Kaayguru.Marathi

गुरुवार, जानेवारी ०३, २०१९

हरितालिका व्रत कथा

         💠 हरितालिका व्रत कथा 💠
कैलास पर्वतावर उमामहेश्वर बसले होते. तेव्हा देवी पार्वतींनी विचारले, " हे महेश्वरा, मी असे कोणते व्रत केले की, ज्यामुळे आपण मला पती म्हणून मिळालात ? " ते ऐकून महेश्वर म्हणाले, " हे प्रिये, जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे ; असे एक उत्तम श्रेष्ठ व्रत मी तुला सांगतो, ते ऐक. ज्या व्रताने तुला माझे अर्धासन मिळाले, ते परम मंगल व्रत सर्व पुराणांचे व वेदांचे रहस्य आहे. सर्व व्रतात श्रेष्ठ आहे.
भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी हे व्रत केले असता सर्व मनोरथे पुर्ण होतात. तू हे व्रत पूर्वी हिमालयावर केले आहेस."
पार्वतीदेवी म्हणाली, हे महेश्वरा, सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत मी कसे केले ते मला आपणांकडून ऐकायचे आहे."
यावर शिवशंकरजी म्हणाले, " या पृथ्वीवर हिमाचल या सुंदर, आनंददायक पर्वतावर तू मोठे उत्कृष्ट तप केलेस. तुझे ते उग्र तप पाहून तुझे वडील हिमवान चिंताग्रस्त झाले, अत्यंत दुःखी झाले. आपली ही लाडकी लेक कोणाला देऊ अशी काळजी करु लागले. तेव्हा नारदमुनी आकाशमार्गे तिथे आले. हिमवानाने मोठ्या आनंदाने नारदमुनींचा आदर सत्कार केला आणि विचारलं ,
" हे मुनीश्रेष्ठ ! माझे भाग्य उदयाला आले असावे म्हणून आपले येथे येणे झाले असावे असे मला वाटते. आपण कोणता हेतू मनात धरुन आला आहात ते सांगा ? "
महर्षी नारदजी म्हणाले, " हे गिरीराजा, भगवान श्रीविष्णुंनी मला आपणांकडे पाठविले आहे. स्त्रियांत रत्नभूत अशी तुमची कन्या योग्य पुरुषाला देणे आवश्यक आहे. वासुदेवासारखा दुसरा वर कुणीच नाही. म्हणून हे गिरीराजा, तुम्ही आपली कन्या वासुदेवाला द्यावीस असे मला वाटते ! "
नारदमुनींचे बोलणे ऐकून गिरीराज हिमवान म्हणाले , " वासुदेव स्वतः माझी कन्या मागत आहेत. आणि आपणही मला तसेच करावे असे म्हणता ; तसे मला करायलाच हवे ! "
नंतर नारदमुनी श्रीविष्णुकडे गेले. म्हणाले," भगवान मी तुमचा विवाह निश्चित करुन आलो ! हिमवानानीही मोठ्या आनंदाने सांगितले की, मी माझी कन्या श्रीविष्णुला देण्याचे निश्चित केले आहे !"
हे ऐकून देवी तुम्ही दुःखी झालात. तशाच आपल्या सखीच्या घरी गेलात. तुम्हास पाहता सखीने विचारले," तू अशी कष्टी का ? काय झाले ? " यावर देवी तुम्ही म्हणालात..,  "  महादेवाला पती करावे असा माझा निश्चय आहे, पण माझ्या पित्याने दुसरेच ठरविले आहे. आता मी काय करु ? "
तुमच्या या प्रश्नावर सखी म्हणाली,  " आपण महाराज गिरीराजांना माहित नसलेल्या अशा प्रदेशात जाऊ या ! " त्याप्रमाणे तुम्ही दोघींनी विचार केलात. सखीने तुम्हास मोठ्या अरण्यात नेले. तुम्ही अशा निघून गेल्यावर तुमच्या शोध हिमराजांनी सर्वत्र सुरु केला.
ते मनात म्हणाले, " माझी कन्या मी श्रीविष्णुला देण्याचे नारदमुनींजवळ कबूल केले होते, आता मी त्यांना काय सांगू ?"
" देवी, या विचारांनी गिरीराज तुम्हास शोधण्यासाठी या अरण्यातून त्या अरण्यात भटकंती करु लागले. देवी, तुम्ही सखीसह एका घोर अरण्यात, रम्य नदीकाठी असलेल्या मोठ्या गुहेत प्रवेश केला. अन्न, पाणी सर्व वर्ज्य केले. भाद्रपद मासातील शुक्ल तृतीयेचा दिवशी हस्त नक्षत्रावर तुम्ही तुमच्या सखीसह वाळूचे लिंग स्थापून माझे मनोभावे पूजन केले. देवी, तुम्ही माझे स्तूतीगीत गायिलेस. जागरण केलेस. तुमच्या व्रताच्या प्रभावाने माझे आसन हालले. तुम्ही जिथे सखीसह व्रत करीत बसला होतात, मी तेथे आलो. आणि म्हणालो,
" हे देवी, मी तुमच्या व्रताने प्रसन्न झालो आहे. तुम्ही हवा असलेला कोणताही वर मागा !" हे ऐकताच तुम्ही म्हणालात की, " हे प्रभो महेश्वरा ! तुम्ही जर माझ्या या व्रताने माझ्यावर प्रसन्न झाला आहात, तर तुम्हीच माझे पती व्हा ! " देवी तुमचा हा वर ऐकून मी म्हणालो, " देवी, हे फार चांगले आहे. " असे बोलून मी कैलास पर्वतावर आलो. तद्नंतर प्रातःकाल होताच तुम्ही तुमच्या या व्रताची उत्तरपूजा  करुन तुमच्या सखीसह आरंभिलेल्या या व्रताचे पारणे तिथेच केले.
तुमचे पिता गिरीराज हिमवान तुमच्या शोध घेत त्या घनघोर अरण्यात आले. तेथेच त्यांनी तुम्हाला सखीसह पाहिले. तुम्हाला पाहताच ते तुमच्याजवळ आले व म्हणाले, " कन्ये, तू या घनघोर अरण्यात का येऊन राहिलीस ? चल, आधी आपण महाली परत जाऊ या." पिता हिमवानाचे बोल ऐकून हे देवी तुम्ही म्हणालात,
" पिताश्री, तुम्ही माझा विवाह श्रीशंकराशी करणार असे मला वाटले होते. परंतु तुम्ही पूर्वी केलेला विचार बदललात ; माझा विवाह वासुदेवाशी करण्यास नारदमुनींना होकार दिला. म्हणून मी या वनात निघून आले. तुम्ही जर माझा विवाह  श्री शिवशंकराशी  लावून देत असाल तरच मी या घनघोर अरण्यातून राज्यातील राजमहालात परत येईन. नाहीतर येथेच राहीन. मी तसा दृढनिश्चय केला आहेच !  "
हे देवी, तुमचे हे दृढनिश्चयात्मक बोल ऐकताच, हिमराज म्हणाले, " तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी सर्व करीन ! " हे वचन पिता गिरीराज हिमवानांनी तुम्हास दिले व घरी-महाली घेऊन आले. पुढे हिमवान राजांनी यथाविधी तुमचा  विवाह माझ्याशी लावून दिला. देवी, तुम्ही जे व्रत आचरले त्याच्या प्रभावाने तुम्हाला सौभाग्य मिळाले. असे बोलून महादेव म्हणाले, "  हे देवी, हे सौभाग्दायक सर्वोत्तम व्रत अद्याप मी कोणालाही सांगीतलेले नाही. हरित म्हणजे हिरवे आणि आलि म्हणजे सखी. सखीने तुम्हाला हिरव्यासमृद्ध अशा अरण्यात  नेले म्हणून या व्रताला हरितालिका  व्रत हे पावन पुण्यदायक नाव मिळाले."
श्री शंकराचे हे उद्गार ऐकून देवी पार्वती म्हणाल्या , " प्रभो, या व्रताचा पूजाविधी मला कृपा करुन सांगा ! या व्रतापासून काय फळ मिळते, हे व्रत कोणी करावे तेही सांगा ! " देवी पार्वतीचा हट्ट समजून श्री शिवशंकरजी म्हणाले, " हे देवी, हरितालिका हे व्रत  सौभाग्यदायक आहे. सौभाग्याची ईच्छा असणा-या स्त्रियांनी हे व्रत भक्ती आणि श्रद्धापूर्वक करावे.
व्रताचा पूजाविधी सांगतो ते ऐका. " केळीचे खांब आणून त्यास तोरण लावून मखर करावे. ते चंदनाने सुगंधित करावे. त्यावर छत लावावे. ते विविध रंगाच्या उत्तमोत्तम  पट्टवस्त्रांनी सुशोभित करावे.तेथे मंगल वाद्याचा गजर करावा.सखीसहित तुमची मूर्ती व माझे स्वरुप असणारे शिवलिंग वाळूत तयार करुन गंध, पुष्प, धूप, दिप, फळे इत्यादि उपचारांनी माझे पूजन करावे. नैवेद्य अर्पन करावा. रात्री भक्ती व श्रद्धापूर्वक आनंदीवृत्तीने जागरण करावे.
* या व्रताचा पुजनाचा वेळी पूजीकेने मंत्र म्हणावे ते असे -
१) नमः शिवाय । शांताय पंचवक्राय शूलिने ।।
२) नंदिभृंगीमहाकालगणयुक्ताय शंभवे ।।
३)  शिवायै हरकांतायै प्रकृत्ये सृष्टिहेतवे ।
शिवायै सर्वमांगल्ये शिवरुपे जगन्मये शिवे कल्याणदे।
नित्य शिवरुपे नमोस्तुते।।
४) भवरुपे नमस्तुभ्यं शिवायै सततं नमः ।
नमस्ते ब्रम्हरुपिण्ये जगद्धात्र्यै नमो नमः ।
संसारभयसंतापात त्राहि मां सिंहवासिनी।
येन कामेन देवी त्व पूजितासि महेश्वरी ।
राज्यसौभाग्य संपत्तीदेहि मामांह पार्वती।
देवी पार्वती, या मंत्रांनी तुमच्या सखीसहित तुमची व माझी पूजा करावी.
नंतर श्रीहरितालिका कथा पठण करावी. हे व्रत यथाविधि केले असता सर्व पापांपासून मुक्त होऊन सप्तजन्मापर्यंत राज्य मिळवून सौभाग्याची वृद्धि होते.दुसरे दिवशी ब्राम्हणास वायनदान करावे. नंतर पारणे करावे. हे देवी, याप्रमाणे जी  स्त्री हे व्रत करील ती स्त्री तुम्हाप्रमाणे आपल्या पतीसह रममाण होईल. इहलोकी अनंत सुख, ऐश्वर्य, वैभव उपभोगून अंती माझे सायूज्य प्राप्त होईल. हजारो अश्वमेध आणि शत वाजपेय यज्ञ केल्याने जे पुण्य व फळ प्राप्त व्हावयाचे ते या कथा श्रवण-पठणाच्या योगाने प्राप्त होते.
हे देवी, याप्रमाणे मी हे सर्वोत्तम श्रेष्ठ व्रत तुम्हांस निवेदन केले. या एका व्रताच्या आचरणाने कोटी यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते.
।। इति भविष्योत्तरपुराणे हरगौरी संवादे हरितालिका व्रतकथा समाप्त।।
              

◽श्री हरितालिका पुजेची तयारी ◽

                 ◽ उपकरणे  ◽
तांब्या, फूलपात्र, पळी, ताम्हण, ताट, व नैवेद्याची वाटी, समई, त्यात तेल व वाती, निरांजन, (तूप व फूलवातीसह) उदबत्ती, व उदबत्ती घर, कापूर, धूपारती, एक चौंरंग, व पाट, केळीचे चार बारीकसे खांब.                 हरितालिकादेवी मूर्ती व शिवाची पिंडी(वाळूची), घंटा, आगपेटी, इत्यादि.
🔹 पूजेचे साहित्य :-
हळद, कुंकू, गुलाल, दोन नारळ, उदबत्ती, कापसाचे वस्त्रे, विड्याची पाने - १२, सुपारी-१०, खारिक-५, बदाम-५, गुळ खोबरे, केळी, व इतर फळे, जानवे, वासाचे तेल, पंचामृत, (दूध, दही, तूप, मध, साखर ) अक्षता, गंध, सिंदूर, अत्तर, कोमट पाणी, काडपेटी, काचेच्या हिरव्या बांगडी, गळसरी, सुट्टे पैसे, दक्षिणा, दूर्वा, इत्यादि.
🌸 फुले :-
चाफा, केवडा, कन्हेर, बकूळ, धोतरा, कमळ, शेवंती, जास्वंद, मोगरा, अशोक, इत्यादि.
💠 पत्री :-
बेलपत्र, अशोक, आवळी, कण्हेर, कदंब, ब्राम्ही, धोतरा, आघाडा इत्यादि.
🔽 सौभाग्यवायनाचे साहित्य ◾
लहान सुपली, (सुफ) हळद, कुंकू, काजळ, तांदूळ, सुपारी, खारिक, बदाम, नारळ, खण, हिरव्या बांगड्या, गळेसरी, आरसा, फणी, विडा व दक्षिणा, इत्यादि.
🔽पुजेसाठी नियम ◽
०१) पूजेचे धातूमय साहित्य तांब्याचे असावे.  चांदीची उपकरणेही उपयोगात आणता येतील.
०२) मूर्ती मातीच्या असल्यास पूजेचे उपचार हळूवारपणे करावेत. दुर्वेने किंवा फुलाने किंचीत पाणी शिंपडावे.
०३) घरातील देवासमोर विडा ठेवून, नमस्कार करुन मगच आसनावर बसून पुजेस यथाक्रम सुरुवात करावी. पूजा करतांना सर्व साहित्य व पदार्थ जवळच आणून निट सांभाळावे. मध्येच उठू नये.
०४) देवीवर फुले उडवू नयेत. हलकेच वाहावित. प्राणप्रतिष्ठेनंतर विसर्जनपूर्व उत्तरपूजा होईपर्यंत मूर्ती हलवू नये.
०५) देवीला अनामिकेने कुंकू वाहावे. कुंकूम-अक्षता व फूले उजव्या हाताची अनामिका, मधले बोट व अंगठा यांच्या चिमटीने वाहाव्यात.
०६) विड्याची पाने उताणी व देठ देवीकडेकरुन देवीसमोर ठेवावी, वर सुपारी ठेवावी. नारळाची शेंडी देवीकडे करुन ठेवावा. देवीचे मुख पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असावे. देवीच्या डाव्या बाजूस समई व निरांजन उजव्या बाजूस ठेवावे. उदबत्ती निरांजनाजवळ ठेवावी.
०७) अर्घ्य म्हणजे गंधपुष्प व अक्षता. अक्षता म्हणजे कुंकूममिश्रित तांदूळ. फूले सुंगधित ताजी व न तुटलेली वाहावीत.
०८) फुलाचे देठ देवीकडे करुन वाहावीत. देवीला लाल व पिवळी फुलं फार प्रिय असतात. दुर्वा व बेलाचे त्रिदल आपल्याकडे अग्र करुन वाहावे.
०९) प्रदक्षिणा घालतांना स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे फिरावे. त्यावेळी हात जोडलेले असावेत.
१०) देवीला उदबत्ती, निरांजन, कापूर आरतीने ओवाळतांना ती उजव्या हाताने खालून आपल्या डावीकडून वर व वरुन उजवीकडे खाली अशी देवीच्या मूर्तीवर प्रकाश पाडीत ओवाळावी. त्या वेळी डाव्या हाताने घंटानाद करावा.
दुस-या दिवशी उत्तरपूजा होईपर्यंत तेलाचा दिवा सतत लावलेला असावा. उत्तरपूजेनंतर हरितालिकेच्या मूर्ती, देवीला वाहिलेली फुले, पत्री इत्यादि (निर्माल्य ) समुद्रात किंवा वाहत्या नदित किंवा भरलेल्या तळ्यात विसर्जित करावे.
हरितालिका व्रत करणाऱ्या सुवासिनीने नवीन साडी नेसावी. नथ व दागदागिने हे सौभाग्यअलंकार धारण करावे. हळद-कुंकू लावून घ्यावे. कुमारिकेनेही हे व्रत आचरावे. हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक, लाभदायक व मनोरथ पूर्ण करणारे असे आहे. व्रत करतांना मनात कोणतीही अढी, क्लेश, नैराश्य, चिंता न धरता सश्रद्ध भक्तिभावे आचरावे.
        🔹🌸 🔸💠🔸🌹🔸🌸🔹
◽ पूजा प्रारंभ करण्यापूर्वी  ◽
व्रत करणाऱ्या सुवासिनीने प्रथम आपल्या इष्ट देवतांना हळद-कुंकू वाहून देवापुढे विडा ठेवून नमस्कार करावा. ब्राह्मण गुरुजींना व वडिलधारी माणसांना नमस्कार करुन नव्या किंवा स्वच्छ धुतलेल्या आसनावर बसावे. नंतर पूजा प्रारंभ करावी.
            * * * * * * * * * * * * *
◽।। अथ हरितालिका पूजा प्रारंभ।। ◾

◾ द्विराचम्य  ◽

तीन नावांचा उच्चार करुन प्रत्येक नावाच्या शेवटी संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन प्राशन करावे. :-
०१) ॐ केशवाय नमः ।
०२) ॐ नारायणाय नमः ।
०३) ॐ माधवाय नमः ।
* पुढील नावाच्या उच्चार करुन -
०४)        ॐ गोविंदाय नमः।
म्हणून संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन सोडावे. याप्रमाणे दोन वेळा करावे.
येथून पुढे ध्यान करावे. हातात अक्षता घेऊन दोन्ही हात जोडावेत. दृष्टि आपल्या समोरील देवीवर असावी.
०५) ॐ विष्णवे नमः।
०६) ॐ मधुसुदनाय नमः ।
०७) ॐ त्रिविक्रमाय नमः ।
०८) ॐ वामनाय नमः।
०९) ॐ श्रीधराय नमः ।
१०) ॐ ह्रषीकेशाय नमः ।
११) ॐ पद्मनाभाय नमः ।
१२) ॐ दामोदराय नमः ।
१३) ॐ संकर्षणाय नमः ।
१४) ॐ वासुदेवाय नमः ।
१५) ॐ प्रद्युम्नाय नमः ।
१६) ॐ अनिरुद्धाय नमः ।
१७) ॐ पुरुषोत्तमाय नमः ।
१८) ॐ अधोक्षजाय नमः ।
१९) ॐ नारसिंहाय नमः ।
२०) ॐ अच्यूताय नमः ।
२१) ॐ जनार्दनाय नमः ।
२२) ॐ उपेन्द्राय नमः ।
२३) ॐ हरये नमः ।
२४) ॐ श्रीकृष्णाय नमः ।
हातातील अक्षता देवीला वाहाव्यात.
◽ देवतावंदन ◽
🔽श्रीमन् महागणाधिपतये नमः ।
🔽इष्टदेवताभ्यो नमः।
🔽कुलदेवताभ्यो नमः।
🔽ग्रामदेवताभ्यो नमः।
🔽स्थानदेवताभ्यो नमः।
🔽मातृपितृभ्यो नमः।
🔽उमामहेश्वराभ्यो नमः।
🔽श्रीलक्ष्मीनारायणांभ्यो नमः।
🔽सर्वेभ्यां देवेभ्यो नमः।
🔽सर्वेभ्यो ब्राम्हणेभ्यो नमः।
                  निर्विघ्नमस्तू।।
© प्रा.पुरूषोत्तम पटेल, मु.पो.म्हसावद
mhasawad.blogspot.in

बुधवार, डिसेंबर २६, २०१८

क्रांतीरत्न शिवराम हरी राजगुरु

पवित्र स्मरण -
मृत्यूला हसत हसत आलिंगन देणारा महाराष्ट्राच्या मातीतील थोर क्रांतिकारक - शहिद शिवराम हरी राजगुरु.

भारतीय स्वातंत्र्यलढा म्हणजे जगातील सर्वोत्तम क्रांतिपर्वांपैकी एक होय.   जीवाची पर्वा न करता इंग्रजांच्या नाकी नऊ आणणा-या या थोर क्रांतिकारकाची ‘शहिदगाथा’!

‘ शिवराम हरी राजगुरू ’ ! लहानपणी त्यांना ‘रघुनाथ’ या नावाने ओळखले जात. राजगुरू म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र!

२४ ऑगस्ट१९०८ रोजी पुणे जिल्ह्यातील खेड गावात त्यांचा जन्म झाला.  त्यांना अचूक नेमबाजी आणि दांडगी स्मरणशक्तीचे वरदान होते. त्यातूनच त्यांच्या बुद्धीला  खाद्य पुरवले जात असे .
    वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी घर सोडल्यानंतर. सर्वप्रथम  नाशिकला काही काळ वास्तव्य केले. नंतर शिक्षणाच्या उद्देशाने ते काशीला पोचले. तेथे पुस्तकांत, राजकीय वातावरणात आणि व्यायामशाळेत लाठीकाठी, दांडपट्टा यांसारख्या खेळात ते रमून गेले.त्याकाळी काशी येथील पंडीत मदनमोहन मालवीयांचे हिंदू विद्यापीठ हे साऱ्या क्रांतिकारकांचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जायचे. तेथे अनेक गुप्त खलबतेही होत असतं. याच काळात काशीमध्येच राजगुरूंची भेट चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत झाली. राजगुरूंचे निडर व्यक्तिमत्त्व पाहून आझादांनी राजगुरूंना क्रांतिकारकांच्या गटात सामील करून घेतले. त्या क्रांतिमय वातावरणात वावरताना राजगुरूंमधील क्रांतिकारक घडत गेला. कोणत्याही मोहिमेसाठी ते एका पायावर तयार असतं. वेळ पडली तर या क्रांती संग्रामात बलिदान देण्याची देखील त्यांची तयारी होती.
पुढे राजगुरूंनी केलेली अजून एक जबरदस्त कामगिरी म्हणजे सॉंंडर्सचा वध होय. पंजाबकेसरी लाल लजपतराय यांच्यावर निर्दयीपणे लाठीहल्ला करून त्यांना ठार मारणाऱ्या पोलीस अधिकारी स्कॉटला जगण्याचा अधिकार नाही अशी गर्जना करीत भगतसिंगांनी त्याचा वध करण्याचा विडा उचलला. राजगुरूंनी हट्ट केल्यामुळे भगतसिंगांनी त्यांना देखील आपल्या बरोबर सामील करून घेतले. त्यांचा अजून एक साथीदार जय गोपाळ पोलीस स्टेशनवर स्कॉटच्या हालचालीवर पाळत ठेवून होता. पण ४-५ दिवस स्कॉट त्या भागात आलाच नाही.
अखेर दुसऱ्या दिवशी एक गोरा अधिकारी डॉ पोलीस स्टेशनमधून बाहेर पडला. जय गोपाळला वाटले की हाच स्कॉट आहे, म्हणून त्याने दबा धरून बसलेल्या भगतसिंग आणि राजगुरूंना खुण केली. पण भगतसिंगांनी हा स्कॉट नसावा अशी प्रतिक्रिया दिली, परंतु राजगुरूंचं त्यांच्याकडे लक्षच नव्हते. भगतसिंगांनी नकार देण्यापूर्वीच राजगुरूंनी त्या गोऱ्या अधिकाऱ्यावर गोळी झाडली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून भगतसिंगांनी सलग आठ गोळ्या झाडत त्या गोऱ्या अधिकाऱ्याला यमसदनी धाडले. त्या सगळ्या गोंधळातून बाहेर पडण्यात मात्र ते यशस्वी झाले. नंतर दोघांनाही कळले की तो स्कॉट नसून सॉंंडर्स होता. माणूस चुकला पण मोहीम अयशस्वी राहिली नाही यातच भगतसिंग आणि राजगुरू या दोघांनीही समाधान मानले.

   इकडे मारेकऱ्यांच्या मागावर पोलीस हात धुवून लागले होते, पण शेवटी वेषांतर करून भगतसिंग आणि राजगुरू दोघेही दिवसाढवळ्या एकाच गाडीतून लाहोरहून राजकोटला निसटले. पुन्हा काशीत परतल्यावर राजगुरू उघडपणे वावरू लागले. लोकांना संशय येऊ नये म्हणून त्यांच्यात मिसळू लागले. परंतु फार काळ ते पोलिसांना गुंगारा देऊ शकले नाहीत आणि १९२९ सालच्या सप्टेंबर महिन्यात ते पोलिसांच्या हाती लागले.
त्यांनी साथीदारांची नावे सांगावीत म्हणून कारागृहात त्यांचा अमानवी छळ करण्यात आला. शेवटी छळ करणारे थकले पण राजगुरूंनी त्यांना आपल्या साथीदारांच्या नावाची साधी पुसटशी कल्पनाही येऊ दिली नाही. यावरून त्यांची निष्ठा दिसून येते.
पुढे कारावासात शिक्षा भोगत असताना भगतसिंग आणि सुखदेव या आपल्या सहकाऱ्यांसोबत त्यांची पुन्हा भेट झाली. तेथेही त्यांनी आपलं क्रांतिकारी बाणा ढळू दिला नाही. अखेर लाहोर खटल्याचा निकाल आला आणि भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांनाही लाहोर जेलमध्ये २३ मार्च, इ.स. १९३१ ला संध्याकाळी ७.३३ वाजता फासावर चढवण्यात आले आणि तीन पेटत्या निखाऱ्यांची धग विझली. त्यांच्या बलिदानाचा २३ मार्च हा दिवस आपल्याकडे शहीद दिन म्हणून साजरा केला जातो.

स्वातंत्र्यप्राप्ती वगळता कोणतीही अभिलाषा मनात न धरता केवळ आणि केवळ देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या आणि महाराष्ट्राचे नाव क्रांतिपर्वात सुवर्णाक्षरांनी  कोरणाऱ्या राजगुरु नामक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला  त्रिवार मानाचा मुजरा!!!
🔹प्रा.पुरूषोत्तम पटेल
Mhasawad.blogspot.in

रविवार, डिसेंबर ०९, २०१८

शुक्रवार, नोव्हेंबर ०९, २०१८

पाय आणि पाऊल

पाऊल आणि पाय
शब्द जरी सारखे
अर्थ विचारात घेता
दोघे एकमेका पारखे ||१||
पाऊलावर पाऊल ठेवतांना
पाहावी लागते व्यक्ती
पायावर पाय ठेवतांना
विचारात घ्यावी शक्ती ||२||
संस्काराचा शाळेत
पाऊलाची होते पाटी
जीवनाची वाट तुडवताना
पायांची लागते कसोटी ||३||
पाऊल वाकडे पडताच
समाजात येते विकृती
लाथ मारुन काढीन पाणी
पायाची दृठ संस्कृती ||४||
पाऊल सांगतसे
निती नियमांची दिशा
पाय लागता पायाला
विचाराची होई दुर्दशा ||५||
म्हणूनच... पाय ठेवतांना
मना नसावा विकार
पाऊल उचलतांना
करावा हजारदा विचार ||||
© प्रा.पुरुषोत्तम पटेल,
    मु.पो.म्हसावद 

शनिवार, ऑक्टोबर २०, २०१८

तोरणमाळ :खान्देशी सौदर्याची माळ

     तोरणमाळ : खान्देशी सौदर्याची माळ
    नंदुरबार जिल्ह्याच्या व शहादा तालुक्याच्या उत्तरेस असलेल्या सातपुडा आणि जिल्ह्याच्या पूर्वेस वाहणारी सूर्यकन्या तापीनदी ही खान्देशच्या इतिहासाची दोन जिवंत साधने आहेत. सूर्यकन्या तापीचा उल्लेख पुराणात सापडतो, तसाच सातपुड्याचा उल्लेखही महाभारत व रामायण या महाकाव्यात सापडतो. यावरून या दोहोंचा प्राचीनतेची कल्पना लक्षात येते. सातपुड्याच्या विचार केल्यास महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर हा पर्वत विस्तारला आहे. या मध्यकालीन पर्वताचे आयुष्य तेरा कोटी वर्ष असल्याचे संशोधकांचे मत आहे.
    पर्वताच्या एकामागे एक अशा सात रांगा असलेल्या सातपुड्याची पूर्व-पच्छिम लांबी ७२५ कि.मी. आहे, तर उत्तर-दक्षिण रुंदी साधारणत: १२ कि.मी. आहे. पच्छिमेस गुजरातमधील भडोच जिल्ह्यातील राजपिपला या गावाजवळील टेकड्यापासून या पर्वतमालेची सुरवात होते. या पर्वतरांगा लहानमोठ्या प्रमाणात एकमेकांना समांतर खेटून आहेत. सातपुड्यात तीन शिखरे आहेत. सर्वाधिक उंचीचे गुलीअंबा हे शिखर गुजरात हद्दीत येते. अस्तंबा हे दुसऱ्या क्रमांकाचे  तिसरे तोरणमाळ हे एक शिखर. ही दोन्ही महाराष्ट्रात येतात. तोरणमाळ हे या पर्वतीय प्रदेशात असून ते एक पर्वतांतर्गत पठार आहे. या पठाराचे क्षेत्रफळ ३.२ चौ.मै. इतके आहे. लहानमोठी असंख्य शिखरे, कडा, दरी, स्तर इ. या पर्वतरांगात आढळतात. तोरणमाळ हा भाग दुरस्थ क्षेत्र म्हणून ओळखला जातो. हे सातपुड्याच्या चौथ्या पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून १०७६ मी. उंचीवर उत्तर अक्षांश २१ अंश ५३ मिनिट आणि पूर्व रेखांशावर ७४ अंश ४२ मिनिट असे वसले आहे. तोरणमाळ हे ता. धडगाव जि. नंदुरबार म्हणून परिचित आहे.
    तोरणमाळचे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील हे दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून शासनदरबारी ओळखले जाते. तेवढेच ते पर्याटकांसाठीही मोहक आहे. नंदुरबार या जिल्हा मुख्यालयापासून ते ९५ कि.मी. आणि धुळे येथून १४० कि.मी. अंतरावर आहे. तोरणमाळला जाण्यासाठी नंदुरबारकडून किंवा धुळ्याकडून येतांनाही शहादा हा मध्यवर्ती थांबा लागतोच! शहादा तोरणमाळ हा पक्क्या स्वरूपाचा रस्ता असून राणीपूरपासून घाटरस्ता प्रारंभ होतो. शहाद्याहून लोणखेडा-जुनवणे-म्हसावद- कुबेर हायस्कूल-राणीपूर-नागझरी-कालापाणी  ते तोरणमाळ अशा मार्गाने पोहचता येते. येथे जाण्या-येण्यासाठी दररोज  शहादा आगारातून नियमित एस.टी. बसेस आहेत. खाजगी वाहनांनी देखील जाता येते.तोरणमाळला जातांना पर्वतरांगा ,पर्वत पठार ,आणि घाटरस्ता मार्गक्रमण करतांना पर्यटकांचा थकवा सहजच नष्ट होतो.घनदाट  व उंच उंच वृक्ष ऊंच ऊंच शिखरे, त्यावरुन लोळणारे मेघांचे लोट पाहून कवी कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती ओठांवर रुंजी घालू लागतात.
“आकाशातुन घनश्याम आळविती धरणीला
आणि सखीच्या गळा घाली मोत्यांची माळा ” हे अनुभवता येते.म्हणूनच तोरणमाळ येथे जाण्यासाठी वर्षातील वर्षा ऋतु मनमोहक आहे. पण.. इतर कोणताही दिवस पर्यटनासाठी योग्यच आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडे आस्वादक दृष्टी असली तर येथला कण अन् कण आणि प्रत्येक श्वास आनंददायी ठरतो. .सातपुड्याकडे  बघताना त्याची उंच उंच शिखरे जणू त्याचा दिलदार रुपाची आपल्याशी चर्चा करू लागतात .
    शहादा तालुक्याची हद्द संपताच तोरणमाळच्या  वाटेवर प्रथम भेटतो ; तो सातपायरी घाट.एकेका पायरीने सात घाट वळणं घेत मार्गक्रमण करताना होणारा आंनद शब्दातीतच ! हा प्रत्यक्ष अनुभवावाच. सातपायरी घाट चढल्यावर डाव्या बाजूवर दर्शन होते ते येथील पुरातन लेणीचे व त्यातील नागार्जुनाचे.ही देवता हिंदू जैन आणि बुद्ध या तिनही धर्मवीचारात दिसते. मूर्तीची भव्यता आणि शिल्पाची प्राचीनता आपल्याला इतिहासात घेवून जाते.येथेच थांबून सातपायरीघाटाचे विहंगम दृश्य पाहण्याचा  आंनद लुटता येतो.हे दृश्य डोळ्यात साठवून पुढे गेल्यावर उजव्या हातावर साधारणतः सात कि.मी.अंतरावर जालंन्धरनाथाचे भग्नावषेशातील मंदिर आहे. या ठीकानीच तोरणमाळ किल्यातील भव्य परंतु भग्न तटाचा रुंदीची प्रचीती येते. येथेच अभिरराजा युवानाश्व हा महाभारतकालीन राजा राज्य करीत होता. तो न्याय नितीचा वाली असून कौरवांचा बाजूने न लढता पांडवाचा बाजूने लढला होता असे या परिसरात म्हटले जाते. थोडं पुढे गेल्यावर ज्या शिखराने तोरणमाळला त्याचा नावाची ओळख व अस्तित्वाची ओळख करून दिली ,ते तोरणाईदेवीचे शिखर व तेथील मंदिर  दृष्टोत्पतीस पडते. नंतर भेटीची साद घालतो; यशवंत तलाव आणि गोरक्षनाथ मंदिराचा प्रसन्न व मोक्षदाई परिसर. येथे नवनाथांपैकी गोरक्षनाथ-मच्छीन्द्रनाथ यांचे वास्तव्य होते. हे पाहिल्यावर तोरणमाळचा खरा अनभिषिक्त सम्राट भगवान शंकरच असावेत ,असे जाणवते. याच भक्ती आसक्तीतून येथे  दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रोत्सव होतो. यावेळी आदिवासी स्त्री-पुरुषांची वेशभूषा त्यांचे दाग-दागिने त्यातून निसर्गविषयक साकारलेल्या कल्पना यांचे दर्शन घडते महाराष्ट्रासह गुजराथ, मध्यप्रदेश या तीनही राज्यातून भाविक भक्त लाखोंच्या संख्येने उपस्थित राहतात. हा भक्ताचा मेळा श्रद्धा - भक्ति - विश्वास यांचा संगमात मनसोक्त न्हाऊन धन्य होतांनाचा भाव प्रत्येक चेह-यावर दिसून येतो.
    भगवान चंद्रमौळी व गोरक्षनाथांचा दर्शनानंतर खुणावतो यशवंत तलाव ! महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हान यांनी या ठिकाणी भेट दिल्याची आठवण म्हणून तलावाला दिलेले हे नाव तोरणमाळच्या रुंद छातीवर करुणा, स्नेह आणि बलिदान या तीन पवित्र मूल्यांचा संगम म्हणजे हा यशवंत तलाव. अतिशय विस्तीर्ण, स्वच्छ, आणि अखंड जलसाठा असलेला, दोन्हीकडे उंच टेकड्यांच्या आत सुरक्षित कडेवर असलेला नैसर्गिक तलाव होय. वनविभागाच्या माहितीनुसार त्याची खोली ९.२० मी. असून पाणी साठवण क्षमता ३५०० टी.एम.सी. आहे. तलावाचा परीघ ४ कि.मी. असून त्याला प्रदक्षणा घालण्याचा आनंदही लुटता येतो. याशिवाय येथे बोटिंगचा आनंदही घेता येतो.
    जवळच तोरणमाळ हिल रिसोर्ट आहे. त्याजवळच खडकी पॉईंट आहे. येथून सातपुड्याचे विहंगम दृश्य डोळ्यात साठविता येते. हिल रिसोर्ट पासून एक कि.मी अंतरावर सनराईज पॉईंट असून तेथून उगवत्या सूर्याच्या साक्षीने नवनवे संकल्प करता येतात. संपूर्ण जगाला चैतन्याचा थरार देणारा रविकिरण येथूच अनुभवने म्हणजे एक आनंदोत्सवच ! हिल रिसोर्ट पासून सुमारे दिड कि.मी. अंतरावर सनसेट पॉईंट असून अस्तंगत होणाऱ्या सुर्याला अभिवादन करून प्रकाशाचा वसा थोडासा कवडशासारखा आपल्या हृदयात जपता येतो.
    तोरणमाळच्या माथ्यावर ईशान्य कोपर्‍यात एक खोलदरी आहे. या दरीची खोली सुमारे १०० ते १२५ फुट आहे. हिलाच सिताखाई पॉईंट असे म्हणतात. ही खाई तीनही बाजूंनी प्रचंड पाषाण व उंच-उंच तासीव कड्यांनी वेढलेली असल्याने नयनरम्य भासते. खाईच्या तळाला एक कुंड  असल्याचे सांगितले जाते. त्याला सिताकुंड म्हणतात. सिताखाईच्या ठिकाणी पाऊसाळ्यात मोठा फेनिक धबधबा पाहता येतो. शिवाय येथे उभे राहून आवाज दिल्यास आवाजाचे प्रतिध्वनी तीनवेळा ऐकू येतात. याला इकोपॉईंट म्हणतात. सिताखाई जवळच कमळाचे एक तळे आहे. त्याला कृष्ण तलाव म्हणतात. तेथे उमलणारी पांढरी व गुलाबी रंगाची कमळपुष्प पर्यटकांना आकर्षित करतात.ते पाहण्याचा अनूभव काही औरच..!
    तोरणमाळ येथे १९व्या शतकाच्या पहिल्या दशकाअखेर उभारण्यात आलेली चर्च आहे. चर्चचे भव्य रूप बघून बुद्धी थक्क होते.  जाण्यायेण्यासाठी रस्ता किंवा साधने नसतांना चर्चचे बांधकाम चिरेबंदी दगडात  कसे केले असेल हा स्वतंत्र संशोधनाचा विषय ठरावा. अनाकलनीय गोष्ट प्रयत्नपूर्वक मूर्त रूपात स्थापित करणाऱ्या वास्तूनिर्मिकाला अभिवादन केल्याशिवाय राहवत नाही.
    तोरणमाळचे एक प्राकृतिक वैशिष्ट म्हणजे हे जंगल कोरडे जंगल प्रकारात मोडते. म्हणून रखरखत्या उन्हाळ्यात येथील वृक्षराजी पर्णहीन होते व हवेच्या तालावर कोरडी पाने जणू विविध सप्तसूर आळवतात. पण .... चैत्रातील नवपल्लविने संपूर्ण दऱ्या खोऱ्या नव लेणं घेऊन नटून येतात.व मानवाला जणू उपदेश करतात, नवनिर्मितीसाठीच आम्ही हा त्याग करीत आहोत. तूही आमच्या सोबतीला ये! आणि कवी मंगेश पाडगावकरांची कविता आठवू लागते.
        “ या जन्मावर या जगण्यावर
               शतदा प्रेम करावे…! ”
    तोरणमाळच्या  रानात सलई, महू, चारोळी, टेंम्भूर्णी, तिवस, कुडा, खैर, जांबूळ, आवळा, आंबा, सीताफळ, बोर, भेडा , पळस आणि साग,बांबू इ. वृक्ष दिमाखदारपणे उभे असलेले पाहता येतात. चैत्र पालवीने लालबुंद झालेला पळस पाहतांना वाटू लागते की  जणू लाजेने लालीलाल झालेली नववधूच येथे उभी असावी! पळसाचे पर्णरहित फुलणे बघून जन्माचे सार्थक झाल्याचा आनंद मिळतो. वृक्षसंपदा बरोबरच येथे कारवी , धायटी, तोरण , करवंद अशी विविध झुडूपेही तसेच विविध प्रकारचे औषधी वनस्पती ,कंदमुळे आढळतात. यांचे संवर्धन करण्यासाठी वनविभागाने औषधी वनस्पती , कंद व फुले संवर्धन केंद्र सुरु केले असून तेथील विविध रंगी गुलाबाची फुले मनमोहक ठरतात.
तोरणमाळचे जंगल पक्षी संपदेनेही समृद्ध आहे. येथे एकूण २३३ प्रजातीचे पक्षी असल्याचे नोंद वनविभागाकडे आढळते. शिवाय हवामान आणि मनुष्य स्वभावाच्या वेडातून नामशेष होत असलेला एक पक्षी म्हणजे वनपिंगळा.जगभरात वनपिंगळ्याचा ३३प्रजाती आढळतात.पैकी येथील जंगलात त्यांचा ९ जाती आढळून आल्याची नोंद बाॅबे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या पक्षी तज्ज्ञांनी केली आहे. हा पक्षी केवळ सातपुडा पर्वतराजीत तोरणमाळ जंगलात, आणि मेळघाटच्या जंगलात, ओरिसाच्या जंगलात सापडतो. . हा पक्षी निशाचर नसून दिवसा भ्रमंती करतो. त्यालाही अनुभवणे म्हणजेच जागतिक लेणं अनुभवल्याचा आनंद पक्षी निरीक्षकांना मिळतो. दरवर्षी हिवाळ्यात येथे हिमालयातील ब्लॅक रेड स्टार , वारवब्लर आणि इतर बरेच पक्षी नियमित नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येतात व एप्रिल मे अखेर परतीच्या मार्गाला असतात. विदेशी पक्ष्यात प्रामुख्याने युरोपियन रोलर, हेन हॅरीयर, पेल हॅरीयर, ग्रे वॅगटेल, ग्रीन सॅडे पायपर इ. युरोपियन देशातील सायबेरीयातून हे पक्षी तोरणमाळला पाहुणे येतात.पक्षी अभ्यासकाना हे सारे काही संशोधनासाठी उपयुक्त खजिनाच होय . तोरणमाळ येथील निसर्गसौदर्याचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना विश्रांती व सुविधा देणारे ठिकाण म्हणजे वनविभागाचे विश्राम गृह होय. त्या शिवाय दुसरे तोरणमाळ हिल रिसोर्ट होय. रिसोर्टद्वारा लाकडीफळीपासून आकर्षक पद्धतीने तयार केलेली मोबाईल घरे पर्यटकांना सुखावतात. खास सुविधा म्हणून अमरविला हा सुट बनविला आहे. तसेच प्राचीन आश्रमपद्ध्तीचा आनंद अनुभवन्याकरिता ऋषीमुनीच्या जीवनपद्धतीची व्यवस्था केली आहे.
सातपुड्याचे रुप मुळातच रौद्र असे आहे. हा शुरांचाही भूभाग म्हणून इतिहासाला परिचित आहे. स्वातंत्र्य पुर्व काळात इंग्रजांना सळो की पळो करुन सोडणारा नेमाडातील स्वातंत्र्यदेवीचे उपासक, स्वातंत्र्यवीर तंट्या भिल ह्याच सातपुड्यात भूमिगत राहून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी कार्य करीत होते. हे आपणास विसरता येणार नाही. ह्या स्वातंत्र्यवीराच्या पदस्पर्शाने पावन भूमीत फिरण्याचा अभिमान आपणास अनुभवता येतो.
तोरणमाळ (ता.धडगाव ,जि.नंदुरबार) हे पर्यटनाचे ठिकाण आबाल स्री-पुरुषांना वेड लावणारे, नियमित भेटीची ओढ निर्माण करणारे, निसर्गसौदर्याने नटलेले,खान्देशातील एकमेव गिरीस्थान. महाराष्ट्राचे पर्यटनाचे दुसऱ्या क्रमाकाचे थंड हवेचे ठिकाण.
सातपुड्याचा कुशीत, नंदुरबारच्या प्राकृतिक चेहरा खुलविणारे, वनउपजांनी व विविध वृक्ष-लतानी वेढलेले निसर्गाचे आवडते व मुक्त हस्ताने आनंदाची उधळण करणारे,
आल्हाददायक .ठिकाण तोरणमाळ...!
तोरणमाळला जाताना सातपुड्याचा चार रांगातून, घनदाट जंगलातून, वेडावाकड्या वळणातून सात घाट चढतांना निसर्गाचे नयनमनोहर दृश पाहून आनंदाने वेडावून टाकणारे रम्य   तोरणमाळ...!!!
नक्की या हं ..! तोरणमाळ प्रतिक्षा करते आहे. आपल्या आगमनाची !
( लेखकाच्या खाली दिलेल्या ब्लॉगवर वाचा तोरणमाळचे काव्यात्मक सुंदर वर्णन : माझे तोरणमाळ ही कविता.)
     शब्दसौदर्य :-  प्रा.पुरुषोत्तम पटेल,               उपप्राचार्य,                               
कुबेर हायस्कूलउच्च माध्यमिक
विद्यालय म्हसावद, ता.शहादा
जि. नंदुरबार   ४२५४३२
मोबा  : ८२०८८४१३६४,
          इ-मेल- patelpm31@gmail.com
          Blog- mhasawad.blogspot.in

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...