Kaayguru.Marathi

मंगळवार, फेब्रुवारी ०७, २०२३

सख्या रे...!

सख्या रे,सख्या रे ये ना...
विरह    हा सोसवेना 
मन   माझे  आतुरले 
येऊन  मिठीत  घे ना ।।१।।

तुझ्याविना   करमेना
वाटे   जीवन   उदास
तूच  तर  आहे  राजा
माझा जीवनात खास ।।२।।

सख्या तुझ्याविना भासे
बासुरीचे     मंद   सूर
मन  माझे   शोधते  रे
नको  राहू  रे  तू  दूर।।३।।

उमलेना  थिजली   रे 
तुझी  रे  ही  रातराणी
कोमेजली   श्वेततळी
जणू शुक्राची चांदणी ।।४।।

नभी   मेघांच्या राईत
चंद्र   लाजला   लपून
तनूवरी   या   घालावे
प्रीतरंगी       पांघरुन ।।५।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

बुधवार, जानेवारी १८, २०२३

जग हे ओळखावे![ अष्टाक्षरी]


जग    हे    धावपळीचे
भान   असू   दे  मानवा
व्हावे    पथदर्शक    तू
शोध  आता  मार्ग  नवा  ।।१।।

धन     द्रव्य  संचयासी
नको   करु   मनःस्ताप 
अंत  काळी   पुरे  तुला
तीन     मिटरचे    माप   ।।२।।

जन्म    धन्य   करावया 
व्यर्थ    नको  धावाधाव
घे  तू  हाती  एक शिळा
लिहावया   तुझे     नाव  ।।३।।

आला  तू रिकाम्या हाती
जाशीलही   तू   रिकामा
राम    नामाचा मोत्यांनी
जागा   लाभे  निजधामा ।।४।।

पदस्पर्श    होता    तुझा
व्हावी  प्रफुल्लित  माती
जिव्हाळ्याचा  प्रकाशाने
उजळून    यावी    नाती  ।।५।।

जीव    येथला    करितो
धडपड        जगण्याची
ऐसे   व्हावे    कर्म  थोर
आस   लागो  मिलनाची  ।।६।।

समजून   घे    तू    एक
देवाने     दिले    वरदान
ओंजळीत     येई    तेच 
तव     भाग्याचे  हे  दान ।।७।।

प्रभातीचा    सूर्य    पहा
रोज    येई    नवा   नवा
विसरुन     क्लेश    ताप
तम  जाळी   एक   दिवा ।।८।।

फुला    परी      परिमळ
जगा     अर्पित    करावे
घेता      निरोप   जगाचा
तू    किर्ती  रुपी    उरावे ।।९।।

‌क्षणोक्षणी    येथे    भेटे
कामा     पुरते   मामाजी
कुणी   न्  भला  चांगला
खरा    एक    श्रीरामजी ।।१०।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल 
" पुष्प "


शनिवार, डिसेंबर ३१, २०२२

२०२३ चे स्वागत…नव्हे,स्मरण दिव्यत्वाचे !

२०२३ चे स्वागत…नव्हे,स्मरण दिव्यत्वाचे!
   

   मित्रहो…आज संपूर्ण जगात दूरदूरपर्यंत पाहता २०२२ या सरत्या वर्षाला निरोप देण्याची जय्यत तयारी सुरु असल्याचे चित्र दिसून येते आहे.२०२२ च्या अंतिम दिवसांच्या अस्ताला जाणारा सूर्य आपल्या डोळ्यात साठवून घेण्यासाठी,तसेच आपल्या मोबाईल कॅमे-यात टिपून घेण्यासाठी आबालवृद्ध,त्यातही
तरुणाई सज्ज झाली आहे.जगभरातील सनसेट ( सूर्यास्त) पॉईंट आज तरुणाईच्या गर्दिने फुलून आलेले पाहायला मिळतील.
   …आणि त्याचबरोबर येणारे नुतन वर्ष २०२३ च्या घड्याळातील पहिला ठोका कानात भरुन घेण्यासाठी,उदयाला येणारा रविराज त्याचा सहस्ररश्मींसह डोळ्यात साठवून घेण्यासाठी, उगवत्या रविला साक्ष ठेवून आनंद अनुभवायला तरुणाई उल्हसित झाली आहे. त्यासाठी जगभरातील सनराईज पॉईंट तरुण- तरुणींच्या आगमनाने फुल्लमऽऽफूल झालेले बघायला मिळताहेत.केवढा उल्ल्हास ? केवढी उत्सुकता?किती आतुरता? वर्णन करायला शब्दही कमी पडावेत!
  मित्रहो,ही तर अस्ताचलाकडे जाणा-या सरत्या वर्षातील सूर्याला निरोप देण्याची तयारी मात्र हा सायंकाळी अस्ताचलाकडे जाणारा सूर्य उद्या प्रभाती,वेळ न चुकता,न विसरता, चराचर सृष्टीला नवचैतन्य घेऊन येणारच आहे ना! मला वाटते,सूर्य हा तर जीव सृष्टीचा प्राण. जीव सृष्टीचा चैतन्याचा स्रोत.जीवसृष्टीचा संजीवक.त्याचा एक एक किरण जणू जीवसृष्टीसाठी जगण्याचा श्वासच म्हणा ना! तो आहे म्हणून तर जीवसृष्टीला उभारी देणा-या जलाची ( जल हेच जीवन ) निर्मिती होते.त्याच जलाने जीवसृष्टीची तृषा,तल्ल्खली, दाह ,शांत होतो.मग हे एवढे महान कार्याची जबाबदारी टाकून तो रवीराज जाणार आहे का? नाही जाऊ शकत.जो कायमचा जाणारच नाही,मग त्याला निरोप देणे कितपत योग्य आहे हो? हा माझ्या मनात आलेला मोठ्ठा गुढ प्रश्न ! 
  या गुढ प्रश्नाचे उत्तर शोधतांना मी दृष्टीसमोर एक दिव्य गोष्ट अनुभवली.ती म्हणजे सूर्य रोज प्रभाती रक्तवर्णी रुपाने येतो.रक्ताचा रंग लाल. रक्त हे चैतन्य शक्तीचे अमृतच ! जीव चैतन्यमय व जीवंत असणेचं सिद्ध करणारा महान घटक होय.रोज निवांत झोपलेल्या चराचर सृष्टीला जागृत करण्यासाठी त्यांचे हे रक्तवर्णी रुप.तद्नंतर तो उत्तरोत्तर रजतवर्णी म्हणजेच लख्ख श्वेतवर्णी होतो.जसे रजत म्हणजे चांदी त्यांचा वर्ण रजत…हे धातूबल वाढविणारे रसायन औषध आहे, जे शरीराची ताकद वाढवून पुनरुत्थानास मदत करते.शरीराला ताकत देते, उत्साह निर्माण करते.अगदी तसेच फायदे सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेतल्याने शरीराला भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व " डी " प्राप्त होते. जे हाडांच्या मजबुतीकरिता आवश्यक असते. कोवळ्या उन्हात अंग शेकल्याने सांधेदुखी आणि थंडीमुळे होणारा अंगदुखीचा त्रास दूर होऊन आराम मिळतो.नवीन ताकद अंगात येऊन नवी स्फूर्ती,प्रेरणा अंगी बळावते.
  हाच सूर्य उत्तरोत्तर अस्ताचलाकडे सरकू  
लागतो. पूर्ण अस्ताचलाजवळ जातो तेव्हा त्यांचा वर्ण पित होतो.सूर्याला पाहतांना जणू तो सोन्याचा गोळाच आहे असे भासते.कवी बालकवींची त्याला " सोन्याचा गोळा " ही उपमा दिली आहे.ती अगदी सार्थ वाटते
तेव्हा सुवर्णाचे गुण जणू त्याच्यात उतरतात.
जसे सुवर्णभस्म प्राशन केले तर– मानवी
शरीरावर आलेला तणाव दूर होतो.व शांत झोप लागते असे म्हणतात.त्याचप्रमाणे दिवसभर काम-धाम करुन घरी आल्यावर माणसाला रात्रीची शांत झोप घेता यावी म्हणून सूर्य अस्ताला जातो.जणू पित रंगाने सुवर्णभस्म देऊनच तो जातो.पण…माणसाला आश्वस्त करुन जातो की, 
" बाळा,तू रात्रीची शांत झोप घे.मी तुला प्रभाती चैतन्य देण्यासाठी परत येतोय !" आहे की नाही गंमत ? म्हणूनच तर कुमुदिनीच्या पाकळीत रात्रभर विसावलेला भ्रमर सूर्यतेजाने नवतेज घेऊन मुक्त होतो. खोप्यात विसावलेली पाखरे नभाकडे झेप घेऊ लागतात.वृक्षाची मिटलेली पाने हरित चैतन्याने सळसळू लागतात.कळीची फूले होऊन सुगंध दशदिशांना बागडू लागतो. मंदिरात भाट भूपाळी आळवू लागतात. गायींना पान्हा फूटतो. दवबिंदूंचे मोती-हिरे होतात.हे केवळ सहस्ररश्मींच्या उदयानेच!
     आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आपली भारतीय संस्कृती ही दिव्य,भव्य आणि सुवर्णमयी आहे.तीचे नववर्ष हे चैत्र मासाच्या  प्रारंभी म्हणजेच " चैत्र प्रतिपदेपासून " सुरु होते.त्यामागची कथा  थोडक्यात - आजच्याच दिवशी प्रभू श्रीराम हे वनवासातून सीतामाई,बंधु लक्ष्मणासह अयोध्यापुरीत परतले.तो आनंद शब्दातीत! या दिवशी खूप छान गोडधोड,खिर-पुरणपोळी, श्रीखंड,बासुंदी-पुरी पदार्थ बनवून एकमेकांसोबत आनंदाने आस्वाद घेतो.कोणत्याही पक्षी,प्राण्यांचा जीवावर उठून हा उत्सव साजरा होत नाही.ही वैभवशाली संस्कृती आपली आहे.
     गुढीला कुंकू अक्षता वाहून मनोभावे आपल्या नवीन वर्षाला सुरवात करतात. हा आपल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण. त्याचे दिव्य स्मरण म्हणूनच आपण घराच्या मुख्य दरवाजाच्या समोरच गुढी उभारुन आनंदोत्सव साजरा करतो.हेही विसरणे म्हणजे कृतघ्नपणाचे ठरेल. 
  अजून एक गोष्ट सांगता येईल.हा सूर्य बारा तासांसाठी आपली विश्रांतीसाठी काळजी घेतो.त्याचे हे किती मोठे औदार्य ! आई जितके प्रेम, जिव्हाळा आपल्या बाळावर करते,तिला बाळाचा जितका लळा असतो. तितकेच प्रेम हा सूर्य देव चराचर सृष्टीतील आपल्या लेकरांवर करतो.जणू चैतन्यमयी आई बनून! प्रत्येक लेकराला आईची माया, कृपेची छाया सदैव जवळच असावीशी वाटते.आई जिथे जाईल, तिथे त्याच्याबरोबर तिच्या पदराला धरुन लेकरु-बाळ सोबत जाणारच ! हे सांगण्यासाठी कोणी तज्ज्ञ ज्योतिषाची गरज नाही ते तर अटळ सत्यच! आपल्या बाळाला आराम मिळावा म्हणून आई अंगाई गाऊन त्याला जोजवते; झोपवते.अन् ती स्वतः काम-धाम करते.
अशा आईला आपण कधीच निरोप देऊ शकतच नाही. का ? तर तिचा प्रेमपान्हा, ममत्वाचा झरा,तो आपणास कायम प्राशन करता यावा.अगदी तसेच सूर्याचेही ! अशा चैतन्यशक्तीच्या महानस्रोताला निरोप दिला तर…तर त्याचा अस्तित्वाविना ही जीवसृष्टीच संपून जाईल.म्हणून मी तर म्हणेेन,ज्याचातून संपूर्ण ब्रम्हांडाची निर्मिती करणा-या ब्रम्हाची निर्मिती झाली.त्याला निरोप देणे योग्य नव्हेच ! तर त्या हिरण्यगर्भाची प्रार्थना करणे मनुष्यासाठी चराचर सृष्टीचा हितासाठी योग्य ठरेल.
🌹।। ॐ हिरण्यगर्भाय नमः ।।🙏

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, डिसेंबर ३०, २०२२

मैत्रीची गंगोत्री!

मैत्रीची गंगोत्री!

  मैत्री म्हणजे काय? याचे उत्तर जर मी दिले तर ते असे असेल–
" मैत्री म्हणजे निखळ, निकोप असा भाव असलेले आणि कुठलेही अंतर न ठेवता दोघांनीही जपलेले एक नि:शब्द नाते होय."
🔻आता दोघांत वा परस्परात मैत्री कशी असते ? याबाबत विचार करता-- 
१) मैत्री एकमेकांना सन्मानित करणारी असते.
२) मैत्री मित्राला अवमानित करणारी नसते, तर एकमेकांचा मान वाढविणारी असते.
३) मैत्री वेदना देणारी नसते तर प्रेरणा देणारी असते. 
४) मैत्री मित्रांसाठी वेळ देणारी असते. मित्रावर कपट-कारस्थान करुन घाव घालून काळ ठरणारी नसते.
५) मैत्री नि:स्वार्थ साथ देणारी असते.प्रसंगी स्वतः जवळ असेल ते मित्राला देणारी असते. स्वार्थ पाहणारी नसते.
६) मैत्री बेचैन मनाला सुखावणारी असते,मन दुखावणारी नसते. 
७) मैत्री बदल घडवणारी असते, बदला घेणारी नसते.
८) मित्र हा आपल्याला अत्यंत जवळचा वाटणारा असतो .
९) आपला मन:स्थिती निराश असताना सुद्धा तो स्वतःला विसरुन आपल्याला हसवण्याचा प्रयत्न करतो. 
🔻 मैत्री कोणात होऊ शकते? यांचे उत्तर – मैत्री ही मित्राची मित्रांशी होते.तशी मैत्री ही मित्रांशी तशीच मैत्रीणीशीही असू शकते. का? तर मैत्रीत स्त्री - पुरुष हा भेदभाव मुळी नसतो. मैत्री हे एक अनमोल नाते आहे.त्याचे मोल होऊच शकत नाही.उदा.कर्ण हा दुर्योधनाचा अत्यंत जवळचा मित्र होता.कुरुक्षेत्रावर महायुद्धात कुंतीमातेद्वारा त्याला समजले की, पांडवांचे आपण जेष्ठ भाऊ आहोत.तरी त्याला त्याक्षणी बंधुप्रेम रोखू शकले नाही.तर त्याने मातेला वचन दिले की, " उद्या तुझे पाच पुत्र जीवंत पाहशील.त्यात एक तर मी कर्ण असेन किंवा अर्जुन असेल!" असे सांगितले.मात्र दुर्योधनाशी असलेली मैत्री न त्यागता,युद्धात त्याचा बाजूने लढणे सोडले नाही.कारण, प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची असते.  
  असे सांगितले जाते की,प्रेम तर सगळ्यांना एकदा तरी रडवतेच आणि मैत्री ही दुःखातही हसवण्याचे कार्य करते. उदास मनाला खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देते.
   मैत्री हा असा वटवृक्ष आहे की,त्याचा विश्वासाचा पारंब्या ह्या सदोदित आकाशाला नव्हे;तर जमीनीलाच स्पर्श करतात.[पारंब्या ह्या जिव्हाळा,ममत्वाचे प्रतिक आणि जमीन हे हृद्य आत्मियतेचे व निगर्वीतेचे प्रतिक होत. ]  
  मैत्रीचा विचार करता,मित्रांचे प्रकार पाडता येतील.म्हणजे बालपणापासूनचा मित्र तो लंगोटी मित्र, सुख-दु:खात धिर देतो तो हृदयमित्र,शाळा-कॉलेजात सर्व सहकार्य करतो तो पेनमित्र-शाळामित्र, एखादी कला,विद्या मिळविताना सोबत असलेला गुरुमित्र असे सांगता येतील. पाळीव प्राणी सुद्धा आपले मित्र असू शकतात.उदा.हत्ती या प्राण्याची मैत्री दाखविणारा राजेश खन्नाचा चित्रपट " हाथी मेरे साथी " , कुत्र्याचा मित्रनिष्ठा आपण सर्व जाणून आहोत-ती मैत्री दाखविणारा जॅंकी श्राॅफचा " तेरी मेहेरबानीयॉं " आणि गायीची मैत्री सिद्ध करणारा " गाय और गौरी " हा जया भादुडी-बच्चनचा चित्रपट.हे चित्रपट पाळीव प्राणी आणि माणसाचे आदर्श मित्रत्वाचे नाते सिद्ध करतात. 
  मैत्री हे असे नाते आहे ज्या नात्याला रंग,रुप, जात,धर्म,
पंथ,भाषा,लिंग,वय,प्रांत,संपत्तीशी काही देणेघेणे नसते.
मैत्रीचे नाते निरपेक्ष असते
जे रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट बनते. 
उत्तम मित्राची लक्षणे:-
🔻मित्राला मनातील भावना व्यक्त करताना कधीच संकोच वाटत नाही.
🔻 स्वतःकडून अनावधानाने काही चूक वा अयोग्य घडलेच तर,मित्राला सांगण्यात व कबुली देण्यास तो कधीच कचरत नाही.
🔻एक मित्र आपले पराक्रम, कर्तृत्व आनंदाने कथन करतो.
🔻त्याच्या मनात मित्राविषयी कधीच वाईट विचार येत नाही.
🔻 मैत्रीचे प्रकार - 
पौराणिक मैत्री-
श्रीराम आणि रावणाचा बंधु बिभिषण,तसेच श्रीराम आणि सुग्रीव यांची मित्रता,श्रीकृष्ण आणि सुदामदेव यांच्यातील मैत्री ही त्रिखंडात पौराणिक मैत्रीचे आदर्शवत उदाहरण म्हणून प्रसिद्ध आहे.
   मैत्री ही निर्मळ आणि वासना विरहित असते.तिला स्वार्थाचा लवलेशही नसतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील स्नेहबंध होय. तसेच राधा आणि कृष्ण यांच्यात असलेला मैत्रीच्या संबंध सांगता येईल.
🔻ऐतिहासिक मैत्री-
इतिहासाचा विचार करता,मला तर वाटते की, सम्राट पृथ्वीराज चौहान आणि त्याचे जीवलग मित्र चांदबराई यांच्या मैत्रीचा उल्लेख करता येईल.सम्राटांच्या अखेरपर्यंत त्यांना सोबत तर केलीच! पण,योग्य ती क्लुप्ती वापरुन मोहम्मद घोरीच्या वध सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्याच हातून ' शब्दवेधी ' बाणाने करविला. 
 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपतीं शिवाजी 
महाराज व तानाजी मालुसरेंची मैत्री-- त्यातून " आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे!" म्हणत कोंढाणा सर करणारे तानाजी मालुसरे व राजांनी तानाजीच्या बलिदानाचे स्मरण येणा-या पिढ्यांना कायम होण्यासाठी नामकरण केलेला सिंहगड विसरता येणार नाही.
दुसरी मैत्री- " महाराज ! तुम्ही विशाळगडावर पोहचा.तो पर्यंत मी ह्या घोडखिंडीत शत्रूला अडवूनच ठेवतो !" हा शब्द देऊन शिवराजांच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावणारे बाजीप्रभू देशपांडे, त्यांनी आपले बाजी हे नावच सार्थकी लावले...त्यांचा त्यागाचे स्मरण करुन देणारी पावनखिंड आज आपल्याला विसरता येणार नाही.असे  अगणित मित्र छत्रपती शिवाजी महाराजांनी जमविले.त्यांच्या मैत्रीला शतशः प्रणाम!🙏
पाळीव प्राण्यांची मैत्री-
  पाळीव प्राणी हे सुद्धा उत्तम मैत्रीचे उदाहरण देता येईल.ते तर माणूसही निभावणार नाही अशी मैत्री करतात.ही उदाहरणे प्रमाणभूत सिद्ध झाली आहेत.राजा महाराणा प्रतापांचा घोडा ,अत्यंत जखमी झाला असतानाही स्वतःच्या प्राणांची तमा न बाळगता,राणांना शत्रूपासून वाचविण्यासाठी दूर सुखरुपस्थळी घेऊन विसावला.राणाजीकडे पाहून अश्रू निमाले.व तिथेच धन्याला सुखरुप पाहून त्याने प्राण सोडले " धन्य धन्य चेतक घोडा! " त्यांची ही कृतज्ञता सारथ्य आजही चितोडगडात " चेतक का चबुतरा " स्थळी मैत्रीची धन्यता सिद्ध करतो आहे..
   छत्रपती शिवाजीराजे यांचा मोती श्वान रायगडावर पाहता आपली धन्यता सिद्ध करतो आहे.आणि कृष्णा घोडी हे आदर्श सारथीची उदाहरणे देता येतील. हे प्राणी असले तरी,त्यांची मैत्री,अढळ निष्ठा मानवाला पुसून काढता येणार नाही.मानवी ( राजे) मैत्रीचे हे अतुलनीय उदाहरण म्हणून इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली गेली आहेत.
  सोबत असताना कधी कधी रडता रडता हसवणारी, तर कधी दूर गेल्यावर त्याच मित्र आणि मैत्रिणीच्या आठवणी मध्ये हसता हसता रडवणारी अशी घट्ट मैत्री असावी.तर कधी प्रेमामध्ये हरल्यानंतर घनदाट अंधारामध्ये हरवलेल्या मनाला देखील काजव्याच्या प्रकाशाने प्रसन्न करणारी मैत्री असावी.हीच मैत्री जीवनात सुखाचे नंदनवन फुलवू शकते.

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

रविवार, डिसेंबर ११, २०२२

प्यारी यारी!


प्यारी तुझी माझी यारी
दोस्ता  रेऽ  जगावेगळी
प्यारीराहो   अशीच   टिकून
यथा  तथा   सर्वकाळी ।।१।।

एक    सिनेमा  आपण
बघायचो     एकेकटे !
अर्ध्या अर्ध्या सिनेमाची
दोन    मिळून   तिकिटे ।।२।।

झाला   सिनेमा   पाहून
सांगायचे   दोघे   स्टोरी
आहे  की नाही आमची
गोष्ट  अशी  लई   भारी ।।३।।

मित्रा  तुझ्या रे  प्रेमाची
तोड नाही  रे  या जगी
भेट  तुझी माझी  होता
जणू   आनंदाची  सुगी ।।४।।

यारी  तुझी  अन् माझी
राहो   टिकून    अभंग
देवा जन्मोजन्मी लाभो
आम्हा  मित्रसख्य  संग ।।५।।

एक   मागणे    मागतो
सुखेनैव    राहो    यारी
यावी   कधी  न  कटुता
बुद्धी   दे    कृष्णमुरारी ।।६।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...