Kaayguru.Marathi

मंगळवार, जुलै १८, २०१७

जीवनाचे सार

     महाराष्ट्राची भूमी ही संताच्या पदस्पर्शाने पुण्यपावन आहे. याच मातीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, निवृत्ती, आणि नामदेव, एकनाथ तुकाराम, समर्थ रामदास,चोखामेळा, निळोबाराय, जनाबाई, मुक्ताबाई , सकुबाई कान्होपात्रा बहिणाबाई अशी स्त्री  संताची मादियाळी पंढरपूरी चंद्रभागा वाळवंटात दाटू लागली.या संतानी समाजातील उच्च-निच, भेदभाव, विषमता, जातीभेद, हे सामाजिक वैगुण्य दूर करण्यासाठी भाव-भक्तीचा व श्रद्धा भावनांचा अचूक उतारा सांगितला. आपल्या वाणीतून संत ज्ञानेश्वर माऊलीने पसायदान मागितले. संत तुकाराम महाराजांनी तर आपल्या जन्माचेच गुपित उघड केले. ते एका अभंगात म्हणतात,       
     " आम्ही वैकुंठवासी आलो  |
             या चि कारणासी |
बोलीले जे ऋषी| साच भावे वर्तावया ||"
  अशी घुटिका देत संतसज्जनांनी सामान्य  जनांना समतेची अमृत-संजीवनी पाजली.
संत नामदेवांनी मानवी जीवनात नामस्मरण  हरिकिर्तन आणि  भगवंताचे अधिष्ठान अति महत्वाचे आहे.  ते मानवी जीवनाचे खरे सार आहे असे म्हटले. ते एका अभंगात वर्णन करतात,
" धिग तो ग्राम धिग तो आश्रम |
   संत समागम नाही जेथे ||
   धिग ते संपत्ती धिग  ते संतती |
   भजन सर्वाभूति नाही जेथे ||
   धिग तो आचार धिग तो विचार |
   वाचे सर्वेश्वर नाही जेथे ||
   धिग तो वक्ता धिग तो श्रोता |
   पांडुरंग  कथा नाही  जेथे ||
   धिग ते गाणे धिग ते पढणे |
   विठ्ठल  नामे बाण नाही जेथे ||
   नामा म्हणे धिग धिग त्यांचे जिणे |
   एका नारायणे वाचूनिया || "
अर्थ : धिग =धिक्कार, पढणे= शिकून घेणे.
         एका= एक
         नारायणे= श्री विष्णु,श्रीहरी
   या अभंगात संत नामदेव  म्हणतात,
"  जिथे संत समागम नाही त्या गावाचा आणि आश्रमाचा धिक्कार असो. जिथे श्रीहरी चे भजन नाही तेथील संपत्तीचा आणि  संततीचा धिक्कार असो.जिथे वाचावर (जिभेवर )
सर्वेश्वर नाही त्या आचार व विचारांचा धिक्कार असो. जिथे पांडुरंग कथा नाही  असा वक्ता व श्रोता यांचाही धिक्कार असो. जिथे विठ्ठल नाम नाही असे  गाणे आणि वाचन - पठणाचा धिक्कार असो. नारायणावाचून (श्रीहरी) ज्यांचे जगणे असेल त्या जगण्याचाही धिक्कार असो. "
   संत नामदेव या अभंगात संतसंग, श्रीहरी चे भजन, नामसंकिर्तन, नामस्मरण, आणि नारायणाचे अस्तित्व यांचे महत्त्व ठासून मांडत आहे.
* आश्रमात संत समागम  असावा.
* संपत्ती व संतती याच्याकडे भजन असावे.
*आचार-विचार सर्वा ठायी असलेल्या ईश   चिंतनांनी शोभून दिसावे.
* वक्ता आणि  श्रोता  यांचा विषय श्री पांडुरंग कथा असावा.
* गाणे व वाचन यात विठ्ठलनामाचा सुर हवा.
* जगण्यात श्री नारायणाचे अधिष्ठान असावे.
हे त्यांनी मुमुक्षू जनांस आवर्जून सांगितले आहे. नामदेवांच्या काळात भक्ती करण्याचा किंवा ज्ञान सांगण्याचा जो अधिकार होता तो संकुचित झाला होता. त्याच्या कक्षा रुंदावण्याचे काम नामदेव महाराजांनी केले. म्हणूनच नामदेव महाराजांच्या काळात जेवढे संत महाराष्ट्रात निर्माण झाले तेवढे एकाच वेळी पुढे कधी झाले नाहीत. कारण नामदेवाने आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला त्याच्या हक्काची आणि अधिकाराची जाणीव करून दिली आणि व्यक्त होण्यासाठी लिहिते केले. म्हणूनच नामेदवाच्या घरातील एकंदर चौदा जणांचा समावेश होता. त्या सर्वाच्या नावाने अभंग आहेत. ते स्वतः प्रभुनामाचा महिमा व भक्तीज्ञानाचा महिमा एका अभंगात वर्णन करतात...
" नाचू किर्तनाचे रंगी |ज्ञानदिप लावू जगी||    परेहुनी परते घर |तेथे राहू निरंतर ||"
संतांनी या अभंगात पवित्र ईश नामावाचून जगणे ही केवळ जगण्याची उणीव दाखवली नसून त्यांचा धिक्कार केला आहे.  मानवी आयुष्याला पुर्णत्व येण्यासाठी भक्ती आणि देवाठायी भाव असावाच हेआग्रहाने सांगतात.
    मानवी जन्म सार्थ  करावयाचा असेल तर प्रत्येकाने पांडुरंगाची भक्ती, संतसहवास, आणि श्री हरी कथेचे नित्य गायन ही आपल्या
जगण्याची त्रिसूत्री केली पाहिजे.
© प्रा. पुरुषोत्तम पटेल.
   ९४२१५३०४१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...