Kaayguru.Marathi

मंगळवार, ऑगस्ट २८, २०१८

श्रीशंकरा

              * श्रीशंकरा *

दारी तुझा आलो मी करुणावतारा

दर्शन दे रे शंभो मज कर्पूरगौरा ||धृ||

देवांचा देव तू रे तू महादेव

तूच शोभे देवा पार्वतीवरा       ।।१।।

दर्शन दे रे शंभो मज कर्पूरगौरा…  

हलाहल विष भोला तूच पचविले

निलकंठ झाला रे तू  जगउद्धारा।।२।।

दर्शन दे रे शंभो…

बेलपान कन्हेर धतूरा तुला आवडे

ॐ नमो ऐकता पावसी ओंकारा।।३।।

दर्शन दे रे शंभो…

तांडव नृत्याचा तू धनी आद्य नर्तक

नर्तनात तूच रमतो हे नटेश्वरा।।४।।

दर्शन दे रे शंभो…

जटा शोभे गंगा माथी चंद्रकोर

रुळे मुंडमाळ गळा भस्म कपाळा।।५।।

दर्शन दे रे शंभो मज

महाकाल नाव  तू काशीअधिपती

भक्त उद्धारक देवा तू विश्वेश्वरा।।६।।

दर्शन दे रे शंभो मज…

नाग तनुवरी विलसे  हाती डमरु

तूच हरितो चिंता नमन चिंतेश्वरा।।६।।

दर्शन दे रे शंभो मज कर्पूरगौरा

© प्रा.पुरूषोत्तम पटेल

म्हसावद ता.शहादा

रक्षाबंधन.

       रक्षाबंधन
नातं तुझं नी माझं
बहिण अन् भावाचं
रक्षाबंधन सणाला
जपू स्नेह-सौख्याचं   ।।१।।
राखीचा प्रितगंध
दुरदुरी हो  दरवळला
बहिण घरी आज
जणू श्रीहरी आला    ।।२।।
हाती तूझा बांधते
धागा रेशमाचा
त्यात गुंफला मी
प्राण द्रोपदीचा         ।।३।।
कुंकुम अक्षत टिळा
लाविते तुझा कपाळी
लाभो सुख-समृद्धी
दादा तुला सर्वकाळी।।४।।
भाऊ म्हणे बहिणीस
देतो तुला वचन
तुझी ऐकता हाक   
करीन तुझे रक्षण    ।।५।।
प्रा. पुरुषोत्तम पटेल

©

गुरुवार, ऑगस्ट १६, २०१८

डॉक्टर डे निमित्ताने कविता.

डॉक्टर डे निमित्ताने….

प्रिय डॉक्टर

डॉक्टर…,

तुम्ही आमच्या आयुष्याचे शिल्पकार

अन् सुखाचे सार

दुःख व्याधीला तुम्ही

जगण्याचा आधार ||१||

डॉक्टर…,

तुम्हाला माहिती केवळ

मानवतावादी धर्म

अहोरात्र रुग्णसेवा

हेच तुमचे कर्म ||२||

डॉक्टर…,

तुम्ही दुःखाचे भाजक

अन् सुखाचे गुणक

सामाजिक आनंदाचे

तुम्हीच खरे जनक ||३||

डॉक्टर…,

तुमच्या एका स्पर्शात

वाढते जगण्याची आस

तुमच्या एका शब्दात

श्वासाला लाभे श्वास ||४||

डॉक्टर…,

तुम्हालाच असते खरे

रुग्णसेवेचे भान

तुम्ही अहर्निश प्रयत्ने

वाचविता रुग्णप्राण ||५||

डॉक्टर…,

आमच्या जन्ममरणाची

तुम्ही जाणतात नाडी

तुमच्या औषधोपचारे

आयुष्याची चाले गाडी ||६||

डॉक्टर…,

तुम्हालाच आमुच्या

आरोग्याची चिंता

तुमच्याविना रोजच

पेटतील अनंत चिता ||७||

आज डॉक्टर डे

करितो तुम्हाला

मी हृदयापासून

प्रणाम ! प्रणाम!! प्रणाम !!! ||८||

© प्रा.पुरुषोत्तम पटेल, 

mhasawad.blogspot.in



स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!

        स्वातंत्र्य दिन चिरायु होवो !

   उद्या आपल्या भारतमातेच्या ७२वा स्वातंत्र्यदिवस. जाज्वल्य राष्टप्रेमाने भारावलेल्या १५ अॉगष्ट १९४७ च्या हर्षोल्होसित दिवशी भारतमातेच्या मुकुटातील लाल किल्ल्यावर तिरंगा राष्ट्रध्वजाचे डौलाने ध्वजारोहण करण्यात आले. आसमंत दशदिशांनी फूलून आला होता. स्वातंत्र्य सूर्याने भारत माता की जय…..! च्या निनादात आपले नवचैतन्याचे किरण दशदिशांना पसरवले. तेव्हापासून तर आजपर्यंत आपण सर्व जण देशभरातून हा चैतन्यदायक, स्फूर्तीदायक असा  स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आलो आहोत.

  भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनंत स्त्री-पुरुषांनी आणि बालगोपाळांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. जुलमी इंग्रजानी त्या थोर स्वातंत्र्यविरांना अतोनात छळले असल्याचा इतिहास आजही विसरणे शक्य नाही. आठवते ना ती जालियनवाला बागेतील क्रुरतेची घटना? एवढे सोसूनही भारतमातेचे विर सुपूत्र घाबरले नाही. इंग्रजांविरोधात लढतांना “ भारतमाता की जय! ” आणि “वंदे मातरम् ” “ इन्कलाब जिंदाबाद ” ह्या घोषणा देत क्रांतीविरांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या आहेत. अनंत क्रांतीविर, ज्यांची नावे उच्चारताच स्फूरण चढते व जुलमी इंग्रज सत्तेविरुद्ध प्रचंड चिड निर्माण होते.

  भारतीय जनतेत  स्वातंत्र्य लालसा निर्माण व्हावी म्हणून हसत हसत फासावर गेलेल्या क्रांतीविरांची गाथा हिमालयाइतकी उत्तुंग व गंगौघाएवढीच पवित्र  आहे. त्यांचा अदम्य विरतेच्या इतिहास आजही सुवर्णाक्षरांनी आपणास स्फूर्ती देत आहे. हे आपण कोणीही विसरु शकत नाही. या सर्वांचा रक्ताने पावन झालेली ही भारतमाता आज विरांची व क्रांतीकारकांची भूमी  म्हणून ओळखली जाते.

स्वातंत्र्यासाठी वेडावलेल्या  अशा अनंत ज्ञात अज्ञात सुपूत्रांच्या बलिदानावर  दिं. १५ अॉगष्ट १९४७ रोजी आपण स्वातंत्र्य मिळविले आहे.ह्या राष्ट्रध्वजाला घडविण्यासाठी, त्याला ऊंच करण्यासाठी अगणित स्वातंत्र्यसैनिक लढले. आजही भारतीय सैन्याचे शूर-विर जवान स्वतःच्या प्राणाचे आजही बलिदान करीत आहेत. लतादिदिंनी गाईलेले

“ ए मेरे वतन के लोगो जरा आँखमे भरलो पाणी। जो शहिद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी। ”  

असे सुवर्णमय शब्दलालित्य लाभलेले गीत आपण सदैव कृतज्ञतापूर्वक स्मरुण आहोतच! वास्तविकतः  स्वातंत्र्याचा प्रतिक असलेला आपला तिरंगा राष्ट्रध्वज आपल्या सर्वांसाठी सार्वभौमत्वाचा सुगंध पेरीत आहे. तिरंगा राष्ट्रध्वजाचा मान-सम्मान राखणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे हे आपण सदैव  प्राणपणाने पार पाडू या.

१) राष्ट्रध्वजाला सलामी देण्यासाठी उद्या सकाळी जवळच्या केंद्रावर, शाळेत, सरकारी कार्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाला न विसरता वेळेआधीच उपस्थित राहा.

२) प्लॅस्टिक किंवा कागदाचे राष्ट्रध्वज अति उत्साहाने गाड्यांवर वा मोटारसायकल वा सायकलीवर लावू नका.

३)कागदाच्या वा प्लॅस्टिकचा राष्ट्रध्वज लहान मुलांच्या हाती कदापि देवू नका. राष्ट्रध्वज हा राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक आहे. ही सूज्ञपणाची जाणीव ठेवा.व इतरांनाही करुन द्या.

४) राष्ट्रध्वज तिरंगा हा आपल्या देशाची संस्कृती, शौर्य, धैर्य, त्याग - बलिदान यांचे प्रतिक आहे.हे जाणिवपूर्वक लक्षात ठेवा.

५) राष्ट्रध्वज तिरंगाचा अपमान करणाऱ्या घटकांवर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी.

६) तिरंगा राष्ट्रध्वजाच्या गौरवशाली इतिहासाची थोरवी सदैव कथन करा. हा अखंडीत वारसा पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न करा

७) स्वातंत्र्यासाठी शहिद झालेल्या शहिदांचे ऋण आपण अनंत जन्मातही फेडू शकत नाही.ते लढले;फासावर गेले  म्हणूनच आपण स्वातंत्र्य उपभोगतो आहोत. त्यांचा त्याग व बलिदानाशी कृतज्ञ रहा.

  पुढील पिढ्यांचा विश्वास व राष्ट्रनिष्ठा मजबूत करण्यासाठी व राष्ट्रध्वजाला सन्मानाची भावना जागविण्यासाठी आज आपण प्रत्येक जण वचनबद्ध होऊ या..!

🌹 वंदे मातरम् 🌹

© प्रा.पुरूषोत्तम पटेल.

शुक्रवार, मे ०४, २०१८

गुरु महात्म्य

विश्वविजयाचीच्छा असणारा सिकंदर माहिती नाही. असे सांगणारी एकही अभ्यासू व्यक्ती जगात नाही.
प्रसिध्द ग्रिस तत्ववेत्ता अॅरिस्टॉटल हा सिकंदराचा गुरु. हे गुरु - शिष्य एके दिवशी घनदाट जंगलातून गप्पा करित मार्गक्रमण करीत होते. चालता चालता मार्गावर एक खाडी लागली. खोल खाडीतून पाण्याचा प्रवाह जोरात सुरू होता. अॅरिस्टॉटल खाडी पार करण्यासाठी चालू लागताच सिकंदराने त्यांना अडवले. म्हणाला," गुरुदेव आधी ही खाडी तुम्ही नव्हे तर मी पार करीन!" दोघांत बराच हट्ट चालला. सिकंदर ऐकत नाही हे पाहून निरेच्छेने का होईना अॅरिस्टॉटल थांबला. प्रथम सिकंदर खोल खाडीच्या वाहत्या प्रवाहात उतरला. व नंतर अॅरिस्टॉटलने खाडी पार केली. अॅरिस्टॉटल सिकंदरला म्हणाला, "अरे, मी तुझा गुरु आहे. तरी तू माझा अगोदरच खाडी पार करणे हा माझा अपमान नव्हे का?"
सिकंदरने विनम्र प्रणाम करित म्हटले, "गुरुदेव, मी आपला अपमान करणे मला कधीही शक्य नाही. मी आधी खाडीत उतरणं एक शिष्य म्हणून माझे आद्य कर्तव्य केले आहे." अॅरिस्टॉटल म्हणाले, "यात कसले कर्तव्य? "
सिकंदर पुन्हा विनम्र होत म्हणाला," गुरुदेव, खाडीत पहिला उतरणार त्याला काहीच माहिती नसणार; खाडी किती खोल आहे ते. बुडण्याची शक्यताच अधिकम्हणून आधी मी गेलो. आणि... गुरुदेव, अॅरिस्टॉटल वाचला तर लाखो सिकंदर निर्माण होतील पण सिकंदर वाचला तर एकही अॅरिस्टॉटल निर्माण होणार नाही. म्हणून मी असे वागलो."
अॅरिस्टॉटलने सिकंदरचे कौतुक केले.
"धन्य ते गुरु। धन्य ते शिष्य |"
©प्रा.पुरूषोत्तम पटेल

Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...