जालियनवाला बागेतील क्रुरतेची घटना? एवढे सोसूनही भारतमातेचे विर सुपूत्र घाबरले नाही. इंग्रजांविरोधात लढतांना “ भारतमाता की जय! ” आणि “वंदे मातरम् ” “ इन्कलाब जिंदाबाद ” ह्या घोषणा देत क्रांतीविरांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या आहेत. अनंत क्रांतीविर, ज्यांची नावे उच्चारताच स्फूरण चढते व जुलमी इंग्रज सत्तेविरुद्ध प्रचंड चिड निर्माण होते.

  भारतीय जनतेत  स्वातंत्र्य लालसा निर्माण व्हावी म्हणून हसत हसत फासावर गेलेल्या क्रांतीविरांची गाथा हिमालयाइतकी उत्तुंग व गंगौघाएवढीच पवित्र  आहे. त्यांचा अदम्य विरतेच्या इतिहास आजही सुवर्णाक्षरांनी आपणास स्फूर्ती देत आहे. हे आपण कोणीही विसरु शकत नाही. या सर्वांचा रक्ताने पावन झालेली ही भारतमाता आज विरांची व क्रांतीकारकांची भूमी  म्हणून ओळखली जाते.

स्वातंत्र्यासाठी वेडावलेल्या  अशा अनंत ज्ञात अज्ञात सुपूत्रांच्या बलिदानावर  दिं. १५ अॉगष्ट १९४७ रोजी आपण स्वातंत्र्य मिळविले आहे.ह्या राष्ट्रध्वजाला घडविण्यासाठी, त्याला ऊंच करण्यासाठी अगणित स्वातंत्र्यसैनिक लढले. आजही भारतीय सैन्याचे शूर-विर जवान स्वतःच्या प्राणाचे आजही बलिदान करीत आहेत. लतादिदिंनी गाईलेले

“ ए मेरे वतन के लोगो जरा आँखमे भरलो पाणी। जो शहिद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी। ”  

असे सुवर्णमय शब्दलालित्य लाभलेले गीत आपण सदैव कृतज्ञतापूर्वक स्मरुण आहोतच! वास्तविकतः  स्वातंत्र्याचा प्रतिक असलेला आपला तिरंगा राष्ट्रध्वज आपल्या सर्वांसाठी सार्वभौमत्वाचा सुगंध पेरीत आहे. तिरंगा राष्ट्रध्वजाचा मान-सम्मान राखणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे हे आपण सदैव  प्राणपणाने पार पाडू या.

१) राष्ट्रध्वजाला सलामी देण्यासाठी उद्या सकाळी जवळच्या केंद्रावर, शाळेत, सरकारी कार्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाला न विसरता वेळेआधीच उपस्थित राहा.

२) प्लॅस्टिक किंवा कागदाचे राष्ट्रध्वज अति उत्साहाने गाड्यांवर वा मोटारसायकल वा सायकलीवर लावू नका.

३)कागदाच्या वा प्लॅस्टिकचा राष्ट्रध्वज लहान मुलांच्या हाती कदापि देवू नका. राष्ट्रध्वज हा राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक आहे. ही सूज्ञपणाची जाणीव ठेवा.व इतरांनाही करुन द्या.

४) राष्ट्रध्वज तिरंगा हा आपल्या देशाची संस्कृती, शौर्य, धैर्य, त्याग - बलिदान यांचे प्रतिक आहे.हे जाणिवपूर्वक लक्षात ठेवा.

५) राष्ट्रध्वज तिरंगाचा अपमान करणाऱ्या घटकांवर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी.

६) तिरंगा राष्ट्रध्वजाच्या गौरवशाली इतिहासाची थोरवी सदैव कथन करा. हा अखंडीत वारसा पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न करा

७) स्वातंत्र्यासाठी शहिद झालेल्या शहिदांचे ऋण आपण अनंत जन्मातही फेडू शकत नाही.ते लढले;फासावर गेले  म्हणूनच आपण स्वातंत्र्य उपभोगतो आहोत. त्यांचा त्याग व बलिदानाशी कृतज्ञ रहा.

  पुढील पिढ्यांचा विश्वास व राष्ट्रनिष्ठा मजबूत करण्यासाठी व राष्ट्रध्वजाला सन्मानाची भावना जागविण्यासाठी आज आपण प्रत्येक जण वचनबद्ध होऊ या..!

🌹 वंदे मातरम् 🌹

© प्रा.पुरूषोत्तम पटेल.

Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...